सिंधुदुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग (किल्ला)
सिंधुदुर्गचे ठिकाण दाखविणारा नकाशा
सिंधुदुर्गचे ठिकाण दाखविणारा नकाशा
सिंधुदुर्ग
नाव सिंधुदुर्ग
उंची 200 फुट
प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
जवळचे गाव सिंधुदुर्ग, मालवण
डोंगररांग सिंधुदुर्ग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना नोव्हेंबर २५, इ.स. १६६४


सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.

भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]

महत्त्व[संपादन]

शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले.

इतिहास[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली.

असे म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत.

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :

'चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला ।

सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।

सिंधुदुर्ग आणि समुद्र

घडण व पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारुतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इ.स.१८१२पर्यंत फडकत होता.

गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली.

विषेश म्हणजे या किल्यामध्ये एका नारळाच्या झाडाला दोन फांद्या (वाय) आकाराच्या होत्या, अलीकडे त्यातील एक फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे.

सिंधुदुर्ग द्वार

पाण्याची सोय[संपादन]

मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत.ह्या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. यामुळे किल्ल्यावर रहाणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो.

सिंधुदुर्ग महोत्सव[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महारा़्ष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दि. २२ एप्रिल ते २४ एप्रिल २०१६ या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्रा सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दि. २२ एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.

सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. २१ एप्रिल रोजी सायं.४ वा मालवण बाजारपेठेतून भव्य शिवप्रेरणायात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या ३५० वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला जाणार आहे. दि.२२ एप्रिल ते २४ एप्रिल या तीन दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सांगणाऱ्या कार्यक्रमांचा खजिना इतिहास प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे अडीचशे कलावंतांचा शिवकालीन युद्धकलांचा थरार "शिव शौर्योत्सव" या कार्यक्रमात दररोज स. ९ ते सं. ५ या वेळेत पाहता येणार आहे. दि. २२ एप्रिल रोजी सायं ६.३० वा महोत्सवाच्या औपचारिक उद्‌घाटन सोहळयानंतर केरळ, मणिपूर, प.बंगाल, झारखंड, आसाम, उ.प्रदेश आणि ओडीसा या राज्यातील जवळपास १०० कलावंत भारतातील युद्धकलांचे सादरीकरण करणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितांसाठी पर्वणीच ठरणार आहे. यानंतर नाट्यदिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'कोकण रजनी' हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करतील. दि. २३ एप्रिल रोजी संध्याकाळी नंदेश उमप हे त्यांच्या साथीदारांसह सादर करीत असलेला "शिवसोहळा" ही ऐतिहासिक सांस्कृतिक मेजवानी हे रसिकांसाठी खास आकर्षण असेल.

या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरिता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरिता प्रवासी बोट सेवेच्या दरात ५० टक्के सवलतीच्या दर आकारण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर रोज पाच हजार पर्यटकांना रु. ५७ ऐवजी रु.२९ एवढाच आकार बोटीने प्रवास करण्यासाठी द्यावा लागेल.

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी दि. २४ एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्तिगीतांच्या संगीतमय मैफिलीचा आस्वाद घेता येणार आहे. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजित गोखले, सुवर्णा माटेगांवकर, पराग माटेगांवकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतिपर लोकप्रिय गीते सादर करणार आहेत.

तीन दिवसाच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे सकाळी ९ ते रात्री ८ वाजता रांगोळी, शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भग्रंथ, पुस्तके यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. चिवला बीच या ठिकाणी वाळूशिल्प प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे नावाड्याच्या वेशातील वाळूशिल्प साकारण्यात येणार आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2013-08-08. ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

अधिक वाचन[संपादन]