ताराबाई शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताराबाई शिंदे यांचा जन्म इ.स. १८५० साली व मृत्यू इ.स. १९१०मध्ये झाला. ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री--पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत्या.

व्यक्तिगत माहिती[संपादन]

ताराबाई ह्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. ते सत्यशोधक समाजाचे सभासद होते. ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते. [१]

शिक्षणाने त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. त्या मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी शिकल्या. शिक्षणामुळे त्यांना वाचनाची आवड होती. स्त्री असूनही घोडा चालवायला शिकल्या. ताराबाई शेतीच्या कामात लक्ष घालीत तसेच कोर्टाचीही कामे करत. ताराबाई स्वभावाने तापट होत्या. ताराबाईना लग्न करण्याची इच्छा नव्हती. पण १९व्या शतकात मराठा समाजातील, शेतकरी कुटुंबातील स्त्रीला लग्न न करता जीवन जगणे शक्य नव्हते आणि विवाहसुद्धा वडील माणसाच्या सांगण्यानुसार करावा लागे. त्यांचे लग्न एका सर्व सामान्य माणसाबरोबर झाले. परंतु त्यांचा संसार सुखाचा झाला नाही. मुलबाळ होऊनही त्या संसारात रमल्या नाही.[२] स्त्रियांमध्ये जसे दुर्गुण असतात तसेच पुरुषांमध्येही ते काठोकाठ भरलेले आहेत, हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पष्टपणे मांडण्याचे धैर्य दाखवणारी आणि त्यासंबंधीचा जाब समाजाला विचारणारी धडाडीची स्त्री अशी ओळख असणारी धडाडीची स्त्री म्हणून त्यांची ओळख होती. किमान हजार वर्षे परंपरेने चालत आलेल्या समाज व्यवस्थेला कारणमीमांसा विचारण्याचे धैर्य दाखवणारी एकोणिसाव्या शतकातील बंडखोर स्त्री म्हणजे ताराबाई शिंदे. त्यांचे वडील महात्मा फुले यांचे सहकारी होते. ते जहाल मतवादी होते. महसूल खात्यात उपायुक्त पदावर ते काम करीत होते. सुरक्षित स्थानांना इशारा हे पुस्तक त्यांनी १८७१ साली लिहिले. ताराबाई ही त्यांची एकुलती एक मुलगी. पुरोगामी विचारांच्या या मुलीला त्यांनी मराठी बरोबर संस्कृत आणि इंग्रजी भाषाही शिकविल्या  होत्या. [३]ताराबाई या अतिशय बुद्धिमान, बहुश्रुत, वादकुशल, स्त्रियांच्या दुखाविषयी अत्यंत आस्था आणि कळवळा बाळगणाऱ्या होत्या. महात्मा फुले यांचे विचार त्यांना त्या स्वतः आचरणात आणत असत. ताराबाईचे  विवाह विषयक मत विचारात न घेता त्याच्या वडिलांनी ताराबाईचे लग्न अत्यंत सामान्य पुरुषाबरोबर घरातच लावून दिले. ताराबाईंच्या वाचन दांडगे होते. समकालीन वृत्तपत्रे, नियतकालिके, वैचारिक निबंध, ग्रंथ, संत कवियित्रीच्या रचना, पंडिती काव्य, महात्मा फुले आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे लेखन यांचा त्यांना अभ्यास होता. प्रतिष्ठित जमीनदार मराठा कुटुंबात त्या जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या असल्यामुळे अश्या कुटुंबातील चालीरीती त्यांना चांगल्या माहित होत्या. वडिलांच्या नोकरीमुळे कार्यालयीन कामकाजाच्या वेळा, कामाच्या पद्धती, स्वरूप,वरिष्ठ कनिष्ठांचे परस्परांशी असणारे नटे, परस्परांशी चालणाऱ्या कारवाया, खरेखोटे व्यवहार, माणसातील हेवेदावे, लोभ, मत्सर हे सारे त्यांनी जवळून पहिले होते. त्या अनुभवाचे प्रतिबिंम्ब त्यांच्या लेखनात उमटलेले दिसते. ताराबाईची क्षमता आणि योग्यता महात्मा फुले यांना यथार्थपणे जाणवली होती. त्यांच्या बुद्धीची तीक्ष्णता आणि अभिव्यक्तीची सहजता त्यांनी ओळखली होती आणि म्हणूनच महात्मा फुले यांच्या 'सत्सार ' या अनियतकालिकांच्या दुसऱ्या अंकात ताराबाईचे मनापासून कौतुक झाले. ताराबाईंनी स्वतः शेतजमिनीचे व्यवहार लक्षपूर्वक आणि कर्तबगारीने पहिले होते. [४]

स्त्रीपुरुष तुलना[संपादन]

ताराबाईंनी आपल्या पुस्तकात विधवा-विवाहास उच्चवर्णीयांनी केलेली मनाई, तिचे हाल, शिक्षण नसल्याने स्त्रीची होणारी कुचंबणा त्यांच्या भोवताच्या परिस्थितीत त्या बघत होत्या. परंपरेने रूढी संस्कृतीने स्त्रियांना कुटुंबात दिलेले गौण स्थान, सर्व बंधने स्त्रीवर घालण्याची पद्धत, पुरुषांना गरजेपेक्षा दिलेले महत्त्व ताराबाईना पटत नव्हते. त्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटनेने त्यांना प्रेरणा मिळाली. १८८१ सालच्या मे महिन्यात टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात एक बातमी छापून अली होती. सुरतमधील विजयालक्ष्मी या विधवेने समाजाच्या भीतीने तिच्या मुलाची हत्या केल्याने तिच्या विरोधात दाखल झालेल्या खटल्याची ही बातमी होती.विजयालक्ष्मी या तरुण विधवेवर खटला भरला गेला होता. तिला शिक्षा झाली होती. खटल्याविषयी ताराबाईनी वृत्तातून वाचले.[५] त्याच्या अनुषंगाने 'पुणे वैभव' या तत्कालीन सनातनी वृत्तपत्रात एक लेख आला होता. त्याला प्रतिसाद म्हणून १८८२ साली ताराबाई शिंदे यांनी 'स्त्री पुरुष तुलना' हा निबंध लिहिला होता. या निबंधाच्या ५०० प्रति पुण्याच्या शिवाजी प्रेस मध्ये छापल्या होत्या. त्याची किंमत ९ अणे होती. या निबंधाची दुसरी आवृत्ती येऊ नये, यासाठी समाजातून सनातनी, प्रतिगामी लोकांमधून मोठ्या प्रतिक्रिया, दबाव आणण्यात आला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या सत्सरच्या दुसऱ्या अंकात यासंबंधीचा लेख सापडतो. त्यानंतर १९७५ पर्यंत हा निबंध अज्ञात राहिला. एका स्त्रीची केशवपनासारख्या दुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले. त्यानी स्त्रियांच्या शोषणाविरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.[६]स्त्रियांचा कैवार घेण्याच्या हेतूने त्यांनी 'स्त्री पुरुष तुलना' लिहिल्याचे स्पष्टपणे म्हंटले आहे. त्याच बरोबर विधवांच्या जीवनाचे विदारक चित्र त्यांनी रेखाटले आहे. विवाहित स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि मुलींच्या लग्नाच्या विचित्र तऱ्हाहि त्यांनी या अनुषंगाने सांगितल्या आहेत. एकूणच स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या यमयताणांमुळे त्यांचे मन विषन्न झाले होते. म्हणून त्यांनी तीन पृष्ठांची प्रस्तावना आणि एकोणपन्नास पृष्ठांचे विवेचन असा बावन्न पानाचा निबांध लिहिला. वस्तुतः स्त्री पुरुषपेक्षा अधिक शोषिक, अल्पसंतुष्ट, पुरुष प्रेमाची भुकेली असते. तरी सुद्धा स्त्रीच्या वाट्याला उपेक्षा, वंचना, शोषण व यातना येतात. त्याचा त्यांना त्रास होतो. म्हणून त्या पोटतिडकीने लेखन करतात. ताराबाई शिंदे यांनी 'इंग्रज सरकारचे राज्य ईश्वर राज्य असे सदोदित चिरकाल ठेवो' अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याचे कारण इंग्रजांच्या आगमनामुळे अनेकानेक भौतिक सुधारणा झाल्या. [७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ स्त्रीमुक्तीचा पहिला हुंकार ताराबाई शिंदे -दैनिक नवशक्ती -मुखपृष्ठ महिला दिन विशेष संकेतस्थळ पान[permanent dead link] दिनांक १३ ऑगस्ट २०१३ भाप्रवे सायं ४ वाजता जसे अभ्यासले
  2. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्वान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. ४७. ISBN 978-81-7425-310-1.
  3. ^ patil, prakash (2012). karmyogini. kolhapur: mukta publishing house. pp. 33–34. ISBN 978-93-81249-09-3.
  4. ^ patil, prakash (2012). karmayogini. kolhapur: mukta publishng house. pp. 34–35. ISBN 978-93-81249-09-3.
  5. ^ Patil, Prakash (2012). Karmyogini. kolhapur: Mukta Publishing House. p. 35. ISBN 978-93-81249-09-3.
  6. ^ संपा. फडके य. दि. (१९९१). महात्मा फुले समग्र वाङ्मय. मुंबई: महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ. pp. ७५२.
  7. ^ Patil, Prakash (2012). Karmyogini. Kolhapur: Mukta publishing house. p. 37. ISBN 978-93-81249-09-3.