अहमदनगर जिल्हा
| अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्हा |
|
|
महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्हाचे स्थान |
|
|
|
|
|---|---|
| राज्य | महाराष्ट्र, |
| विभागाचे नाव | नाशिक |
| मुख्यालय | अहमदनगर |
| तालुके | १. अकोले २. कर्जत ३. कोपरगाव ४. जामखेड ५. नगर ६. नेवासा ७. पाथर्डी ८. पारनेर ९. राहाता १०. राहुरी ११. शेवगांव १२. श्रीगोंदा १३. श्रीरामपूर १४. संगमनेर |
|
|
|
| क्षेत्रफळ | १७,४१३ कि.मी.² |
| लोकसंख्या | ४५,४३,०८० (२०११) |
| लोकसंख्या घनता | २६०/किमी² |
| शहरी लोकसंख्या | १७.६७% |
| साक्षरता दर | ८०.२२% |
| लिंग गुणोत्तर | १.०७ ♂/♀ |
|
|
|
| प्रमुख शहरे | अहमदनगर, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी |
| जिल्हाधिकारी | डॉ.संजीवकुमार |
| लोकसभा मतदारसंघ | १.अहमदनगर २.शिर्डी |
| विधानसभा मतदारसंघ | १.अहमदनगर शहर २.पारनेर ३.कर्जत जामखेड ४.शेवगांव ५.श्रीगोंदा ६.श्रीरामपूर ७.राहुरी ८.शिर्डी ९.अकोले १०.कोपरगाव ११.नेवासा, १२.संगमनेर |
| खासदार | १.दिलीप कुमार गांधी २.भाऊसाहेब राजाराम वाकचौरे |
| पर्जन्यमान | ५०१.८ मिमी |
|
|
|
| संकेतस्थळ | |
अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुकात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. 'राळेगण सिद्धी' द्वारे जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले.
अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या ४०,८८,००० इतकी आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] भौगोलिक स्थान व महत्त्व
राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्य दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैर्ऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणाऱ्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने अकोले तालुका व संगमनेर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे. शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्चंद्राची रांग या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिण भाग हा घोड नदी, भीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, ढोरा, घोड नदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची या जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुकात होतो, या स्थळाला प्रवरासंगम असे म्हटले जाते.
अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो.
मुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुकात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातूनच अहमदनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्र्वरसागर असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
[संपादन] दळणवळण
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग ही पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो. पुणे-औरंगाबाद हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी. चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहमदनगर-बीड-परळी आणि पुणतांबे-शिर्डी रेल्वे मार्गाचे काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विठा घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट - हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
[संपादन] विशेष
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी ! ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला, आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला राज्यातील जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा ओळखला जातो तो सहकारी साखर कारखान्यांचा मूलस्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला साखर कारखाना स्थापन केला (जून, १९५०), आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री. धनंजयराव गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयीसुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
[संपादन] ऐतिहासिक महत्त्वाचे
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्त्यनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे आस्तित्व सिद्ध झालेले आहे.
[संपादन] निजामशाही
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
[संपादन] इ.स. १९४२चे चलेजाव आंदोलन
१९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
[संपादन] राजकीय संरचना
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
[संपादन] अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)
हा मतदारसंघ अहमदनगर शहर, कर्जत-जामखेड, पारनेर, राहुरी, शेवगाव श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
[संपादन] शिर्डी (लोकसभा मतदारसंघ)
हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ श्रीरामपूर, शिर्डी, अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
[संपादन] जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ
- अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ
- पारनेर विधानसभा मतदारसंघ
- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ
- शेवगांव विधानसभा मतदारसंघ
- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ
- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ
- राहुरी विधानसभा मतदारसंघ
- शिर्डी विधानसभा मतदारसंघ
- अकोले विधानसभा मतदारसंघ
- कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
- नेवासा विधानसभा मतदारसंघ,
- संगमनेर विधानसभा मतदारसंघ
- तसेच जिल्ह्यात ७५ अहमदनगर जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
[संपादन] शेती
ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे. अलीकडच्या काळात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले (१९६८) कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषिविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात, तसेच अनेक पिकांबाबतचे संशोधन केले जाते. स्थापनेनंतर राहुरी विद्यापीठाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकर्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
[संपादन] जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
साईबाबा मंदिर,शिर्डी, चिंकारा व माळढोक अभयारण्य, रेणुकामाता मंदिर, केडगाव, भंडारदरा धरण, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, जगदंबामाता मदिंर, टाहाकरी, भुईकोट किल्ला, अहमदनगर, सिद्धटेक, शनी-शिंगणापूर, हरिश्चंद्रगड, चांदबिबीचा महल
[संपादन] महत्वाची ठिकाणे
[संपादन] जिल्ह्यातील तालुके
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.
- अकोले (संगमनेर उपविभाग)
- कर्जत (कर्जत उपविभाग)
- कोपरगाव (संगमनेर उपविभाग)
- जामखेड (कर्जत उपविभाग)
- नगर (अहमदनगर उपविभाग)
- नेवासा (श्रीरामपूर उपविभाग)
- पाथर्डी (अहमदनगर उपविभाग)
- पारनेर (अहमदनगर उपविभाग)
- राहाता (श्रीरामपूर उपविभाग)
- राहुरी (श्रीरामपूर उपविभाग)
- शेवगांव (अहमदनगर उपविभाग)
- श्रीगोंदा (कर्जत उपविभाग)
- श्रीरामपूर (श्रीरामपूर उपविभाग)
- संगमनेर (संगमनेर उपविभाग)
[संपादन] संदर्भ
![]() |
नाशिक जिल्हा | नाशिक जिल्हा | औरंगाबाद जिल्हा | ![]() |
| पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा | बीड जिल्हा | |||
| पुणे जिल्हा | सोलापूर जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
|
|||||||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||||||
