Jump to content

अरुण कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरुण कांबळे
धर्म बौद्ध
चळवळ दलित चळवळ
संघटना दलित पँथर्स
प्रभाव भीमराव रामजी आंबेडकर
अपत्ये

अपरांत कांबळे

आशुतोष कांबळे

अरुण कृष्णाजी कांबळे (१४ मार्च, १९५३: करगणी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - २० डिसेंबर, २००९:हैदराबाद, तेलंगणा) हे दलित चळवळीचे लढाऊ नेते, [[नामांतर आंदोलन] व मंडल आयोग अंमलबजावणीचा पाठपुरावा करणारे, नवबौद्धांना केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे म्हणून कमकरणारे राजकारणी आणि मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते दलित पॅंथर्स या संघटनेचे संस्थापक-सदस्य व अध्यक्ष होते. समाजातील विषमता नष्ट होऊन, समाज एकजिनसी व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. यांना प्रभावी वक्तृत्व आणि कणखर नेतृत्वासाठी ओळखले जाते.

सुरुवातीचा काळ

[संपादन]

कांबळे यांचा जन्म १४ मार्च, १९५३ रोजी सांगली जिल्ह्यात करगणी या गावी झाला. त्यांच्या आई शांताबाई या गटशिक्षणाधिकारी आणि वडील कृष्णाजी दिघंची येथील जीवन शिक्षण मंदिर या शाळेत शिक्षक होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण करगणी येथे झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात आले. त्यांनी मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून एम.ए.ला मराठी विषयात सुवर्ण पदक मिळवले व १९७३ मध्ये प्राध्यापकी पेशात प्रवेश केला. ते १९८३ पर्यंत वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात; तर १९८३ ते १९९० पर्यंत ते दादरच्या कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९९१ पासून ते मुंबई विद्यापीठात होते. कीर्ती महाविद्यालयात असतानाच त्यांनी मराठीच्या अभ्यासाबरोबरच चळवळीत भाग घेणे सुरू केले.

आपल्या कारकीर्दीच्या शेवटी ते विद्यापीठाच्या मराठी विभागाअंतर्गत प्राध्यापक व फुले-आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक म्हणून काम पाहत होते. कांबळे यांचा प्रामुख्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत वावर होता. चतुरस्र व्यासंगी, सडेतोड भाषा आणि प्रबळ वक्तृत्वाची त्यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कीर्ती होती. त्याचा विवाह आंतरजातीय असल्याकारणाने त्यांना जातीय संघर्षांना तोंड द्यावे लागले.

राजकीय कार्य

[संपादन]

एम.ए.करत असतानाच त्यांचा दलित चळवळीचे नेते राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्याशी संबंध आला. १९७३-७४ च्या काळात त्यांनी दलित पँथरची अधिकृतपणे स्थापना केली व तेथून आंबेडकरी चळवळीमध्ये प्रवेश केला. कांबळे यांचे राजकीय वक्तृत्त्व स्फोटक आणि प्रभावी असत. याद्वारे ते दलित चळवळीचा केंद्रबिंदू बनले. काही वर्षांनी त्यांनी जनता दलामध्ये प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्याशी त्यांचा घनिष्ट संबंध आला. मागास वर्गासाठी आरक्षण आणि सवलती देण्यासाठी त्यांनी सिंग यांच्याकडे प्रयत्न केला. १९८४ सालच्या मंडल आयोग अंमलबजावणी परिषदेचे ते निमंत्रक होते.

दलित पँथर

[संपादन]

१९६८-७० या काळात दलित पॅंथर्स मधील सर्जनशील तरुणांनी तत्कालीन प्रस्थापित रिपब्लिकन नेतृत्वाला आणि त्याचबरोबर दलित साहित्यातील सारस्वतांना आव्हान दिले. त्यावेळी कांबळे १५ वर्षांचे होते. त्या बंडाचा त्यांच्यावरचा प्रखर प्रभाव पडला. महाराष्ट्राच्या साहित्याचा आणि राजकारणाचा बाज बदलण्यासाठी पॅंथर्सच्या कार्यकर्त्यांना या दशकातच आपल्या घट्ट रुतलेल्या हितसंबंधांच्या व्यवस्थेने विस्कळीत करून टाकले. आणीबाणीनंतर जनता पक्षाने आणि विशेषतः त्यांच्यातील समाजवादी मंडळींनी काही पॅंथर्सना जवळ केले. कांबळे तेव्हा पंचविशीत होते. आपण पॅंथर्सना पुन्हा प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कांबळे आणि पँथर्समधील नेतृत्त्वात वयाचे अंतर फारसे नसले तरीही विस्कळीत झालेले दलित नेते आणि साहित्यिक, राजकीय व सांस्कृतिक व्यासपीठावर ते एकदिलाने एकत्र आले नाहीत. त्यानंतर काही महिन्यांतच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर सर्व दलित नेते, त्यांचे समर्थक समाजवादी आणि कॉम्रेड्स एकत्र आले आणि त्या चळवळीने कांबळे यांच्या दलित एकजुटीबद्दलच्या आशा पुन्हा वाढल्या.

जनता दलातील दिवस

[संपादन]

जनता पक्षाचे सरकार केन्द्रात सत्तेवर असताना पंतप्रधान चरणसिंग यांनी मंडल आयोगाची स्थापना केली होती परंतु त्याचा अहवाल पूर्ण व्हायच्या आतच जनता सरकार गडगडले आणि अनपेक्षितपणे इंदिरा गांधींचा नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर लगेचच जनता पक्षाच्या आधारे उभे राहिलेले गट व नेते मुख्य प्रवाहाच्या एकदम बाहेर फेकले गेले. खुद्द कांबळे यांच्याही स्वतःबद्दलच्या आणि आपल्या स्थानाविषयीच्या प्रतिमा उंचावल्या होत्या आणि समाजात आपल्या विचारांनी व कृतीमुळे अर्थपूर्ण परिवर्तन आणता येईल, असे त्यांना वाटू लागले होते. परंतु जनता सरकारचा पाठिंबा गेल्यावर इतर नेत्यांप्रमाणे कांबळे यांनी स्वतःच्या राजकारणाचा पुनः शोध घेणे सुरू केले. काँग्रेस सरकार सत्तेवर असताना साधारणपणे एक दशकभर मंडल आयोगाचा अहवाल बासनात गुंडाळला गेला होता. विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आकस्मिकपणे तो अहवाल अंमलात आणला जाईल असे घोषित केले. विश्व हिंदू परिषदलालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेल्या रथयात्रेला शह देण्यासाठीची ही चाल होती.. अयोध्येला ‘‘त्याच जागी’‘ म्हणजे बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर बांधण्याचा निर्धार करून योजलेली ती यात्रा हे विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या सत्तेला आव्हान होते. त्या यात्रेच्या राजकारणाला शह देण्यासाठी म्हणून मंडल अहवाल बासनातून बाहेर काढला. दुर्दम्य आशावादी असलेल्या कांबळेंना मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत राजकारण नाही तर सामाजिक क्रांतीची सुरुवात आढळली.

वाङ्मयीन काम

[संपादन]

कांबळे यांचे ‘‘रामायणातील संस्कृतीसंघर्ष’‘ प्रबंधरूपी पुस्तक १९८२मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी जेव्हा याविषयीचे लेखन केले तेव्हा डॉ. आंबेडकरांचा रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कांबळेंनी वाचला नव्हता. रिडल्स... बद्दलचा वाद वेगळ्या स्वरूपात १९८७ मध्ये भडकला. रथयात्रेनंतर म्हणजे १९९० सालापासून भारतातील राजकारणाला धार्मिक रंग आल्याचे मानले जाते परंतु राम आणि कृष्ण यांचा सांस्कृतिक राजकारणात १९८२ पासूनच संदर्भ येण्यास सुरुवात झाली होती. याच्यामुळे भारतीय राजकारणात उलथापालथ होणार याचा अंदाज कांबळेंना अगोदरच लागला असावा.

विजय तेंडुलकरांनी कांबळेंच्या ग्रंथावर टिप्पणी करताना म्हणले की - ‘‘या छोटेखानी पण वैचारिक पुस्तकाचे मी स्वागत करतो. मराठीत जेव्हा विद्वत्ता सिद्ध करायची असते तेव्हा ४०० ते ५०० पानांचा ग्रंथ लिहावा लागतो. रामायणावर तर तो हजार पानांचाही होऊ शकला असता; पण अरुण कांबळे यांनी ते केवळ ७०-७५ पानांत सिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या परिच्छेदा-परिच्छेदातून संशोधनाची तळमळ असल्याचे दिसून येते. एकही वाक्य निराधार नाही.. आणि आवेश आहे; पण तो मैदानी किंवा सनसनाटी माजविण्यासाठी आलेला नाही.. हे पुस्तक हा एक सत्याचा शोध आहे आणि तसा शोध ज्या समाजात होत नाही तो समाज मेलेला असतो. अरुण कांबळे यांच्यासारखी माणसे या समाजाची आशास्थाने आहेत.’’

आपल्या कारकीर्दीच्या गर्दीत त्यांनी सांगलीशी आपला संबंध कायम ठेवला. आपली आई शांताबाईंच्या माज्या जल्माची चित्तरकथा या पुस्तकाचे तसेच मी कृष्णा या आपल्या वडिलांच्या आत्मकथनाचे प्रकाशन त्यांनी केले. आपल्या पालकांच्या सृजनशीलतेचा वारसा कांबळे यांनी आपल्या लेखनात वापरला. प्रस्थापित विचारवंतांविरुद्ध वाद करताना प्रचलित वैचारिक वातावरणातील सर्व प्रवाह त्यांनी समजून घेतले आणि स्वतःच्या मुद्द्यावर गहन विचार करून तो परखून पाहिला. यामुळे त्यांना पूर्वसुरी आणि आपल्या विचारांमधील फरक काय आणि क्रांतिकारक काय हे त्यांना मांडता आले. असे न करता येणाऱ्या साहित्यिकांपैकी काही दलित साहित्यिक सुद्धा होते. अशा दोन प्रकारच्या पँथर कवी, पुढारी आणि विचारवंत यांच्यातील कलह तात्त्विक कि वैचारिक हे त्यांनाच ठरविता आलेले नाही आणि कदाचित त्यामुळे रिपब्लिकन वा पॅंथर यांच्यामधील एकजुटीचे प्रयत्न गेली ३० वर्षे सफल झालेले नाहीत. कांबळे त्यामुळेही अस्वस्थ असत.

प्रभावी वक्तृत्व

[संपादन]

कांबळे आपल्या भाषणातील वक्तव्यांना पुराव्यानिशी संदर्भ देत असत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चळवळीतले कार्यकर्ते सुद्धा दुखावले जात. परंतु कांबळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जिवंत संबंध आणि सहज संवाद ठेवीत असत. कॉलेजात शिकवतानाही विद्यार्थ्यांना ते आपल्या विषयाबाहेरचे अनेक सांस्कृतिक-सामाजिक संदर्भ देऊन त्यांच्या जाणिवांच्या कक्षा विस्तारीत असत. विद्यापीठातल्या एका व्यासपीठावर उदय रोटे नावाच्या विद्यार्थ्याने आपला प्रबंध प्रभावीपणे सादर केला. त्यानंतर जेवणाच्या वेळेत कोणीतरी कांबळेंना म्हणले, हा रोटे आपल्यापैकीच आहे ना? तेव्हा कांबळेंनी लगेच जवळच असलेल्या आपल्या एका विद्यार्थ्याला जवळ बोलवून विचारणाऱ्याला सांगितले, हा अभिजीत देशपांडे. हाही आपल्यापैकीच आहे. याप्रकारे त्यांची जातजाणीव ठरलेल्या साच्याची नव्हती असे कळून येते.

शेवटचा काळ

[संपादन]

कांबळे यांना अभिप्रेत असलेले सामाजिक न्यायाचे राजकारण मंडलवादानंतरही फार पुढे गेले नाही. ज्या ‘‘रामायणातील संस्कृती संघर्षांवर’‘ त्यांच्या लेखनाने वाद निर्माण केले त्यातील धर्मवादी व प्रतिगामी प्रवृत्तींनी राजकारणात जम बसविला. शेवटचे काही दिवस कांबळे राजकारणात आणि साहित्यसृष्टीतून अदृष्य झाले होते. त्यातच त्यांचा गूढ मृत्यू झाला.[]

मृत्यू आणि वक्तव्ये

[संपादन]

रिपब्लिकन मूव्हमेंटसह अनेक संघटनांनी केली होती. त्यांचा मृतदेह बेवारस स्थितीत सापडला. त्यांचा मृत्यू नसून हत्या असावी, असा संशय रिपब्लिकन मूव्हमेंटचे संयोजक नरेश वाहणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारतर्फे या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक पाठवावे, असेही पत्रकात नमूद केले गेले.

संपत गायकवाड म्हणाले, की अरुण यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा कणा मोडून पडला आहे. ते खंदे दलित कार्यकर्ते होते. शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारा त्यांनी आयुष्यभर जोपासली. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले की शून्यातून उभा राहिलेले अरुण अचानक निघून गेले. त्यांनी ही चळवळ आणखी पुढे नेली असती. वैजनाथ महाजन म्हणाले की अत्यंत हुशार, अत्यंत प्रतिभावान असलेल्या अरुण कांबळे यांच्याकडे लेखनाची अद्वितीय गुणवत्ता होती. त्यांच्याकडे बौद्धिक आणि सांस्कृतिक उंची होती.[]

त्यांच्या पश्चात दोन्ही मुले अपरांत, आशुतोष, पत्नी प्रा. अवनी कांबळे, बहीण प्रा. मंगला तिरमारे आणि आई शांताबाई कांबळे, भाऊ चंद्रकांत कांबळे असा परिवार आहे.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
धर्मांतराची भीमगर्जना संशोधन प्रतिमा प्रकाशन १९९६
वाद-संवाद वैचारिक प्रतिमा प्रकाशन १९९६
चिवर [] ललित आशय प्रकाशन १९९५
युगप्रवर्तक आंबेडकर वैचारिक आशय प्रकाशन १९९५
रामायणातील संस्कृती संघर्ष सांस्कृतिक संशोधन पॅंथर् प्रकाशन १९८२,१९८७
चळवळीचे दिवस आत्मकथन आशय प्रकाशन १९९५
अरुण कृष्णाजी कांबळे काव्यसंग्रह संकल्प प्रकाशन १९८३
मुद्रा काव्यसंग्रह प्रा. अरुण कांबळॆ स्मारक न्यास २०१०

इतर लेखन कार्य

[संपादन]
  • आंबेडकर भारत हे अनियतकालिक सुरू केले.
  • बाबासाहेब आंबेडकरांच्या जनता पत्रातील लेखांचे केलेले संपादन
  • सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या 'दक्षिण महाराष्ट्र' या साप्ताहिकातून स्तंभलेखन

निवडक भाषणे

[संपादन]
  • पनवेल येथील भाषण[].
  • पंढरपूर येथील भाषण[]
  • यांचे अमरावती येथील भाषण[]
  • यांचे परभणी येथील भाषण[]
  • दलितांवरील माहितीपट (मुंबई:डॉ.अरुण कांबळे यांचा धारावी तील दलितांशी संवाद)[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय!". 2010-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ "प्रा.अरुण कांबळेंच्या निधनाने सांगलीवर शोककळा". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-02 रोजी पाहिले.
  3. ^ "चिवर part-1". 2011-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-03 रोजी पाहिले.
  4. ^ Prof. Arun Kamble's Speech at Panvel
  5. ^ Prof. Arun Kamble's Speech at Pandharpur
  6. ^ Prof. Arun Kamble's Speech at Amaravati
  7. ^ Prof. Arun Kamble's Speech at Parbhani
  8. ^ "Mumbai's Way: Il buddismo negli slum. Visita a Daharawi con il Dr. Arun Kamble". 2012-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-03 रोजी पाहिले.