शांताबाई कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शांताबाई कृष्णाजी कांबळे
जन्म: मार्च १, १९२३
महाराष्ट्र, भारत
मृत्यू: जानेवारी २५, २०२३
पुणे
धर्म: बौद्ध
प्रभाव: बाबासाहेब आंबेडकर
अपत्ये: अरुण कांबळे, मंगल तिरमारे, चंद्रकांत कांबळे

शांताबाई कृष्णाजी कांबळे (१ मार्च, १९२३ - २५ जानेवारी, २०२३) या मराठी लेखिका शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या.[१] त्या दलित स्त्री लेखिका म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. त्या मराठी साहित्यिक अरुण कांबळे यांच्या आई होत. 'माज्या जल्माची चित्तरकथा' हे आत्मचरित्र लिहिणाऱ्या शांताबाई कांबळे ह्या मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्र लेखिका होत्या. २५ जानेवारी २०२३ रोजी वयाच्या १०० व्या वर्षी त्यांचे पुण्यात निधन झाले.[२] त्यांच्यावर नवी मुंबईतील कोपरखैरणे इथं बौद्ध धर्माच्या पद्धतीनं शेवटचे संस्कार करण्यात आले.[३]

जीवन[संपादन]

शांताबाई कांबळे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला. त्यांचे आईवडील अत्यंत दारिद्र्यात जगत होते, तरीही त्यांना मुलीला शिकवायचे होते. जातीयतेच्या जोखडात अडकलेल्या समाजकडून त्यांना प्रचंड त्रास झाला. इयत्ता तिसरीपासून त्यांनी शालेय शिक्षणासाठी झगडा देऊन शिक्षण पूर्ण केले.

कार्य[संपादन]

शांताबाई काळंबळे या पुण्याच्या महिला शाळेत शिकूना शिक्षिका होत्या. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या प्रेरणेने त्यांनी १८५७ साली शांताबाई आणि त्यांचे पति यांच्या माध्यमातून आजूबाजूच्या ७ गावांत धर्मांतरण कार्यक्रम झाले. १९८३ साली सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर शांताबाई कांबळे यांनी लिहिलेले 'माज्या जल्माची चित्तरकथा' हे आत्मवृत्त प्रसिद्ध झाले. दलित महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले आत्मकथन आहे. दिनकर साक्रीकरांच्या प्रयत्नांतून हे आत्मवृत्त १९८२ साली ‘पूर्वा’ मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाले.

शांताबाई जन्माने महार होत्या. सुरुवातीच्या काळी त्या महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धुऊन स्वच्छ करून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात शांताबाईंने आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवऱ्याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित ‘नोरा’ मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाली.

'माज्या जल्माची चित्तरकथा' या पुस्तकावर आधारित नाजुका या नावाने एक दूरचित्रवाणी मालिका होती. शांताबाई कांबळे यांचा अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे, त्यांत दलितमित्र हा एक सन्मान आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'माज्या जल्माची चित्तरकथा' सांगणाऱ्या लेखिका शांताबाई कांबळे यांचं निधन". Maharashtra Times. 2023-02-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Shantabai Kamble Passed Away : लेखिका शांताबाई कांबळे यांचे पुण्यात निधन". eSakal - Marathi Newspaper. 2023-02-08 रोजी पाहिले.
  3. ^ "'माज्या जल्माची चित्तरकथा' सांगणाऱ्या लेखिका शांताबाई कांबळे यांचं निधन". Maharashtra Times. 2023-02-08 रोजी पाहिले.