मुंबई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखपृष्ठ सदर लेखCrystal Clear action bookmark.png
हा लेख ऑक्टोबर १५, २००६ रोजी मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर होता. २००६चे इतर मुखपृष्ठ सदर लेख
हा लेख मुंबई शहराविषयी आहे. मुंबई जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?मुंबई
महाराष्ट्र • भारत
—  मेट्रो  —
मरीन ड्राईव्ह
मरीन ड्राईव्ह
गुणक: 18°58′N 72°49′E / 18.96, 72.82
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
६०३ km² (२३३ sq mi)
• ८ m (२६ ft)
जिल्हा मुंबई शहर
मुंबई उपनगर
लोकसंख्या
घनता
मेट्रो
१,३३,००,००० (१ ला) (२००६)
• २१,८८०/km² (५६,६६९/sq mi)
• १,९७,००,००० (१ ला) (२००६)
महापौर सौ.श्रध्दा जाधव
आयुक्त स्वाधिन क्षत्रिय
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• ४००
• +022
• INBOM
• MH-01—03
संकेतस्थळ: मुंबई महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 18°58′N 72°49′E / 18.96, 72.82

मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'mumbəi/ उच्चार ऐका) ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यवर वसले आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत श्रीमंत शहर व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून ते भारतातील ५०% प्रवासी व मालवाहतुकीकरता वापरले जाते.

मुंबई ही मध्य १८व्या शतकात ब्रिटीशानद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली. १९व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. १९४७ मध्ये भारताला स्वतंत्र मिळाल्यावर मुंबईला मुंबई राज्यामध्ये शामिल करण्यात आले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याची राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था येथे स्थित आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे व असा योग खूप कमी शहराच्या बाबतीत आहे.

अनुक्रमणिका

नाव

मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे.[ संदर्भ हवा ] पोर्तुगीजांनी बोम बाहीया व इंग्रजांनी बाँबे असे नामकरण केले होते. १९९५ मध्ये या शहराचे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले.

मुंबादेवीचे देऊळ.

इतिहास

गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली. मुंबईची लोकसंख्या वाढत राहिली (१६६१: १०,०० ते १६८७: ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.

१८१७ ते १८४५ पर्यंत होर्नबी वेलार्ड (Hornby Vellard)च्या अंतर्गत बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ वर्ग कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईत बनवला गेला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबईही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरुच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.

पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कोलकात्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले.भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई ही बॉम्बे इलाख्याची राजधानी झाली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.

१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्रगुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. १०५ हुतात्म्यांच्या आहुती नंतर मे १, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन मुंबईला राजधानी बनवण्यात आले.

१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिव सेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची हिंदी भाषाइंग्लिश भाषा नावे बदलून केवळ मुंबई हे मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजींचे नाव देण्यात आले.

भूगोल

मुंबईचे भारतातील स्थान

मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखांवर असलेल्या साल्सेट बेटांवर वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा ४५० मी. (१,४५० फूट) आहे.

मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - मुंबई जिल्हामुंबई उपनगर जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुउर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणं आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, लोवर वैतरणा, अप्पर वैतरणापवई. तुळशी व विहार हे तलाव संजय गांधी उद्यानामध्ये आहेत तर पवई तलावही शहराच्या हद्दीतच आहे. तीन नद्या - दहिसर, पोईसर व ओशिवरा राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते.

हवामान

मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतु अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात(मार्च ते ऑक्टोबर) तापमानसापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मॉन्सूनचा पाऊस मुंबईला जून ते सप्टेंबरपर्यंत झोडपतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता.

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतुत मध्यम सापेक्ष आर्द्रता व तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ३८° से. ते किमान ११° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७.४°से असे नोंदवले गेले आहे.

मुंबईच्या तापमानाचा आलेख.
मुंबईच्या तापमानाचा आलेख.

अर्थव्यवस्था

मुंबई समभाग बाजार

मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतातील १०% कारखाना-रोजगार (Factory employment), ४०% प्राप्तिकर, २०% केंद्रीय कर (Central excise), ६०% आयात कर, ४०% परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुंबईत मुख्य कचेऱ्या आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न भारतीय रूपया९,१९,६०० कोटी इतके होते व प्रती व्यक्ती आय भारतीय रूपया१,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीपेक्षा तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बॅंका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.

१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.

मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना रोजगार पुरवला असून भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे केंद्र मुंबई आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.

प्रशासन

महानगर प्रशासन

बृहन्मुंबई महानगरपालिका

मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्‌. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोयीकरता १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागास एक उपायुक्त नेमलेला असतो.

महापालिका १४ प्रभागातील लोकांनी निवडलेल्या २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार वरील निर्वाचित पदांसाठी उभे करतात.

जिल्हा प्रशासन

मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.

लोकसभा, विधानसभा प्रतिनिधित्व

मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवरखासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३४ आमदार करतात.

महानगर पोलिस यंत्रणा

मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलिस आयुक्त असतो; जो राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. मुंबई पोलिस गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलिस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलिस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलिस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे.

न्याय यंत्रणा

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्रगोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय(Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत.

वाहतूक व्यवस्था

मुंबईच्या उपनगरीय गाड्या

मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा, भाड्याच्या अन्य गाड्या शामिल आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या.

रस्ता

मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र ३, राष्ट्रीय महामार्ग क्र ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र ८ सुरु होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, पश्चिम मुक्तमार्ग व पूर्व मुक्तमार्ग यांचे काम सुरु आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत: १) पूर्व द्रुतगती मार्ग (सायन ते ठाणे). २) सायन पनवेल द्रुतगती मार्ग (सायन ते पनवेल). ३) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते बोरीवली).

मुंबईच्या बेस्ट बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसकट नवी मुंबई, मीरा-भायंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, वेस्तीबुल, लो फ्लोर, दुर्बल-मित्र, वातानुकुलीत व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणार्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) वोल्वो बसेस वांद्रे, दिंडोशीबोरीवली पर्यंत चालवते.

मुंबई दर्शन हि बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय आकर्षण दाखविते. मुंबईची ८८% लोकसंख्या सार्वजनिक परिवहन वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूक कोंडी ही वारंवार घडते.

रेल्वे

मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट मध्ये आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरीय रेल्वे तीन वेग-वेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर.

२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५०० हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व ९, १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ सेवा पुरवतात.

मुंबई मेट्रो एक भूमिगत व एलीवेटेड[मराठी शब्द सुचवा] जलद वाहतूक यंत्रणा सध्या बांधकामाखाली आहे. मुंबई मोनोरेल २०११ मध्ये पूर्ण झाल्यावर जेकब सर्कल ते वडाळ्यापर्यंत धावेल. भारतीय रेल्वे मार्फत मुंबई इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेन्ट्रल, अंधेरीबोरीवलीहून सुरु होतात.

वायू मार्ग

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. २००६ मध्ये विमानतळाच्या पुनरबांधकामाला सुरुवात झाली ज्यामुळे २०११ पासून क्षमता २.५ हून ४ कोटी होईल. नवी मुंबई आंतरराष्टीय विमानतळाला केंद्र सरकारची परवानगी मिळाली असून ते २०१४ पर्यंत तयार होईल व सध्याच्या विमानतळाचा भार कमी करण्यात मदत करेल. जुहू विमानतळ भारतातील पहिले विमानतळ आहे व सध्या एका उदान मंडळाचं यजमान आहे.

जल मार्ग

मुंबईत दोन बंदरे आहेत: मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई). मुंबई बंदर जगातील सर्वोतकृस्ट नैसर्गिक बंदरांमधील एक आहे. जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात: २६ मे, १९८९) भारतातील सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५% ते ६०% मालवाहतूक येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे

नागरी सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धिकरण केंद्रात पाणी शुध्द केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते, ज्यामधून सुमारे ७० कोटी लिटर लिकेज व चोरीमुळे वाया जाते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो देवनार, मुलुंड व गोराईतील डंपिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रेवरळीतील सांडपाणी शुद्धिकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धिकरण केले जाते.

मुंबईतील वीजपुरवठा बेस्ट प्रशासन, महावितरण व रिलायन्स एनर्जीद्वारा केला जातो. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्तीमार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक वाढत चालला आहे व अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम्‌. टी. एन्‌. एल्‌.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम. टी. एन. एल., टाटा, रिलायंस, एअरटेल, वोडाफोन, एअरसेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम. टी. एन. एल., टाटा, रिलायंस व एअरटेल इंटरनेट सेवादेखील पुरवतात.

लोकजीवन

मुंबई शहर: 'चौपाटी' किनाऱ्यावरुन दिसणारे दृश्य

मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्याघनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; ज्याचे प्रमुख कारण रोजगाराकरता इतर गावांतून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. शहरात ६८% हिंदू, १७% मुस्लिम, ४% ख्रिस्ती व ४% बौद्ध अशी लोकसंख्या आहे. बाकी लोक पारशी, जैन, ज्यू, शीख व नास्तिक आहेत.

मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून हिंदी, इंग्रजी, कोकणी या भाषादेखील बोलल्या जातात.

मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे.

विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरीबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकालवस्त्यांची / झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी हि आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.

असामाजिक तत्वे

१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बाँबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बाँबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली तसेच २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकी हल्ला होता.

मुंबईकर आणि मुंबईची संस्कृती

मुंबईच्या बाजारपेठेतील एक दृश्य

मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे केले जातात.

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे! पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज पदार्थदेखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत.

मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.

मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहे. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.

प्रसारमाध्यमे

मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृतपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृतपत्रे टाईम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए, हिंदुस्तान टाईम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृतपत्रे महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकसत्ता, सामनानवा काळ अशी आहेत. भारतातील इतर भाषेतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात. दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या केबल नेटवर्क वा डीटीएच्‌ सेवेमार्फ़त उपल्ब्ध आहेत. पैकी स्टार नेटवर्क, झी नेटवर्क व सोनी टीव्ही या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. झी मराठी, ई टीव्ही मराठीसह्याद्री वाहिनी ह्या मराठी वाहिन्या मराठी प्रेक्षकांना सेवा पुरवतात.

मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे उपलब्ध आहेत.

शिक्षण

मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर बाकी सीबीएस्‌ई/आयएस्‌सीई बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुर्या सुविधा पहायला मिळतात पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागतं.[ संदर्भ हवा ] भारतातील १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा शास्त्र शाखेत) प्रवेश घेतात. १२वी नंतर साधी पदवी किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. आय. आय. टी, मुंबई, वीरमाता जिजाबाई टेकनॉलोजिकल इंसटीट्युट व एस्‌. एन्‌. डी. टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विध्यार्थी संख्या घटत होत आहे. हि चिंतेची बाब आहे.

खेळ

क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. गल्लीत मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियमवानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. त्याचबरोबर मुंबईने आजवर अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर हे भारताचे अव्वल क्रिकेटपटू मुंबईचेच.

फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषत: पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, स्क्वॅश, बिलियर्डस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. वॉलीबॉल, बास्केटबॉल हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहे.

उपनगरे

वान्द्रे, खार, सान्ताक्रुझ, विलेपार्ले, जुहू, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड

हेसुद्धा पाहा

मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी, रेल्वे स्थानक, चर्चगेट, ग्रँट रोड, शिवाजी पार्क, चर्नी रोड, लोअर परेल, एल्फिन्स्टन रोड, मरीन लाईन्स, मुंबई विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, मुंबई शेअर बाजार, भारतीय लोहमार्ग संस्था- मध्य विभाग, मुंबई विभाग, मुंबई विभागातील जिल्हे, चेंबूर

संदर्भ

साचा:Ref-cleanup

बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये