नवयान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चैत्यभूमीमधील बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांची मुर्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ‘नवयान’चे जनक बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना जनता.

नवयान किंवा नव-बौद्ध धर्म हा एक प्रमुख बौद्ध संप्रदाय असून भारतातील बहुसंख्य बौद्ध धर्मीय याचे अनुयायी आहेत. ‘नवयान बौद्ध धर्माला’ ‘नवबौद्ध धर्म’ आणि नवयानी बौद्ध अनुयायांना ‘नवबौद्ध’ म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नवयान संप्रदायाचे जनक आहेत. नवयानचा अर्थ : नव — नवीन किंवा शुद्ध, यान — मार्ग किंवा वाहन. नवयानला भीमयान सुद्धा म्हटले जाते. नवयानी बौद्ध अनुयायांना नवबौद्ध असेसुद्धा म्हटले जाते, कारण ते सहा दशकांपूर्वी बौद्ध झाले होते. नवयानला भीमयान नाव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ भीमराव नावावरून पडले. हा संप्रदाय महायान, थेरवाद आणि वज्रयान पासून पूर्ण भिन्न आहे परंतु यात या तिन्हीं संप्रदायातील बुद्धांचे मूळ व शुद्ध सिद्धान्तंसोबत विज्ञाननिष्ठ व मानवतावादी सिद्धान्त घेण्यात आले आहेत. हा संप्रदाय कोणत्याही अंधश्रद्धा किंवा निरूपयोगी रूढी परंपरांना मानत नाही. या बौद्ध धर्माच्या संप्रदायाची सुरुवात आणि स्थापना बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. बाबासाहेबांनी पत्‍नी माईसाहेब समवेत १४ अॉक्टोबर इ.स. १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे महास्थविर चंद्रमणींकडून बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली व नंतर आपल्या ५ लक्ष अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दिक्षा दिली आणि भारतात बौद्ध धर्माचे पुनरूत्थान केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्म स्वीकार करण्याच्या एक दिवस आधी एका पत्रकाराने विचारले, ‘तुम्ही ज्या बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहात तो महायान बौद्ध धर्म असेल की हीनयान बौद्ध धर्म ?’ त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘‘माझा बौद्ध धर्म महायान ही नाही आणि हीनयान ही नाही. या दोन्ही संप्रदायात काही अंधश्रद्धायुक्त बाबी आहेत म्हणून माझा बौद्ध धर्म हा नवयान बौद्ध धर्म असेल. ज्यात बुद्धांचे मूळ सिद्धान्त आणि केवळ विवेकवादी सिद्धान्त असतील, कोणत्याही कुप्रथा किंवा अंधश्रद्धा नसतील. तो एक ‘शुद्ध स्वरूपाचा बौद्ध धर्म’ असेल’’ पत्रकाराने पुन्हा विचारले, “काय आम्ही याला 'भीमयान' म्हणू म्हणावे का?” “तुम्ही म्हणू शकता परंतु मी म्हणणार नाही, कारण मी स्वतःला गौतम बुद्धांच्या समान उभा करू शकत नाही.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तरले. भारतीय बौद्ध किंवा नवयानी बौद्ध अनुयायी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गौतम बुद्ध यांच्या समान सन्मान देतात. कारण बुद्ध आणि बाबासाहेब दोन्हीही भारतीय बौद्धांचे श्रेष्ठतम गुरू आहेत.

२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानूसार, भारतातील बौद्ध लोकसंख्यामध्ये ८७% नवयानी बौद्ध आहे. आणि जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[१]

उदय[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अस्पृश्य म्हणजेच पूर्वीचे नाग लोकांचे नेते होते, जे औपनिवेशिक कालखंडात आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रभावशाली होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका महार कुटुंबात झाला होता, ते १९१३ला परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले. १९२० च्या दशकात ते भारतात परतले आणि देशाच्या राजकीय चळवळीत सहभागी झाले. अस्पृश्य समाजाला सामाजिक आणि राजकीय हक्क मिळवून देणे हा त्यांचा उद्देश होता. आपल्या समुदायाला धार्मिक पूर्वग्रहदूषित मुक्त करण्यासाठी त्यांनी असा निष्कर्ष काढला की, त्यांनी हिंदू धर्म सोडून द्यावा आणि पूर्वाश्रमीचा बौद्ध धर्मांमध्ये वाटचाल सुरू केली. त्यांनी जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला, ज्यात त्यांनी इस्लाम, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध धर्माचा विचार केला. शेवटी त्यांनी बौद्ध धर्माला नवयानच्या स्वरूपात निवडले.[२][३]

सिद्धान्त आणि संकल्पना[संपादन]

इ.स. १९३५ मध्ये, डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मातून पडण्याचे आपले ध्येय जाहीर केले. पुढील दोन दशकांत, त्यांनी विविध धर्मग्रंथांसह बौद्ध धर्मातील ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला की मुख्यधारेतील थेरवाद आणि महायान बौद्ध धर्मातील काही मूलभूत विश्वास आणि सिद्धांत बुद्धांच्या शिकवणुकीतील दोषपूर्ण आणि अतार्किक आहेत.

विविध बौद्ध ग्रंथांचा संदर्भ देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथामध्ये खालील बाबींसंबंधी स्वतंत्र विचार मांडले आहेत, जे की प्रमुख पारंपरिक बौद्ध शिकवणीनुसार भिन्न आहेत :

धर्मांतर[संपादन]

मी स्वीकार करतो की मी बौद्ध धम्माची शिकवण आणि सिद्धांतांचे पालन करेन, मी हीनयान आणि महायान, दोन्ही धार्मिक नियमांच्या बाबींपासून माझ्या लोकांना दूर ठेवेल. आमचा हा नव-बौद्ध धम्म, ‘नवयान’ आहे.

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्याम हॉटल, नागपूर येथे १३ अॉक्टोबर इ.स.१९५६ रोजीची पत्रकार परिषद[४]
मुख्य पान: नवबौद्ध चळवळ

वर्तमान भारतात जेव्हा जेव्हा तथागत बुद्धांचे स्मरण केले जाते तेव्हा तेव्हा स्वाभाविकपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुद्धा आदराने घेतले जाते. कारण स्वातंत्र्यानंतर कोट्यवधी भारतीय लोकांनी प्रचंड मोठ्या संख्येने एकाच वेळी रक्ताचा एकही थेंब न सांडवता डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नवयान बौद्ध धम्माचा स्वीकार केला. १४ अॉक्टोबर, इ.स. १९५६ हा दीक्षा समारोह नागपूर येथे झाला. बाबासाहेबांचे ५,००,००० अनुयायी बौद्ध झाले. दुसऱ्या दिवशी २,००,००० आणि नंतर तिसऱ्या दिवशी १६ अॉक्टोबर रोजी चंद्रपूर येथे ३,००,००० अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या प्रकारे तीन दिवसांत १० लाखांपेक्षा अधिक अनुयायी बौद्ध झाले. यामुळे भारतात बौद्ध धर्माचे पुनःरूजीवन किंवा पुनर्जन्म झाला. एका निष्कर्षानुसार मार्च इ.स. १९५९ पर्यंत १.५ ते २ कोटी बहुजन व अन्य समाजातील लोक बौद्ध झाले होते.[५] आज भारतामध्ये बौद्ध धर्म हा एक प्रमुखनी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म ठरलेला आहे.

पवित्र शास्त्र आणि आचरण[संपादन]

धर्मग्रंथ[संपादन]

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ नवयानी बौद्ध अनुयायांचा धर्मग्रंथ आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा व सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे.

रिसेप्शन[संपादन]

वर्तमान स्थिती[संपादन]

लोकसंख्या[संपादन]

भारतातील बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%), सन २०११

भारतीय बौद्ध लोकसंख्येत जवळजवळ ९५% पेक्षा जास्त नवयानी बौद्ध अनुयायी आहेत. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार भारतात ‘अधिकृत बौद्ध’ ८५ लाख (भारतीय लोकसंख्या ०.७%) असून यात ८७% बौद्ध हे नवयानी आहे. परंतु इतर सर्वेक्षणे आणि बौद्ध विद्वानांनुसार भारतात ५% ते ६% (६ ते ७ कोटी) बौद्ध आहेत आणि यातील ९८% पेक्षा जास्त बौद्ध हे नवयानी बौद्ध आहेत.

बौद्धांचा विकास[संपादन]

दलितांना असे वाटू लागले हिंदू धर्माचा त्याग करणे हा विकासाचा एक उत्तम मार्ग आहे. कारण मागील काही वर्षांत नवबौद्धांची स्थिती सुधारली आहे. इतर हिंदू दलितांचे जीवनमान व्होट बँकस्वरूपात संघटित झाले परंतु सामाजिक आर्थिक स्थिती तीच आहे. १२५व्या आंबेडकर जयंती प्रसंगी रोहित वेमुलाची आई आणि भावाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. भारतातील बौद्ध हे सामाजिक दृष्ट्या भारतातील दलित, हिंदू, मुस्लिम व शिख धर्मींयाहून विकसित आहेत.भारतातील बौद्ध हे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पाळत नाही.ते विज्ञान प्रिय आहे.[६][७] [८]

बौद्धांचे जीवनमान सुधार [९][संपादन]

इ.स. २००१[संपादन]

इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार भारतात बौद्धांची संख्या ८० लाख होती आणि त्यात बहुतांश बौद्ध हे धर्मांतरापूर्वी पूर्वाश्रमीच्या तथाकथित अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींतले होते.

यात सर्वाधिक ५९ लाख बौद्ध महाराष्ट्रात बनले आहे. उत्तर प्रदेशात केवळ 3 लाखाच्या आसपास नवबौद्ध आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी हिंदू कर्मकांड सोडून दिले आहे. पूर्ण देशात १९९१ ते २००१ दरम्यान बौद्धांच्या लोकसंख्येत २४% वृद्धी झालेली आहे.[१०]

१. लिंग गुणोत्तर: हिंदू दलितांमध्ये ९३६ च्या तुलनेत बौद्धांमध्ये स्त्रि आणि पुरुष यांचे लिंग गुणोत्तर ९५३ प्रति हजार आहे. यावरून हे सिद्ध होते की बौद्ध कुटुंबात स्त्रियांची स्थिती हिंदू दलित स्त्रियांपेक्षा खूप चांगली आहे. हे बौद्ध समाजात स्त्रियांच्या चांगल्या शिक्षण दर्जा व आधुनिककतेमुळे आहे. बौद्धांचे हे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या हिंदू (९३१), मुस्लिम (९३६), शिख (८९३) आणि जैन (९४०)च्या तुलनेने अधिक आहे.

२. मुलांचे लिंग गुणोत्तर (०-६ वर्ष): इ.स २००१ च्या लोकसंख्येनुसार बौद्धांमध्ये लहान मुली आणि मुलांचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९४२ आहे. जे हिंदू दलिंतांच्या ९३८ प्रमाणापेक्षा अधिक आहे. हेच प्रमाण हिंदू मध्ये (९२५), शीख समुदायात (७८६),तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे. तसेच जैन (८७०). ही तुलना हिंदू दलित तसेच मुलिंना बौद्ध समूहात चांगले शिक्षण व देखभाल व संरक्षणामुळे दिसून येते.

३. साक्षरता दर

बौद्ध अनुयायीयांतील साक्षरता दर ७२.७ टक्के आहे. जो हिंदू दलितांच्या ५४.७ टक्के विचारात घेता अधिक आहे. या दरात हिंदू दर ६५.१% मुस्लिम ५९.१% (आणि शिख ६९.४% तुलनेत बौद्ध हे हिंदू व अन्य धार्मिक दलितांच्या तुलनेत जास्त साक्षर आहेत.

४. स्त्री साक्षरता

बौद्ध स्त्री साक्षरता अन्य दलित स्त्री साक्षरतेचा विचार करता ४१.९ %च्या तुलनेत ६१.७% आहे. हा दर हिंदू मधील ५३.२% आणि मुस्लिम ५०.१%च्या तुलनेत अधिक आहे. यावरून असे दिसते की बौद्ध महिला अन्य धार्मिक दलित समूदायातील महिलांपेक्षा जास्त शिक्षण घेत आहेत.

५. कामातील भागीदारी दर

बौद्धांसाठी हा दर ४०.६ % सर्वाधिक आहे. जो अन्य हिंदू दलितांसाठी ४०.४ %, मुस्लिम ३१.३ % ख्रिस्ती ३९.३ % , शिख ३१.७ % आणि जैन ३२.७  % असा आहे. यावरून बौद्ध हे अधिक कार्यरत असल्याचे दिसते.

या वरून असे लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या प्रगतीसाठी जो मानवतावादी बौद्ध धर्म दिला त्यामुळे बौद्ध समुदायात प्रगतीचे नवचैतन्य बहरले. परंतु तरीही अद्याप अतिशय अल्प समूदायाने बौद्ध धर्म अंगीकारला आहे. हिंदू, मुस्लिम व दलितांच्या तुलनेत दृश्य प्रगती बौद्ध समुदाय करत आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ मउदगिल, मनु (2017-06-23). "दलितों का बौद्ध धर्म अपनाना जारी, लेकिन परिवर्तन दर कम". IndiaSpend (इंग्रजी भाषेत). 2018-03-16 रोजी पाहिले.
  2. ^ Robert E. Buswell Jr.; Donald S. Lopez Jr. (2013). The Princeton Dictionary of Buddhism. Princeton University Press. p. 34. ISBN 978-1-4008-4805-8.
  3. ^ Keown, Damien; Prebish, Charles S. (2013). Encyclopedia of Buddhism. Routledge. pp. 24–26. ISBN 978-1-136-98588-1.
  4. ^ https://web.archive.org/web/20110208224554/http://www.navayan.com/navayan.php?about-navayan
  5. ^ संघरक्षितांचा ‘डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म’ हा ग्रंथ (Ambedkar and Buddhism by Sangharakshita)
  6. ^ "बौद्ध बनने से दलितों को फायदा ही फायदा". www.nationaldastak.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-08-01. 2018-03-16 रोजी पाहिले.
  7. ^ Moudgil, Manu. "Conversion To Buddhism Has Brought Literacy, Gender Equality And Well-Being To Dalits | IndiaSpend-Journalism India |Data Journalism India|Investigative Journalism-IndiaSpend". www.indiaspend.com. Archived from the original on 2020-09-15. 2018-03-16 रोजी पाहिले.
  8. ^ "बौद्ध बढ़े, चुनावी चर्चे में चढ़े". aajtak.in (हिंदी भाषेत). 2018-03-16 रोजी पाहिले.
  9. ^ "Opinion | Buddhists are far ahead of Hindu Dalits". www.buddhistchannel.tv. 2018-03-16 रोजी पाहिले.
  10. ^ पत्रकार, अनिल यादव वरिष्ठ; लिए, बीबीसी हिंदी डॉट कॉम के. "बौद्ध बनने से हिंदू दलितों के दिन फिरे". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2018-03-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत