नागपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखपृष्ठ सदर लेखCrystal Clear action bookmark.png
हा लेख १ एप्रिल, २००९ रोजी मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर होता. २००९चे इतर मुखपृष्ठ सदर लेख
हा लेख नागपूर शहराविषयी आहे. नागपूर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
  ?नागपूर
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: संत्रानगरी
—  शहर  —
गुणक: 21°05′N 79°02′E / 21.08, 79.03
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२१८ km² (८४ sq mi)
• ३१० m (१,०१७ ft)
प्रांत विदर्भ
जिल्हा नागपूर
लोकसंख्या
घनता
२४,२०,०००[१] (२००६)
• ११,१०१/km² (२८,७५१/sq mi)
भाषा मराठी, हिंदी भाषा, इंग्रजी
महापौर श्री. अनिल मधुकरराव सोले[२]
महानगरपालिका आयुक्त श्री. असीम गुप्ता[३]
स्थापना १८व्या शतकाच्या सुरुवातीला [४]
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड


• +९१-७१२
• MH-३१,MH-४०
संकेतस्थळ: www.nagpur.nic.in
नागपूर चिन्ह
नागपूर चिन्ह

गुणक: 21°05′N 79°02′E / 21.08, 79.03

नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरास 'संत्रानगरी' असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे.[५] नुकताच शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

अनुक्रमणिका

भूगोल व हवामान

नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिलिमीटर इतके आहे. पाऊस जून-सप्टेंबर महिन्यांदरम्यान पडतो. मार्च ते जून उन्हाळा असतो व मे महिन्यात पारा सर्वांत वर असतो. या काळात नागपूरचे उच्चतम तापमान ४०° सेल्सियसपर्यंत वर जाते. हिवाळा नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात असतो व तेव्हा शहराचे न्यूनतम तापमान १०° सेल्सियसच्याही खाली जाते.

इतिहास

नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स. ९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले.इ.स.१७४२ मधे रघूजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. इ.स. १८१७ मधे सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. इ.स.१८६१ मध्ये नागपूर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी करण्यात आली.

सीताबर्डीचा किल्ला

इ.स.१८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला.त्याच एम्प्रेस व मॉडेल मिल होत. भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉँग्रेसची दोन अधिवेशने नागपुरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२०च्या अधिवेशनापासून सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार भारतातील एक प्रांत बनला. १९५० साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व नागपूरला या राज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला. १९५६च्या राज्य पुनर्रचना आयोगाने नागपूरसह वर्‍हाड(बेरार) बॉम्बे(मुंबई) प्रान्त राज्यात घातला. कालांतराने मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व वर्‍हाड (विदर्भ)नव्या राज्यात आला. एके काळी देशाच्या भौगोलिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज, नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

नागपुरातील नामांकित संस्था

विधान भवन

हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे सुमारे दोन आठवडे चालणारे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठदेखील येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे जन्मस्थान व मुख्यालय येथेच आहे.

नागपुरात अनेक राष्ट्रीय स्तराच्या सरकारी वैज्ञानिक संस्था आहेत- नॅशनल एनवायरन्मेंटल इंजिनियरिंग अँन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (NEERI), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च (CICR), नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायट्रस, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल-सर्वे ऍण्ड लॅंड-यूज प्लॅनिंग, जवाहरलाल नेहरू नॅशनल अल्युमिनियम रिसर्च अँन्ड डेवलपमेंट सेंटर, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंडियाज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसि‍व्ह्वज ऑफ द पेट्रोलियम अँन्ड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन, साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर व भारतीय हवामान खात्याचे विभागीय मुख्यालय.

मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ

भारतीय सैन्याच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे आहे. भारतीय वायुदलाच्या निर्वहन (maintenance) विभागाचे मुख्यालय नागपूरात असून दारुगोळा कारखाना, स्टाफ कॉलेज या संस्थादेखील शहरात आहेत. नागपूरजवळील कामठी (Kamptee) हे उपनगर भारतीय सैन्याने रेजिमेंटल सेंटर ऑफ इंडियन आर्मीज ब्रिगेडसाठी स्थापन केलेली लष्करी संस्था(कॅंटोन्मेंट बोर्ड) आहे. या लष्कर हद्दीत नॅशनल कॅडेट कॉर्प्स ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ व इतर अनेक लष्करी संस्था आहेत. त्याचबरोबर नागपूरचे राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय भारत व परदेशातील विद्यार्थांना नागरी-रक्षण व आपत्कालीन व्यवस्थापनाचे शिक्षण देते. शहरात भारतीय वायुदलाच्या आय.एल-७६ या वाहतूक विमानांचा तळ(गजराज) आहे. नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे देशांतर्गत सर्व अंतराचे मोजमाप येथील सिव्हिल लाइन्स या भागात असलेल्या शून्य मैलाच्या दगडापासून (zero milestone) केले जाते.

शून्य मैलाचा दगड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार ह्यांनी १९२५ साली प्रस्थापित केले. मोहन मधुकर भागवत सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. पेशाने हे पशुवैद्य आहेत.

हल्ली नागपूरचा विकास माहिती व तंत्रज्ञान विभागात जोर पकडत आहे. वी. आर. सी. ई टेलीफोन एक्स्चेंज ला लागून एस टी पी आय ची स्थापना झाली असून तिथे बऱ्याच कंपनीनी आपल्या शाखा उघडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने पर्सिसटेंट चा समावेश आहे.

पर्यटनस्थळे

दीक्षाभुमी

दीक्षाभूमी इथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्म स्वीकारला होता. दीक्षाभूमी हा जगातील सर्वांत मोठा पोकळ स्तूप आहे. विजयादशमी/ आंबेडकर स्मृतिदिनी देशाभरातील दलित व बौद्धजन येथे भेट देतात.

सीताबर्डी किल्ल्यात इ.स. १८१७ मध्ये ब्रिटिशराजे रघूजी भोसले यांच्या साम्राज्यात मोठे युद्ध झाले होते. त्यात ब्रिटिश जिंकले व शहर त्यांच्या ताब्यात गेले. शहरातील प्रत्येक भागात मोठमोठी हिंदू प्रार्थनास्थळे असून रामनगर येथील अध्यात्म मंदिर (श्रीराम मंदिर) व रेल्वे स्थानकाजवळील श्री पोद्दारेश्वर राम मंदिर सर्वांत प्रसिद्ध आहे. दरवर्षी या दोन्ही मंदिरातुन रामनवमीस भव्य शोभायात्रा निघतात.कोराडी येथील प्राचिन श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांची नेहमी आणि नवरात्रात तर विशेष गर्दी असते.या गावाजवळच,कोराडी आणि खापरखेडा औष्णीक विद्युत केंद्रे आहेत. कॅथॉलिक सेमिनरी, व कामठी या गावाजवळील बौद्ध ड्रॅगन पॅलेस देखील प्रसिद्ध आहेत.

शहरातील अंबाझरी, तेलंगखेडी, गांधीसागर,सक्करदरा, गोरेवाडासोनेगाव हे तलाव पर्यटकात प्रिय आहेत.सेमिनरी हिल्स परीसरात सातपुडा बोटॅनिकल गार्डन आहे. पैकी अंबाझरी परिसरात रम्य उद्यान आहे. ते अगदी जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. नागपूर शहराचा पाणीपुरवठा पूर्वी या व गोरेवाडा तलावातुन होता. भोसले शासकांनी विकसित केलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयात अनेक दुर्लभ प्राणी-पक्षी आहेत. पेंच संरक्षित वने (यांचा रुडयार्ड किपलिंग यांच्या जंगल-बुक या पुस्तकात उल्लेख आहे) नागपुरापासून ४५ किलोमीटर उत्तरेस आहेत.

ड्रॅगन पॅलेस

विदर्भ क्रिकेट संघटनेचे मैदान हे देशातील कसोटी क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या ९ मैदानांपैकी आहे. नागपूर- वर्धा रस्त्यावर जामठा या गावानजिक निर्माण झालेल्या नव्या मैदानात ८०,००० प्रेक्षकांची व्यवस्था आहे. नागपुरात अनेक उपहारगृहे (हॉटेल्स) आहेत. तिथे भारतीय व आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जेवण मिळते. लिबर्टी व स्मृती ही लोकप्रिय चित्रपटगृहे आहेत. शहरातील पहिले मल्टिप्लेक्स वर्धमाननगरात आहे तर आणखी तीन तयार होत आहेत. या चित्रपटगृहात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील चित्रपट प्रदर्शित केले जातात. नागपुरात्त हॉटेल तुली इंटरनॅशनल व हॉटेल प्राईड ही पंचतारांकित हॉटेल आहेत. सेंट्रल अँव्हेन्यू परिसरात अनेक लहान-मोठी उपहारगृहे आहेत.

लोकजीवन व संस्कृती

नागपुरातील संत्र्यांची बाजारपेठ

मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वर्‍हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. हिंदी भाषाइंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २,१२९,५०० इतकी होती.

नुकतेच नागपूरला भारतातील सर्वांत स्वच्छ व (बंगळूर नंतरचे) दुसरे सर्वांत हिरवे शहर असल्याचा मान मिळाला आहे. नागपूरमध्ये जागेच्या किंमती अजूनतरी मर्यादेत आहेत. पण रामदासपेठ व सिव्हिल लाइन्स परिसरातल्या जागांचे भाव मात्र खूप जास्त आहेत. नागपूर महानगरपालिका पुरेसे पाणी पुरवते त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही परंतु राज्यातील वीजटंचाईमुळे येथे भारनियमन होते. शहरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. पोद्दारेश्वर राम मंदिर रामनवमीला भव्य शोभायात्रा आयोजित करते.सन २०१० हे या शोभायात्रेचे ३८वे वर्ष आहे.तसेच पश्चिम नागपूरात रामनगर येथूनही एक शोभायात्रा निघते.ती सन १९७६ साली सुरू झाली.उर्वरित भारताप्रमाणेच दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सवदुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंतीमोहर्रम हे सणदेखील साजरे होतात.'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांस वापरुन केलेल्या पुतळयाची तान्हा पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात.

सार्वजनिक उत्सवादरम्यान मानवी वाघ हा देखील एक प्रकार येथे बघावयास मिळतो.

पोद्दारेश्वर राममंदिरातुन निघणारी रामनवमीची शोभायात्रा (सन २०१०)- त्यातील सजविलेल्या राम लक्ष्मण व सीतेच्या मूर्ती
पोद्दारेश्वर राममंदिरातुन निघणारी रामनवमीची शोभायात्रा (सन २०१०)- भाविक रामाचा रथ ओढतांना

नागपुरात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र शासन आयोजित कालिदास महोत्सव आठवडाभर चालतो. या महोत्सवात अनेक संगीत-नृत्य विषयक कार्यक्रम होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार त्यात भाग घेतात. संत्रानगरी क्राफ्ट मेळा, लोकनृत्य- महोत्सव हे कार्यक्रम दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे होतात. नागपूरकर भारतीय शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत. पं.भीमसेन जोशी व इतर अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी येथे बऱ्याचदा आपले कार्यक्रम केले आहेत. मराठी नाटकांना नागपूरमध्ये मोठाच लोकाश्रय मिळतो.

नागपूर आकाशवाणी, नागपूर दूरदर्शन ही माध्यमे स्थानिक बातम्या, घडामोडी व कार्यक्रम प्रसारित करतात. लोकमत, सकाळ, तरुण भारतलोकसत्ता ही मराठी दैनिके येथून निघतात. हितवाद,नवभारत,लोकमत समाचार, टाईम्स ऑफ इंडिया यासारखी अनेक इंग्रजी व हिंदी वृत्तपत्रे देखील येथे सहज मिळतात.

प्रमुख स्थळे

मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ,विधान भवन, जनरल पोस्ट आफिस,जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी अनेक शासकीय कार्यालये सिव्हिल लाइन्स भागात आहेत.सिताबर्डीत शहराची प्रमुख बाजारपेठ आहे सिताबर्डीचा मुख्य रस्ता खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागात सिताबर्डी किल्ला आहे. धर्मपेठ (धरमपेठ)येथे मोठी दुकाने, उपहारगृहे व बाजारपेठ आहे. रामदासपेठेत अनेक कार्यालये व दुकाने आहेत. इतवारी येथे मालाच्या किरकोळ/घाउक विक्रीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. महाल हा शहराचा जुना भाग असून येथे छोट्या गल्ल्या असल्याने फार गर्दी असते. कळ्मना येथे संत्री, धान्ये व कृषी उत्पन्नाची मोठी बाजारपेठ आहे. लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक, रामदासपेठ, बजाज नगर, सुरेंद्र नगर, निरी, अजनी, तात्या टोपे नगर, खामला, शंकर नगर, धरमपेठ, सिमेंट रोड, कोर्पोरेशन कॉलनी हेय पश्चिम नागपूर मधील प्रसिद्ध वस्त्या आहेत. रामदासपेठ ह्या भागात भरपूर रुग्णालय आढळतात. आठ रस्ता चौकात आठ दिशातून आठ रस्तेय येवून सामील होतात. लक्ष्मी नगर चे हनुमान देवूळ खूप प्रसिद्ध आहे. निरी च्या भल्या मोठ्या जंगला मुळे हिवाळ्यात येथे कमालीची थंडी पसरते.

अर्थव्यवस्था

बुटिबोरी औद्योगिक वसाहत

नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. इ.स. २००४ साली नागपुरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट ऍट नागपूर-MIHAN) निर्मिती होत आहे. हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा (break of bulk) बनणार आहे. विमाने बनवणाऱ्या जगप्रसिद्ध बोइंग कंपनीने नागपुरात १८.५ कोटी डॉलर भांडवलाचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

क्षेत्रफळानुसार बुटिबोरी आशियातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे. बुटिबोरीतील सर्वांत महत्त्वाची संस्था म्हणजे इंडो-रामा सिंथेटिक्स आहे तर केईसी, ह्युंदाई, एसीसी निहोन कास्टिंग्ज, अनेक टेक्सटाइल उद्योग, विडियोकॉन हे इतर मुख्य प्रकल्प येथे आहेत. अनेक मध्यम आकाराचे उद्योग व महाराष्ट्रातील पहिले फूड पार्क येथे आहे. मुंबई-ठाणे-पुणे औद्योगिक पट्ट्याची क्षमता जवळजवळ संपल्यामुळे बुटिबोरी वसाहतीत अनेक उद्योग येत आहेत.

शहरातील पश्चिम भागातील हिंगणा औद्योगिक वसाहतीत जवळजवळ ९०० लहान व मध्यम आकाराचे उद्योग आहेत. महिंद्र आणि महिंद्र, नेको कास्टिंग, बजाज ऑटो ग्रुप, कॅंडिगो, अजंता टुथब्रशेस, सन्विजय ग्रुप, विको लेब्रॉरेटरीज, दिनशा, हल्दीराम हे उद्योग विशेष उल्लेखनीय. शहराचे भौगोलिक स्थान, सोयी-सुविधा, स्वस्त मनुष्यबळ यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे-मुंबई नंतर नागपूरलाच पसंती दिली जाते. नागपुरात १०,००० कोटी रुपये गुंतवणूक असलेले विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

शिक्षण

कृषी महाविद्यालय,नागपूर

नागपूर मध्यवर्ती भारतातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे. शहरात तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आय.एम.टी., नागपूर व देशातील एकमेव अग्नि-अभियांत्रिकी संस्थेसह अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये येथे आहेत.

नागपुरातील शिक्षण संस्थांमधून मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमातून शिक्षण मिळते. येथील शाळा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत. केंद्रीय बोर्डाचा (CBSE) अभ्यासक्रम शिकवणारी पहिली शाळा केंद्रीय विद्यालय (सेन्ट्रल स्कुल)म्हणुन सुरू झाली. हा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळा शहरात हळूहळू सुरू होत आहेत. येथील महाविद्यालये राष्ट्रसंत त्तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रात येतात. नागपुर शहराची साक्षरता ८९.३% आहे.

नागपुरातील काही महत्त्वाच्या शिक्षण संस्था

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
  • इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
  • एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
  • व्ही.एन.आय.टी. अभिमत विद्यापीठ
  • कृषि महाविद्यालय
  • एल.आय.टी व कमला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय
  • शिवाजी विज्ञान महाविद्यालय
  • हिस्लॉप महाविद्यालय
  • आय.एम.टी. व्यवस्थापन संस्था
  • वाय सी सी अभियांत्रिकी विद्यालय
  • पी सी ई अभियांत्रिकी विद्यालय
  • रामदेवबाबा अभियांत्रिकी विद्यालय
  • ईन्स्टीट्यूट ऑफ सायन्स
  • एस एफ एस कॉलेज
  • जी एस कोलेज

नागपुरातील काही महत्त्वाच्या शाळा

  • हडस हाय स्कूल
  • सोमलवार हाय स्कूल
  • सरस्वती विद्यालय
  • हिंदू ज्ञानपीठ शाळा
  • डी पी एस
  • सेंटर पोईन्ट स्कूल
  • सांदिपनी
  • माउंट कार्मल स्कूल

वाहतूक व्यवस्था

रेल्वे

नागपुराच्या भौगोलिक स्थानामुळे येथील रेल्वे स्थानक महत्त्वाचे जंक्शन बनले आहे व देशातल्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्या (विशेषत: मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता या महानगरांना जोडणाऱ्या)ते मध्यवर्ती असल्यामुळे येथूनच जातात. नागपूर रेल्वे स्थानकाबरोबरच अजनी, इतवारी, कळ्मना, कामठी व खापरी ही स्थानके शहराच्या जवळ आहेत. नागपुरात जवळपास १६० रेल्वे गाड्या थांबतात. त्यात प्रवासी, दुरंतो, मेल, राजधानी, गरीब रथ ह्यांचा प्रामुख्यानी समावेश आहे. त्यात ६५ गाड्या दररोज धावतात. दररोज जवळपास दीड लाख प्रवासी नागपूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात.

नागपूर रेल्वेस्थानक तयार झाल्यानंतर १५ जानेवारी, इ.स. १९२५ साली तत्कालीन ब्रिटिश गवर्नर फ्रँक यांच्या हस्ते या स्थानकाच्या इमारतीचे उदघाटन करण्यात आले. सद्य:स्थितीत या स्थानकावर ७ प्लेटफॉर्म असून पूर्व,पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांकडून गाड्यांची ये-जा सुरू असते.

रस्ते वाहतूक

भारतातील दोन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग (कन्याकुमारी-वाराणसी क्र.७) व (हाजिरा- कोलकाता क्र.६) नागपुरात एकमेकास मिळतात. तसेच महामार्ग क्र.६९ नागपूर-भोपाळ येथूनच सुरू होतो. दोन आशियाई महामार्ग ए.एच ४७- आग्रा-मटारा (श्रीलंका) व ए.एच ४६ खरगपूर-धुळे येथून जातात. नागपूर आपल्या चांगल्या दर्जाच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर इनलॅंड पोर्ट हे देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारे अंतर्गत बंदर (Inland port) ठरले आहे.शहरातल्या शहरात वाहतुकीचा प्रश्न मात्र येथील रहिवाशांना भेडसावत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सेवा नागरी व ग्रामीण जनतेस अपुरी ठरत आहे. येथे इंटिग्रेटेड बस व मोनोरेल प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. नव्या राष्ट्रीय राजमार्ग जो नागपूर ते मुंबई ह्या प्रमुख महाराष्ट्रातील शहरांना जोडेल, त्याचे बांधकाम सुरु आहे. वैदर्भीय प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गुरुवार (ता. आठ) पासून नागपूर ते पुणे वातानुकूलित व्हॉल्व्हो (शिवनेरी) बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

विमान वाहतूक

मिहान कार्गो हब प्रकल्प

नागपुरातील विमानवाहतूक नियंत्रण केंद्र देशातील सर्वांत व्यस्त आहे व ३०० हून जास्त उड्डाणे शहरावरून होतात. देशातर्गत विमानवाहतूक सेवा इंडियन एयरलाइन्स, जेट, एयर डेक्कन, इंडिगो, गो एयर, स्पाईस जेट, जेट लाईट इत्यादी नागपूरला मुंबई, दिल्ली, हैद्राबाद व कोलकाता,पुणे,बंगरुळ, चेन्नई, इंदूर, अहमदाबाद, जयपूर, कोची, नांदेड, औरंगाबाद, रायपूर या शहरांना जोडतात. १ ऑक्टोबर २००५ रोजी नागपुरातील सोनेगाव विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला व त्याचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. नागपूर हा मध्यवर्ती भारतातील महत्त्वाचा विमानतळ असून एयर अरेबिया (शारजा), इंडियन एर लाइन्स(बँकॉक), कतार एयरवेज (दोहा)(नियोजित) यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे येथून होतात.

नागपूर विमानतळ हे देशाच्या मध्यभागी असल्याने देश-विदेशातील विमाने नागपूरच्या आकाशातून जातात. त्यामुळे नागपूर स्टॅण्डबाय एरपोर्ट म्हणून मान्यता मिळाली आहे. येथे एकूण दोन एरोब्रिज स्थापित झाले आहेत. नागपूर विमानतळ आता अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज होत असून येत्या ०६ फेब्रुवारी २०१२ विमानतळावरील दोन्ही एअरोब्रिज प्रवासी सेवेत रुजू होणार आहेत.

नागपूर देशातील हवाई नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवीत आहे. इ.स.२००६ साली मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट अ‍ॅट नागपूर अर्थात मिहान प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. नागपुराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकासप्रकल्पांमधल्या चालू प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे[६]. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडीलपश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे. या मालवाहतूक प्रकल्पामुळे नागपूर शहराची तसेच विदर्भ विभागाची आर्थिक प्रगती जोमाने होईल. विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या बोइंग कंपनीचे येथे निर्वहन केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी १८.५ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक प्रस्तावित आहे[ संदर्भ हवा ].

मेट्रो

बहुचर्चित आणि नागपूरची नवी ओळख निर्माण करणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. हा प्रकल्प सुमारे २५ किलोमीटर लांबीचा राहणार असून, याचे कार्य जानेवारी २०१३ पासून सुरू होणार आहे. नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर मेट्रो रेल्वेसाठी तयार झाले असून, या कार्यावर १२५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जानेवारी २०१३ पासून कार्याला प्रारंभ होईल आणि डिसेंबर २०१६ मध्ये ते पूर्णत्वास जाईल. नागपूरची लोकसंख्या वर्तमानात २५ लाख असून, २०३० पर्यंत ही आकडेवारी ५० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर शहर मेट्रो रेल्वे सेवेसाठी पात्र ठरणार आहे. मिहान प्रकल्पाच्या प्रारंभी प्रकल्प सल्लागार एल ऍण्ड टी रॅम्बोल यांनी २००१ मध्ये आपल्या सक्षमता अहवालात मेट्रो रेल्वेची प्रस्तावना केलेली आहे. त्यांनी तर १०० किलोमीटरपर्यंत मेट्रो रेल्वे प्रस्तावित केली होती. मात्र शासनाने २५ किलोमीटर पर्यंत तिचा मार्ग राहील असे म्हटले आहे. दरम्यान यातील दुसऱ्या टप्प्यात पारडी नाका ते वाडी नाका, कस्तुरचंद पार्कचा एक विभाग जोडण्यात येईल. तर तिसऱ्या टप्प्यात फुटाळा तलाव ते धंतोली असा मार्ग प्रस्तावित केला होता. एकंदरीत हा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प नागपूरसाठी वरदान ठरेल असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मिहान

बोर्ईंग

नागपूरच्या मिहान प्रकल्पात सुरू असलेले बोर्इंग एमआरओचे काम चालू वर्षा अखेर पूर्ण होईल व त्यानंतर विविध प्रक्रिया पार पडल्यानंतर २०१३ जून अखेर प्रत्यक्ष एमआरओ कार्यान्वित होईल.

विश्रामगृह व हॉटेल्स

नागपूर ला बरेच विश्रामगृह, हॉटेल्स व मोटेल्स उपलब्ध आहेत. काही पंचतारका हॉटेल्स ची यादी अशी:

  1. प्राइड हॉटेल
  2. सन 'न' सँड

काही ३ तारका हॉटेल्स ची यादी अशी:

  1. हॉटेल सेंटर पॉइंट
  2. तुली इंटरनॅशनल

इंप्रेस सिटी येथे "ताज हॉटेल" व वर्धा रस्त्यावर हॉटेल रॅडिसन या हॉटेलांचे बांधकाम सुरु आहे.

हेसुद्धा पहा

संदर्भ

  1. "The world's largest cities". शहर Mayors. २००६-०६-२६ रोजी पाहिले.
  2. [१]
  3. [२]
  4. /NMCEIP/city_info.jsp
  5. [३]
  6. "मिहान इज बिगेस्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट (मिहान सर्वांत मोठा विकासप्रकल्प आहे)", टाइम्स ऑफ इंडिया, २२ मे, इ.स. २००७. (इंग्लिश मजकूर) 

बाह्य दुवे


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये