गाडगे महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Gadge Maharaj (es); গাডগে মহারাজ (bn); Sant Gadge Maharaj (fr); جادج مهراج (arz); Gadge Maharaj (nl); Gadge Maharaj (de); गाडगे बाबा (mr); ಗಾಡ್ಗೆ ಮಹಾರಾಜ್ (kn); ਗਾਡਗੇ ਮਹਾਰਾਜ (pa); Gadge Maharaj (en); गाडगे महाराज (hi); గాడ్గే బాబా (te); காட்கே மஹராஜ் (ta) সমাজ সংস্কারক (bn); عامل اجتماعى من هنود (arz); asistente social indiu (1876–1956) (ast); एक थोर समाज सुधारक (mr); ಸಮಾಜ ಸುಧಾರಕ (kn); ਸਮਾਜ ਸੁਧਾਰਕ (pa); social reformer (en); समाज सुधारक (hi); సంఘ సంస్కర్త, సంచార సాధువు (te); இந்திய சமுதாய மறுமலர்ச்சியாளர் (ta) Debuji Zhingraji Janorkar, Sant Gadge Maharaj, Gadge Baba (en); गाडगे महाराज, संत गाडगे बाबा, संत गाडगे महाराज (mr); గాడ్గే మహరాజ్, సంత్ గాడ్గే బాబా, దేబూజీ ఝింగ్రాజీ జానోర్కర్ (te)
गाडगे बाबा 
एक थोर समाज सुधारक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावगाडगे बाबा
जन्म तारीखफेब्रुवारी २३, इ.स. १८७६, फेब्रुवारी १३, इ.स. १८७६
महाराष्ट्र
मृत्यू तारीखडिसेंबर २०, इ.स. १९५६
अमरावती
नागरिकत्व
व्यवसाय
  • सामाजिक कार्यकर्ता
मातृभाषा
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संत गाडगे बाबा (जन्म :- शेंडगाव ता-दर्यापूर जि-अमरावती २३ फेब्रुवारी १८७६; मृत्यू - , २० डिसेंबर १९५६ वलगाव जवळ अमरावती) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.[ संदर्भ हवा ]

संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जाणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

संत गाडगे महाराजविषयी माहिती :-

गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

बालपण :

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.

डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा :

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे.

"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

संक्षिप्त चरित्र :-

  • गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.

ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.

  • १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
  • १९२५- मूर्तिजापूर येथे गोरक्षणाचे काम केले आणि एक धर्मशाळा व एक विद्यालय बांधले.

१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.

"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणूनही ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.

गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.
आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात."

  • १८९२ डेबुजीचे लग्न. कमलापूर तरोडा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या गुंताबाई यांच्याशी डेबुचा विवाह पार पडला.
  • १ फेब्रुवारी १९०५ रोजी सकाळी ३.०० वाजता गृहत्याग.
  • १९२१ मराठा धर्मशाळा पंढरपूर येथे सदावर्त उघडले.
  • १ मे १९२३ - आई सखुबाई यांचे निधन.
  • ५ मे १९२३ - एकुलता एक पुत्र गोविंदाचे निधन.
  • १९२६ - संत गाडगेबाबांची व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी एका कार्यक्रमात भेट.
  • १९३२ नाशिक येथे सदावर्त उघडले.
  • १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
  • २७ नोव्हेंबर १९३५ - वर्धा येथे महात्मा गांधी व गाडगेबाबांची पहिली भेट.
  • १४ जुलै १९४९ - रोजी स्वतः पंढरपूर येथे स्थापन केलेल्या 'संत चोखामेळा धर्मशाळे'ची सर्व कागदपत्रे स्वतःचा अंगठा उमटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपूर्द केले.
  • १९५२ - पंढरपूर येथे भरलेल्या कीर्तन परिषदेतील अस्पृश्यता निर्मूलन यासंदर्भात कठोर भूमिका मांडून दलितांची सेवा करण्यासाठी कीर्तनकारांनी पुढाकार घ्यावा, असे कळकळीचे आवाहन या किर्तन परिषदेतून त्यांनी केले होते.
  • १९५४ - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची अंतर्गत कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज विद्यालयाची स्थापना केली.
  • १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
  • गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
  • डॉ. आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
  • ८ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे महाराजांचे वांद्रे पोलीस स्टेशन मुंबई येथे झालेले कीर्तन करण्यात आले आहे. त्यांच्या हयातीतील त्यांच्या आवाजात असलेले मूळ ध्वनी मुद्रित करण्यात आलेले एकमेव किर्तन असल्यामुळे याद्वारे आपणाला त्यांचे स्पष्ट व परखड विचार ऐकण्यास मिळतात व गाडगेबाबा समजण्यास व त्यांचा अभ्यास करण्यास आपणाला फार मोठी मदत होते. (ते कीर्तन आपण Youtube इथे ऐकू शकता.)
  • १४ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले.
  • २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :
१४ जुलै १९४१ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

गाडगेबाबांचे विचार :
एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचाऱ्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा अन् आम्हालाबी ब्राह्मण करा."

गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक 'कर्मवीर' म्हणायचे. तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख 'महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम' असे करायचे. कर्मयोगी गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातं खूपच जिवाभावाचा होतं. ते एक दुसऱ्यांचा श्वास होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे नेणारी राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबा यांना आपल्या गुरुस्थानी मानत असत. रयत शिक्षण संस्थेच्या नावाने ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांकरीता शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शैक्षणिक चळवळीला कर्मयोगी गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. साताराच्या स्टेशन परिसरात एका झोपडीत राहणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते. मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले होते. त्यामुळे अनुदानाअभावी / पैशाअभावी रयत शिक्षण संस्था आता कशी चालवावी अशी स्थिती निर्माण झाली होती. या कठीण प्रसंगी गाडगेबाबा कर्मवीरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले त्यांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आवाहन करून रयत शिक्षण संस्थेला मदत देणे विषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत 'कुसुर' नावाच्या छोट्या खेड्यातील 'बंडो गोपाळा मुकादम' या बाबांच्या एका अनुयायांनी कर्मवीरांच्या या शैक्षणिक कार्यास गती मिळावी म्हणून आपली सुपीक जमीन दान देण्याची घोषणा केली. यात जागेवर ५०० लोकवस्तीच्या या गावात कर्मवीर भाऊराव पाटलांनी 'श्री सद्गुरू गाडगे महाराज हायस्कूल' याच नावाने शाळा सुरू केली. हेच 'बंडो गोपाळा मुकादम' एक लाख रुपये घेऊन पंढरपुरास गाडगेबाबांकडे आले, त्यावेळी बाबा म्हणाले, एक लाख रुपये कर्मवीरांना द्या. बाबांचा एक अनुयायी कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहावा, ही बाब कर्मवीरांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेणार होती. कर्मवीर व गाडगेबाबा यांची अतूट सामाजिक मैत्रीसंबंध महाराष्ट्राला प्रेरणा देणारी आहे, असे आपल्या 'प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा' या पुस्तकात लेखक संतोष अरसोड लिहितात.[१] Archived 2022-01-16 at the Wayback Machine.

कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँड सरकारने बंद केली तेव्हा संकटात सापडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ग्रँडकरीता गाडगेबाबा मुंबई येथे जाऊन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. व त्यांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेचे अनुदान का बंद केले? अशा शब्दात खडे बोल सुनावले. बाबांच्या या वाक्याचा परिणाम झाला आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले होते.[२] Archived 2022-01-16 at the Wayback Machine.

महात्मा गांधी व गाडगेबाबा यांच्यातही एक अतिशय जवळचे नाते होते. दोन्ही महामानव करुणेच्या एका सूत्रात बांधले गेले होते, असे आपल्याला त्याच्या कार्यावरून आणि त्यांच्या विचारांवरून दिसते. २७ नोव्हेंबर १९३५ झाली रोजी वर्धा येथे गाडगेबाबा व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली होती. बाबांचे स्वच्छता अभियान व जनप्रबोधन याबाबत महात्मा गांधींना प्रचंड उत्सुकता होती. या भेटीत दोघांनी विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर १९३६ मध्ये फैजपूर येथे बाबांनी स्वतः स्वच्छता केली होती. त्याच वेळी महात्मा गांधी कायम त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी तब्बल सहा ते आठ तास या महामानवांमध्ये एकत्र चर्चा झालेली होती. गाडगेबाबा आपल्या अनेक कीर्तनांमधून महात्मा गांधींचा जय जयकार करत होते. महात्मा गांधींच्या जय जयकारासोबतच त्यांनी केलेले सत्याग्रह, ब्रिटिशांविरुद्ध त्यांचा लढा, चले जाव मोहीम, इ. याबाबत आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा लोकांना गांधीजीं व त्यांच्या कार्याबाबत माहिती द्यायचे. आणि ते म्हणतात जब तक सुरज, चांद है पृथई पर तब तक गांधी मरते नही, गांधीजीकु मरनच नही.[३] Archived 2022-01-16 at the Wayback Machine.Archived 2022-01-16 at the Wayback Machine.

संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.[१]

कर्मयोगी गाडगेबाबांनी या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले ती एक महान तत्त्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून त्या काळात 'जातीय सलोखा' निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. शेतकऱ्यांना सावकार कर्जापाई पीडित होते याकरिता 'शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या आंदोलन' गाडगेबाबांनी त्या वेळी सुरू केले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या पासून मुक्त केलं होते. ज्या काही वाईट चालीरिती परंपरा रूढी व त्या यांचे निर्दालन करून त्या बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. स्पृश्य-अस्पृश्य भेद मिटून जावा, सर्व माणसे समान आहेत, ही त्यांची शिकवण होती. शोषणाविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभा केला होता. 'दगडात देव नाही तर देव माणसात आहे' जिवंत माणसात, प्राणिमात्रात देव आहे, हे सांगणारे संत गाडगेबाबा होते. भूतदया, प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे, याकरीता त्यांनी फार मोठे कार्य केले. बोकडबळी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासोबतच बैलांवर अत्याचार होतात म्हणून शंकरपट बंद करावे, हे सुद्धा त्यांनी सांगितले होते. शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकीता विविध शिक्षण संकुले काढली. शिक्षण संस्थांना मदत केली. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची 'रयत शिक्षण संस्था' यांना मदत करण्यास पासून ते विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांची 'शिवाजी शिक्षण संस्था' असो, यांच्या कामाचं सतत कौतुक केले. आपल्या कृतीतून त्यांनी अस्पृश्यतेवर प्रहार केले. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. ते माणसांच्या मनांची मशागत करत. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले. किर्तनात आपल्या दशसूत्रीतून त्यांनी 'भुकेल्यांना - अन्न, तहानलेल्यांना - पाणी, उघड्या नागड्यांना - वस्त्र, बेघरांना - निवारा, गरीब मुला-मुलींना - शिक्षण, रोग्यांना - औषध, बेरोजगारांना - रोजगार, मुक्या प्राण्यांना - अभय, दुखी व निराशितांना - हिंमत, तरुण गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून दिले.

गाडगे महाराजांची चरित्रे[संपादन]

  • असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
  • कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
  • गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
  • गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
  • श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)
  • Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)
  • प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत-गाडगेबाबा (संतोष अरसोड)
  • गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)
  • गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)
  • गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
  • निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • लोकशिक्षक गाडगेबाबा (रामचंद्र देखणे)
  • लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)
  • लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)
  • The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)
  • संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)
  • संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
  • संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
  • संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
  • श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)
  • श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)
  • संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
  • गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)
  • समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
  • स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

गाडगेबाबांच्या जीवनावरील माहिती[संपादन]

  • डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर
  • देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त

साहित्य संमेलन[संपादन]

महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.

पुरस्कार[संपादन]

गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे. हा पुरस्कार तूर्त स्थगित केला गेला आहे. (२०१८ची बातमी).

पहा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ चव्हाण, रा. ना. (२०१३). संत-सुधारक व त्यांचे धर्मविचार एक अभ्यास. पुणे: रा. ना. चव्हाण जन्मशताब्दी वर्ष प्रकाशन. pp. १२९.

[४] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. २. प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारक संत - गाडगेबाबा - संतोष अरसोड