विठ्ठल उमप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विठ्ठल उमप

विठ्ठल उमप
आयुष्य
जन्म जुलै १५, इ.स. १९३१
जन्म स्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर २६, इ.स. २०१०
मृत्यू स्थान दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यूचे कारण हृदय विकाराचा झटका
व्यक्तिगत माहिती
धर्म बौद्ध धर्म
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
अपत्ये नंदेश उमप
संगीत साधना
गायन प्रकार गायन, संगीत, रंगभूमी, भीम गीते, कोळीगीते
संगीत कारकीर्द
पेशा गायकी


विठ्ठल उमप (१५ जुलै, १९३१ - २६ नोव्हेंबर, २०१०) हे मराठी शाहीर व लोककलाकार होते.[१] उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत.[२]

जीवन[संपादन]

विठ्ठल उमप यांचा जन्म जुलै १५, इ.स. १९३१ रोजी मुंबईमधील नायगाव येथे झाला. उमप लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये लोकगीतांमार्फत आणि पथनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते. विठ्ठल उमपांनी हेच कार्य पुढे चालू ठेवले.

राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शाहिरी शिबिराचे ते चार वर्षे संचालक होते. शिवाय, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे सल्लागार, नभोवाणीचे परीक्षक अशा जबाबदाऱ्याही त्यांनी पेलल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाशीही ते संबंधित होते.[३]

उमप यांचा नोव्हेंबर २०१० मध्ये दीक्षाभूमी नागपूर येथे लॉर्ड बुद्धा टीव्ही या दूरचित्रवाणीवरील आयोजित कार्यक्रमादरम्यान हृदययक्रिया बंद पडून झाला.[४]

लोकसंस्कृतीची उपासना[संपादन]

विठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी १० चित्रपटांमध्येही काम केले आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिंग्या आणि विहीर या चित्रपटांचा समावेश होतो. शाहिर उमप यांनी लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केला होता. त्यात पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मऱ्हाटमोळी कलाप्रकार होतेच, पण कव्वाली आणि गझल गायनांतही ते आघाडीवर होते. "उमाळा' हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. त्यांनी सतत आपल्या गाण्यांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. 'अबक, दुबक, तिबक', 'अरे संसार संसार', 'खंडोबाचं लगीन' आणि 'जांभूळ आख्यान' ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत.

१९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता.[५]

प्रकाशित साहित्य[संपादन]

त्यांनी "फू बाई फूगडी फू' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. याशिवाय त्यांनी 'माझी वाणी भीमाचरणी', 'रंग शाहिरीचे' अशी साहित्यनिर्मितीही केली आहे.

  • फू बाई फूगडी फू (आत्मचरित्र)
  • माझी वाणी भीमाचरणी (काव्यसंग्रह)
  • रंग शाहिरीचे (काव्यसंग्रह)

पुरस्कार[संपादन]

  • राज्य सांस्कृतिक पुरस्कार (इ.स. १९९६) साली प्राप्त
  • दलित मित्र पुरस्कार (इ.स. २००१) साली प्राप्त  

चित्रपट व नाटके[संपादन]

भूमिका केलेले प्रमुख चित्रपट[संपादन]

लिहिलेली प्रमुख नाटके[संपादन]

  • अबक, दुबक, तिबक
  • अरे संसार संसार
  • खंडोबाचं लगीन
  • जांभूळ आख्यान
  • दार उघड बया दार उघड
  • विठ्ठल रखुमाई

संदर्भ[संपादन]

  1. ^ TwoCircles.net. "Vitthal Umap: A versatile folk artist who will be remembered for his enthusiasm | TwoCircles.net". twocircles.net (इंग्रजी भाषेत). 2018-07-18 रोजी पाहिले.
  2. ^ "जांभूळ आख्यान नाबाद ५००".
  3. ^ "इ-सकाळ.कॉम - विठ्ठल उमप : अल्पचरित्र". Archived from the original on 2010-11-30. 2010-11-30 रोजी पाहिले.
  4. ^ "शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन".
  5. ^ "शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन".

बाह्य दुवे[संपादन]