मृत्युंजय (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मृत्युंजय या पानावरून पुनर्निर्देशित)

महाभारतातील 'कर्ण' या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी. सप्टेंबर २४ १९९५ रोजी या पुस्तकाला 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला.

महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित "मृत्युंजय " कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे वर रेखाटलेल्या चित्रावरून सिद्ध झालेच. अशा अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते ही कादंबरी.… मराठी साहित्यास शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली आणखी एक देणगी.

कुरुक्षेत्रावर सुरू असलेल्या कौरव-पांडवांच्या युद्धाचा तो सतरावा दिवस. वेळ जवळ जवळ सूर्यास्ताची. कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांतील योद्धे सारे स्तब्ध उभे. समोर जमिनीवर रक्तात न्हालेला महावीर कर्ण मृत्युच्या शेवटच्या घटका मोजत. इथे कर्ण मृत्युच्या दारात आणि आसपास सभोवताली पडला होता मृत सैनिकांचा रक्तबंबाळ झालेल्या प्रेतांचा खच.… इथे कर्णाचा शेवट पहात उभ्या योध्यांची मुग्ध शांतता आणि चहूकडे फक्त आकांत… त्या सैनिकांच्या स्वकीयांचा. कर्ण आपल्या मावळत्या पित्याला शेवटचा निरोप देत असतानाच त्याचे लक्ष वेधले गेले … एका पित्याच्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे … एका दीर्घ आकांताकडे … एका करुणामयी विनवणीकडे.

                 " अरे या कुरुक्षेत्रावर कोणी आहे का मला मदत करणारा. युद्धात मुलगा मारला गेला माझा. त्याच्या अंतिम कार्यासाठीही द्रव्य नाही माझ्याकडे. कोणी आहे का ? "

ही मदतीसाठी मारलेली हाक दानवीर कर्णाने ऐकली आणि त्याने त्या याचकास जवळ बोलावले. त्याला इच्छा विचारली तेव्हा खरेतर त्या याचकास देण्यासाठी त्या क्षणी कर्णाकडे स्वतःकडे काहीच द्रव्य नव्हते. पण तरीही कर्णाने आपला दानधर्म न त्यागता आपल्या मुलास जवळ बोलावले आणि त्या जखमी स्थितीतही तो म्हणाला,

                " पुत्रा , आयुष्यभर जे मजपाशी होते ते ते सर्व जेव्हा जेव्हा ज्याने मागितले मी त्यास दिले. पण         आज हा याचक असाच रिकाम्या हाताने माझ्यापाशी येऊन परत जाणार हे कदापि शक्य नाही. तू एक काम कर . तो पडलेला जमिनीवरचा दगड घे आणि माझ्या तोंडात असलेले हे २ सोन्याचे दात पाड आणि या दुःखी पित्यास दे . त्याच्या मुलाचा अंतिम संस्कार करण्यासाठी ते त्याच्या कामा येतील. "

आपल्या यमसदनी निघालेल्या पित्यासोबत असे निघृण कृत्य करण्यास न धजावणाऱ्या पुत्रास पाहून शेवटी कर्णाने त्यास तशी आज्ञा केली. तेव्हा रडत रडतच दुःखी अंतःकरणाने त्या पुत्राने आपल्या पित्याची ती आज्ञा मानली आणि दगडाच्या घावांनी कर्णाचे तोंड रक्तबंबाळ केले. त्या रक्तवर्णात मोतीमाळेतून अचानक निखळून गळावे तसे २ चमचम करणारे सुवर्णदातही लालसर झाले होते. असे दान कसे दयावे ? हा विचार करत कर्णाने त्यांस आपल्या डोळ्यांपाशी नेले . त्या नयनकमलांतून वाहणाऱ्या अश्रूजलात न्हाऊन पवित्र झालेले रद रेशीम कापडाने पुसून घेत हे शेवटचे दान त्या याचकास सुपूर्द करत कर्णाने कायमचे डोळे मिटले.

कादंबरीची वैशिष्ट्ये[संपादन]

या कादंबरीचे एक पाहताक्षणीच नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे . कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरू द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंवा वर्षानुवर्षे आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहोत पण जी अजूनही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ कुंतीला ही पुत्रप्राप्ती नक्की कशी झाली ?सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे असेल? शोण म्हणून असलेला राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता? कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती…त्यांच्यातील प्रीतीचे क्षण कधी फुलले होते कि इंद्राला कवच कुंडल दान केल्यानंतर निस्तेज झालेल्या कर्णाप्रमाणे त्याचे प्रेमजीवनही कोमेजलेले होते? सूर्याचा पूत्र असूनही त्याने धर्माच्या विरोधात अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली… केवळ मैत्रीसाठी? द्रौपदी वस्त्रहरणात त्याने द्रौपदीचे रक्षण नक्की का केले नाही ? अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारणाऱ्यात कर्ण का सामील झाला ? खरेच तो अधर्मी होता ? जर असे होते तर मग श्रीकृष्ण विरुद्ध पक्षात असतानाही त्याने या सूतपूत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला? जसजसे आपण एकेक पान वाचत जावू तसतसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो.

=इतर भाषांतील अनुवाद[संपादन]

अशा या महावीर राधेयच्या जीवनपटाला योग्य न्याय देत गुंफलेल्या शब्दांची सांगड वाचकाचे मन तासनतास गुंतवून ठेवते. मी एकदा 'मृत्युंजय' वाचताना सापडलेली सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्ये लिहून ठेवण्याचा ध्यास घेतला पण लवकरच माझ्या लक्षात आले कि यातला प्रत्येक शब्दच खूप महत्त्वाचा , अर्थपूर्ण आहे आणि थोडक्यात सांगायचे झाले तर 'मृत्यंजय ' हा एक उत्तम कलाकृतीचा नमूना जो आज विविध भाषांतही उपलब्ध आहे आणि तितक्याच आपुलकीने त्याने सर्वांनाच आपलेसे केले आहे.[संपादन]

(http://umatlemani.blogspot.in/)