भुदरगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भूदरगड या पानावरून पुनर्निर्देशित)

भुदरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेला एक किल्ला आहे.


भुदरगड
नाव भुदरगड
उंची ३,२१२ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव पेठ शिवापूर (गारगोटी)
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था सुस्थितीत
स्थापना {{{स्थापना}}}


कोल्हापूरपासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.

भुदरगड तालुक्यातील गारगोटी जवळील हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती. पण आज रोजी गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधून झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.

इतिहास[संपादन]

हा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. इ.स. १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलशाही|मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही देवळात आहेत.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला.

इ.स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. ऑक्टोबर १३ १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला.

असे बंडाचे प्रयत्‍न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली.

छायाचित्रे[संपादन]

गडावरील ठिकाणे[संपादन]

गडावर जाण्यासाठी गारगोटीवरून पाल बार्वे मार्गे किंवा गारगोटीवरून पुशपनगर राणेवाडी मार्गे जाता येते. पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. पूर्वी पेठ शिवापूर ही बाजारपेठ होती. वाटेत महादेवाचे मंदिर व त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदिर दिसते. मंदिराभोवती ओवऱ्या, कमानी व दिपमाळा आहेत. मंदिरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे.

देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोद्धार केलेले पुरातन शिवमंदिर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे.

वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदिर मंदिरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदिर लागते. मंदिरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी अनेक समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.

पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे डाव्या हातास श्री महादेवाचे सुबक नक्षीकाम असलेले मंदिर दिसते. पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा व या शिळेत कोरून काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते. येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायऱ्या उतरून आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची शेंदरी मुर्ती दिसते. आता आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदिरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतोगडावर चिऱ्याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत .परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.

गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.

गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरून दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो. गडाच्या सर्व बाजूनी वनीकरण केल्यामुळे हा गडाखालील परिसर सदैव हिरवागार दिसतो.

गडाखाली पेठ शिवापूर, गडबिद्री, जकींनपेठ, शिंदेवाडी, कदमवाडी, वरेकरवाडी, राणेवाडी, माडेकरवाडी, कालेकरवाडी, घावरेवाडी, चोपडेवाडी, पडखंबे, बारवे अशी छोटी गावे आणि वाड्या आहेत.

कसे जाल[संपादन]

कोल्हापूरपासून गारगोटी व नंतर गारगोटीपासून किल्ल्याच्या तटाखालपर्यंत एस. टी. महामंडळाची बस आहे.

बाह्य दुवे[संपादन]

हे सुद्धा पहा
  • [भारतातील किल्ले]
  • [महाराष्ट्रातील किल्ले]

{महाराष्ट्रातील किल्ले}

[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]