विनायक दामोदर सावरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्वातंत्र्यवीर सावरकर या पानावरून पुनर्निर्देशित)
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर
VD Savarkar.jpg
सावरकरांचे छायाचित्र
जन्म: २८ मे १८८३
भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६
दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अभिनव भारत
अखिल भारतीय हिंदू महासभा
प्रमुख स्मारके: मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान, नाशिक
धर्म: हिंदू ( चित्पावन ब्राह्मण )
प्रभाव: छत्रपती शिवाजी महाराज[ संदर्भ हवा ], जोसेफ मॅझिनी, चापेकर बंधू
प्रभावित: अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पोंक्षे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शेषराव मोरे, अनंत ओगले, आकाश भडसावळे
वडील: दामोदर विनायक सावरकर
आई: राधाबाई दामोदर सावरकर [१]
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर (माई)[२]
अपत्ये: प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास

विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धीलिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.[३] १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे :- आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥ [४][५]

चरित्र[संपादन]

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला.[६] त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन मुलांपैकी दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला.[७] सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना केल्या . चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.[८]

विवाह[संपादन]

मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले.[९]

शिक्षण आणि क्रांतिकार्य[संपादन]

लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.[१०]

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.[११] इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.[१२]

इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला.[१३] हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०).[१४] ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला.[१५] पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले.[१६] हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला.[१७] ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केली आणि ब्रिटिश सरकारची माफी मागितली. त्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).

७ ऑक्टोबर १९०५ ला वीर सावरकरांनी लोकमान्य टिळकांना  घेऊन पुण्याच्या fc रोड ला विदेशी कपड्यांची होळी पेटवली

सावरकरांचे जात्युच्छेदन[संपादन]

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६[१८]) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अधःपतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली.[१९] स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.[ संदर्भ हवा ] जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले.[२०] या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला.[२१] सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.[२२]

हिंदू महासभेचे कार्य[संपादन]

रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.[२३]

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.

सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.[२४]

सावरकर स्मारके[संपादन]

  • पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.[२५]
  • सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
  • पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.
  • गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
  • स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)[ संदर्भ हवा ]

संस्था[संपादन]

सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-

  • नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र - यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्‌मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.
  • वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
  • वीर सावरकर मित्र मंडळ ()
  • वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
  • समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
  • सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
  • सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ ()
  • स्वातंत्र्यवीर सावरकर पुस्तकप्रेमी मंडळ ( संस्थापक - शिवम सत्यवान मद्रेवार )
  • स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.[ संदर्भ हवा ]

ग्रंथ आणि पुस्तके[संपादन]

वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५००हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते",[२६] "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.[२७][२८]

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :

  1. अखंड सावधान असावे
  2. १८५७ चे स्वातंत्र्यसमर
  3. अंदमानच्या अंधेरीतून
  4. अंधश्रद्धा भाग १
  5. अंधश्रद्धा भाग २
  6. संगीत उत्तरक्रिया
  7. संगीत उःशाप
  8. ऐतिहासिक निवेदने
  9. काळे पाणी
  10. क्रांतिघोष
  11. गरमा गरम चिवडा
  12. गांधी आणि गोंधळ
  13. जात्युच्छेदक निबंध
  14. जोसेफ मॅझिनी
  15. तेजस्वी तारे
  16. नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
  17. प्राचीन अर्वाचीन महिला
  18. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  19. भाषा शुद्धी
  20. महाकाव्य कमला
  21. महाकाव्य गोमांतक
  22. माझी जन्मठेप
  23. माझ्या आठवणी - नाशिक
  24. माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
  25. माझ्या आठवणी - भगूर
  26. मोपल्यांचे बंड
  27. रणशिंग
  28. लंडनची बातमीपत्रे
  29. विविध भाषणे
  30. विविध लेख
  31. विज्ञाननिष्ठ निबंध
  32. शत्रूच्या शिबिरात
  33. संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
  34. सावरकरांची पत्रे
  35. सावरकरांच्या कविता
  36. स्फुट लेख
  37. हिंदुत्व[२९]
  38. हिंदुत्वाचे पंचप्राण
  39. हिंदुपदपादशाही
  40. हिंदुराष्ट्र दर्शन
  41. क्ष - किरणें


इतिहासविषयावरील पुस्तके[संपादन]

कथा[संपादन]

कादंबऱ्या[संपादन]

संदर्भ

  1. ^ Arya, Rakesh Kumar (2016-12-16). Gandhi & Savarkar: गांधी और सावरकर (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5261-670-1.
  2. ^ Goyal, Shiv Kumar. Kranti Kari Savarkar (हिंदी भाषेत). Subodh Pocket Books. ISBN 978-81-87961-18-5.
  3. ^ "Savarkar Jayanti 2022 : कवी, लेखक, प्रखर विज्ञानवादी, हिंदूसंघटक ते भाषाशुद्धीचे प्रणेते जाणून घ्या सावरकरांविषयी सर्वकाही". Maharashtra Times. 2022-05-28 रोजी पाहिले.
  4. ^ हिंदी विश्वकोश (हिंदी भाषेत). नागरीप्रचारिणी सभा. 1960.
  5. ^ "It's time to revisit facets of Savarkar's life and work which can guide us today". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-05-28. 2021-02-26 रोजी पाहिले.
  6. ^ "Who was Veer Savarkar and how he contributed in National Freedom Struggle Movement?". Jagranjosh.com. 2020-02-24. 2021-03-03 रोजी पाहिले.
  7. ^ ऑनलाईन, सामना. "लेख : सावरकर घराण्याचे क्रांतिकार्यातील योगदान | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-05-08. 2021-03-03 रोजी पाहिले.
  8. ^ Sampath, Vikram (2019-08-16). Savarkar: Echoes from a Forgotten Past, 1883–1924 (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India Private Limited. ISBN 978-93-5305-614-8.
  9. ^ "महिलाओं में स्वाभिमान जगाया क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर की पत्नी यमुनाबाई ने". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-05-28 रोजी पाहिले.
  10. ^ March 31, Dipankar De Sarkar; March 31, 1989 ISSUE DATE:; October 23, 1989UPDATED:; Ist, 2013 10:41. "Plaques of Gandhi, Patel, Tilak and Savarkar put up in London". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  11. ^ "अभिनव भारत". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2021-03-03 रोजी पाहिले.
  12. ^ "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - Webduniya Marathi". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.
  13. ^ Sankalit (2017-01-01). Veer Savarkar (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 978-93-84414-78-8.
  14. ^ "ऐतिहासिक उडीची शताब्दी!". Maharashtra Times. 2021-03-09 रोजी पाहिले.
  15. ^ Saavarkar, Vinayak Damodar (2007-01-01). Mera Ajivan Karavas (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-648-9.
  16. ^ "गांधी आणि सावरकर : विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व... | eSakal". www.esakal.com. 2021-02-26 रोजी पाहिले.
  17. ^ "BBC News मराठी".
  18. ^ ":: Swatantra veer Savarakar Smarak ::". www.savarkarsmarak.com. 2018-04-04 रोजी पाहिले.
  19. ^ http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध वेबसाईट दिनांक २६ जुलै २०१२ १४-३५ वाजता पाहिले
  20. ^ "वीर सावरकर के आदर्शों पर चलने का लिया गया संकल्प, पुण्यतिथि पर दी गई श्रद्धांजलि". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2021-03-03 रोजी पाहिले.
  21. ^ "10 Interesting facts about VD Savarkar". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2019-10-19. 2021-02-26 रोजी पाहिले.
  22. ^ "सावरकरांचे समाजकारण | eSakal". www.esakal.com. 2021-03-17 रोजी पाहिले.
  23. ^ Sankalit (2017-01-01). Veer Savarkar (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 978-93-84414-78-8.
  24. ^ सम्पत, Vikram Sampath/विक्रम (2022-03-15). Savarkar/सावरकर: Ek Vivadit Virasat 1924-1966/एक विवादित विरासत 1924-1966 (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India Private Limited. ISBN 978-93-5492-367-8.
  25. ^ Sarkar, Sumit (2004-09-23). Savarkar, Vinayak Damodar (1883–1966), Hindu nationalist. Oxford Dictionary of National Biography. Oxford University Press.
  26. ^ "Tarun Bharat : जयोस्तुते श्रीमहन्मंगले… : स्वातंत्र्यदेवतेची आरती". Tarun Bharat. 2021-03-17 रोजी पाहिले.[permanent dead link]
  27. ^ "'ने मजसी ने'ची शतकपूर्ती". Maharashtra Times. 2021-03-17 रोजी पाहिले.
  28. ^ "वीर सावरकरांनी 'हे' शब्द मराठीला दिले". My Mahanagar. 2021-03-17 रोजी पाहिले.
  29. ^ Savarkar, Vinayak Damodar (2021-02-01). Hindutva (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-89982-03-9.