१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१८५७चे स्वातंत्र्ययुद्ध
उठावाची ठिकाणे दर्शवणारा १९१२ सालीचा आराखडा
उठावाची ठिकाणे दर्शवणारा १९१२ सालीचा आराखडा
दिनांक १० मे १८५७ - २० जून १८५८
स्थान उ.भारतीय मैदानी प्रदेश, बंगाल
परिणती ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात
शिपायांचा उठाव दडपला गेला
मुघल साम्राज्यमराठा साम्राज्यांचा शेवट
ब्रिटीश राणीचा अंमल सुरू
युद्धमान पक्ष
ईस्ट इंडिया कंपनीचे बंडखोर शिपाई
मुघल
ग्वाल्हेर संस्थान
झांंशी संस्थान
मराठा साम्राज्य
ईस्ट इंडिया कंपनी
ब्रिटिश साम्राज्य
भारतातील युरोपीय नागरिक
२१ भारतीय संस्थाने
नेपाळचे साम्राज्य
सेनापती
बहादूरशहा दुसरा
नानासाहेब पेशवा 2
राणी लक्ष्मीबाई
तात्या टोपे
बख्त खान
बेगम हजरत महल
कुंवरसिंघ
इंग्रजी सेनाधिकारी


१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७ चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरू झालेले बंड २० जून १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूरदिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.

१ नोव्हेंबर १८५८ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.

१८५७ च्या उठावातील दोन व्यक्तींना फाशी
तात्या टोपे यांची सेना

उठावाची कारणे[संपादन]

बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ, अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी, कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक)[संपादन]

वि.दा. सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.[१]

अन्य पुस्तके[संपादन]

  • अठराशे सत्तावन्न आणि मराठी कादंबरी (प्रमोद मुनघाटे)
  • १८५७चा जिहाद (शेषराव मोरे)
  • १८५७चा प्रस्फोट (ज.द. जोगळेकर)
  • १८५७ची यशोगाथा (अनिल गोडबोले)
  • १८५७ चे आणखी काही पैलू (सेतुमाधवराव पगडी)
  • १८५७ चे स्वातंत्र्यसमर (वि.दा. सावरकर)
  • १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील तात्या टोपे (डॉ. पद्माकर प्रभाकर जोशी)
  • १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील सेनानी नानासाहेब पेशवे (डॉ. पद्माकर प्रभाकर जोशी)
  • १८५७ : बंडाचा वणवा (कादंबरी, लेखक - परशुराम सदाशिव देसाई, वरदा प्रकाशन)
  • इंग्रजांच्या दृष्टिकोनातून १८५७चा प्रस्फोट (ज.द. जोगळेकर)
  • रणसंग्राम १८५७चा - भाग १, २ (कॅप्टन राजा लिमये)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'१८५७ चे स्वातंत्र्यसमर'च्या मूळ हस्तलिखिताची प्रत सावरकर स्मारकात!". लोकसत्ता. २४ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.