सज्जनगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सज्जनगड
सज्जनगड समर्थ रामदास स्वामी स्थापित स्थान
नाव सज्जनगड
सज्जनगड समर्थ रामदास स्वामी स्थापित स्थान
उंची ३३५० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव कारी, परळी, गजवाडी
डोंगररांग सातारा
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {{{स्थापना}}}


सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे.[१] आश्वलायन ऋषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत.[२] परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.

स्थान[संपादन]

प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या नैर्ऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे.

हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंच आहे, तर पठारापासून १००० फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मीहून अधिक आहे. पश्चिमेस खेड - चिपळूण, उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा आहे.

इतिहास[संपादन]

प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले.[३] पुढे राज्याभिषेकानंतर इ.स.१६७९, पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

१८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नैरससातारा' म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

समर्थ रामदास स्वामी स्थापित स्थान

गडावरील ठिकाणे[संपादन]

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे -

छत्रपती शिवाजी महाराजद्वार
सज्जनगड येथील शिलालेख

सज्जनगड : सातारा शहराच्या पश्चिमेस दहा किलोमीटरवर सज्जनगड आहे.

समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य कल्याण स्वामीयांचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामीयांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामादासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती. अंगलाई मंदिर समर्थांनी बांधले. शके १६०३ माघ नवमी (सन १६८२) रोजी रामदासांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे. समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई हिचे वृंदावन आहे. माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी साजरी करतात.

  • गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार'असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे.
  • दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात.

आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो.

फार्सी वाचन : दौलत झ दरत हमहरा रूए नुमायद हिम्मत झ कार ऊ हमह नुव्वार कुशायद तू कब्लह व मर हाजतमन्द हाजती हाजत हमह अझ दर कब्लह बर आयद बिनाए दरवाज इमारत किलआ परेली आमिर शुद बतारीख ३ दर जमादी उल आखिर कार कर्द रेहान आदिलशाही

त्याचा मराठी अर्थ खालील प्रमाणे :

  1. ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.
  2. हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे.
  3. तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहेस.
  4. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात.
  5. परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने काम केले.

ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या आधी एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशीदवजा इमारत आहे, तर समोरच आंगलाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली.

गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले.

मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तु आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. या गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे.

राममंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात. गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात.

गडाच्या उत्तरेस बाटेवरच गायमारुती व कल्याण स्वामी मंदिर आहे. गायमारुती देवळाजवळून कड्याच्या कडेकडेने एक पायवाट जाते, साधारणत: १०० मीटर अंतरावर एक गुहा आहे. त्याला रामघळ म्हणतात.

सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे. कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय आहे.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

नकाशा

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.

  • परळी पासून : -

सातारा ते परळी अंतर १० किमीचे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण १८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो.

  • गजवाडी पासून :-

सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ किलोमीटरवर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो.रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.

एस.टी. महामंडळाच्या बसने साताऱ्याहून जाता येते.सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे.

राहण्याची सोय[संपादन]

गडावर राहण्यासाठी खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्जनगड खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.[४]सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे.

चित्रदालन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "श्री श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे दीपोत्सव उत्साहात". लोकमत. 2020-11-14. 2021-11-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Fort Sajjangad: A blend of History and Spirituality | Kolhapur News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-11-23 रोजी पाहिले.
  3. ^ Kale, Rohit Pralhadrao (2018-05-24). Rajwata: Aavishkar Gad Killayacha (इंग्रजी भाषेत). FSP Media Publications.
  4. ^ "भोजन, निवासाविना सज्जनगड खुला; रामदास स्वामी संस्थानचा महत्वपूर्ण निर्णय | Sakal". सकाळ. 2021-11-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]