यवतमाळ जिल्हा
यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा | |
---|---|
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा | |
![]()
| |
देश |
![]() |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | अमरावती विभाग |
मुख्यालय | यवतमाळ |
तालुके | उमरखेड • झरी जामणी • घाटंजी • आर्णी • केळापूर • कळंब • दारव्हा • दिग्रस • नेर • पुसद • बाभुळगाव • यवतमाळ तालुका • महागांव • मारेगांव • राळेगांव • वणी • |
क्षेत्रफळ | १३,५८४ चौरस किमी (५,२४५ चौ. मैल) |
लोकसंख्या | २७,७५,४५७ (२०११) |
लोकसंख्या घनता | २०४ प्रति चौरस किमी (५३० /चौ. मैल) |
साक्षरता दर | ८०.७% |
लिंग गुणोत्तर | १.०५५ ♂/♀ |
जिल्हाधिकारी | श्री एम.डी.सिंग |
लोकसभा मतदारसंघ | यवतमाळ-वाशिम • हिंगोली • चंद्रपूर |
विधानसभा मतदारसंघ | आर्णी • यवतमाळ • दिग्रस • पुसद • वणी • उमरखेड • राळेगांव |
खासदार | भावना पुंडलिकराव गवळी • हेमंत पाटील • सुरेश धानोरकर |
संकेतस्थळ |
यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. ( अक्षांश १९° २६' ते २०° ४२' उत्तर, व रेखांश ७७° १८' ते ७९° ९८' पूर्व)
इतिहास[संपादन]
भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
सीमा[संपादन]
जिल्ह्याच्या
- उत्तर दिशा - वर्धा जिल्हा व अमरावती जिल्हा,
- पूर्व दिशा - चंद्रपूर जिल्हा,
- दक्षिण दिशा - तेलंगणा राज्य व नांदेड जिल्हा
- पश्चिम दिशा - हिंगोली जिल्हा व वाशीम जिल्हा आहे.
हवामान व भौगोलिक विशेषता[संपादन]
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६५ मि.मी आहे. जिल्ह्याचा सुमारे २१ % भाग (२८५० चौ.कि.मी.) हा वनक्षेत्रात मोडतो.
लोकजीवन[संपादन]
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी. आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २०११) आहे. जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. मराठा, मुस्लिम, कुणबी, माळी, बंजारा तसेच आंध, गोंड, परधान, ढोर कोळी(टोकरे-कोळी) आणि कोलाम या काही प्रमुख आदिवासी जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी हिंदी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात.
जिल्ह्यातील धरणे[संपादन]
यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा नदी वरील बेंबळा धरण, अरुणावती नदी वरील अरुणावती धरण व पूस नदी वरील पूस धरण ही मोठी व प्रमुख धरणे आहेत. यापैकी बेंबळा धरण ईसापूर धरण पैनगंगा नदी (पुसद) हे यांपैकी सर्वात मोठे आहे
जिल्ह्यातील व्यवसाय[संपादन]
जिल्ह्यात हातविणकाम(हॅंडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके- कापूस, ज्वारी, भुईमूग, तूर-डाळ ही आहेत. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडा व मोह या उपयोगी वस्तू मिळतात. यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार-केंद्रे आहेत.
पर्यटन[संपादन]
==जिल्ह्यातील पर्यटनस्थळे== आर्णी येथील बाबा कंबल्पोष जत्रा(सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान मानले जाते),घंटीबाबा जत्रा (दिग्रस), रंगनाथ स्वामी जत्रा (वणी), इतर जत्रेची ठिकाणे- कळंब, घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर, वणी, तपोणा, पुसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर(वणी) इत्यादी पर्यटनस्थळे येथे आहेत आणि पांढरकवडा येेथिल जगदंबा देवी संंस्थान केलापूर ही आहेेेत,भवानी टेकडी-दिग्रस,वाघाडी नदीवरील-निळोना,चापडोह,पिंगळाई देवी नाथशक्तीपिठ करळगाव घाट [यवतमाळ]
जिल्ह्यातील तालुके[संपादन]
- आर्णी
- उमरखेड
- कळंब
- केळापूर
- झरी जामणी
- घाटंजी
- दारव्हा
- दिग्रस
- नेर
- पुसद
- बाभुळगाव
- महागांव
- मारेगांव
- राळेगांव
- वणी, यवतमाळ
- यवतमाळ तालुका
जल संधारण[संपादन]
या जिल्ह्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर सर्वात मोठे धरण आहे. वनराई बंधारे या योजनेखाली २००५ ते २००८ या चार वर्षांत तब्बल २८,५५३ बंधारे बांधण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात २००४ साली दुष्काळ होता. सुमारे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी वाया गेली होती. नद्या, नाले, विहिरी, विंधनविहिरी कोरड्या झाल्या होत्या. जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी १.९९ मीटरने खाली गेली. ९५ टक्के गावांमध्ये डिसेंबर अखेर पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली.
गावभेटी तसेच, ग्रामस्थ-अधिकारी यांच्या चर्चेतून एक वास्तव समोर आले. ते म्हणजे जलसंधारणातील लोकसहभागाचा अभाव. त्याचबरोबर नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून राहण्याची मानसिकता. २००५ मध्ये सुदैवाने चांगला पाऊस झाला. या अनुकूल परिस्थितीत जलसंधारण, त्याला लोकसहभागाची जोड, श्रमदान यासाठी विशेष उपक्रम घेणे आवश्यक होते. त्यासाठी सहजसोपे व विनाखर्ची वनराई बंधारे निर्मितीचे माध्यम निवडले गेले. विविध विकासात्मक कामांसाठी बांधकामातील पोती आणि विक्रेता संघ-कंत्राटदार संघटना यांनी दिलेली सिमेंटची रिकामी पोती त्यासाठी वापरण्यात आली.
२००५ सालापासून पर्यावरण विषय शालेय अभ्यासक्रमात आला. त्यामुळे उपक्रमाच्या पहिल्या वर्षी ‘एक शाळा-एक वनराई बंधारा’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील १८५९ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी तब्बल २०४७ वनराई बंधारे बांधले. याची दखल घेऊन ‘युनिसेफ’ने हा वृत्तान्त आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला. त्यानंतरही विद्यार्थ्यांचा सहभाग कायम होता. सलग चार वर्षांत विद्यार्थ्यांनी एकूण ८,३३७ बंधारे बांधले. बंधारे बांधताना ते इतरांसाठी उपयुक्त ठरतील, याकडे विशेष लक्ष दिले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी थेट जंगलात जाऊन वन्यजीवांसाठी वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली. तर काही ठिकाणी गावठाण परिसरातील सार्वजनिक विहिरींची पातळी वाढविण्यास साहाय्यक ठरतील, अशा ठिकाणी वनराई बंधारे बांधले गेले.
संदर्भ[संपादन]
यवतमाळ एन.आय.सी [Central Provinces District Gazetteers, 1908]