नारायण सुर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नारायण सुर्वे
जन्म नाव नारायण गंगाराम सुर्वे
जन्म ऑक्टोबर १५, इ.स. १९२६
मृत्यू ऑगस्ट १६, इ.स. २०१०
मुंबई
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
वडील गंगाराम कुशाजी सुर्वे
आई काशीबाई गंगाराम सुर्वे
पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे[साळुंके]
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)

नारायण गंगाराम सुर्वे (जन्म : १५ ऑक्टोबर १९२६; - १६ ऑगस्ट २०१०[१]) हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.

जीवन[संपादन]

१९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीतील एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाला म्हणून काम मरणाऱ्या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. [२]त्याच गिरणीत बाईंडिंग खात्यात काम करणाऱ्या गिरणी कामगार काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वतःच्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्ऱ्य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यांतून नारायण सुर्वे यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. हे दांपत्य मुळचे कोकणातील हेताचीवाडी(भुईबावडा) येथील होते. त्यांनी नारायणास मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले. पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले.नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.

मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी नारायण सुर्वे एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे "सुर्वे मास्तर' झाले.

"कधी दोन घेत, कधी दोन देत' आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता १९५८ मध्ये "नवयुग' मासिकात प्रसिद्ध झाली. "डोंगरी शेत माझं गं....' हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली. .

गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला [ संदर्भ हवा ]. इ.स. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - "ऐसा गा मी ब्रह्म" - प्रकाशित झाला.त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.

सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्र वासाची ही सुरुवात होती. "माझ्या पहिल्या संपात मार्क्सआ मला असा भेटला,' असे सांगणाऱ्या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते "रेडगार्ड' बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच्याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य श्री. सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईने नदीकाठी सोडले. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असे सुर्वे म्हणत.

त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले. गाजत रा हिले. "माझे विद्यापीठ', "जाहीरनामा', "पुन्हा एकदा कविता', "सनद' हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या, इस ल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या , अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. "मास्तर, तुमचंच नाव लिवा...', "असं पत्रात लिवा', "मर्ढेकर', "सर कर एकेक गड', "मनिऑर्डर', "मुंबईची लावणी', "गिरणीची लावणी' या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. श्री. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही उल्लेख केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला.

नारायण सुर्वे यांचे १६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले.

पु.ल. देशपांडे म्हणाले[संपादन]

ज्यांना सुर्वे दिसू आले नाहीत, अशांसाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी एकदा सांगितले, "अरे, केशवसुत कशाला शोधतांय? तुमचा केशवसुत परळ मध्येच राहतोय.

प्रकाशित साहित्य[संपादन]

काव्य संग्रह[संपादन]


नारायण सुर्वे यांच्या काव्याचा नमुना[संपादन]

आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते.
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते.
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते, चला बरे झाले;
आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते...जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, .......


"असे आम्ही लक्षावधी नारीनर दिवस असे तो वावरतो,

राबता, खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवुन घेतो."

[[ तेव्हा एक कर ! ]]

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन

तेव्हा एक कर

तू निःशंकपणे डोळे पूस.

ठीकच आहे चार दिवस-

उर धपापेल, जीव गुदमरेल.

उतू जणारे हुंदके आवर,

कढ आवर.

उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस

खुशाल, खुशाल तुला आवदेल असे एक घर कर

मला स्मरून कर,

हवे अत्र मला विस्मरून कर.

{{ दोन दिवस वाट पाहण्यात गेले}}

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

[[इतका वाईट नाही मी]]

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस

दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले

आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस

हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद

पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको

आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.

ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

नारायण सुर्वे यांच्यासंबंधी पुस्तके[संपादन]

  • नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.
  • सुर्व्यांच्या काव्याची इहवादी समीक्षा (डाॅ. श्रीपाल सबनीस)

गौरव[संपादन]

नारायण सुर्वे यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (इ.स. २००४)
  • मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार
  • पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)
  • सोव्हिएत रशियाचं नेहरू ॲवॉर्ड
  • महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा नरसिंह मेहता पुरस्कार
  • कराड साहित्य पुरस्कार
  • महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, वगैरे.

नारायण सुर्वे यांच्या नावाचे पुरस्कार[संपादन]

  • रयत शिक्षण संस्थेचे अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार (१५ सप्टेंबर २०१७)
  • चित्रपट दिगदर्शक राजदत्त यांना 'पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार (१३ ऑगस्ट २०१६)
  • नागराज मंजुळे यांना ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या पुस्तकासाठी नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार

नारायण सुर्वे कला अकादमी[संपादन]

तळागाळातील साहित्यिक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सुर्व्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’नारायण सुर्वे कला अकादमी’ स्थापन करण्यात आली आहे. नारायण सुर्व्यांच्या पत्‍नी कृष्णाबाई या अकादमीच्या सध्याच्या(२०१२) कार्यकारी विश्वस्त आहेत. डिसेंबर २०१२ मध्ये सोलापूरचे कवी माधव पवार यांची अकादमीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे निधन". Maharashtra Times. 2020-03-10 रोजी पाहिले.
  2. ^ दुसऱ्या पिढीचे आत्मकथन.

बाह्य दुवे[संपादन]