शिवानंद शंकरगौडा पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवानंद शंकरगौडा पाटील
जन्म मार्च १३
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा तबलावादक , गायक
मूळ गाव पुणे
वडील शंकरगौडा
आई हिराबाई


शिवानंद शंकरगौडा पाटील. जन्म इचलकरंजी. वडील शंकरगौडा पाटील व आई हिराबाई हे कन्नड संगीत रंगभूमीवरील एक नावाजलेले जोडपे होते. प्रमुख नट व नटी म्हणून दोघे एणगी बाळप्पा ह्यांच्या 'कलावैभव नाटक मंडळी'तले कलाकार होते. एणगी बाळप्पा म्हणजे महाराच्ट्रातल्या 'ललित कलादर्श'च्या अण्णा पेंढारकरांसारखे. बहुतेक दोघेही समकालीन आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात कंपनी सांभाळून नेणारे असे होते. शिवानंदचा जन्म नाटक-बिऱ्हाडीच झाला. 'कलावैभव'मध्ये पाळणा हलला व शिवानंद अक्षरशः संगीताचे बाळकडू व नाटकाचे अनुभवाचे बालामृत पिऊनच लहानाचा मोठा झाला. त्याचे बालपण, शिक्षण वगैरे जिकडे कंपनी गेली, तिकडेच झाले.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागांत व धारवाड, बेळगांवमध्ये शिवानंद यांनी संगीताचे पुढचे धडे चंदशेखर पुराणिकमठ व पं. बसवराज राजगुरू ह्यांच्याकडे गिरवले. डॉ. गंगूबाई हनगल यापण त्याला वात्सल्याने शिकवायच्या. त्या आजीसारखी सदैव त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. मग शिवानंदने सांगली-मिरज(काणे बुवा) करत मुंबई गाठली. तो काळ संगीत नाटककंपन्यांचा पडता काळ होता. मराठी असो वा कन्नड, नाटक कंपन्यांची बिऱ्हाडे बंद होण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे बालकलाकार म्हणून नावाजलेला शिवानंद अखेरीस मुंबईत आला व अक्षरशः दादरच्या एका बियर बारमध्ये मॅनेजर म्हणून कामाला लागला.[ संदर्भ हवा ]

त्यानंतरच्या काळात शिवानंद रेल्वेत रुजू झाला. तिथे त्याला योजना भेटली. 'योजना प्रतिष्ठान'चा जन्मही कदाचित ह्याच काळातला. त्याचवेळी शिवानंदच्या आई-बाबांचा कर्नाटक सरकारच्या 'नाटक अकॅडमी'त सत्कार झाला. योजनाने पुढे जयस्वाल सरांच्या हाताखाली आर.पी.जी. (पूर्वाश्रमीची एच्.एम्.व्ही.)मध्ये प्रवेश केला व शिवानंद पाटीलचेच शिष्यत्व पत्करले. त्याच सुमारास म्हणजे १९९२ च्या जुलै-ऑगस्टमध्ये बसवराज राजगुरू अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले होते, पण त्यांचा वाटेतच अकाली मृत्यू झाला.

शिवानंदचे रीतसर शिक्षण पं. जितेंद्र अभिषेकी, पं. यशवंतबुवा जोशी, काणेबुवा ह्यांच्याकडे चालूच होतं. दूरदर्शन आणि इतरत्र 'जय जय गौरीशंकर' इत्यादी संगीत नाटकंही सुरू होती. 'योजना प्रतिष्ठान'तफेर् राबविण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमात पं. शिवानंद पाटील आवर्जून हिरीरीने भाग घ्यायचा. कधी गुरू म्हणून, कधी रंगकर्मी म्हणून शिवानंदने सलग दहा वर्षं राजगुरू स्मृतीचे कार्यक्रम आयोजित केले होते. आषाढी एकादशीनिमित्त शिवाजी मंदिर व 'योजना प्रतिष्ठान'तर्फे 'कानडा वो विठ्ठलु' कार्यक्रम जल्लोषात सादर केला जायचा. भक्तजनांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळायचा.

मोहन वाघांच्या 'चंदलेखा'ची निर्मिती असलेल्या 'शतजन्म शोधिताना' या नाटकात शिवानंदने प्रमुख भूमिका केली होती.[ संदर्भ हवा ]

त्याने केलेली संगीताची सेवा लक्षात घेऊनच त्याला आजवर कर्नाटक सरकारचा संगीतसन्मान, मुंबई कर्नाटक संघातर्फे कन्नड व मराठी भाषा बांधवांसाठी देण्यात येणारा आद्य सन्मान मिळाला होता. 'दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान'तर्फेही २०११ सालच्या एप्रिल महिन्यात त्याचा सन्मान झाला होता.[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]