गो.नी. दांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गो. नी. दांडेकर या पानावरून पुनर्निर्देशित)


गो.नी. दांडेकर
शिक्षण सातवी इयत्ता
आई

अंबिकाबाई नीलकंठ दांडेकर

वडिल = नीलकंठ दांडेकर


गो.नी. दांडेकर
जन्म नाव गोपाल नीलकंठ दांडेकर
टोपणनाव गो.नी.दा.
जन्म जुलै ८, १९१६
परतवाडा
मृत्यू जून १, १९९८
पुणे
कार्यक्षेत्र कादंबरीकार, ललितलेखक
साहित्य प्रकार कादंबरी, ललित वाङमय,
कुमार वाङमय, चरित्र, प्रवासवर्णन
वडील नीलकंठ दांडेकर
आई अंबिकाबाई नीलकंठ दांडेकर
पत्नी निराताई
अपत्ये वीणा देव
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार
महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार
महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
महाराष्ट्र गौरव पुरस्कार -१९९०
जिजामाता पुरस्कार -१९९०
केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (ज्यांना गोनीदा असेही म्हणतात)(जुलै ८, १९१६ - जून १, १९९८) हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.

जीवनप्रवास[संपादन]

गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.

त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.

१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव (डॉ.वीणा विजय देव) ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.

कादंबरी अभिवाचन[संपादन]

गो.नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांच्या वाचनाचा सार्वजनिक कार्यक्रम वर्षातून अनेकदा होतो. या उपक्रमाची सुरुवात १९७५मध्ये प्रत्यक्ष गोनीदांनी केली. संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम 'मोगरा फुलला' या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते

यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. 'मोगरा फुलला'च्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या. गोनीदा हयात असताना सुरू झालेला हा उपक्रम त्यांच्या पश्चातही या कुटुंबाने अखंडपणे सुरू ठेवला. त्यांच्या या उपक्रमात पुढे देव कुटुंबीयांचे जावई रुचिर कुलकर्णी हेदेखील सहभागी झाले.

अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित केलेला या कादंबरी अभिवाचनाचा साडेसहाशेवा प्रयोग १८ फेब्रुवारी २०१५ रोजी पुण्यात ’निवारा’ सभागृहात झाला..

गो.नी.दां.चे दुर्गप्रेम[संपादन]

गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. 'किल्ले' हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'रानभुली', 'त्या तिथे रुखातळी', 'वाघरू', आणि 'माचीवरला बुधा' या त्यांच्या कादंबऱ्यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे.

साहित्य[संपादन]

कथा[संपादन]

  • आईची देणगी (बालसाहित्य)

कादंबरी[संपादन]

आम्ही भगीरथाचे पुत्र कृष्णवेध जैत रे जैत तांबडफुटी पडघवली
पद्मा पवनाकाठचा धोंडी पूर्णामायची लेकरं बिंदूची कथा माचीवरला बुधा
मोगरा फुलला मृण्मयी शितू सिंधुकन्या वाघरू
रानभुली त्या तिथे रुखातळी

ललित[संपादन]

चरित्र, आत्मचरित्र[संपादन]

चित्रपट[संपादन]

गो.नी. दांडेकरांच्या ‘माचीवरचा बुधा’ या कादंबरीवरून त्याच नावाचा एक मराठी चित्रपट बनला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजयदत्त यांचे आहे.

आप्पांच्या'जैत रे जैत' या कादंबरीवर आधारित चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. सदर चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. कर्नाळा किल्लाजवळील 'ठाकरांवर' आधारित हा चित्रपट आहे.

ऐतिहासिक[संपादन]

प्रवास आणि स्थळवर्णन[संपादन]

किल्ले कुणा एकाची भ्रमणगाथा गगनात घुमविली जयगाथा
गोनीदांची दुर्गचित्रे (संकलन-संपादन वीणा देव) दुर्ग दर्शन दुर्गभ्रमणगाथा
नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा निसर्गशिल्प महाराष्ट्र दर्शन
मावळतीचे गहिरे रंग शिवतीर्थ रायगड

धार्मिक आणि पौराणिक, संतचरित्रे[संपादन]

गणेशायन श्रीकृष्णगायन श्रीरामायण भावार्थ ज्ञानेश्वरी भक्तिमार्गदीप
श्रीगणेशपुराण श्रीकर्णायन श्री संत ज्ञानेश्वर श्री संत तुकाराम श्रीमहाभारत
श्री संत एकनाथ श्री संत नामदेव श्री गाडगेमहाराज श्री संत रामदास कहाणीसंग्रह
श्रीगुरुचरित्र (मूळ) सुबोध गुरुचरित्र सार्थ ज्ञानेश्वरी

कुमारसाहित्य[संपादन]

गौरव[संपादन]

पुरस्कार[संपादन]

साहित्य अकादमी पुरस्कार १९७६ 'स्मरणगाथा' साठी महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
महाराष्ट्र गौरव पुरस्कार -१९९० जिजामाता पुरस्कार -१९९० केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार

स्मृति पुरस्कार[संपादन]

गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्‍नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफाॅर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत.

बाह्य दुवे[संपादन]