बाळासाहेब ठाकरे
| बाळ केशव ठाकरे | |
|---|---|
![]() मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी बाळासाहेब ठाकरे (इ.स. २०१२) |
|
| जन्म | जानेवारी २३,इ.स. १९२६ पुणे, महाराष्ट्र, भारत |
| मृत्यू | नोव्हेंबर १७, इ.स. २०१२ मातोश्री,कलानगर,मुंबई, महाराष्ट्र, भारत |
| मृत्यूचे कारण | हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने |
| चिरविश्रांतिस्थान | शिवतीर्थ, शिवाजी पार्क, दादर, मुंबई |
| निवासस्थान | मातोश्री, कलानगर, वांद्रे, मुंबई |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| टोपणनावे | साहेब |
| वांशिकत्व | भारतीय |
| नागरिकत्व | भारतीय |
| पेशा | व्यंगचित्रकार |
| कारकिर्दीचा काळ | इ.स. १९५०-इ.स. २०१२ |
| ख्याती | हिंदूहृदयसम्राट |
| राजकीय पक्ष | शिवसेना |
| धर्म | हिंदू |
| जोडीदार | मीनाताई ठाकरे |
| अपत्ये | उद्धव, बिंदूमाधव, जयदेव |
| वडील | केशव सीताराम ठाकरे |
| नातेवाईक | राज ठाकरे(पुतण्या) |
| स्वाक्षरी | |
| संकेतस्थळ shivsena.org |
|
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते.
अनुक्रमणिका |
बालपण आणि जीवन [संपादन]
२३ जानेवारी, इ.स. १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.
व्यंगचित्रकार [संपादन]
सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.
'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक [संपादन]
पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
शिवसेनेची स्थापना [संपादन]
महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काही नाव सुचतय का संघटने साठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…” “मि सांगतो नाव….....शिवसेना.........यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दु-विधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.
‘सामना’ - दैनिक वृत्तपत्र [संपादन]
वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असतो.
शिवसेना - भाजप युती [संपादन]
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
हिंदुत्व [संपादन]
हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.
एक राजकारणी [संपादन]
| या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा. |
झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय.
जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था - साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, कै. प्रमोद नवलकर, कै. मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, कै.आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.
अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे आहेत.
विदर्भावर बाळासाहेबांचे प्रेम [संपादन]
| या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा. |
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुरुवातीपासूनच विदर्भावर अनोनात प्रेम राहिले आहे. अकोला येथे बाळासाहेबांच्या अनेक सभा झाल्या. बुलडाणा जिल्ह्यात बाळासाहेबांच्या ५ सभा झाल्या. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथुन १९९५ मध्ये बाळासाहेबांनी विदर्भात झंझावाती प्रचाराला सुरुवात केली. त्यावेळी युतीचे सरकार आल्यास सिंदखेडराजा येथील मातृतीर्थाचा कायापालट करू असा शब्द त्यांनी दिला होता. सरकार आल्यानंतर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मातृतीर्थाचे सौंदर्यीकरण केले. बुलडाणा जिल्ह्यातून त्यावेळी मेहकर मतदार संघातून प्रतापराव जाधव, बुलडाण्यातून विजयराज शिंदे, जळगाव जामोदमधुन कृष्णराव इंगळे, खामगावातून नाना कुकरे, चिखलीतून रेखाताई खेडेकर, मलकापुरातून चैनसुख संचेती हे युतीचे उमेदवार विजयी झाले होते. सिंदखेडराजा हा एकमेव मतदार संघ असा होता, जेथे युतीचा उमेदवार पराभूत झाला होता. तेथुन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे विजयी झाले होते.
कलेचा ठाकरे परिवाराने नेहमीच सन्मान केला आहे. विदर्भातील प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्या काव्यसंग्रह ‘सखे साजणी’चे प्रकाशन मातोश्रीवर बाळासाहेबांनीच केले. बाळासाहेबांनी १९८५ च्या काळात गडचिरोलीत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. ९९० मध्ये आरमोरी मतदार संघातून हरिराम वरखडे हे शिवसेनेचे पहिले आमदार निवडून आले. नंतर १९९५ मध्ये आरमोरी मतदार संघातून रामकृष्ण मडावी या नवख्या तरुणाला वडसा-देसाईगंज इथे बाळासाहेबांचा जाहीर सभेनंतर जनतेने निवडून दिले. जिल्हाप्रमुख पद सांभाळणारे विजय वडेट्टीवार १९९८ मध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर बाळासाहेबांनी वडेट्टीवार यांना विधान परिषदेत घेवून २००५ मध्ये चिमूर मतदार संघातूनही संधी दिली. १९९० मध्ये माओवाद्यांच्या हिंसक करावाया असतानाही बाळासाहेबांनी सेनेचे उमेदवार विलास कोडाप यांच्या प्रचारासाठी गडचिरोलीत जाहीर सभा घेतली. वर्ध्यांत २६ जानेवारीला घेतलेली सभा अविस्मरणीय आणि ऐतिहासिक अशीच. खरेतर बाळासाहेब वर्ध्यात सभा घेण्यासाठी आले नव्हते. परंतू कार्यकर्त्यांनी मनोहर जोशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्थानिक वृत्तपत्रातून आज बाळासाहेबांची सभा अशी बातमी दिली होती. हा पेपर बाळासाहेबांच्या हाती पडला. त्यानंतर बाळासाहेबांनी वर्धेतील मुक्कामाच्या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ‘२६ जानेवारीला सभा. अरे आजच्या दिवशी तरी माझ्या तोंडून काही कुणाबद्दल अपशब्द निघू नये.’ खरे तर ही सभा पूर्वनियोजित नव्हती, त्यामुळे बाळासाहेबांच्या जागी दुसरा नेता असता तर कदाचित गेलाही नसता पण शिवसैनिकांनी दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी पूर्वकल्पना नसतानाही आयोजित केलेल्या सभेला बाळासाहेबांनी उपस्थिती नोंदविली. ते व्यासपीठावर आले, त्यावेळी पावसाला सुरुवात झाली होती. आपल्या भाषणाला सुरुवात करताच बाळासाहेब म्हणाले ‘माझ्या सभेला वाघ बसतात, शेळ्या मेंढ्या नाही.’ बाळासाहेबांचे हे उद्गार ऐकताच घराघरातून लोक बाहेर पडले आणि सभास्थळ गर्दीने भरले.
अमरावतीत बाळासाहेबांनी ११ सभा गाजविल्या. परतवाडा हे बाळासाहेबांचे आजोळ आणि एकविरा देवी, अंबादेवी हे आराध्यदैवत. बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनीही युवासेनेची मुहूर्तमेढ अमरावतीतच रोवली. खासदार आनंदराव अडसूळ यांचे सुपूत्र कॅप्टन अभिजित अडसूळ, गायक अभिजित सावंत यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात डिसेंबर २०१० मध्ये युवासेनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्या मातीत ते खेळले, ज्या वाड्याशी त्यांच्या स्मृती जुळलेल्या आहेत. तो वाडा आजही बाळासाहेबांच्या जाज्वल्य कतृत्त्वाची साक्ष देतो. ३ जानेवारी १९९९ रोजी एका प्रचार सभेसाठी बाळासाहेब अकोल्यात आलेत. अकोल्यातील त्यांची सभा खुपच गाजली. त्यावेळी अकोला आणि वाशीम हा एकच जिल्हा होता. दिवंगत माजी खासदार पुंडलीकराव गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्डच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी बाळासाहेब येथे आले होते. त्यानंतर येथे त्यांनी शेतकरी मेळाव्यालाही मार्गदर्शन केले. भर दुपारी रखरखत्या उन्हात रिसोडपासून १२ किलोमीटरवर झालेल्या या सभेतला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. प्रास्ताविक भाषणात गवळी यांनी त्यावेळी वाशीम जिल्हा झालाच पाहिजे ही मागणी केली. त्यानंतर बाळासाहेबांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांचे पहिले वाक्य होते ‘तालुका खोडा वाशीम जिल्हा लिहा’. याच वेळी स्वतंत्र वाशीम जिल्ह्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. वाशीमला जिल्हा झाला तो फक्त बाळासाहेबांच्या या घोषणेमुळे. तत्कालीन राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, युतीचे उमेदवार पुंडलीकराव गवळी यांनी त्यावेळी पुसदमध्ये सभा घेतली. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकर नाईक यांना त्यांनी आपल्या भाषणात इशारा दिला. त्यावेळी बाळासाहेबांनी पुंडलीकराव गवळी विजयी होतील, असे जाहीरपणे सांगितले होते. माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या विरोधात सामान्य उमेदवार असे चित्र निवडणुकीत त्यावेळी होते. बाळासाहेबांच्या सभेनंतर इतिहास घडला आणि मतदार संघावर भगवा फडकला. त्यानंतर भावना गवळींच्या प्रचारार्थ बाळासाहेब पुन्हा वाशीममध्ये आलेत. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार होते मनोहर नाईक. बाळासाहेबांची सभा झाली अन् इतिहासाची पुनरावृत्ती झाली. रेकॉर्ड मतांनी भावना गवळर विजयी झाल्या. भावना गवळी जेव्हा लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या तेव्हा त्यांचे नाव सर्वांत कमी वयाच्या महिला खासदार म्हणून घेतले जाऊ लागले. आपल्या ५ वर्षाच्या कारकिर्दीचा लेखोजाखो गवळी यांनी ‘विकासगंगा’ या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवला. या पुस्तकाचे प्रकाशनही बाळासाहेबांनी केले होते. बाळासाहेबांच्या झंझावातामुळे विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची पाळंमुळं घट्ट झाली.
अखेरचा काळ व निधन [संपादन]
बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार १५३० वाजता मुंबईत मातोश्री या निवासस्थानी निधन झाले [१].
संदर्भ [संपादन]
- ↑ "बाळासाहेब ठाकरे यांचं निधन", आयबीएन लोकमत, १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२. (मराठी मजकूर)
बाह्यदुवे [संपादन]
- शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे निधन. मराठीमाती. (मराठी मजकूर)
