मूकनायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मूकनायक मुखपृष्ठ, पहिला अंक

मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते.[१] ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती.[२][३]

या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. ५ जुलै १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले.[४]

सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यांत आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले.[५] मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली. 'मूकनायक' पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. 'मूकनायक' एप्रिल १९२३ मधे बंद पडले.[६]

पहिला अंक[संपादन]

बाबासाहेबांनी सुरू केलेले दोन पाक्षिके मूकनायक व बहिष्कृत भारत

बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या खालील ओव्या छापल्या जात असे.

काय करून आता धरुनिया भीड |
निःशक हे तोड वाजविले ||१||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |
सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||

पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये खालील जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली[७]

आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.

मूकनायकाच्या पहिल्या अंकातील हा ही मजकूर पुढीलप्रमाणे होता — "हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही."[८]

हे सुद्धा पहा[संपादन]

लोकप्रिय संस्कृतीत[संपादन]

गंगाधर पानतावणे यांनी मूकनायक नावाचे आंबेडकरांवर पुस्तक लिहिले आहे.[९]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/100-years-of-the-makers-of-mukuneka/articleshow/68865388.cms
  2. ^ "Dr. Ambedkar as a Journalist". Velivada (इंग्रजी भाषेत). 2018-12-27 रोजी पाहिले.
  3. ^ चौबे, Kripashankar Chaube कृपाशंकर. "वर्तमान के सन्दर्भ में आंबेडकर की पत्रकारिता का महत्त्व". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2018-12-27 रोजी पाहिले.
  4. ^ Gaikwad, Dr. Dnyanraj Kashinath (2016). Mahamanav Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Marathi भाषेत). Riya Publication. p. 102.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "संग्रहित प्रत". www.mahanews.gov.in. Archived from the original on 2019-01-03. 2018-12-27 रोजी पाहिले.
  6. ^ "संग्रहित प्रत". www.beedlive.com. Archived from the original on 2020-02-02. 2018-12-27 रोजी पाहिले.
  7. ^ Gathal, Dr. S. S. (2017). Aadhunik Maharashtracha Itihas (Marathi भाषेत). Aurangpura, Aurangabad, Maharashtra: Kailas Publication. pp. 424, 425.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ राजबहादुर, Raj Bahadur. "बाबा साहेब डा. आंबेडकर का सृजनात्मक साहित्य". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2018-12-27 रोजी पाहिले.
  9. ^ https://www.amazon.in/Muknayak-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-Dr-Gangadhar-Pantavane/dp/B07TJHVLD4

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत