चंद्रकांत सखाराम चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंद्रकांत सखाराम चव्हाण (९ जून, इ.स. १९०६ - ५ जुलै, इ.स. १९९६) हे बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक होते. मॅट्रिकच्या वर्गात असताना शाळा सोडलेले बाबूराव मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खऱ्या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. चार आणे मालांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले. तत्कालीन लोकप्रिय कादंबरीकार ना.सी. फडके यांच्या कादंबऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्या चोरून वाचल्या. ज्या काळात साने गुरुजी आणि वि.स. खांडेकर यांचे आणि ऐतिहासिक चरित्रांचे वाचन हेच शालेय विद्यार्थ्यांसाठी योग्य समजले जात होते त्या काळात मुखपृष्ठावर पाठीत सुरा खुपसलेला मृतदेह आणि किंचाळणारी स्त्री असली चित्रे असलेली बाबूरावांची पुस्तके चोरूनच वाचली जात.

१९४२ च्या चळवळीत तुरुंगात असताना ’सामान्य माणसासाठी लिही’ असे बाबूरावांना सांगण्यात आले. सामान्य माणसाकरिता लिहायचे म्हणजे काय हे बाबूरावांना पडलेले कोडे होते. बाबूरावांना नाटकाची आवड होती. एका नाट्यक्लबाचे ते सभासद होते. त्या नाट्यक्लबातून ते एकदा विजयदुर्ग किल्ल्यात गेले. आणि परत आल्यावर त्यांनी ’सतीची समाधी’ नावाची गोष्ट लिहिली; ती अस्नोडकरांच्या ’करमणूक’मधून प्रसिद्ध झाली. त्याच दिवशी बाबूरावांना नाटककार अच्युत बळवंत कोल्हटकर भेटले. छान गोष्ट आहे, ते म्हणाले. एका मोठ्या माणसाला तुझी गोष्ट खूप आवडली आहे असे म्हणून ते बाबूरावांना नाथ माधव यांच्याकडे घेऊन गेले. नाथ माधवांनी अशाच रहस्यकथा लिही असे सुचवले. बाबूरावांनी मग लेखणी हाती घेतली, ती अखेरच्या श्वासापर्यंत खाली ठेवली नाही.

येरवड्याच्या तुरुंगात असताना विसापूरच्या तुरुंगातील काही राजकीय कैद्यांनी लढा देऊन सर्वच तुरुंगांतील राजकीय कैद्यांना वाचनासाठी पुस्तके पाठवावयास शासनाला भाग पाडले. अशा काही पुस्तकांतून एडगर वॅलेस यांची ’थ्री जस्ट मेन’ ही कथा बाबूराव अर्नाळकर यांच्या हाती पडली. आणि सामान्यांसाठी काय लिहायचे ते समजले.

बाबूरावांचे स्नेही प्रभू हे रहस्यमाला काढीत असत. १९४२ च्या फेब्रुवारीत बाबूरावांनी लिहिलेली ’चौकटची राणी’ ही पहिली रहस्यकथा पुस्तकरूपाने प्रकाशित झाली, आणि बाबूरावांना ४० रुपये मानधन मिळाले.

याच सुमारास चिदरकर यांनी एक माला काढली होती त्या मालेत क्रमाने सात कथा लिहिल्यानंतर बाबूराव परत प्रभूंसाठी कथा लिहू लागले. बाबूरावांच्या कथांना पाश्चात्त्य कथांचा आधार असायचा, पण त्या कथांना मराठीत लिहिताना महाराष्ट्रीय वातावरणाचा साज असायचा. कथेत कुठेही अश्लीलपण येऊ न देण्याची खबरदारी बाबूराव घेत आणि कथेचा शेवट नेहमी ’सत्यमेव जयते’ असाच असे. कथेतील प्रसंग वेगळे असले तरी नायक एकच ठेवायचा हे बाबूरावांनी निश्चित केले होते.

नायकाचे नाव बाबूरावांना गीता वाचताना सुचले आणि त्यांनी धनंजय हे नाव मुक्रर केले. बाबूरावांचा कथानायक रुबाबदार, सुस्वभावी, समयसूचक आणि धडाडीचा असल्याने वाचकांना त्याच्या गु्णविशेषांची, वागण्याची, बोलण्याचालण्याची चांगलीच ओळख असे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सल्ल्यामुळे इ.स. १९४६ ते १९४८ या काळात बाबूराव सैन्यात दाखल झाले होते. त्या काळात त्यांच्या कथालेखनात खंड पडला. परत आल्यानंतर परत त्यांनी प्रभूंच्या कथामालेकरिता रहस्यकथा लिहायला सुरुवात केली.

बाबूरावांचे मुंबईतील गिरगावात चष्म्याचे दुकान होते. सुरुवातीला तेथे बसून बाबूराव रहस्यकथा लिहीत. दुकानात चष्मा खरेदी करण्याऐवजी लोक रहस्यकथा लेखक बाबूरावांना पहायला येत. बाबूराव जेपी (जस्टिस ऑफ पीस) होते; ते स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनेचेही काम करीत. त्यामुळे त्यांना खूप फोन येत, याचा आणि बाहेरील वर्दळीचा त्रास होऊ लागल्याने ते अनेकदा एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लेखन करीत. वयाच्या ५५व्या वर्षी बाबूरावांनी चष्म्याचे दुकान बंद केले.

बाबूराव अर्नाळकरांनी इ.स. १९३७ ते १९४२ च्या दरम्यान ’मराठ’ नावाचे एक मासिक चालवले होते.

आयुष्याची अखेर[संपादन]

पुडे पुढे रहस्यकथा वाचायची वाचकांची आवड कमी होऊ लागली आणि वयाने अतिवृद्ध झालेल्या बाबूरावांच्या पुस्तकांचा खप रोडावला, पण त्यांचे रहस्यकथा लिहिणे थांबले नाही. प्रकाशक दर आठवड्याला येत आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके मानधन देऊन घेऊन जात, पण त्यांपैकी अनेक पुस्तके प्रकाशकाने प्रसिद्धच केली नाहीत. बाबूरावांना हे त्याने कधीच कळू दिले नाही.

सन्मान[संपादन]

  • इ.स. १९६२ साली जेव्हा बाबूराव अर्नाळकरांच्या ५०० रहस्यकथा पूर्ण झाल्या तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मान करून त्यांना १०,००० रुपयांचे मानधन दिले होते.
  • आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, अनंत काणेकर, पु.ल.देशपांडे, नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू वि.भि.कोलते, महाराष्ट्रभाषाभूषण ज.र. आजगावकर या सर्वांनी बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथालेखनाला प्रोत्साहनच दिले आहे.
  • लता मंगेशकर या त्यांच्या भरगच्च दिनक्रमात अर्नाळकरांच्या रहस्यकथा जवळ बाळगत आणि वेळ मिळेल तेव्हा वाचत.
  • बालगंधर्व आजारी असताना बाबूराव अर्नाळकर त्यांना भेटायला माहीमला गेले होते. तेव्हा बालगंधर्व म्हणाले, ’माझी सेवा करणारी दोनच माणसे उरली आहेत, एक गोहर आणि दुसरे तुम्ही. मी तुमची पुस्तके वाचतो आणि सगळी दुःखे विसरतो.’
  • सरस्वती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पिरोज आनंदकर यांनी बाबूरावांना रहस्यकथांऐवजी शाळांवर किंवा शाळांसंबंधी काहीतरी लिहा असे सुनावले. काही वर्षांनी भेटल्यावर पिरोज आनंदकर म्हणाल्या की लोणावळ्याच्या बंगल्यातल्या माळीदेखील पहाटे दिवटी लावून तुमचे पुस्तक वाचत असल्याचे मी पाहिले. तुमची पुस्तके अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचली आहेत, यात काहीच शंका नाही.
  • वि.स. खांडेकरांच्या मते बाबूरावांच्या रहस्यकथा मुलांवर वाईट परिणाम करतात, तेव्हा त्यांनी तसले लिहिणे सोडून द्यावे. बाबूरावांनी खरोखरच लिहिणे सोडून देण्याचा विचार केला होता, पण तत्पूर्वी कुणाचातरी सला घ्यावा म्हणून त्यांनी आजगावकरांना आणि कोलत्यांना पत्राने विचारले. दोघांचीही उत्तरे आली की रहस्यकथा वाचणारे पुष्कळ विद्यार्थी परीक्षेत पहिले आल्याचे त्यांना माहीत आहे, तेव्हा रहस्यकथा वाचनामुळे मुलांवर वाईट परिणाम होतो, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही.

बाबूराव अर्नाळकरांची पुस्तके प्रकाशित करणारे प्रकाशक आणि माला[संपादन]

  • अस्नोडकर
  • उमा पब्लिकेशन्स
  • कांचनमाला
  • चार आणे माला
  • चिंदरकर
  • प्रफुल्लमाला
  • प्रभू
  • मनोरमा प्रकाशन
  • रसनामाला
  • वसंत बुक स्टॉल प्रकाशन

बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांमधील पुन्हापुन्हा येणारी पात्रे[संपादन]

  • पोलीस अधिकारी आनंदराव
  • चंद्रवदन उर्फ काळापहाड
  • कृष्णकुमारी
  • गोलंदाज
  • चारुहास
  • झुंजार, त्याची पत्‍नी विजया आणि नोकर नेताजी.
  • धनंजय आणि छोटू
  • पंढरीनाथ
  • भीमसेन
  • मनोरमा
  • मेघनाद
  • शालिमार
  • संजय
  • सुदर्शन

बाबूराव अर्नाळकरांची काही पुस्तकांची नावे[संपादन]

  • अकरावा अवतार
  • अजिंक्य फू मांच्यू
  • अभिनव भारत : देशभक्तिपर कथा
  • अष्टाग्रहीच्या फेऱ्यात
  • इस्पिकचा एक्का
  • कर्दनकाळ
  • कालकन्या
  • काश्मीर आघाडीवर
  • काळरात्र
  • काळाच्या जबडयात
  • काळापहाड
  • काळापहाडला शह
  • किल्ले झुंजार
  • कृष्णसर्प
  • कोर्टाची दुनिया
  • गोलंदाज आणि कांचन
  • चार न्यायाधीश
  • चोरांची दुनिया
  • चौकटची राणी
  • ज्वालामुखी
  • झुंजार आणि गांधीलमाशी
  • झुंजारचा दणका
  • झुंजारच्या तळघरात
  • देशभक्त काळा पहाड
  • नववे नवल
  • नवी चढाई
  • नवी मोहीम
  • निवडक बाबूराव अर्नाळकर (संपदित, संपादक - सतीश भावसार)
  • निशाणबाज!
  • नीलिमा
  • न्यायमंडळ
  • पहिली झुंज
  • पेशवाईतील काळापहाड
  • बाबुराव अर्नाळकर यांचा संच (एकूण ३२०२ पाने)
  • बुरखेधारी किलवर टोळी
  • भद्रंभद्र
  • भद्रभद्रचा विजयी टोला
  • भागोजी
  • भीमसेन
  • मृत्यूचा डाव
  • याचे नाव गोलंदाज
  • रंगेल उठावगीर
  • रणधुमाळी
  • रहस्यजाल
  • राजरहस्य
  • रुद्रावतार
  • विलक्षण शस्त्रक्रिया
  • विश्वामित्री पेच
  • वेताळ टेकडी
  • शाहजादी
  • सतीची समाधी
  • सहावी प्रतिमा
  • साहसी तरुणी
  • सूर्यकांताचा मृत्यू
  • सैतान
  • सोन्याची मोटार आणि इतर कथा : छोटा कथासंच, ४०८ पाने
  • हिऱ्याचे पदक