Jump to content

पेब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेब किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
पेबचा किल्ला
नाव पेबचा किल्ला
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण नेरळ
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


पेब (विकटगड) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पनवेलच्या ईशान्येला मुंबई-पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.

इतिहास

[संपादन]

या किल्ल्याचे नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो. विकटगड हे मुळ नाव जास्त प्रचलित नसल्याने गडाची ओळख ही त्याच्या असलेल्या सर्वातमोठ्या भूमिकेतून निर्माण झाली, आणि ती म्हणजे 'पेब चा किल्ला'. शक्यतो सगळे याच नावाने गडाला ओळखतात. माथेरानच्या डोंगर रांगेत असणाऱ्या या गडाचा वापर स्वराज्य स्थापन करताना 'पेवी' साठी करण्यात आला; म्हणजेच 'धान्याचे कोठार'. कारण या रांगेत असणारे दोन मुख्य गड अर्थात 'चंदेरी गड' आणि 'ताहुली गड' हे चढाई श्रेणीत अत्यंत कठीण असल्याने त्यांच्या कोठारात धान्य मोठ्याप्रमाणात साठवणे कठीण होते. त्यावर पर्याय म्हणून धान्याची साठवण ही विकटगडवर करण्याचा विचार केला गेला, कारण इंग्रज भारताचे सत्ताधारी होण्यापूर्वी या गडाच्या चढाई साठी वाट ही केवळ नेरळ गावातून होती. ही वाट घनदाट जंगलातून व फसवी असल्याने गडाचे संरक्षण करण्याची जबाबदारी बऱ्याच प्रमाणात याच वाटेने घेतली म्हणून विकटगडास धान्याचे कोठार करण्याचे पक्के केले व साठवणीतील हे धान्य गरजेनुसार कमीत-कमी वेळेत इतर दोन गडांवर तसेच प्रभळगडावर पोहचवले जाऊ लागले. कालांतराने विकटगड ला धान्याचे कोठार अर्थात पेवी चा किल्ला असे संबोधले जाऊ लागले, नकळत या पेवी शब्दाचे रूपांतर पायथ्याशी असलेल्या पेबी देवीच्या मंदिरामुळे पेब मध्ये होऊन गडाची ओळख 'पेबचा किल्ला' अशी झाली. इंग्रजांनी माथेरान पर्यटन क्षेत्र जाहीर करून या डोंगरात वाहने व आगगाडी जण्याकरिता सोयीप्रमाणे रस्ता आणि लोखंडी रुळांचे बांधकाम केले. त्यामुळे या रूळ मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात गडावर जाण्याचा रस्ता हा सोपा झाला; मुख्य म्हणजे या वाटेने गडाचा कोणताही दरवाजा नसल्याने गडाच्या तटबंदी जवळ मापक अशा लोखंडी रुळापासून बनवलेल्या शिड्या पुरवून गडाची चढाई सोपी केली. या मार्गे किमान दिड तासातच आपण गडावर पोहचतो. आणि आता गडावरील कोठारे ही स्वामी समर्थ यांच्या 'मठ' व 'ध्यान मंदिरात' बदलली गेली आहेत.

जाण्याच्या वाटा

[संपादन]

मध्य रेल्वेने कर्जतजवळच्या नेरळ रेल्वे स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. नेरळ स्टेशनला उतरल्यावर डावीकडची वाट माथेरानला व उजवीकडची वाट पेबला जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान, पोल्ट्रीफार्म व घरांची अर्धवट बांधकामे दिसतात. त्यानंतर समोर दिसणाऱ्या इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने गेल्यावर सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर येतो. तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळच तीन वाटा आहेत.

    तसेच पनवेल तालुक्यातील सतीची वाडी व कोंबल टेकडी येथून दोन तासात जंगल सफर करत व खडी चढण चढत किल्ल्यावर पोहोचता येते.

१) धबधब्याला लागून असलेली वाट. २) मधून गेलेली मुख्य वाट. ३) टॉवर्सला लागून असलेली वाट .

या तीन वाटांपैकी पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढल्यावर पुढे झऱ्यातून जावे लागते. तरीही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करून खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे लागते. तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच या किल्ल्यावर जाणाऱ्यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

[संपादन]

नेरळ रेल्वे स्टेशनपासून पासून कार ने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.

किल्ला चढायला लागणारा वेळ

[संपादन]

किल्ला चढण्यास लागणारा वेळ दोन ते अडीच तास आहे. पेबवर जाण्यासाठी गिर्यारोहकांना आणखी एक वाट आहे. त्यासाठी माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटवर यावे. येथून सुमारे ६ तासात पेबच्या गुहेत पोहचता येते. गुहेच्या पायथ्याशी गरुड कोरला आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

पेबचा किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण आहे. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते. पेब वर मुख्यतः २वाटा आहे त्यानुसार पाहण्याच्या ठिकाणांचा क्रम ठरतो आणि ही ठिकाणे विविध श्रेणीत आपण वर्गीकरण करू शकतो १) मंदिरे

गडावर एकूण ३ मंदिरे आहेत सर्व प्रथम पुरातन शिव मंदिर जे पाण्याच्या टाक्याजवळ आहे इथे जाताना थोडे सांभाळून जावे लागते दुसरे मंदिर हे बालेकिल्ल्याच्या सर्वोच ठिकाणी आहे इथे आपण दत्तगुरू आणि शिवलिंग पाहू शकतो. आणि तिसरे ईशानंद महाराजानी स्थापित केलेले गुरू आश्रम मंदिर आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत ईशानंद महाराजच या मंदिरांची देखरेख करतात.

२) गुहा धान्याच्या कोठारालगतच चौकोनी द्वाराची गुहा आहे ज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी गुडघ्यावर रांगत जावे लागते, या गुहेत ५ लोक विना अडचण मुक्काम करण्याइतपत जागा असली तरीही गुहा ही राहण्याच्या सुस्थिती मध्ये नाही. ३) गडाचे अवशेष

सर्व प्रथम धान्याचे कोठार जे सध्याच्या घडीला स्वामी समर्थांचा मठ म्हणुन बदलण्यात आले आहे. पुरातन शिवमंदिर आणि जवळील पाण्याचे टाके. यामधील काही टाक्याचे पाणी हे पिण्यासाठी योग्य आहे सोबतच त्याच टाक्यात आपण कोरीव (प्रसुती) शिल्प पाहु शकतो. आणि उर्वरित गडाची तटबंदी आणि त्याचे अवशेषही पाहता येतात.

४) गडाच्या दृष्टीक्षेपात असणारे इतर गड आणि डोंगररांग

पेब गडावरून दिसणाऱ्या ठिकाणची यादी कोथळी गड, माथेरान रांग, कलावंतीण दुर्ग, प्रबळगड, चंदेरी, ताहुली, श्रीक्षेत्र मलंगगड, बदलापूरचे डोंगर आणि नाखिंड इत्यादी

राहण्याची/पाण्याची सोय

[संपादन]

किल्ल्यावर गुहेमध्ये स्वामी समर्थांचे शिष्यगण रहात असल्याने गुहेच्या बाहेर किंवा जवळच असलेल्या कपारीमध्ये १० जणांच्या रहाण्याची सोय होते. गुहेजवळच असलेले पाण्याचे टाके हीच पिण्याच्या पाण्याची सोय. जेवणाची सोय स्वतःच करावी लागते.


संदर्भ

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]