वामन कृष्ण चोरघडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वामन कृष्णराव चोरघडे
जन्म नाव वामन कृष्णराव चोरघडे
जन्म १६ जुलै १९१४
नरखेड , जि. नागपूर
मृत्यू ०१ डिसेंबर १९९५
धरमपेठ , नागपूर
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र साहित्य
साहित्य प्रकार कथा कादंबरी
विषय मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती संपूर्ण चोरघडे
वडील कृष्णराव देवराव चोरघडे
आई गंगुबाई कृष्णराव चोरघडे
अपत्ये सुषमा , श्रीकांत

वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे (जन्म : नरखेड, १६ जुलै १९१४; मृ्त्यू : १ डिसेंबर १९९५] हे मराठी लघुकथालेखक होते. कथासंग्रहांशिवाय त्यांनी सुमारे ९२ ललितलेख, चरित्रे, प्रबंध, पाठ्यपुस्तके, इ. लिहिले किंवा त्यांत योगदान दिले.

ओळख[संपादन]

वामन चोरघडे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे झाला. त्यांच्या एकूण बारा भावंडांमधली चार जगली. सर्वात धाकटे म्हणजे बापू ऊर्फ वामन. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठय़ा भावाने घेतली, आणि त्यांना काटोल गावातल्या एका प्राथमिक शाळेत घातले. पुढचे शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूल या शाळेत, आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मॉरिस कॉलेजात झाले.

कॉलेजात असताना चोरघडे त्यांची पहिली लघुकथा कथा 'अम्मा' १९३२ साली प्रसिद्ध केली. त्यांच्या कथा वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत गेल्या.

चोरघडे यांनी डॉ. वेणू साठे यांच्याशी विवाह केला. त्यांचे चिरंजीव श्रीकांत चोरघडे हे बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ आहेत.

वामन चोरघडे यांनी मराठी साहित्य व अर्थशास्त्र यां विषयांत पदवी मिळवली होती. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेक्सरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले.

ते दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते.

महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता.

नोकऱ्या आणि स्वातंत्र्यलढा[संपादन]

एम.ए. झाल्यावर वामन चोरघडे यांना वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा परिचय झाला. तुरुंगात त्यांनी खादीचे व्रत घेतले व मृत्यूपर्यंत पाळले. चोरघडे हे नेहमी खादीचा कुडता, पायजमा अशा स्वतः धुतलेल्या स्वच्छ पांढऱ्या वेषातच असत.

चोरघडेंना हे नियमित व्यायाम करीत असून त्यांची शरीरयष्टी मजबूत होती. त्यांचे उच्चार स्पष्ट होते. चोरघडे हे उत्तम वक्ते मानले जात. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारास त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली. त्यानंतर ते गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वर्ध्याच्या गोविंदराम सक्सेरिया वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले, इ.स. १९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच चोरघडे प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले.

समाजकार्य[संपादन]

महाराष्ट्रातचे मंत्री रामकृष्ण पाटील यांनी चोरघड्यांना मानद अन्नपुरवठा अधिकारी हे पद दिले होते. पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

त्यावेळी विविध शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चोरघडे यांनी श्रमसंस्कार पथक स्थापन केले होते. या विद्यार्थ्यांनी श्रमदानाने नागपूर विद्यापीठाच्या परिसरात ओपन एर थिएटर बांधून घेतले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • असे मित्र अशी मैत्री (बालसाहित्य)
  • ख्याल
  • चोरघडे यांची कथा (१९६९)
  • जडण घडण (आत्मचरित्र, १९८१)
  • देवाचे काम (बालसाहित्य)
  • पाथेय (१९५३)
  • प्रदीप (१९५४)
  • प्रस्थान
  • यौवन
  • वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ आणि २ (संपादक आशा बगे आणि डॉ. श्रीकांत चोरघडे)
  • संपूर्ण चोरघडे (१९६६)
  • साद
  • सुषमा (१९३६)
  • हवन

गौरव[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]