भंडारदरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९ ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३ ४’ ५”पूर्व.

भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हटले जाते.

मुख्य आकर्षण[संपादन]

भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटनस्थळ असुन दरवर्षी विविध ठिकाणांहुन येथे भेट देणारांची संख्या वाढत आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असुन कित्येक प्रसिद्ध हिंदी/मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. (कटी पतंग, हीना, राम तेरी गंगा मैली, राजू चाचा, आणि देऊळ हे त्यांपैकी काही चित्रपट होत.)

कळसूबाई[संपादन]

भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे. कळसुबाई ही आदिवासी कोळी महादेव तसेच वारली, कातकरी या जमातींची कुलदेवी आहे. सध्या वाढत्या बदलामुळे येथे देखील नवरात्रात दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. शिखरावरून दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे आहे.

अम्ब्रेला फॉल[संपादन]

विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला 'अम्ब्रेला फॉल' असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरू असताना खुप दुरवरूनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.

रंधा फॉल[संपादन]

शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.

रतनवाडी[संपादन]

भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता येते. रतनवाडी येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे, पावसाळ्यात हे शिवलिंग पूर्णतः पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असुन गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे.

घाटघर[संपादन]

शेंडी येथुन पश्चिमेकडे २२ किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. तसेच येथे आदिवासी कोळी महादेव जमातीच्या कुलदेवीचे देखील मंदिर आहे तिचे नाव घाटन देवी आहे. याच नावावरून गावाचे नाव घाटघर असे पडले आहे. इथे अनेक धबधबे असुन पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खुप पाऊस पडतो म्हणुन यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते.