कोर्लई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोर्लई किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)

कोर्लई मोरो कॅसल किंवा कॅसल कर्ल्यू (पोर्तुगीज: फोर्तोलेझा दो मोरो दि चाउल) हा महाराष्ट्रातील रेवदंडा जवळीस किल्ला आहे.

कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदंडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे. तर दक्षिणेकडे कोर्लई गावाजवळ कोर्लईचा किल्ला आहे.

मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोरलईपासून वसई पर्यंतच्या आपल्या प्रांताच्या रक्षण केले. पोर्तुगीज व्यापाराचा पुरावा कोर्रलई खेड्यांच्या रहिवाशांच्या लुसो-इंडियन पोर्तुगीज क्रिओल या वेगळ्या बोलीमध्ये दिसून येतो.

कोरलाई गाव हे अलिबाग - मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबाग पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. कोर्लईला रोह्याकडूनही येणारा गाडीरस्ता आहे. रोहा ते मुरुड (चणेरे मार्गे) हा गाडी रस्ताही कोर्लई गावाजवळून जातो.

इतिहास[संपादन]

इ.स. १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चौल या रेवदंडा जवळच्या खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या भागात काम सुरू केले. त्यांनी कोर्लईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी चर्चिल चौथा या पुस्तकात नमूद केले आहे की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगीजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. १३ सप्टेंबर इ.स. १५९४च्या अहमदनगर निजामशहा व पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या लढाईनंतर किल्ला पोर्तुगीजांकडे आला.

स्वरूप[संपादन]

कोर्लईचा किल्ला एका चिंचोळ्या डोंगरावर बांधलेला आहे. मुख्य रस्ता व हा डोंगर एका निमुळत्या भूशिराने जोडला गेला आहे. या भूशिरावरून लहान वाहने जावू शकतील, असा गाडीमार्ग कोर्लई गावातून किल्ल्यापर्यत जातो. हे अंतर दोन कि.मी. आहे.

निमुळत्या टेकडीवर असलेला कोर्लई किल्ला किलोमीटर भर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. साधारण ३० मी. पेक्षा याची रुंदी जास्त नाही. ८० ते ९० मीटर उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊस मधून, तर तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे.

दक्षिण टोकाकडील कोर्लई गावातील कोळीवस्ती संपली की, एक पाऊलवाट दांडाच्या पूर्वेकडून वर चढते. या वाटेने २० ते ३० मिनिटांमध्ये आपण डोंगराच्या माथ्यावरील तटबंदीपर्यंत पोहोचतो. पूर्वेकडील तोंड असलेल्या दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. हा भाग बालेकिल्ल्याचा आहे. कोर्लईचा हा सर्वोच्च असा हा माथा आहे. हा चारही बाजूने तटबंदीने बांधलेला आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. समोरच्या चर्चची पडझड झालेली इमारत आहे. या पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. तेथून आपण गडाच्या दक्षिण टोकावर जावू शकतो. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. या टोकावर पोहोचल्यावर आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोर्लई गावाचे उत्तम दर्शन घडते. हा परिसर पाहून आपण चर्चकडे येतो. सध्या याच्या दुरुस्तीचे काम पुरातत्त्व खात्याने हाती घेतले असून किल्ल्याच्या तटबंदीवर वाढलेली सर्व अनावश्यक झाडे तोडल्यामुळे किल्ल्याचे मूळ बांधकाम पाहण्यास अडथळा येत नाही. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर झाडे तोडल्यामुळे किल्ल्याचे मूळ बांधकाम पाहाण्यास अडथळा येत नाही. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकी आहे. हे पाण्याचे टाकी वरून पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. बादली व दोरी असल्याशिवाय पाणी काढणे अशक्य आहे. या टाक्यातूनच खालच्या लाईट हाऊसला (दीपगृह) पाणी पुरवठा केला जातो.

बाजूला छोटेसे महादेव मंदिर असून त्यासमोर दोन वृंदावन आहेत. हा परिसर पाहून पुढे निघाल्यावर डावीकडील तटबंदीमध्ये एक लहान दार आहे. या दारातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या नव्याने केलेल्या असून या मार्गाने आपण दीपगृहात उतरु शकतो. हा मार्ग सोडून आपण खाली उतरु लागतो. दोन दरवाजे ओलांडून आपण तळामध्ये पोहोचतो. तेथे पश्चिमेकडे दिंडी दरवाजा आहे. तर पूर्वेकडे दर्या दरवाजा आहे. दर्या दरवाजातून बाहेर आल्यावर आपल्याला समोरच धक्का बांधलेला दिसतो. पूर्वी येथेच गलबतांची दुरुस्ती होत असे. तो भाग पाहून आपण पुन्हा आत येतो. येथील तटबंदीमध्ये अनेक खोल्या ओळीने आहेत. या पूर्वी सैनिकांना राहण्यासाठी वापरला जात असत.

उजव्या बाजूला असलेल्या बुरुजावर तोफा आहेत. त्याच्या बाजूचे बांधकाम म्हणजे क्रुसाची बातेरी आहे. या वरील क्रुसाचे चिन्ह काळाच्या ओघात नष्ट झाले. दिंडी दरवाजातून बाहेर पडून आपण सागर किनाऱ्याने दीपगृहाकडे जातो. दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदीचे दृश्य उत्तमपैकी दिसते.

कोरलाईच्या किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पोर्तुगिजांनी केलेली आहे. या किल्ल्यामुळे सागर आणि कुंडलिका नदीची खाडी या परिसरावर ताबा ठेवणे सोपे होते. दियोगु लोपिष दि सिकैर या पोर्तुगिजांच्या गव्हर्नर याने हे बांधकाम निजामशाहीच्या काळात केलेले आहे. चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोर्लईवर ताबा मिळवला होता.

कोर्लईची तटबंदी, त्याचे आठ-दहा दरवाजे, आजही जागोजागच्या बुरुजांवरून रोखलेल्या तोफा, सागराचे विशाल दर्शन आपल्याला मोहवून टाकते.

हे सुद्धा पहा[संपादन]