गोपाळ कृष्ण गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नामदार गोपाळ कृष्ण गोखले या पानावरून पुनर्निर्देशित)
गोपाळ कृष्ण गोखले

जन्म: मे ९, १८६६
कोतळूक, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू: फेब्रुवारी १९, १९१५
पुणे , महाराष्ट्र
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा
संघटना: भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
वडील: कृष्ण महादेव गोखले
आई: सत्यभामाबाई कृष्ण गोखले

नामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात. 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरचा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. राजकारणाला आध्यात्मिकरणाचा विचार त्यांनी मांडला. एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्त्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली. महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरू मानले. गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजकारणी होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टिकोण उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. जहाल विचार व सरळ प्रतिकार, सशस्त्र क्रांती यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता. मात्र इंग्रजांच्या न्यायबुद्धी वर उदारतेवर निष्पक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता. गोखले यांच्या मते इंग्रजपूर्व काळात भारतात शांतता आणि सुव्यवस्था ही अस्तित्वात नव्हती. आणि ही गोष्ट खरी होती. इंग्रजांच्या आगमनानंतर केवळ सनदशीर मार्गाने ब्रिटिशांनी शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. एकूणच गोपाळकृष्ण गोखले यांचा दृष्टिकोन हा ब्रिटिशधार्जिणा होता असे म्हणता येईल. गोपाळकृष्ण गोखले यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाला आध्यात्मिकतेत बसवले. त्याचाच वारसा पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. गोखल्यांच्या सांगण्यावरूनच महात्मा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि अहिंसात्मक सत्याग्रहाची चळवळ देशामध्ये उभी करण्यात ते यशस्वी ठरले गोपाळ कृष्ण गोखले यांच्या उदारमतवादाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय व सामाजिक परिवर्तन करताना हिंसात्मक मार्गाला त्यांनी केलेला विरोध होय गोपाळ कृष्ण गोखले हे सरकारशी संघर्ष करण्याच्या तसेच कायद्याच्या उल्लंघन करण्याच्या विरोधात होते कोणताही प्रश्न हिंसात्मक मार्गाने सुटणार नाही उलटपक्षी तो अधिकच गंभीर बनतो असा विचार गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली भारताची नवनिर्मिती करता येईल अशी त्यांची ठाम धारणा होती थोडक्यात गोपाळ कृष्ण गोखले यांच्या राजकीय उदारमतवादी विचारात हिंसेला कोणतेही स्थान नव्हते याठिकाणी पुणे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी लोकांना सामाजिक सुधारणा व राजकीय शिक्षण देखील मिळावे हा उद्देश कायम ठेवला ब्रिटिश सरकारच्या न्याय बुद्धीवर त्यांचा विश्वास होता

बालपण[संपादन]

रत्‍नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील बंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या पत्‍नीने स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे गोपाळ कृष्ण गोखल्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले.

शिक्षण[संपादन]

१८८४ मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी १८८५ मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक कार्यांत त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.

राजकीय प्रवास[संपादन]

बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.

इ.स. १९०२ साली त्यांची निवड केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली, आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले.

इ.स. १८८९ मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा काँग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. १९०५ सालच्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. काँग्रेसचे कार्य त्यांनी भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Societyची) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.

त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले.

न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व निःस्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत.

भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली. सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत.

‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, निःस्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले.

संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी निधन झाले.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे 'अंकगणित' हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात असे. हे पुस्तक अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले होते. ज्यांनी गोखल्यांच्या अंकगणितातली गणिते सोडवली त्याला कुठलेही गणित अवघड वाटणार नाही असी मान्यता होती.

सामाजिक सुधारणा[संपादन]

इ.स. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. १९०११ मधे त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे म्हणून पाहिले विधेयक इम्पीरियल कौन्सिल मधे मांडले.

संस्था[संपादन]

नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स ॲन्ड इकाॅनाॅमिक्स' नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.

आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत १९१६-१७ या काळात लिहिलेल्या गोखल्यांच्या पहिल्या चरित्राचे मराठी भाषांतर ९४ वर्षांनी म्हणजे २०११ साली मराठीत आले. हे भाषांतर विद्या शर्मा यांनी केले आहे.

गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासंबंधी पुस्तके[संपादन]

  • गोखले : नवदर्शन (मु.गो. देशपांडे)
  • नामदार गोखल्यांचं शहाणपण (नरेंद्र चपळगावकर)
  • नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज (नरेंद्र चपळगावकर)
  • भारत के अमर चरित्र : गोपाळ कृष्ण गोखले (हिंदी लेखक - नेमिशरण मित्तल)
  • महात्मा गोपाळ कृष्ण गोखले (चरित्र, मूळ आसामी, लेखक - डॉ. सूर्यकुमार भुयां, मराठी अनुवाद - विद्या शर्मा)

चित्रपट[संपादन]

  • गोपाल कृष्ण (हिंदी) (१९१५) (गोपाल कृष्ण गोखल्यांवरील कृष्ण-धवल मूकपट) (भूमिका : गोपाळ कृष्ण गोखले स्वतः); दिग्दर्शक आर. नटराज मुदलियार)

संदर्भ[संपादन]