विदर्भ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?विदर्भ

महाराष्ट्र • भारत
—  प्रांत  —
भारताचा नकाशा ज्यात विदर्भ लाल रंगाने दाखविण्यात आला आहे.
भारताचा नकाशा ज्यात विदर्भ लाल रंगाने दाखविण्यात आला आहे.
Map

२१° ०९′ ००″ N, ७९° ०५′ २४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ९७,३२१ चौ. किमी
मोठे शहर नागपूर
लोकसंख्या
घनता
२,०६,३०,९८७ (2001)
• २१२/किमी
भाषा मराठी, हिन्दी
संकेतस्थळ: no
विदर्भ क्षेत्रातले जिल्हे

विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे दोन उपविभाग आहेत - (नागपूर आणि अमरावती). विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची आर्थिक उन्नती कमी आहे.[१]

विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. ह्या प्रदेशात कापूस, संत्रे आणि सोयाबीन ही उत्पन्न देणारी मुख्य पिके आहेत. तसेच ह्या प्रदेशात ज्वारी, बाजरी आणि तांदुळाची लागवड होते. विदर्भ म्हणजे वीर+तर्फ म्हणजेच वीर आणि त्यांचा प्रदेश विदर्भ ही मराठी सातवाहन,राष्ट्रकूट,वाकाटक,यादव राजवटीतील वीर पुत्रांची भूमी आहे. विदर्भ शब्दाचा अर्थ वीर आणि तर्फच अपभ्रंश होऊन विदर्भ झाले तर्फ म्हणजे प्रदेश या तरफचा दर्भ झाला आणि वीर मधला र गायब झाला आणि बनला वीरांचा प्रदेश विदर्भ जो महाराष्ट्र आहे त्याचे मूळ विदर्भ आहे.विदर्भ म्हणजेच आजचा पूर्ण महाराष्ट्र आहे आणि छत्तीसगड आहे.

नैसर्गिक साधने[संपादन]

विदर्भ हा वनसंपत्तीने आणि खनिजसंपत्तीने संपन्न प्रदेश आहे. येथील गर्द हिरव्या वनराईमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि अनेक वन्य पशु-पक्षी नैसर्गिकपणे आढळतात.

महाराष्ट्रातील सर्व व्याघ्रप्रकल्प विदर्भातच आहेत. अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि नागपूर जिल्ह्यात पेंच व्याघ्रप्रकल्प हे विदर्भातले व्याघ्रप्रकल्प आहेत. दरवर्षी जंगल पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात. विदर्भाच्या पूर्व भागात दाट जंगले तसेच कोळसा आणि मँगनीजच्या खाणी आहेत.

महाराष्ट्रातील सर्वांत जुने राष्ट्रीय अभयारण्य हे १९५५ मध्ये घोषित झालेले ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प[२] विदर्भाच्या पूर्व भागात आहे. हा प्रकल्प भारतातल्या २५ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.[३] हा प्रकल्प ६२३ चौ.किमी. येवढा असून ह्यात ताडोबा आणि अंधारी हे दोन चौकोनी प्रदेश आहेत. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात ५० वाघांशिवाय लांडगे, अस्वल, रानगवा, रान कुत्रे, तरस, उदमांजर, रानमांजर तसेच सांबर, चितळ, नीलगाय आणि भेकर, सारख्या भारतीय हरिणांचे प्रकार आहेत. येथील ताडोबा तलावात महाराष्ट्रात एकेकाळी सामान्यपणे आढळणाऱ्या मगरींचे प्रजनन केंद्र होते. निरनिराळ्या प्रकारच्या जलचर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे ताडोबा हे पक्षीतज्ञांचे नंदनवन आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या उत्तर आणि पश्चिमेला दाट माळराने आणि वनराईंनी आच्छादित टेकड्या आहेत. नैऋत्य दिशेला एक प्रचंड तलाव आहे. तो पलीकडच्या इरई तलावापर्यंतच्या शेतांपासून प्रकल्पाच्या वनराईंचे रक्षण करतो. दाट माळरानांना लागूनच चिचघाट खोऱ्यात फॉरेस्ट लॉज आहे. ताडोबा टायगर रिझर्व एक अबाधित अरण्य असून येथे फारसे पर्यटक येत नाहीत. ताडोबा टायगर रिझर्व तसेच फ़ॉरेस्ट लॉज वर्षभरासाठी खुले असतात. ताडोबा कँप नागपूरपासून, अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे. मात्र दर मंगळवारी पार्क पर्यटकांसाठी बंद असतो.

इतिहास[संपादन]

विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश तो विदर्भ अशी याच्या नावाची व्युत्पत्ती आहे.विदर्भ हा प्रदेश गोंड या राजवटीखाली हाती होता. नागपूर ही गोंडवाना राज्यसंघातील गोंड घराण्याची राजधानी होती. गोंडवाना राज्य हे पूर्ण मध्य-पूर्व भारतात पसरलेले होतं. १८१८ च्या तिसरे इंग्रज-गोंड युद्ध पराभवानंतर गोंड प्रभाव फक्त चंद्रपूर - नागपूर विभागातच मर्यादित झाला. नंतर गोंड राजांचे राज्य इंग्रजी साम्राज्यात विलीन करण्यात आले. (१८६१).

महाराष्ट्राला विदर्भातून आजवर चार मुख्यमंत्री व देशाला एक राष्ट्रपती देखील लाभले. हरितक्रांती व पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक , जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक हे लोकप्रिय मुुुख्यमंत्री विदर्भाने दिले.

नागपूर करार[संपादन]

विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा म्हणून नागपूर येथे दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला. या करारास कोणतीच कायदेशीर मान्यता किंवा वैधता नाही.हा एक प्रकारचा समझोताच होता. त्यानुसार विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात (एक मराठी भाषिक प्रदेश म्हणून) सामील करून घेण्यात आले. राज्य पुनर्रचना आयोगाचे मत हे वेगळे होते, त्यांना मराठी भाषी प्रदेश एकत्र यायला नको होता..[४]

स्वतंत्र विदर्भराज्य चळवळ[संपादन]

विदर्भ

गेल्या काही वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला आहे. विदर्भ प्रांत हा पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या मानाने कितीतरी पटीने आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, तसेच काही प्रमाणातील स्वतंत्र सांस्कृतिक बैठक हे मुद्दे धरून स्वतंत्र विदर्भाची मागणी गेली कित्येक वर्षे स्वतंत्र राज्याचे पुरस्कर्ते करत आले आहेत. परंतु महाराष्ट्राच्या इतर प्रांतातून होणारा विरोधही पुष्कळ आहे. स्वतंत्र विदर्भात आर्थिक व सामाजिक प्रगती झपाट्याने होइल असा त्यांचा अंदाज आहे तर विरोधक असे मानतात की विदर्भ जर वेगळा झाला तर महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या अनेक आर्थिक सोयीसुविधांना विदर्भातील जनता मुकेल व विदर्भाची प्रगती अजून खुंटेल.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण पुननिर्माण योजनेच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी विदर्भाचा दौरा केला व या क्षेत्रासाठी पुनर्वसन मदतीची घोषणा केली..[५]

पौराणिक कथांमध्ये[संपादन]

महाराष्ट्रापासून काही बाबतीत सांस्कृतिक वेगळेपणा विदर्भात आहे. विदर्भाचे संदर्भ महाभारतात आढळतात. महाभारतातील कथेप्रमाणे विदर्भ हा आर्यावर्तातला[६] देश होता. ज्याची राजधानी अमरावतीजवळील कुंडिनपूर - सध्याचे कौंडिण्यपुर- येथे होती. वैदिक काळानंतरच्या महा-जनपदात विदर्भाचा समावेश होता. पुराणातील अनेक कथा विदर्भाशी निगडित आहेत त्या खालीलप्रमाणे -

  • अगस्त्यलोपामुद्राचा विवाह
  • महाभारतातील रुक्मिणीहरण - विदर्भाची राजकन्या रुक्मिणी हिने मनोमन कृष्णाला वरले होते. मनाविरुद्ध होत असलेल्या आपल्या लग्नाची बातमी व कृष्णाबद्दलच्या भावना तिने कृष्णापर्यंत पोहोचवल्या. तिने कृष्णाला तिला पळवून नेण्याची विनंती केली होती. कृष्णाने रुक्मिणीची विनंती मान्य केली व तिचे हरण केले व विदर्भ राजकुमार रुक्मी याचा पराभव केला.
  • एकदा भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला वर मागण्यास सांगितले माझ्या राज्यावर कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती (भूकंप, सुनामी,चक्रीवादळ ई. अशा आजही विदर्भात घडत नाही) येऊ नये असा वर मागितला.
  • प्रसिद्ध नल दमयंतीची कथाही विदर्भ राज्याशी निगडित आहे.
  • कालिदासाच्या मेघदूतात विदर्भाचा, यक्ष-गंधर्वाची वनवासाची जागा म्हणून नोंद आहे.
  • महाभारतातील पांडवांचा अज्ञातवास विदर्भात व्यतीत झाला. कीचकवध अमरावती जवळील किचकदरा येथे झाला असा उल्लेख आढळतो.
  • महर्षी गृत्समद यांना विदर्भातच कापसाचा शोध लागला आणि त्यांनीच कापसाच्या धाग्यापासून कापड तयार करण्याची पद्धत विकसित केली.

लोकसंख्या[संपादन]

जिल्हा पुरूष स्त्रिया एकूण
अकोला जिल्हा ९,३६,२२६ ८,८२,३९१ १८,१८,६१७
अमरावती जिल्हा १४,८२,८४५ १४,०४,९८१ २८,८७,८२६
भंडारा जिल्हा ६,०४,३७१ ५,९४,४३९ ११,९८,८१०
बुलढाणा जिल्हा १३,४२,१५२ १२,४५,८८७ २५,८८,०३९
चंद्रपूर जिल्हा ११,२०,३१६ १०,७३,९४६ २१,९४,२६२
गडचिरोली जिल्हा ५,४२,८१३ ५,२८,९८२ १,०७१,७९५
गोंदिया जिल्हा ६,६२,५२४ ६,५९,८०७ १३,२२,३३१
नागपूर जिल्हा २,३८८,५५८ २,२६४,६१३ ४६,५३,१७१
वर्धा जिल्हा ६,६५,९२५ ६,३०,२३२ १२,९६,१५७
वाशिम जिल्हा ६,२१,२२८ ५,७५,४८६ ११,९६,७१४
यवतमाळ जिल्हा १४,२५,५९३ १३,४९,८६४ २७,७५,४५७

२०११ च्या जनगणनेनुसार विदर्भामध्ये २,३०,०३,१७९ लोकसंख्या आहे. या प्रदेशात हिंदू धर्म हा प्रमुख धर्म आहे.[७] बौद्ध धर्म दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. तर इस्लाम तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.

धर्म लोकसंख्या प्रमाण (%)
हिंदू १,५८,६६,५१४ ७६.९०६%
बौद्ध २६,९७,५४४ १३.०७५%
मुस्लिम १७,२०,६९० ८.३४०%
ख्रिस्ती ७०,६६३ ०.३४३%
शिख ३७,२४१ ०.१८१%
जैन ८९,६४९ ०.४३५%
इतर धर्मीय १२७,५१६ ०.६१८%
निधर्मी २१,१७० ०.१०३%
एकूण २,३०,०३,१७९ १००.०००%

सद्यस्थिती[संपादन]

गेल्या काही वर्षात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे विदर्भ राष्ट्रीयस्तरावर झोतात आलेला आहे. मुख्य कारण म्हणजे येथील प्रमुख पीक कापसाला खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी बाजारभाव. ह्या घटना गुंतागुंतीच्या असून या आत्महत्यांना अनेक कारणे आहेत. सावकारांकडून घेतल्या गेलेल्या कर्जाची परतफेड न करता येणे हे एक प्रमुख कारण आहे.

भारत सरकारने कापसाचा किमान आधारभाव अंदाजे १०० रुपयांनी($1.33) वाढवून देण्याबद्द्ल हमी दिलेली आहे. परंतु, पुढे आपल्या हमीपासून माघार घेत किमान आधारभाव कमी केला. याचा परिणाम म्हणून आत्महत्या आणखी वाढल्या. सन २००६ मध्ये फक्त विदर्भात १,०४४ आत्महत्यांची नोंद केली गेली आहे. म्हणजे दर ८ तासाला एक आत्महत्या.."[८]

१ जुलै २००६ला भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भासाठी ३,७५० कोटी रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली. या निधीद्वारे, या क्षेत्रातील ६ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. परंतु, जेथे हवी तेथे मदत पोचेलच की नाही याबद्दल सर्व आश्वस्त नाहीत. या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना वाटते की अजून पुष्कळ काम करणे बाकी आहे.

साहित्य - संस्कृती[संपादन]

विर्भातील साहित्य क्षेत्रात विठ्ठल वाघ , यशवंत मनोहर , बाबाराव मुसळे , श्रीपाद भालचंद्र जोशी, सुधाकर गायधनी , कवी ग्रेस, सुरेश भट , अशोक पवार , सदानंद देशमुख , आशा बगे ,वसंत आबाजी डहाके , नामदेव कांबळे, नारायण कुलकर्णी कवठेकर, एकनाथ पवार , राजा धर्माधिकारी, शेषराव धांडे , किरण शिवहरी डोंगरदिवे, विलास अंभोरे, सुनील अभिमान अवचार अशा अनेक दिग्गज आणि युवा लेखकांच्या नामावली मुळे विदर्भातील साहित्य क्षेत्र समृद्ध होत आहे.

वैदर्भीय समाजसुधारक , थोर व्यक्ती[संपादन]

विदर्भात जन्म झालेले व विदर्भ कर्मभूमी असलेल्या वैदर्भीय समाजसुधारक , थोर पुरुषांची सूची

विनोबा भावे

संत गाडगे महाराज

संत तुकडोजी महाराज

महानायक वसंतराव नाईक

पंजाबराव देशमुख

बाबा आमटे

लोकनायक बापूजी अणे

जलनायक सुधाकरराव नाईक

फुलसिंग नाईक

हेही पहा[संपादन]

           विदर्भातील जिल्हे

1)अमरावती 2)अकोला 3)भंडारा 4)बुलढाणा 5)चंद्रपूर 6)गडचिरोली 7)गोंदिया 8)नागपूर (विदर्भाची राजधानी) 9)वर्धा 10)वाशिम 11)यवतमाळ

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अंडरस्टँडिंग अंडरडेव्हलपमेंट इन विदर्भ." संजीव फणसाळकर लिखित. IWMI-Tata Water Policy Program. लेख येथे वाचा [१].
  2. ^ http://projecttiger.nic.in/tadoba.htm
  3. ^ http://projecttiger.nic.in/map.htm
  4. ^ "लोकमत,नागपूर-ई-पेपर-दि.२६/०९/२०१३ पान क्रं ८". Archived from the original on 2016-03-15. 2013-09-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Package for farmers in 31 districts proposed" Archived 2007-12-18 at the Wayback Machine.. By Gargi Parsai. The Hindu. June 27, 2006.
  6. ^ म्रुत्युंजय-ले. शिवाजी सावंत
  7. ^ "Vidarbha population 2011".
  8. ^ "The Dying Fields". Wide Angle (TV series). PBS. 2007.

बाह्य दुवे[संपादन]

महाराष्ट्र
Maha div.png
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ