Jump to content

अहिल्यानगर

Coordinates: 19°05′N 74°44′E / 19.08°N 74.73°E / 19.08; 74.73
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अहमदनगर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अहिल्यानगर शहराविषयी आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?अहिल्यानगर
नगर
(अहमदनगर)
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
अहिल्यानगर रेल्वे स्थानक
अहिल्यानगर रेल्वे स्थानक
अहिल्यानगर रेल्वे स्थानक
Map

१९° ०५′ ००″ N, ७४° ४४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
८५.१४ चौ. किमी
• ६५६.५४ मी
जवळचे शहर छत्रपती संभाजीनगर, पुणे
जिल्हा अहिल्यानगर जिल्हा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
३,५०,९०५[] (२०११)
• ८,९००/किमी
१.०८ /
७७.५२ %
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 414001
• +२४१
• महा-१६, महा-१७
संकेतस्थळ: अहिल्यानगर संकेतस्थळ
  1. ^ "अहमदनगर जिल्हा".

अहिल्यानगर हे शहर अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, कल्याण, ठाणे, सोलापूर, धुळे, बीड या शहरांना जोडले गेले आहे.

अहिल्यानगरचा इतिहास

[संपादन]

निजामशाहीचे संस्थापक निजाम अहमदशाह होते. मध्ययुगीन कालखंडात दक्षिण भारत मध्ये ज्या पाच शाही होऊन गेल्या त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली होती. भारत मध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली होती. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मितीही झाली होती. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहिल्यानगर हे नाव मिळाले. या निजामशाहीचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे.

अहिल्यानगर हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. दौलताबाद वर स्थापन झालेल्या बहामनी राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारे मलिक अहमद हा मूळचे हिंदू असून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचे नातू होते.त्यांच्या वडिलांनी-तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मलिक अहमद हे तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत ते सुभेदार पदापर्यंत पोहोचले. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गावानमुळे विस्तार झाला, परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापले.

मलिक अहमद यांनी जुन्नर या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाचे स्वतंत्र राज्य झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमद यांच्यावर आक्रमण केले. तेव्हा अहिल्यानगर गावाजवळील इमाम घाटात त्यांनी बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्यांनी एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहिल्यानगर. विशेष म्हणजे मलिक अहमद यांच्या फौजेत असणाऱ्या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते.

आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हणले गेले. मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. त्यानुसार अहिल्यानगर मध्ये अंडाकृती किल्ला बांधला. या किल्ल्याचा परीघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक, तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली.

तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोट बाग ए निजाम म्हणले गेले. या कोट बाग ए निजामचे वैभव एवढे मोठे,अतिभव्य होते की,याची तुलना कैरो व [[पॅरिस] बगदाद सारख्या भव्य शहरांसोबत व्हायची.

अहिल्यानगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे. त्यापैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे ही राजसत्ता टिकली. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणाऱ्या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९०ची अहमदनगरची निजामशाही आणि दुसरी १७२४ची हैदराबादचे निजामशाही. या दोन सत्तांचा परस्पर काहीही संबंध नाही.

निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहानच्या काळात मुलुख मैदान/ मालिक - ए -मैदान जी रूमी खान दक्कनी यांनी बनवली (अहिल्यानगर मध्ये तोफखाना आहे तिथे ही तोफ बनली होती; आजही हा भाग तोफखाना म्हटला जातो) जगातील भव्य असणारी तोफ. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती.( हुसैन निजामशहा यांनी सुलताना चांद बीबी यांच्या लग्नात ही तोफ आदिल शहा यांना भेट म्हणून दिली होती) पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती बिजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व बिजयनगरवर याचा वापर झाला. बिजापूरच्या उपली बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मुघलांच्या कैदेत गेले आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले.

तेव्हापासून १७५९ पर्यंत अहिल्यानगर निझाम शाही मुघलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग आणि बादशाह औरंगजेबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजविरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस अहमदनगरमध्ये मुक्काम ठोकला होता/आहे. मोगलांचा बिजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर , (परिनदा)परंडा, काटी, जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. शिवाजी महाराजांनाही अहिल्यानगर चा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केले होते. मध्ययुगीन कालखंडातील प्रसिद्ध फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला.

मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारे बादशाह औरंगजेब आलमगीर शेवटी परत जाण्याकरिता निघाले तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहिल्यानगर मध्येच राहिले होते .त्यामुळे त्यांच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहिल्यानगरचा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारे बादशाह औरंगजेब आलमगीर वार्धक्यामुळे २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहिल्यानगर मध्येच वारले आहे.

पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिसांना अहिल्यानगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहिल्यानगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी अहिल्यानगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ 'पाकिस्तान' व मौलाना आझादांनी ‘गुबार -ए -खातीर’ लिहून काढला आहे.

छत्रपती शिवरायांचे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम अहिल्यानगरजवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने अहिल्यानगरची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर सुलतान अल्लाउद्दीन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने अहिल्यानगरची निर्मिती स्वतः सूलतान मलिक अहमद यांनी केलेली असल्याने या शहराच्या नाव लौकिक जगभर होता .

निजामांच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय ज्ञानेश्वररांपासून ते शेख महंमद महाराज पर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी दासगणूंनी अहिल्यानगर विषयी लिहिताना म्हणले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन आहे.

मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथे सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्यांच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे बिजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर (कर्नाटक) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.

लष्करी छावणी

[संपादन]

अहिल्यानगर येथे:

भारतीय आर्मी आर्मर्ड कॉर्प्ससाठी प्रशिक्षण आणि भरती ACC&S येथे होते. पूर्वी, हे शहर इतर युनिट्ससह ब्रिटिश सैन्याच्या रॉयल टँक कॉर्प्स / इंडियन आर्मर्ड कॉर्प्सचे भारतीय तळ होते. या शहरामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्करी टँक आणि आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे.[]

भूगोल

[संपादन]

१. स्थान :- अहिल्यानगर शहराचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे. शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहमदनगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे.या जिल्हाला सात जिल्ह्यांच्या सिमानी जोडले आहे/आहेत.

२. जमिनीचे प्रकार :- अहिल्यानगर' जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना कळसूबाई, अदुला, बालेश्वर आणि हरिश्र्चंद्रगड डोंगरी रांग म्हणतात. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर कळसूबाई हे अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, कुलंग आणि अजूबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. पुणे-संगमनेर रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला विटा घाट दिसेल.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या भोगोलिक रचनेनुसार तीन प्राकृतिक विभाग पडतात.

१) पश्चिमी डोंगराळ क्षेत्र २) मध्यवर्ती पठार प्रदेश ३) उत्तरेकडील आणि दक्षिणी मैदानाचे क्षेत्र

१. पश्चिमी डोंगराळ क्षेत्र : अकोले तालुकासंगमनेर तालुक्यांचा या प्रदेशामध्ये समावेश होतो. या प्रदेशातील अदुला, बालेश्वर आणि हरिशचंद्रगडच्या पर्वत रांगांमध्ये एकाच भागात अनेक उच्च शिखरे आढळतात. सह्याद्रीतील ५४२७ फूट उंच असलेले सर्वोच्च शिखर कळसूबाई हे याच प्रदेशात आहे.

२. मध्यवर्ती पठार प्रदेश : या क्षेत्रात पारनेर, अहिल्यानगर

तालुका आणि संगमनेर,श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील काही भाग या क्षेत्रात येतो.

३.उत्तर आणि दक्षिण मैदानाचे क्षेत्र : या क्षेत्रात उत्तरी कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, नेवास्याचा समावेश आहे. हा गोदावरी आणि प्रवरा नदीच्या खोरयाच भाग आहे. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या दक्षिणेकडील तालुक्यांचा भागही या भौतिक विभागात समाविष्ट केला आहे. या प्रदेशात घोड, भीमा आणि सिना नद्यांचे खोरे आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नद्या

[संपादन]

गोदावरी आणि भीमा ह्या जिल्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. या नद्यांचे पाणलोट क्षेत्र हरिश्चंद्रगडावर आणि जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्य नद्या प्रवरा, मुळा, सिना आणि धोरा या आहेत. प्रवरा नदी गोदावरीची उपनदी आहे. प्रवरा नदीवर अकोले तालुक्यात भंडारदरा येथे धरण बांधण्यात आले आहे. धरण परिसरात रंधा धबधबा आहे.

मुळा नदीवर राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर येथे मुळा धरण बांधण्यात आले आहे.

अहिल्या नगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात जंगल आहे. साग, बाभूळ, धावडा, हळदू आणि नीम ही या जंगलात आढळणारी प्रमुख झाडे आहेत. आंबा, हळदी, आवळा, बोर, मोसंबी, इत्यादी फळझाडे जिल्ह्यात आढळतात.

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]

वाहतूक व्यवस्था

[संपादन]

मुंबई - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग २२२ अहिल्यानगर शहरातून जातो.अहिल्यानगर शहर हे पुणे - छत्रपती संभाजीनगर - सोलापूर - बीड - धाराशिव - नाशिक - धुळे - कल्याण - मुंबई - ठाणे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांने जोडले गेले आहे. दौंड - मनमाड लोहमार्गावरील अहमदनगर रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे .

अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

[संपादन]
  • 'हरेश्वर संस्थान डमाळवाडी (चिचोंडी)पाथर्डी
  • दुर्गादेवी मंदिर शिराळ: पाथर्डी तालुक्यातील शिराळ हे गाव अहमदनगर पासून उत्तर - पूर्वेला सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर रोड वरील पांढरीचा पूल-करंजी या रोडवर आहे. शिराळ गावामध्ये पश्चिम-दक्षिणेस नदीकाठापासून सुमारे शंभर फूटावर आदिशक्ती श्री दुर्गा देवीचे भव्य-सुंदर मंदिर आहे. मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ आहे.
  • शनी शिंगणापूर - ता. नेवासा येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची अशी भावना आहे.
  • शिर्डी - हे ठिकाण साईबाबांच्या वास्तव्यासाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डीला छोटी मुंबई असे म्हणतात. शिर्डीला विमानतळ आहे.
  • सिद्धटेक-येथील सिद्धिविनायक मंदिर हे अष्टविनायक मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
  • विशाल गणपती मंदिर - हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहिल्यानगर च्या माळीवाडा भागात आहे.
  • रेणुकामाता मंदिर (केडगांव) - केडगांव अहिल्यानगर रेल्वेस्थानकापासून साधारण पणे ३ किलोमीटरवर आणि lअहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे/आहेत.
  • ब्रह्मनाथ - पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गाव येथील तीर्थस्थान आहे.
  • भुईकोट किल्ला - इ.स. १९४२ साली जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहिले.
  • हरिश्चंद्रगड - एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा अहमदनगर पासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकणकडा येथेच आहे. नाक्लेस फॉल सुप्रसिद्ध आहे.
  • भगवानगड - हे पाथर्डी तालुक्यातील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबाभीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते.
  • राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्री. संत कवी महिपती महाराज यांची समाधी आहे.
  • राहुरी तालुक्यातील मुळा धरण प्रसिद्ध आहे.
  • भंडारदरा धरण - अकोले तालुक्यात हे धरण असून येथील नेकलेस स्वरूपातला धबधबा अद्भुत आहे.
  • शेषनारायण मंदिर हे भारतातील  सर्वात दुर्मिळ ( एकमेव शेषनारायण मंदिर ) मंदिर असून हे अकोले तालुका पासून ४ किलिमीटर अंतरावर कुंभेफळ येथे आहे .
  • राशिन - कर्जत तालुक्यात येथे श्री जगदंबा देवी मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. पेशवा पहिले बाजीराव यांच्या घराण्याची कुलदैवता ही राशिनची देवी ओळखली जाते व श्री गोपिकाबाई पेशवीन आणि नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराला भेट दिली होती अशे इतिहासात पुरावे आहेत.
  • अहिल्यादेवी होळकर - यांचे जन्मस्थान जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आहे

राजकारणशास्त्र

[संपादन]

अहिल्यानगर जिल्हा परिषद २००३ मध्ये महानगरपालिकेत श्रेणीसुधारित करण्यात आली. २०२२ पर्यंत शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या विद्यमान महापौर होत्या. अहिल्यानगर शहराचे प्रतिनिधित्व केंद्रीय आणि राज्य विधानसभेत अनुक्रमे अहिल्यानगर लोकसभा आणि अहिल्यानगर शहर विधानसभेद्वारे केले जाते. २०२२ पर्यंत विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील होते, तर विद्यमान आमदार संग्राम जगताप होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The History of Ahmednagar". Ahmednagar.nic.in. 15 August 1947. 7 October 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 November 2011 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके
अकोले तालुका | कर्जत तालुका | कोपरगाव तालुका | जामखेड तालुका | नगर तालुका | नेवासा तालुका | पाथर्डी तालुका | पारनेर तालुका | राहाता तालुका | राहुरी तालुका | शेवगाव तालुका | श्रीगोंदा तालुका | श्रीरामपूर तालुका | संगमनेर तालुका

[[वर्ग:अहमदनगर जिल्हा]अहमदनगर शहर]