Jump to content

गुरुनाथ नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुरुनाथ नाईक
टोपणनाव हेमचंद्र साखळकर, चंद्रहास काळापूरकर
जन्म १९३८
मृत्यू ३ नोव्हेंबर २०२१
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र लेखन, पत्रकारिता
भाषा मराठी / कोकणी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
विषय रहस्य, थरार, भय, साहस
प्रसिद्ध साहित्यकृती बहिर्जी कथा
अपत्ये 2
पुरस्कार लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस

गुरुनाथ विष्णू नाईक (जन्म - इ.स. १९३८ ) हे रहस्यकथालेखकपत्रकार आहेत. इसवी सन २०१३ मध्ये जगात सर्वाधिक १२०८ कादंबऱ्या लिहिल्याबद्दल त्यांचे नाव "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस"मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. अशी कामगिरी करणारे ते मराठीतील एकमेव लेखक आहेत. १९७० ते १९९० च्या दशकात महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागांत वाचन संस्कृती रुजवण्यात त्यांच्या 'पॉकेट बुक्स' आकारातील रहस्यकथांचा मोठा वाटा होता. रहस्यकथांच्या दुनियेत त्यांनी निर्माण केलेले 'कॅप्टन दीप', 'गरुड', 'उदयसिंह चौहान' हे नायक आजही जुन्या वाचकांच्या स्मरणात आहेत.

गुरुनाथ नाईक हे मराठीतल्या आघाडीच्या रहस्य आणि थरार कथा/कादंबरीकारांपैकी एक असून बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनी सुद्धा हजारांवर रहस्य कादंबऱ्या लिहिल्या, व एका मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवले.

मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होय.

प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक कीर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर हे नाईक यांच्या वडिलांचे -विष्णू नाईक- यांचे जवळचे मित्र. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच गुरुनाथ नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रुजले. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्वभूमी आहे. साखळीच्या राणे घराण्याने पोर्तुगीजांविरुद्ध १७ बंडे पुकारली होती. नाईक यांचे आजोबा लेफ्टनंट होते. १९०१ मध्ये त्यांनी बंड पुकारले. १९०३ मध्ये बेसावध असताना त्यांना अटक झाली. पोर्तुगीजांनी त्यांना २८ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यांची रवानगी तिमोर बेटावर केली. यावेळी गुरुनाथ नाईक यांच्या आजी गरोदर होत्या. त्याही पोर्तुगिजांविरुद्ध काम करणाऱ्या संघटनेच्या प्रमुख होत्या. पोर्तुगिजांचा ससेमिरा चुकवित त्या साखळीत राहण्यास आल्या. त्यांनी नाईक हे नवीन नाव धारण केले. तेव्हापासून या घराण्याला नाईक हेच आडनाव लागले.[]

रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या.

पत्रकारिता आणि सुरुवातीचा काळ

[संपादन]

लेखक म्हणून प्रसिद्ध होण्याआधी गुरुनाथ नाईक यांनी पत्रकारितेत मोठी कारकीर्द गाजवली. बेळगावात असतानाच त्यांनी बाबुराव ठाकूर यांच्या 'तरुण भारत' या दैनिकात नोकरीस सुरुवात केली. तिथे त्यांनी कंपोजिंग, मुद्रित शोधन (Proofreading) आणि बातमीदारीचे धडे गिरवले.

त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांत काम केले:

  • सकाळ (पुणे): १९५६ मध्ये उपसंपादक म्हणून उमेदवारी केली.
  • साप्ताहिक स्वराज्य: च.म. साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
  • पुणे तरुण भारत: १९५७ मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले.
  • गावकरी (मनमाड): पा.वा. गाडगीळ यांच्या हाताखाली संपादकीय लेखनाचे धडे घेतले.
  • अजिंठा (औरंगाबाद): १९६० साली दैनिक सुरू करण्याच्या कामगिरीवर गेले आणि तिथे नऊ वर्षे काम केले.
  • नवप्रभा (गोवा): १९७० मध्ये द्वा.भ. कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
  • पुढे त्यांनी लातूरच्या 'एकमत' आणि बीडच्या 'लोकाशा' या वृत्तपत्रांतही दीर्घकाळ काम केले.

मुख्य प्रवाहातील रहस्यकथा लेखक म्हणून नावारूपाला येण्यापूर्वी, १९५७ ते १९६३ या काळात त्यांनी 'हेमचंद्र साखळकर' या टोपणनावाने विविध मासिकांतून लेखन केले होते. या नावाने त्यांनी सुमारे पावणेदोनशे कथा आणि काही श्रुतिका लिहिल्या होत्या, परंतु त्या काळात त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली नाही.

रहस्यकथालेखनाचा ओनामा

[संपादन]

१९७० साली कामानिमित्त पुण्यात आले आसताना त्यांन सदानंद प्रकाशनचे खाडिलकर भेटले. त्यांनी नाईक यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची विनंती केली. नाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो म्हणले आणि ते कामाला लागले.

नेमका त्याच काळात ते पुण्यातील अलका चित्रपटगृहात 'किस द गर्ल्स अँड मेक देम डाय' हा इंग्रजी चित्रपट पहायला गेले. डोक्यात कथा लिहून देण्याचे विचार सुरू होते. अचानक चित्रपट अर्धवट सोडून ते उठले आणि थेट रूमवर गेले. रात्री दोन वाजेपर्यंत जागून त्यांनी ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन' ही पहिली रहस्यकथा लिहून काढली. सकाळीच ही कथा त्यांनी खाडिलकरांना सोपविली. घरी परतल्यावर 'शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ' ही दुसरी रहस्यकथा तयार झाली. तीही खाडिलकरांना सोपवून ते बेळगावला निघून गेले. थोड्याच दिवसात खाडिलकरांचे पत्र आले. तुमच्या आणि गजाननाच्या कृपेने तुमच्या दोन्ही कादंबऱ्या छापत आहोत, कृपया निघून यावे, आणि गुरुनाथ नाईक रह्स्य कादंबरीकार झाले.

नाईक यांच्या कादंबऱ्यांना बाजारात चांगली मागणी होती. महिन्याकाठी ते ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत. या कादंबऱ्या सरासरी शंभर पानांच्या असायच्या. अर्नाळकरांच्या कादंबऱ्याही १०० पानांच्या असत. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत. []

प्रकाशन व्यवसाय आणि कायदेशीर लढा

[संपादन]

गुरुनाथ नाईक यांच्या सुरुवातीच्या सर्व कादंबऱ्या पुण्यातील 'सदानंद प्रकाशन' तर्फे प्रकाशित झाल्या. नाईक आणि त्यांचे समकालीन दिवाकर नेमाडे या दोन लेखकांमुळे सदानंद प्रकाशनाला अफाट यश मिळाले. पुस्तकांच्या खपाचे उच्चांक मोडले गेले. मात्र, पुढे मानधनावरून आणि हक्कावरून वाद झाल्याने नाईक सदानंद प्रकाशनातून बाहेर पडले.

१९७२ मध्ये सदानंद प्रकाशनाने नाईक यांच्यावर दावा ठोकला आणि त्यांच्या पात्रांवर प्रकाशकाचा हक्क असल्याचे सांगितले. हा खटला आणि त्यातील वर्तमानपत्रांतील जाहिरातबाजी त्याकाळी खूप गाजली होती. अखेरीस न्यायालयाने निकाल दिला की, लेखकाचे पात्र आणि पुढील लेखन हे पूर्णपणे लेखकाचेच असेल. या निकालानंतर नाईकांनी स्वतःचे 'गुरुनाथ प्रकाशन' सुरू केले.

पुढे आर्थिक अडचणींमुळे आणि भागीदारीतील वादांमुळे गुरुनाथ प्रकाशन बंद पडले. त्यानंतर नाईक गोव्याला गेले आणि तिथे 'शिलेदार प्रकाशन' सुरू केले. गोव्यातून महाराष्ट्रात पुस्तके पाठवण्यासाठी त्यांच्या राहत्या इमारतीत (अल्तिनो, पणजी) खास 'पोस्ट ऑफिस' सुरू करण्यात आले होते, हा एका लेखकासाठी अत्यंत दुर्मिळ बहुमान त्यांना मिळाला होता.

त्यांनी आपली १०० वी आणि १२५ वी कादंबरी ('स्वर्गाची पायरी') मोठ्या थाटामाटात प्रकाशित केली होती. १९८५ मध्ये त्यांनी आपली ७०० वी कादंबरी 'घातकी डाव' प्रकाशित करून पुन्हा एकदा लेखनात सक्रिय होण्याचा प्रयत्न केला होता.

गुरुनाथ नाईकांच्या कथांमधील नायक

[संपादन]
  • कॅप्टन दीप (Captain Deep):
    • माहिती: गुरुनाथ नाईकांच्या सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेल्या नायक मालिकांपैकी एक. कॅप्टन दीप हा एक अत्यंत बुद्धिमान, चाणाक्ष आणि गूढ रहस्ये उकलणारा गुप्तहेर आहे. तो शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करून, सूक्ष्म तपशील शोधून गुन्हेगारांचा छडा लावतो. त्याची बुद्धी आणि तार्किक विचारसरणी हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
  • गोलंदाज (Golandaz) / उदयसिंग राठोड (Udaysingh Rathod):
    • माहिती: हा नायक त्याच्या धडाकेबाज शैलीसाठी आणि साहसी वृत्तीसाठी ओळखला जातो. गोलंदाज हे त्याचे 'कोडिंग' नाव असू शकते, तर उदयसिंग राठोड हे त्याचे खरे नाव काही कथांमध्ये सूचित केले जाते. हा नायक गुन्हेगारांशी प्रत्यक्ष दोन हात करण्यात आणि वेगाने निर्णय घेण्यात तरबेज असतो. तो अधिक ॲक्शन-ओरिएंटेड आणि थरारक कथांमध्ये आढळतो.
  • गरुड (Garud) / मेजर अविनाश भोसले (Major Avinash Bhosale):
    • माहिती: 'गरुड' हे नाव असलेला हा नायक त्याच्या गरुडासारख्या तीक्ष्ण नजरेसाठी आणि दूरदृष्टीसाठी ओळखला जातो. काही कथांमध्ये त्याचे खरे नाव मेजर अविनाश भोसले असे असते. हा नायक विशेषतः साहसी आणि मोठ्या कटांचा किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज असतो. त्याची कार्यपद्धती अधिक शिस्तबद्ध आणि लष्करी स्वरूपाची असते.
  • शिलेदार (Shiledar):
    • माहिती: शिलेदार हा नायक त्याच्या निडर वृत्तीसाठी आणि एकाकी लढवय्या म्हणून ओळखला जातो. तो अनेकदा स्वतःच्या बळावर आणि बुद्धीच्या जोरावर मोठ्या संकटांवर मात करतो. तो एक प्रकारचा न्याय-संरक्षक असतो जो अन्यायाविरुद्ध लढतो.
  • शब्दवेधी (Shabdavedhi) / सुरज (Suraj):
    • माहिती: शब्दवेधी हा नायक त्याच्या शब्दांवरून किंवा बारीक आवाजावरून, खुणांवरून आणि अस्पष्ट पुराव्यांवरून गुन्हेगारांचा माग काढण्यात निष्णात असतो. त्याचे निरीक्षण कौशल्य आणि ऐकण्याची क्षमता असामान्य असते. काही कथांमध्ये त्याचे नाव 'सुरज' असे दिले जाते.
  • रातरानी (Ratrarani) / रजनी काटकर (Rajani Katkar):
    • माहिती: गुरुनाथ नाईक यांच्या काही निवडक स्त्री नायिकांपैकी रातरानी ही एक प्रमुख आहे. तिचे खरे नाव रजनी काटकर असते. ती एक धाडसी, बुद्धिमान आणि तितकीच आकर्षक गुप्तहेर असते, जी पुरुष नायकांसारख्याच धोकादायक परिस्थिती हाताळते आणि गुन्हेगारांना पकडते.
  • बहिर्जी (Bahirji) / बहिर्जी नाईक (Bahirji Naik):
    • माहिती: गुरुनाथ नाईकांनी काही ऐतिहासिक किंवा ऐतिहासिक पात्रांवर आधारित कथा लिहिल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यातील प्रमुख 'बहिर्जी नाईक' हे पात्र नायक म्हणून काही कथांमध्ये येते. या कथांमध्ये ऐतिहासिक घटना आणि गुप्तहेरगिरीचे मिश्रण असते.
  • सागर (Sagar) / जीवन सावरकर (Jeevan Savarkar):
    • माहिती: सागर हा नायक समुद्र आणि पाण्याशी संबंधित रहस्यांवर काम करतो. तो समुद्रातील गुन्हेगारी, तस्करी किंवा पाण्याखालील गुप्त कार्यांचा शोध लावतो. 'जीवन सावरकर' हे त्याचे खरे नाव असू शकते.

गुरुनाथ नाईकांनी वापरलेली विविध टोपणनावे

[संपादन]

गुरुनाथ नाईकांनी कथा लिहीत असताना विविध टोपणनावांचा वापर केला होता. ही नावे खालीलप्रमाणे:

  • हेमचंद्र साखळकर
  • गीता नाईक
  • गीता पै
  • मंगेश नाईक
  • चंद्रहास काळापूरकर
  • आरती शिंदे

त्यांनी विशेषतः त्यांच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे १९५७ ते १९६३ दरम्यान, 'हेमचंद्र साखळकर' आणि 'नाईक' या नावांनी विविध मराठी मासिकांतून लिखाण केले होते. त्यांनी आकाशवाणीच्या पुणे आणि गोवा केंद्रांसाठीही काही संगीतिका आणि श्रुतिका लिहिल्या.

लेखन शैली आणि प्रभाव

[संपादन]

गुरुनाथ नाईक यांची लेखन शैली अत्यंत वेगवान आणि चित्रदर्शी होती. ते एका महिन्यात ६ ते ७ कादंबऱ्या लिहीत असत. त्यांच्या लेखनात लांबलचक वर्णनापेक्षा घटनांना (Action) जास्त महत्त्व होते. टीव्ही आणि इंटरनेट नसलेल्या काळात, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुण पिढीला त्यांच्या कादंबऱ्यांनी वाचनाचे वेड लावले होते. रेल्वे स्टेशन्स, एस.टी. स्टँड्स आणि रद्दीच्या दुकानांतून त्यांच्या पुस्तकांची सर्वाधिक विक्री होत असे. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांची संख्या १२०८ इतकी सांगितली जाते.

उत्तरार्ध आणि मृत्यू

[संपादन]

लेखनातून प्रचंड यश आणि पैसा मिळवूनही गुरुनाथ नाईक यांचे आर्थिक नियोजन कोलमडल्याने त्यांना उतारवयात मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. गोव्यातील प्रेस बंद पडल्यावर ते पुन्हा मुंबई-वसई भागात आले. काही काळ त्यांनी पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात एका पत्र्याच्या खोलीत वास्तव्य केले. तिथेही त्यांचे लेखन अव्याहत सुरू होते.

१६ वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका (Stroke) आला, ज्यामुळे त्यांचे लेखन थांबले. त्यानंतर ते उपचारांसाठी पुण्यात आले. ३ नोव्हेंबर २०२१ रोजी, वयाच्या ८४ व्या वर्षी पुणे येथे दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • अजिंक्य योद्धा
  • अंधा कानून
  • अंधाराचा बळी
  • अफलातून
  • आसुरी
  • कायदा
  • कैदी नं. १००
  • गरुडभरारी
  • गोलंदाज
  • झुंज एक वाऱ्याशी
  • तिसरा डोळा
  • दिल्लीचा ठग
  • देहान्त
  • धगधगती सीमा
  • प्रलय
  • बळी
  • भयानक
  • मृत्यूकडे नेणारे चुंबन
  • रणकंदन
  • रणझुंज
  • सरळ चालणारा खेकडा
  • सवाई
  • सुरक्षा
  • हर हर महादेव
  • हादरा
  • हिरवे डोळे
  • दरितील खजिना

संदर्भ

[संपादन]
  1. "News in Marathi Daily Maharashtra Times".
  2. गुरूनाथ नाईकांची मुलाखत