Jump to content

विदर्भ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?विदर्भ

महाराष्ट्र • भारत
—  प्रांत  —
भारताचा नकाशा ज्यात विदर्भ लाल रंगाने दाखविण्यात आला आहे.
भारताचा नकाशा ज्यात विदर्भ लाल रंगाने दाखविण्यात आला आहे.
भारताचा नकाशा ज्यात विदर्भ लाल रंगाने दाखविण्यात आला आहे.
Map

२१° ०९′ ००″ N, ७९° ०५′ २४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ९७,३२१ चौ. किमी
मोठे शहर नागपूर
लोकसंख्या
घनता
२,०६,३०,९८७ (2001)
• २१२/किमी
भाषा मराठी,
संकेतस्थळ: no
विदर्भ क्षेत्रातले जिल्हे

विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची आर्थिक उन्नती कमी आहे.[]

विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. ह्या प्रदेशात कापूस, संत्रे आणि सोयाबीन ही उत्पन्न देणारी मुख्य पिके आहेत. तसेच ह्या प्रदेशात ज्वारी, बाजरी आणि तांदुळाची लागवड होते.

विदर्भ शब्दाची व्युत्पत्ती

[संपादन]
  1. विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश तो विदर्भ अशी याच्या नावाची व्युत्पत्ती आहे.
  2. विदर्भ शब्दाची फोड अशी: वि+तर्फ म्हणजेच वि या पूर्व प्रत्ययाचा अर्थ मोठा, महा.

जसे- जय म्हणजे फक्त जय आणि विजय म्हणजे मोठा जय. तसेच नाश म्हणजे फक्त नाश आणि विनाश म्हणजे मोठा नाश. म्हणून- विं+तर्फ म्हणजे मोठा महान प्रदेश.

  • विदर्भ ही मराठी सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक, यादव राजवटीतील वीरपुत्रांची भूमी आहे.

पौराणिक कथांमध्ये

[संपादन]

महाराष्ट्रापासून काही बाबतीत सांस्कृतिक वेगळेपणा विदर्भात आहे. विदर्भाचे संदर्भ महाभारतात आढळतात. महाभारतातील कथेप्रमाणे विदर्भ हा आर्यावर्तातला[] देश होता. ज्याची राजधानी अमरावतीजवळील कुंडिनपूर - सध्याचे कौंडिण्यपुर- येथे होती. वैदिक काळानंतरच्या महा-जनपदात विदर्भाचा समावेश होता. पुराणातील अनेक कथा विदर्भाशी निगडित आहेत त्या खालीलप्रमाणे-

  • अगस्त्यलोपामुद्राचा (राजा विदर्भराज यांची कन्या) विवाह
  • महाभारतातील रुक्मिणीहरण - विदर्भाची राजकन्या रुक्मिणी हिने मनोमन कृष्णाला वरले होते. मनाविरुद्ध होत असलेल्या आपल्या लग्नाची बातमी व कृष्णाबद्दलच्या भावना तिने कृष्णापर्यंत पोहोचवल्या. तिने कृष्णाला तिला पळवून नेण्याची विनंती केली होती. कृष्णाने रुक्मिणीची विनंती मान्य केली व तिचे हरण केले व विदर्भ राजकुमार रुक्मी याचा पराभव केला.
  • एकदा भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला वरदान मागण्यास सांगितले असता, माझ्या राज्यावर कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती (भूकंप, त्सुनामी,चक्रीवादळ ई. अशा आजही विदर्भात घडत नाही) येऊ नये, असा वर मागितला.

इतिहास

[संपादन]

गोंडवन प्रदेश

[संपादन]

विदर्भ हा प्रदेश गोंड या राजवटीखाली हाती होता. नागपूर ही गोंडवाना राज्यसंघातील गोंड घराण्याची राजधानी होती. गोंडवाना राज्य हे संपूर्ण मध्य-पूर्व भारतात पसरलेले होतं.

  • त्यानंतर विदर्भ १७३९ ते १८५३ या काळात नागपूर भोसले या मराठा राजांच्या राजवटीत होता,
    • नंतर इंग्रजांनी खालसा करून त्यांच्या अधिपत्याखाली आणला.

महाराष्ट्राला विदर्भातून आजवर ४ मुख्यमंत्री व देशाला एक राष्ट्रपती देखील लाभले. हरितक्रांती व पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक, जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक हे लोकप्रिय मुुुख्यमंत्री विदर्भाने दिले.

नागपूर करार

[संपादन]

विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा, म्हणून नागपूर येथे दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला. या करारास कोणतीच कायदेशीर मान्यता किंवा वैधता नाही. हा एक प्रकारचा समझोताच होता. त्यानुसार विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात (एक मराठी भाषिक प्रदेश म्हणून) सामील करून घेण्यात आले. राज्य पुनर्रचना आयोगाचे मत हे वेगळे होते, त्यांना मराठी भाषी प्रदेश एकत्र यायला नको होता.[]

प्रशासन

[संपादन]

विदर्भाचे दोन उपविभाग आहेत - (नागपूर आणि अमरावती).

स्वतंत्र विदर्भ चळवळ

[संपादन]
विदर्भ

गेल्या काही वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला आहे. विदर्भ प्रांत हा पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या मानाने कितीतरी पटीने आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, तसेच काही प्रमाणातील स्वतंत्र सांस्कृतिक बैठक हे मुद्दे धरून स्वतंत्र विदर्भाची मागणी गेली कित्येक वर्षे स्वतंत्र राज्याचे पुरस्कर्ते करत आले आहेत. परंतु महाराष्ट्राच्या इतर प्रांतातून होणारा विरोधही पुष्कळ आहे. स्वतंत्र विदर्भात आर्थिक व सामाजिक प्रगती झपाट्याने होइल असा त्यांचा अंदाज आहे तर विरोधक असे मानतात की विदर्भ जर वेगळा झाला तर महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या अनेक आर्थिक सोयीसुविधांना विदर्भातील जनता मुकेल व विदर्भाची प्रगती अजून खुंटेल.

  एक सत्य हे पण आहे की जोपर्यंत स्थानिक नेते त्याच्या क्षेत्रात विकास कामे, पाणी संवर्धन करत नाहीत तोपर्यंत विकासाचे प्रश्न सुटणार नाहीत, झारखण्ड व तेलंगाना वेगळे राज्य बनून स्थिती होती तशीच आहे कारण शेवटी स्थानिक नेते काय उपाययोजना करतात, किती काम करतात यावर सगळे अवलंबून असते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण पुननिर्माण योजनेच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी विदर्भाचा दौरा केला व या क्षेत्रासाठी पुनर्वसन मदतीची घोषणा केली.[]

नैसर्गिक साधने

[संपादन]

विदर्भ हा वनसंपत्तीने आणि खनिजसंपत्तीने संपन्न प्रदेश आहे. येथील गर्द हिरव्या वनराईमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि अनेक वन्य पशु-पक्षी नैसर्गिकपणे आढळतात.

महाराष्ट्रातील सर्व व्याघ्रप्रकल्प विदर्भातच आहेत. अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि नागपूर जिल्ह्यात पेंच व्याघ्रप्रकल्प हे विदर्भातले व्याघ्रप्रकल्प आहेत. दरवर्षी जंगल पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात. विदर्भाच्या पूर्व भागात दाट जंगले तसेच कोळसा आणि मँगनीजच्या खाणी आहेत.

महाराष्ट्रातील सर्वांत जुने राष्ट्रीय अभयारण्य हे १९५५ मध्ये घोषित झालेले ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प[] विदर्भाच्या पूर्व भागात आहे. हा प्रकल्प भारतातल्या २५ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.[] हा प्रकल्प ६२३ चौ.किमी. येवढा असून ह्यात ताडोबा आणि अंधारी हे दोन चौकोनी प्रदेश आहेत. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात ५० वाघांशिवाय लांडगे, अस्वल, रानगवा, रान कुत्रे, तरस, उदमांजर, रानमांजर तसेच सांबर, चितळ, नीलगाय आणि भेकर, सारख्या भारतीय हरिणांचे प्रकार आहेत. येथील ताडोबा तलावात महाराष्ट्रात एकेकाळी सामान्यपणे आढळणाऱ्या मगरींचे प्रजनन केंद्र होते. निरनिराळ्या प्रकारच्या जलचर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे ताडोबा हे पक्षीतज्ञांचे नंदनवन आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या उत्तर आणि पश्चिमेला दाट माळराने आणि वनराईंनी आच्छादित टेकड्या आहेत. नैऋत्य दिशेला एक प्रचंड तलाव आहे. तो पलीकडच्या इरई तलावापर्यंतच्या शेतांपासून प्रकल्पाच्या वनराईंचे रक्षण करतो. दाट माळरानांना लागूनच चिचघाट खोऱ्यात फॉरेस्ट लॉज आहे. ताडोबा टायगर रिझर्व एक अबाधित अरण्य असून येथे फारसे पर्यटक येत नाहीत. ताडोबा टायगर रिझर्व तसेच फ़ॉरेस्ट लॉज वर्षभरासाठी खुले असतात. ताडोबा कँप नागपूरपासून, अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे. मात्र दर मंगळवारी पार्क पर्यटकांसाठी बंद असतो.

लोकसंख्या

[संपादन]
जिल्हा पुरूष स्त्रिया एकूण
अकोला जिल्हा ९,३६,२२६ ८,८२,३९१ १८,१८,६१७
अमरावती जिल्हा १४,८२,८४५ १४,०४,९८१ २८,८७,८२६
भंडारा जिल्हा ६,०४,३७१ ५,९४,४३९ ११,९८,८१०
बुलढाणा जिल्हा १३,४२,१५२ १२,४५,८८७ २५,८८,०३९
चंद्रपूर जिल्हा ११,२०,३१६ १०,७३,९४६ २१,९४,२६२
गडचिरोली जिल्हा ५,४२,८१३ ५,२८,९८२ १,०७१,७९५
गोंदिया जिल्हा ६,६२,५२४ ६,५९,८०७ १३,२२,३३१
नागपूर जिल्हा २,३८८,५५८ २,२६४,६१३ ४६,५३,१७१
वर्धा जिल्हा ६,६५,९२५ ६,३०,२३२ १२,९६,१५७
वाशिम जिल्हा ६,२१,२२८ ५,७५,४८६ ११,९६,७१४
यवतमाळ जिल्हा १४,२५,५९३ १३,४९,८६४ २७,७५,४५७

२०११ च्या जनगणनेनुसार विदर्भामध्ये २,३०,०३,१७९ लोकसंख्या आहे. या प्रदेशात हिंदू धर्म हा प्रमुख धर्म आहे.[] बौद्ध धर्म दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. तर इस्लाम तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.

धर्म लोकसंख्या प्रमाण (%)
हिंदू १,५८,६६,५१४ ७६.९०६%
बौद्ध २६,९७,५४४ १३.०७५%
मुस्लिम १७,२०,६९० ८.३४०%
ख्रिस्ती ७०,६६३ ०.३४३%
शीख ३७,२४१ ०.१८१%
जैन ८९,६४९ ०.४३५%
इतर धर्मीय १२७,५१६ ०.६१८%
निधर्मी २१,१७० ०.१०३%
एकूण २,३०,०३,१७९ १००.०००%

सद्यस्थिती

[संपादन]

गेल्या काही वर्षात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे विदर्भ राष्ट्रीयस्तरावर झोतात आलेला आहे. मुख्य कारण म्हणजे येथील प्रमुख पीक कापसाला खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी बाजारभाव. ह्या घटना गुंतागुंतीच्या असून या आत्महत्यांना अनेक कारणे आहेत. सावकारांकडून घेतल्या गेलेल्या कर्जाची परतफेड न करता येणे हे एक प्रमुख कारण आहे.

भारत सरकारने कापसाचा किमान आधारभाव अंदाजे १०० रुपयांनी($१.३३) वाढवून देण्याबद्द्ल हमी दिलेली आहे. परंतु, पुढे आपल्या हमीपासून माघार घेत किमान आधारभाव कमी केला. याचा परिणाम म्हणून आत्महत्या आणखी वाढल्या. सन २००६ मध्ये फक्त विदर्भात १,०४४ आत्महत्यांची नोंद केली गेली आहे. म्हणजे दर ८ तासाला एक आत्महत्या.[]

१ जुलै २००६ला भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भासाठी ३,७५० कोटी रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली. या निधीद्वारे, या क्षेत्रातील ६ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. परंतु, जेथे हवी तेथे मदत पोचेलच की नाही याबद्दल सर्व आश्वस्त नाहीत. या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना वाटते की अजून पुष्कळ काम करणे बाकी आहे.

साहित्य - संस्कृती

[संपादन]

विर्भातील साहित्य क्षेत्रात..

  1. सुरेश भट
  2. विठ्ठल वाघ
  3. कवी ग्रेस
  4. यशवंत मनोहर
  5. वसंत आबाजी डहाके
  6. बाबाराव मुसळे
  7. सदानंद देशमुख
  8. नामदेव कांबळे
  9. नारायण कुलकर्णी कवठेकर
  10. एकनाथ पवार
  11. किरण शिवहर डोंगरदिवे

आशा बगे, राजा धर्माधिकारी, डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे, श्रीपाद भालचंद्र जोशी, सुधाकर गायधनी, अशोक पवार, शेषराव धांडे, किरण शिवहरी डोंगरदिवे, विलास अंभोरे, सुनील अभिमान अवचार अशा अनेक दिग्गज आणि युवा लेखकांच्या नामावली मुळे विदर्भातील साहित्य क्षेत्र समृद्ध होत आहे.

विदर्भाच्या इतिहासाची साधने

[संपादन]
  • नागपुर अफेअर्स - त्र्यं.शं. शेजवलकर
  • नागपुरकर भोसल्यांची बखर - या.मा. काळे
  • देवगडचे गोंड राजे - भा.रा.अंधारे
  • भोसलेकालीन नागपूर - भा.रा. अंधारे
  • अखेरचा सेनासाहेबसुभा - भा.रा. अंधारे
  • आधुनिक नागपूर - भा.रा‌. अंधारे
  • नागपुर प्रांताचा इतिहास - या.मा. काळे
  • वऱ्हाडप्रांत इतिहास - या.मा. काळे
  • चंद्रपुर गडचिरोली जिल्ह्याचे पुरातत्व - रघुनाथ बोरकर
  • विदर्भातील किल्ले - चितळे
  • मध्ययुगीन विदर्भाचा इतिहास - रघुनाथ बोरकर
  • विदर्भ नामा - श्रीहरी अणे
  • विदर्भ संशोधनाचा इतिहास - नारायण हूड
  • वाकाटककालीन विदर्भ - मिनल खेरडे
  • चंद्रपूरचा इतिहास - अण्णाजी जयराम राजूरकर

वैदर्भीय समाजसुधारक, थोर व्यक्ती

[संपादन]

विदर्भात जन्म झालेले व विदर्भ कर्मभूमी असलेल्या वैदर्भीय समाजसुधारक, विदर्भ भूषण, स्वातंत्र्यसेनानी, थोर पुरुषांची सूची खालीलप्रमाणे:

  1. विनोबा भावे
  2. संत गाडगे महाराज
  3. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  4. वसंतराव नाईक
  5. मारोतराव कन्नमवार
  6. फुलसिंग नाईक
  7. पंजाबराव देशमुख, माजी केंद्रीय कृषीमंत्री
  8. बाबा आमटे
  9. जलनायक सुधाकरराव नाईक
  10. जमनालाल बजाज
  11. लोकनायक बापूजी अणे
  12. रामजी रामसिंग नाईक

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अंडरस्टँडिंग अंडरडेव्हलपमेंट इन विदर्भ." Archived 2011-07-18 at the वेबॅक मशीन. संजीव फणसाळकर लिखित. IWMI-Tata Water Policy Program. लेख येथे वाचा [१] Archived 2007-12-18 at the वेबॅक मशीन..
  2. ^ मृत्युंजय-ले. शिवाजी सावंत
  3. ^ "लोकमत,नागपूर-ई-पेपर-दि.२६/०९/२०१३ पान क्रं ८". 2016-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Package for farmers in 31 districts proposed" Archived 2007-12-18 at the वेबॅक मशीन.. By Gargi Parsai. द हिंदू. June 27, 2006.
  5. ^ "TADOBA". projecttiger.nic.in. 2025-11-13 रोजी पाहिले.
  6. ^ http://projecttiger.nic.in/map.htm
  7. ^ "Vidarbha population 2011".
  8. ^ "The Dying Fields" Archived 2007-09-29 at the वेबॅक मशीन.. Wide Angle (TV series). PBS. 2007.

बाह्य दुवे

[संपादन]
महाराष्ट्राचे उपप्रांत
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खान्देश · मराठवाडा · विदर्भ