श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शाहीर पठ्ठे बापूराव या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रीधर कृष्ण कुलकर्णी
विकिस्रोत लोगो श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर यांचे, अथवा यांच्या बद्दलचे साहित्य मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:
जन्म नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी.
टोपणनाव शाहीर पठ्ठे बापूराव
जन्म नोव्हेंबर ११, इ.स. १८६८
रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली
मृत्यू २२ डिसेंबर १९४५
पुणे
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार लावणी, शाहिरी
वडील कृष्णाजी कुलकर्णी रेठरेकर
आई राधाबाई कृष्ण कुलकर्णी

बालपण ते तारुण्य[संपादन]

पठ्ठे बापूरावांचे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८६८ रोजी हरणाक्ष रेठरे (वाळवा तालुका, सांगली जिल्हा) या गावी झाला. लहानपणापासून श्रीधरला तमाशाचा नाद होता. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. आई-वडिलांनी श्रीधरला शाळेत घातले. त्याचवेळी त्याला कविता करण्याचा छंद लागला व त्याचा गळाही गाता राहिला. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ऐकूनऐकून त्यांनी त्यांतही बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` अशी लोकप्रियता मिळाली. श्रीधरच्या शिक्षकांनी शिफारस करून त्याचे नाव औंध सरकारांना कळविले. त्याची दखल घेऊन औंधच्या राजांनी श्रीधरला आपल्याकडे बोलावून घेतले. श्रीधरचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. पुढे त्याच्या १६व्या वर्षी राणीसाहेबांनी श्रीधरला बडोद्यास नेले. तेथे तो संस्कृत भाषा शिकला. त्याबरोबरच त्याने कलाभुवन या संस्थेत यंत्र दुरुस्तीचे शिक्षणही घेतले व नोकरीही केली. दुर्दैवाने श्रीधर अवघ्या सतरा वर्षे वयाचा असताना त्याचे आई-वडील निवर्तले. शेवटी बडोद्याची नोकरी सोडून श्रीधर परत आला. [१]

तमाशाचा फड[संपादन]

गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. श्रीधरच्या कानावर त्या वाड्यातल्या तमाशाचे सूर येत. पण ब्राह्मण आणि कुलकर्णीपद, त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरून तमाशाला जाऊ लागले. तमासगिरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `

श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनि घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !!’ ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन` हा संकल्प करूनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागले. बापूरावांचे स्वतःचे काव्य, योग्य साथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा होता होता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले. ` दोन लक्ष आम्ही केली लावणी केवढी म्हणावी मात बडी ` असा स्वतःच्या काव्य लेखनाचा निर्देश करणारा हा शाहीर, मुंबईत आला, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुलवडकरांच्या फडात पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी `ची उपमा द्यायचे. ती आधीच ’नामचंद पवळा’ म्हणून प्रसिद्ध होती. बापूरावांची काव्यप्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन्‌ पवळाबाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली. बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरली. १९०८-०९ साली छत्रपती शाहू महाराजांसमोर `’मिठाराणी'चा वग पठ्ठे बापूरावांनी सादर केला.

पवळा हिवरगावकर

रंगभूमीवरील पहिली महिला नृत्यांगना.पवळा हिवरगावकर या अजूनही उपेक्षितच आहे. नामा धुलवाडकर यांच्या तमाशात पवळा पहिल्यांदा नाचल्या. पवळासारखी रूपवान स्त्री नाचताना पाहून प्रेक्षक फिदा व्हायचे. पवळाने आपल्या नृत्याने तमाशात नवी क्रांती केली. पवळा हिच्या रूपाने तमाशात नाचनारीन म्हणून स्त्रीचा समावेश झाला होता. पवळाच्या बाबतीत मजेशीर कहाणी सांगितली जाते. तमाशाप्रेमी बाबूराव घोलप यांनी आपल्या आत्मचरित्रात याबद्दल रंजक माहिती लिहून ठेवली आहे. पवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला नवे वळण दिले. पवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होते. तर बापूरावविषयी प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील म्हणतात, शाहीर पठ्ठे बापूराव-ज्यांचा उल्लेख सार्थपणे 'लावण्यांचे विद्यापीठ' असा केला जातो, त्या बापूरावांच्या एका गौळणीतील शृंगार तर मला 'ओलेती' या चित्रकृतीच्या दर्जाचा वाटतो. ज्या अवीट गौळणीत शृंगाराच्या तप्त ज्वाला आहेत; मात्र तीत छछोर बाजारूपण नाही. रंगाची उधळण आहे, खुलेपणा आहे, पण बीभत्सपणाचा लवलेशही नाही. त्या गौळणीची धुंदावणारी चाल, पारंपरिक स्वरसाज... सारेच काही और! "श्रीरंग सारंगधरा, लाजुनी धरिते उरा चला नेते माझ्या मंदिरा हो, उडवा रंग, रंग, रंग तुम्ही माझ्या महाली चला ना थाट विलासी केला भला ना गुलाबाच्या फुलांचा झेला जागोजागी मी खोविला पहिला तुम्हा पचला, तर मग उचला नचला नंग नंग नंग, उडवा रंग रंग रंग...' त्या निःसंग, ढंगदार रात्रीचे वर्णन करता करता बापूराव राधा-कृष्णाचा हा शृंगार "मग आनंद मारील चिपळ्या, करील दंग दंग दंग' अशा बेहोषीच्या उंचच उंच झुल्यावर नेऊन ठेवतात. यावरून तमाशा क्षेत्रातील पहिल्या अजरामर जोडीचे महत्त्व लक्षात येते.


संदर्भ :-

  • मराठीचे लोकनाट्य तमाशा कला आणि साहित्य (पुस्तक, लेखक - नामदेव व्हटकर)

बहिष्कार[संपादन]

पण पुढे पठ्ठे बापूराव आणि पवळा या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने ९०० रुपयांचा करार करून स्वतःचा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठने लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिन्‍स्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. असे नामदेव व्हटकरांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसऱ्या स्त्रीला घेऊन तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्‍न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. ’कली युगाचा ऐका दाखला ! पठ्ठे बापूराव भुलला पवळिला ` असे ठामपणे सांगणारा हा शाहीर पुहा एकदा `शाहीर पठ्ठे बापूराव आणि नामचंद पवळाबाई यांचा ढोलकीतील तमाशा’ या नावाने नव्या जोमाने सुरू झाला. खऱ्या अर्थाने पवळा बापूरावांशी एकरूप झाली होती. ६ डिसेंबर १९३९ साली पवळा काळाच्या पडद्याआड गेली. लक्ष्मी गेली, लोकप्रियता गेली. एकेकाळचा तमाशा सम्राटाला अखेरचे दिवस विपन्नावस्थेत कंठावे लागले. त्यांच्याच तमाशात काम करणाऱ्या `ताई परिंचेकर' ह्या बाईने त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. याच काळात पुण्यातील बापूसाहेब जिंतीकर यांनी बापूरावांना आधार दिला. त्यातूनच या जिंतीकरांनी बापूरावांच्या कवनांचे संकलन केले. १९४२ साली बापूरावांचा श्रीमंत आबासाहेबांच्या हस्ते जॉन स्मॉल मेमोरियल पुणे येथे जाहीर सत्कार झाला. या श्रेष्ठ कवीने २२ डिसेंबर १९४५ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. हा शाहीर सांगली जिल्ह्याचे भूषण होता. आजही रातधुंदीत जागवा म्हणत त्यांची कवने गात शाहीर रात्री जागवितात.

पठ्ठे बापूरावांवरील मराठी पुस्तके[संपादन]

  • पठ्ठे बापूराव (लेखक - ल.ना. भावे).
  • पठ्ठे बापुराव व्यक्ती आणि वाड्मय (मधुकर काशिनाथ मोंढे)
  • लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची चतुरस्रर प्रतिभा (अश्विनी तेली, डॉ. चंद्रकुमार नलगे)

चित्रपट/नाटक[संपादन]

  • पठ्ठे बापूरावांच्या जीवनावर त्यांच्याच नावाचा मराठी चित्रपट इ.स. १९५० मध्ये निघाला. राजा नेने दिग्दर्शक होते.
  • लावण्ययवती हा पठ्ठे बापूराव यांच्या आयुष्यावरील दुसरा चित्रपट
  • पठ्ठे बापूराव (नाटक, लेखक मो.ग.रांगणेकर)

पुरस्कार[संपादन]

  • पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान हे सन १९९८पासून दरवर्षी ’शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ देते. हा पुरस्कार मिळालेल्या नृत्यांगना : दिदराबाई गुळखंडकर (२०१३), आशा काळे (२०१५), शकुंतला नगरकर (२०१६), छाया खुटेगाबकर (२०१७)
  • पुणे महानगरपालिका १९९५ सालापासून दरवर्षी ’लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : यमुनाबाई वाईकर (१९९५), शाहीर साबळे (१९९७), सरोजिनी बाबर (१९९८?), लीला गांधी, राजेंद्र दूरकर (२००१), जयमाला इनामदार (२००३), काळू बाळू (२००५), बाबासाहेब पुरंदरे, सुलोचना चव्हाण (२००७), गुलाबबाई संगमनेरकर (२००८), शाहीर राजाराम जगताप (२००९), साहेबराव नांदवळकर (२०१०), मधुकर नेराळे (२०११), ??? (२०१२), कांताबाई तुकाराम खेडेकर (सातारकर) (२०१३), मधू कांबीकर (२०१४), हेमंत मावळे (२०१५), प्रभा शिवणेकर (२०१६)

संदर्भ[संपादन]

  1. ^ नलगे, चंद्रकुमार. "महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर पठ्ठे बापूराव" (PDF). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे संकेतस्थळ - https://msblc.maharashtra.gov.in/. Archived from the original (PDF) on 2016-04-10. १७ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)