महेश एलकुंचवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"महेश एलकुंचवार यांची नाट्यसृष्टी भारतीय रंगभूमीवरील महान दस्तऐवज":


भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाटय लेखनात केलेले आहेत. ज्यात वास्तववादी , प्रतीकात्मक, अभिव्यक्तीवादी शैलीत त्यांनी रचना केलेल्या आहेत. सर्जनशीलता ही त्यांच्याकडे उपजत आहे.जीवनवादी नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जन्म ते मृत्यू यासारख्या विविध थीम त्यांनी मांडल्या आहेत. तीन ते चार दशकांहून अधिक काळ आधुनिक भारतीय रंगमंचावर त्यांचा प्रभाव आहे. 1967 मध्ये सत्यकथा या प्रख्यात साहित्यिक मासिकात "सुलतान" या त्यांच्या एकांकिकेच्या प्रकाशनानंतर महेश एलकुंचवार नाट्यसृष्टीत प्रकाशझोतात आले . प्रसिद्ध दिग्दर्शक विजया मेहता यांनी एलकुंचवार यांची नाट्यकृती रंगमंचावर आणली.1969 आणि 1970 मध्ये होळी आणि सुलतान यांच्यासह रंगायनसाठी त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले.महेश एलकुंचवार यांच्या नाटकांवर आधारित होली ,रक्तपुष्प, पार्टी , विरासत अशा अनेक व्यावसायिक चित्रपटांनंतर यश मिळाले. महेश एलकुंचवार यांच्या नाटकांचे अनेक भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये भाषांतर केले गेले. (इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन इत्यादी)

1984 मध्ये त्यांच्या होळी या नाटकावर केतन मेहता यांनी होली या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यासाठी महेश एलकुंचवार यांनी पटकथा लिहिली होती. त्याच वर्षी गोविंद निहलानी यांनी महेश एलकुंचवार यांच्या पार्टी नावाच्या नाटकावर आधारित ‘पार्टी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोनाटा या एलकुंचवार यांच्या अभिजात नाटकावर आधारित

चित्रपटात अपर्णा सेन, शबाना आझमी आणि ललित दुबे यांनी भूमिका साकारल्या आहेत.महेश एलकुंचवार यांची नाट्यसृष्टी भारतीय रंगभूमीवरील महान दस्तऐवज आहे.

संदर्भ:

1. महेश एलकुंचवार; शांता गोखले आणि मंजुळा पद्मनाभन (अनुवाद) (2004). सिटी प्ले (प्लेस्क्रिप्ट). सीगल बुक्स. आयएसबीएन 8170462304. २. महेश एलकुंचवार खंड १( संग्रहित नाटकः ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस) २००८.

3. महेश एलकुंचवार खंड २ ( संग्रहित नाटकः ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस) २०११.



महेश एलकुंचवार
जन्म ९ ऑक्टोबर १९३९

महेश एलकुंचवार (जन्म : ९ ऑक्टोबर १९३९)

महेश एलकुंचवारांचा जन्म विदर्भातील परवा गावात स्थलांतरीत तेलगू ब्राह्मण कुटुंबात झाला . वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी आपले आईवडील आणि जन्मगाव सोडून दिले . त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मॉरिस महाविद्यालयात आणि पदवीत्तर शिक्षण इंग्रजी साहित्यात नागपूर विद्यापीठातुन झाले . हे मराठीतील साठोत्तर कालखंडातील एक महत्त्वाचे नाटककार आहेत. त्यांच्या वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त या तीन नाटकांचा मिळून मराठी रंगभूमीवर झालेला सलग दीर्घ रंगमंचीय प्रयोग वैशिष्ट्यपूर्ण ठरला असून तो त्रिनाट्यधारा' म्हणून ओळखला जातो. महेश एलकुंचवारांनी   धर्मपीठ आर्टस्  आणि कॉमर्स महाविद्यालय , नागपूर आणि एम.पी. देव मेमोरियल सायन्स महाविद्यालय नागपूर या ठिकाणी  इंग्रजी साहित्याचे अध्यापन  केले . ते १९९० साली विभागप्रमुख या पदावरून निवृत्त झाले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा , दिल्ली या ठिकाणी त्यांनी विझिटिंग प्राध्यापक म्हणूनही कित्येक वर्ष काम केले . महेश एलकुंचवारांचे वाडा चिरेबंदी या नाटकाचा इंग्रजी भाषे मध्ये " द ओल्ड स्टोन मॅन्शन " नावाने अनुवाद करण्यात आला आहे . मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ ही नाट्यकृती प्रसिद्ध आहे. ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचे आतापर्यंत व्यावसायिक रंगभूमीवर १४० प्रयोग झाले असून ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाचे सात प्रयोग झाले आहेत. निवेदिता जोशी-सराफ, प्रसाद ओक, वैभव मांगले, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर असे तगडे कलाकार या नाटकामध्ये काम करत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन प्रतिथयश रंगकर्मीं चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे.‘वाडा चिरेबंदी’तील व्यक्तिरेखांचे दहा वर्षांनंतर नेमके काय होते असा विचार एलकुंचवार यांच्या मनात आला. समाज बदलतो तशी मूल्यं बदलतात. पिढी बदलते तसे नातेसंबंधही बदलतात. हे ध्यानात घेऊन प्रकाश टाकण्याच्या उद्देशातून ‘वाडा’चा दुसरा भाग म्हणून एलकुंचवारांनी ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाचे लेखन केले. रुद्रवर्षा, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, आत्मकथा, प्रतिबिंब, मग्न तळ्याकाठी,युगान्त, गार्बो, सोनाटा, एका नटाचा मृत्यू ही एलकुंचवारांची नाटके आहेत. आत्मकथा, पार्टी, प्रतिबिंब, रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी या नाटकांचे हिंदी भाषेत, तर यांतील काही नाटकांचे बंगाली व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

‘मौनराग’ आणि 'त्रिबंध' हे त्यांचे दोन ललितनिबंध संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या ललित लेखसंग्रहांनी मराठी ललितलेखनाच्या परंपरेतही त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. [१]

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • आत्मकथा (नाटक)
  • एका नटाचा मृत्यू(नाटक)
  • गार्बो (नाटक)
  • धर्मपुत्र (नाटक; हिंदी-कन्नडमध्ये भाषांतरित)
  • पार्टी (नाटक)
  • प्रतिबिंब (नाटक)
  • बातचीत (तीन मुलाखती)
  • मग्न तळ्याकाठी (त्रिनाट्यधारा भाग २)
  • मागे वळून पाहताना (बातचीतची प्रस्तावना)
  • मौनराग (ललितबंध)
  • त्रिबंध (ललितबंध)
  • यातनाघर (नाटक)
  • युगान्त (त्रिनाट्यधारा भाग ३, नाटक. साहित्य अकादमी पुरस्कार, २००२)
  • रक्तपुष्प (नाटक)
  • वाडा चिरेबंदी (त्रिनाट्यधारा भाग १)
  • वासनाकांड (नाटक)
  • वासांसि जीर्णानि (नाटक)
  • वास्तुपुरुष (नाटक)
  • सुलतान (एकांकिका-१९६७)
  • सोनाटा (नाटक)
  • होळी(एकांकिका,यावर चित्रपट निघाला आहे)[ संदर्भ हवा ]

पुरस्कार[संपादन]

  • ‘आत्मकथा’ या त्यांच्या नाटकाला १९८९ मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार मिळाला.
  • नाशिक-कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे वर्षाआड देण्यात येणारा सन २०११चा जनस्थान पुरस्कार[२]
  • युगान्तला २००२चा साहित्य अकादमी पुरस्कार
  • वाडा चिरेबंदी या नाटकाला राज्य सरकारचा १९८७ उत्कृष्ट नाटक सन्मान
  • वैदर्भीय गुणवंत म्हणून नागपूर महापालिकेने दिलेला नागभूषण पुरस्कार, २००९
  • २००८ मध्ये पु.ल. देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा ‘पुलोत्सव सन्मान’
  • प्रिय जी.ए. पुरस्कार (२०१७)
  • २००३ मध्ये सरस्वती सन्मान
  • २०१३ मध्ये मौनराग या ललित निबंधाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत शब्द पुरस्कार
  • गो.नी. दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार (८-७-२०१६)[ संदर्भ हवा ]
  • महाराष्ट्र सरकारचा २०१८चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (३-१-२०१९)
  • संगीत नाटक अकॅडेमी पुरस्कार 1989
  • संगीत नाटक अकॅडेमी फेलोशिप १९१३

संदर्भ[संपादन]

  1. ^ "loksatta.com". www.loksatta.com. Archived from the original on 2016-03-13. 2018-08-16 रोजी पाहिले.
  2. ^ http://72.78.249.107/esakal/20110117/5498940817008529250.htm[permanent dead link]