पिसोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिसोळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे.


पिसोळ

पिसोळ किल्ला तट व बुरुज
पिसोळचे ठिकाण दाखविणारा नकाशा
पिसोळचे ठिकाण दाखविणारा नकाशा
पिसोळ
गुणक 20°51′02″N 74°13′19″E / 20.850544°N 74.221837°E / 20.850544; 74.221837
नाव पिसोळ
उंची १०५० मी/३४४५ फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव नांदिन, पिसोळवाडी, जायखेडा
डोंगररांग गाळणा टेकड्या
सध्याची अवस्था जीर्ण: तट, बुरुजाचे अवशेष व उध्वस्त इमारत तसेच काही पाण्याची टाकी आढळतात.
स्थापना


भौगोलिक स्थान[संपादन]

पिसोळ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आहे.

कसे जाल ?[संपादन]

नाशिकपासून सटाणा (बागलाण) जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत. तेथून पुढे ताहराबाद या २२ किमी अंतरावर असलेल्या गावी जावे नंतर तेथून सोमपुर या 4 किमी वरिल गावी जावे नंतर मात्र वाहन उपलब्धता नाही यासाठी आपण एकटे असल्यास लिफ्ट घेऊन तांदुळवाडी या गावी जाउ शकता व तेथून पुढे नांदिन या गावी गटाने जात असाल तर सोमपुर गावातील वाहन रिक्षा उपलब्ध होऊ शकेल.

धुळे जिल्ह्य़ातून येतांना साक्री तालुक्याच्या ठिकाणी येऊन दिघावे गावापर्यंत वाहन उपलब्ध होतात तेथून खाजगी वाहन उपलब्ध होऊ शकेल.

इतिहास[संपादन]

तेराव्या शतका पर्यंत बागलाण हा प्रांत होता. देवगिरीचे यादवराज्य संपवल्यावर इ.स. १३४० मध्ये नामदेव नावाचा राजा राज्य करू लागला.इ.स. १६३७ मध्ये हा प्रांत मुस्लिम साम्राज्याने जिंकला. याच काळात राठोडवंशीय बागूल राजे पिसोळसह विविध किल्ल्सावर राहत असत. बागूल घराण्याताील राजांमुळे बागलाण हे नाव पडले. नामदेव हा बागुलवंशीय ३२ वा राजा होता. त्याने गवळी राजा महेश याचा पराभव करून साल्हेर, मुल्हेर व पिसोळ किल्ले जिंकले. त्यावेळी जंगछाया नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्याही त्याने पराभव केला. त्याची जैतापूर ही राजधानी होती. नामदेवाची स्मृती म्हणून नामदेव या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि नाव बदलेले नांदीन हे गाव पिसोळ किल्याच्या पायथ्याशी आहे. इ. स. १६३७ मध्ये बागलाण प्रांत मुघलांच्या ताब्यात गेला. याच काळात राठोड वंशीय बागुल राजे बागलाण प्रांताता विविध किल्ल्यावर राहत असत. प्रतापशहा,बहिरम शहा,नामदेव विरसणे आदी राजा होऊन गेले. त्यांच्या आडनावावरून ते बागलाण बनले. त्यानंतर बागलाणला दुसरे नाव सटाणा देण्यात आले. पिसोळ किल्ल्यावर राजा गवळी राहत असे. त्याला गुरे पाळण्याची आवड होती. प्राणी व प्रजा रक्षणासाठी त्याने घरे, दरवाजा, पाण्याचे तळे व आवश्यक ठिकाणी भिंती बांधल्या. मोगलाई जाऊन पेशवाई आली. नंतर इंग्रज राजवट आली. ३ जुलै इ.स. १८१८ रोजी बागलाण प्रांत ब्रिटिशांना मिळाला बागलाण इ.स. १८६९ मध्ये नाशिक जिल्ह्याला जोडले गेले.

पेशवाई अस्तानंतर इ.स.१८१८ पासून बागलाणात ब्रिटिश सत्ता सुरू झाली. पेशवाई सत्तेत सर्व अधिकारी ब्राह्मण होते. त्यावेळी पिसोळ किल्ल्यावर किल्लेदार तेंडुलकर होते. पिसोळ किल्ला हे नाव कसे अस्तित्वात आले, त्याबाबत इ.स. इ.स.१७०४ च्या सुमारास बादशाही सरदार इस्माईल मका यास वाई प्रांतातील देशमुख सूर्याजी पिसाळ यांनी इस्माईल मकास मदत केली. त्या मोबदल्यात इस्माईल मकाने बागलाण प्रांतातील एक किल्ला व शेकडो एकर जमीन सूर्याजी पिसाळ यांना बक्षीस म्हणून दिली. बक्षीस मिळालेल्या देरमाळ, गाळण्याच्या डोंगर रांगेवरील (सह्याद्री डोंगर रांगेवरील) नंदीमाळ किल्ला (पिसोळ किल्ला) व जमिनीची जहॉंगिरी सांभाळण्यासाठी सूर्याजी पिसाळने त्या परिसरात काही वसाहती वसवल्या होत्या. त्यापैकी प्रमुख वसाहतीला ‘पिसाळवाडी’ असे नाव देण्यात आले. पिसोळ किल्ल्याची जहागिरी रद्द झाल्यानंतर तेथील वसाहती पांगले गेले. किल्ल्याचा दरारा आणि धाक, चौकीदार आणि पहारेकरी, रखवालदार हे हटवले गेले आणि राजाचा दरारा कमी झाला. त्यानंतर त्या जंगलामध्ये पिसोळ किल्ल्यावर गुरे चारण्यासाठी किल्ल्याच्या आजूबाजूच्या लोकांनी तेथे तळ ठोकला. देऊर, म्हसदी, छाईल, प्रतापपूर अशा अनेक गावांतील लोक गुरे घेऊन या ठिकाणी आले. तेच आजचे नांदीन गाव होय. मुस्लिम साम्राज्यामुळे त्यांच्या नावाने गाव व रस्त्याचे नाव ठेवले जायचे. परंतु मुस्लिम अधिकाऱ्यांशी मध्यस्थी करून नंदिमाळ किल्ल्याचे नाव पिसोळवाडी किल्ला असे ठेवले. सूर्याजी पिसाळने त्याचा भाऊ जीवजीला पिसाळवाडी किल्ल्याचे फौजदार म्हणून नेमणुकीचे फर्मान मिळाले. परंतु मुल्हेरच्या मुस्लिम अधिकाऱ्याने मध्येच खेळी खेळून मुल्हेरच्या आचार्य कुलातील ब्राह्मणाला मुसलमान करून फौजदारपद देऊ केले. त्यामुळे जीवाजीला राग आल्याने त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. जीवाजीचे जलालउद्यीन केले व पिसोळवाडी किल्ल्याचे फौजदारपद स्वीकारले. पुढे अपभ्रशांने पिसाळवाडी किल्ल्याचे नाव वाडीपिसोळ किल्ला असे झाले. जलालउद्यीन हा शिकारीसाठी गेला असता त्याचा अचानक मृत्यू झाला. ज्या टेकडीजवळ मृत्यू झाला. तेथे एक वस्ती निर्माण झाली. वस्तीला जलालवाडी नाव पडले. पुढे जलालवाडीचे अपभ्रंश जालखेडी, जालखेडा आणि जायखेडा असे झाले.

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक पिसोळ किल्ला हा शिवकालीन तसेच मुस्लिम साम्राज्यातला किल्ला आहे. आजही किल्ल्यावर मारुती मंदिर, गणपती मंदिर, रामकुंड, सीताकुंड, मशीद व किल्ल्याच्या पायथ्याशी त्यावेळचे कब्रस्थान आहे. किल्ल्यावर २० ते २५ पाण्याचे जिवंत झरे (टाके) आहेत. किल्ला परिसरात मोतीटाका, हत्तीटाका, चुनचुन्या टाका असे विविध जिवंत पाण्याची टाकी बघायला मिळतात.

गडावरील राहायची सोय[संपादन]

पिसोळ किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाच्या उजवीकडे कातळातील गुहांमध्ये ५ ते १० जणांना रहाता येते.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावर जेवणाची सोय नाही. ती स्वतः करावी.

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावरील पठारावर पाण्याची टाकी आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

सटाणा ताहराबाद जायखेड पिसोळवाडी मार्गे तसेच पिसोळला जायचे असल्यास नाशिक – सटाणा मार्गे ताहराबादला जावे लागते. नाशिकपासून ताहराबाद १०५ किमीवर आहे. ताहराबाद – मालेगाव रस्त्यावर ताहराबादपासून ८ किमीवर जायखेडा नावाचे गाव आहे. ताहराबादपासून जायखेड्याला जाण्यास एसटी किंवा सहा आसनी रिक्षा मिळतात. जायखेड्यापासून वाडी पिसोळपर्यंत ५ कि.मी. कच्चा रस्ता आहे. पिसोळवाडीमधून किल्ल्याच्या दिशेला निघाल्यावर एक मारुतीचे मंदिर आहे. येथून किल्ल्याच्या मधोमध असणारी खिंड दिसते. ही खिंड म्हणजेच आपले लक्ष्य होय. किल्ल्याच्या दोन कड्यांमुळे ही खिंड तयार झालेली आहे. मंदिरापासून निघाल्यावर सुमारे पाऊण तासानंतर माणूस किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो.[१]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

पिसोळ वाडीतून २ तास लागतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; सह्याद्री प्रतिष्ठान नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही