खैराई किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खैराई
नाव खैराई
उंची २२९६ फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी अत्यंत अवघड
ठिकाण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव ठाणापाडा
डोंगररांग कळसुबाई
सध्याची अवस्था बिकट
स्थापना {{{स्थापना}}}


खैराई किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा पुण्याहून २९० कि.मी. पुणे - नाशिक - हरसूल - ठाणापाडा - खैरपाली या मार्गावर आहे. या किल्यावर जूनी तोफ , हत्यारे ठेवण्याची जागा , तटबंदी , टेहळणी बुरुज , शिवकालीन स्वच्छता गृह , पाण्याचे टाके, वेताळेश्वर मंदिर, या गोष्टी पर्यटकांचे आकर्षण ठरतात.

इतिहास[संपादन]

शिवकाळात हा गड मोघलांचा जहागीरदार बनलेल्या कोळी राजाच्या ताब्यात होता. इ.स. १६७६ मध्ये संपूर्ण रामनगरचा भूभाग जिंकताना छत्रपती शिवरायांनी खैराई किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला [१] इ.स. १७९० मध्ये पेठचे संस्थानिक चिमणाजी दलपतराव यांनी कर्जापोटी हा गड नरहर गोपाळ पेशवे सरकार यांना दिला [२] शिवाजी महाराज सुरतेच्या मोहिमेवर जात असताना या किल्ल्यावर १ जानेवारी १६६४ रोजी आले होते.

गडावरील ठिकाणे[संपादन]

खैराईचा गडमाथा छोटेखानीच असला तरी गडावर पाण्याची सुकलेली अनेक टाकी, दोन लहान तोफा, खोदीव पायऱ्या, एक लाकडी चौकट असलेले उघड्यावरील वेताळाचे मंदिर, एक भग्न वास्तूचा चौथरा, काही उध्वस्त बुरुज व बऱ्यापैकी शाबूत असलेली तटबंदी या गोष्टी नक्कीच पाहण्यासारख्या आहेत. या किल्ल्यावरून आग्नेयेला त्रिकोणी आकाराचा वाघेरा किल्ला व दूरवर उतवड, हरिहर व त्र्यंबकगडाची पुसटशी रांग दिसते.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूलला पोहचायचे. हरसूवलरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करावी लागते. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास वेळ लागतो. माचीवर पोहोचल्यावर माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरे आहेत. तेथून गड चढायला सुरुवात करावी. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्‍यासमोर ठेवून चढत राहायचे. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्‍चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातील पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. माचीपाड्याकडला बुरुज नाकासमोर ठेवत ३० मिनिटांचा छातीवर येणारा चढ चढला की तुटलेल्या तटावरून आपला गड प्रवेश होतो. किल्ल्यावर पाण्याची अनेक टाकी असली तरी त्यातील पाणी फक्त पावसाळ्यातच उपयोगास येते. त्यामुळे पिण्याचे पाणी माचीपाड्यातील विहिरीवरच भरून घ्यावे. किल्ल्यावर राहण्याची कोणतीही सोय नाही मात्र माचीपाड्यातील छोटेखानी मंदिरात राहता येऊ शकते. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा येथे पोहोचावे लागते.

मुक्काम[संपादन]

एका दिवसात रामसेज किल्ला, वाघेरा किल्ला, आणि खैराई किल्ला हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येते.

छायाचित्रे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]


  1. ^ दुर्गमदुर्ग – श्री. भगवान चिले
  2. ^ दुर्गवास्तू – आनंद पाळंदे