संवादिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संवादिनी (हार्मोनियम/बाजाची पेटी/पेटी) हिचा शोध पॅरिस शहरातील अलेक्झांडर डिबेन यांनी इ.स. १७७० मध्ये लावला. भारतात हे वाद्य इ.स. १८००नंतर युरोपीय लोकांनी आणले. हाताने किंवा पायाने भात्याद्वारे हवा भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या (सूर) शिट्ट्यांच्या मार्फत सुरेल ध्वनी निर्माण होतो. या वाद्यात डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास प्रथम २ व नंतर ३ असे काळ्या पट्ट्यांचे तीन समूह असतात. भारतीय संगीतात या बाजाच्या पेटीचा गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकलवादनासाठी उपयोग होतो. कीर्तने, सुगम संगीत इत्यादी ठिकाणी पेटी साथीला असते.

हार्मोनियममध्ये दोन घटक महत्त्वाचे असतात : स्वराची पत्ती व हवेचा भाता. आवाज निघतो तो पत्तीतून. पत्तीत भरल्या जाणाऱ्या हवेला नियंत्रित करण्याचे काम भाता करतो. प्रत्येक स्वरासाठी एक लांबट चौकट असते. चौकटीच्या खाचेत पत्ती खाली-वर होऊ शकते. ह्या स्वरचौकटी एका ओळीत एक फळीवर चिकटवितात व ती फळी पेटीत अशा रीतीने बसवितात की, भात्यातून येणारी हवा त्या फळीतून शिरेल. उच्च प्रतीच्या स्वरचौकटी पूर्वी परदेशांतून, विशेषतः जर्मनी व फ्रान्समधून, मागवीत असत पण आता त्या भारतात तयार होऊ लागल्या असून पालिताणा( गुजरात) येथे मोठ्या प्रमाणावर तयार होतात. भाता दाबला म्हणजेे त्यातून निघालेली हवा स्वरपत्तिकेच्या खाली बंद असलेल्या चौकटीत कोंडली जाते. या चौकटीत चार-पाच मोठी छिद्रे अंतराअंतरावर असतात व ती छोट्या लाकडी पट्ट्यांनी बंद असतात. त्यांना लोखंडी सळ्या जोडून त्या सळ्यांची टोके पेटीच्या बाहेर काढलेली असतात. हार्मोनिअम वाजविताना ह्या सळ्या ओढून बंद चौकटीतील एक किंवा अधिक छिद्रे उघडतात त्यामुळे भात्यातून आलेली हवा या छिद्रांतून स्वरपत्तिकेत शिरते. स्वर-पत्तिकेच्या वर, पेटीच्या बाहेर, वरच्या चौकटीत प्रत्येक स्वरचौकटीला जोडणारी एक अशा खाचा केलेल्या असतात व त्यांवर प्रत्येक स्वराची एक अशा, समोर काळ्या व पांढऱ्या रंगांच्या आणि मागे टणक तारेनेदाबून धरलेल्या लांब पट्ट्या असतात. एक एक पट्टी बोटाने दाबलीकी, तिच्याखालची खाच उघडी पडते व तिच्यातून तसेच आतल्यास्वरचौकटीतून आलेली हवा बाहेर पडते. हवेच्या या संचलनामुळे स्वरचौकटीतील पत्ती कंपित होऊन आवाज निघतो. स्वरपट्टीवरून बोट काढले की, मागची खाच बंद होते व हवेला बाहेर पडण्यास वाव न मिळाल्यामुळे पत्ती कंपित होत नाही. यात साडेतीन सप्तकाचे स्वर मिळतात. हार्मोनियममध्ये स्वर टेंपर्ड स्केलमध्ये लावलेले असतात. टेंपर्ड स्केलमध्ये स्वरसप्तकातील कोमल व शुद्ध स्वरांचे स्वरूप सप्तकाचेसमान बारा भाग करून योजलेले असते कारण सप्तकात प्रमुख स्वरसात म्हणजे शुद्ध किंवा तीव्र व उपप्रमुख किंवा कोमल मिळून बारा, सात पट्ट्या पांढऱ्या व पाच काळ्या रंगाच्या असतात. स्वरभरणा आणि हाताळ-ण्यास सुलभता यांमुळे भारतात या वाद्याचा प्रसार व प्रचार झपाट्याने झाला.

शोध व प्रसार[संपादन]

संवादिनी हे नाव भारतीय वाद्याचे आहे असे वाटते, पण ते तसे नाही. हार्मोनियम या मूळ पाश्चात्त्य वाद्याचे ते भारतीय नाव आहे. १७७० इ.स.च्या आसपास आँर्गन या रीङवाल्या वाद्यामध्ये काही नवे प्रयोग होण्यास सुरुवात झाली. मुळात तीन स्वरांचा मेळ जो पाश्चात्त्य संगीतात आवश्यक असतो, तो साध्य करण्याचे उद्दिष्ट ज्या वाद्याने साध्य होते, तशा वाद्यांची आवश्यकता नव्या रीङ वाद्यांमध्ये निर्माण होऊ लागली. त्या प्रयत्नांतूनच १८४० मध्ये फ्रान्समध्ये अलेक्झांर दिबेन याने अशा स्वरपट्ट्या असणारे हे हलक्या वजनाचे वाद्य शोधून काढले. हार्मनी म्हणजे स्वरांच्या मिश्रणाने साधला जाणारा संवाद. यालाच सहज भाषेत स्वरमिश्रण म्हणण्यास हरकत नाही. एकमेकास अनुकूल असणाऱ्या स्वरांच्या संवादामुळे भारतीय संगीतकारांनी या वाद्याचे नाव संवादिनी ठेवले.

हार्मोनियम विदेशातून आलेले हे पहिलेच वाद्य नाही. यापूर्वी व्हायोलिन भारतात आले होते, आणि या वाद्याचा प्रवेश पहिल्यांदा दाक्षिणात्य संगीतात झाला, त्यानंतर ते वाद्य हिंदुस्तानी संगीतात आले.

हिंदुस्तानी संगीतामध्ये प्रथम प्रयोग[संपादन]

हिंदुस्तानी संगीतासाठी या वाद्याचा प्रथम प्रयोग मराठी संगीत नाटकांच्या माध्यमातून सुरू झाला तो १८८२ साली. संगीत शाकुंतल या पहिल्या संगीत नाटकाने आँर्गनचा उपयोग केला. त्यानंतर संगीत साैभद्र हे नाटकही त्यातल्या संगीतासाठी आणि ऑर्गनच्या साहाय्याने गाजले. मराठी संगीत नाटकानी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचाही पदांसाठी उपयोग केला आणि त्यातूनच हार्मोनियमने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधले आपले स्थान बळकट केले. नाट्यसंगीताच्या माध्यमातूनच एका स्वतंत्र स्वरवाद्याची देणगी भारतीय संगीताला मिळाली.

प्रथम वादक[संपादन]

  • दादा मोङक (प्रथम हार्मोनियम वादक), किर्लोस्कर नाटक मंङळी, इ.स. १८८२

प्रथम स्वतंत्र वादक[संपादन]

  • भैया गणपतराव शिंदे, ग्वाल्हेर (इ.स. १८५२-१९२०)

भारतात निर्मिती[संपादन]

भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत बदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे. कलकत्त्याच्या द्वारिकानाथ घोष यांनी १८७५ मध्ये सर्वप्रथम भारतीय संगीताल उपयुक्त हार्मोनियमची निर्मिती केली. द्वारिका दास या त्यांच्या फर्मने आधुनिक हातपेटीची भारतात पहिल्यांदा निर्मिती आणि विक्री केली. त्यानंतर टी. एस्. रामचंद्र ॲन्ड कंपनीने महाराष्ट्रात याची निर्मिती सुरू केली. त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यांनी हातपेट्या बनवल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली. मग भावनगरमध्ये आणि पालिटाणामध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मिती सुरू झाली. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल आणि पंजाब प्रांतात दर्जेदार हार्मोनियम बनविले जाऊ लागल्या. बेळगावातही झीलु सुतार आणि रामचंद्र हुदलीकर यानी उत्तम दर्जाचे हार्मोनियम बनविलेया. २२ श्रुतियुक्त हार्मोनियम बनिवण्यात हुदलीकर यांचा हातखंडा होता.

पाश्चात्त्य सुरावटींप्रमाणे बनलेले हार्मोनियम हिंदुस्तानी संगीतासाठी कधी उपयोगात आणले जाण्याची शक्यताच नव्हती. परंतु उस्ताद अब्दुल करीमखाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यानी गंधार ट्यून्ङ हार्मोनियम बनवून ते हिंदुस्तानी गायकीला योग्य बनविले. गं. बा. आचरेकर यानी श्रुति हार्मोनियम बनविले. त्यांचेच चिरंजीव बा. गं आच्ररेकर यानीही ते कार्य पुढे चालविले. ङाँ. विद्याधर ओक यानीही २२ श्रुतींची मेलोङियम बनविली आहे. बेळगावचेच हरी गोरे यानी पितळेचा रस तयार करून रीड्स बनविण्याचा कारखाना सुरू केला. स्वदेशी चळवळीला प्राधान्य देऊन त्यानी संपूर्ण भारतीय बनावटीचे हार्मोनियम बनविले. कलकत्ता, दिल्ली आणि इतर संगीतपेठांत त्यांच्या हार्मोनियमला मागणी होती. वाद्यसंगीताला आवश्यक स्वरपेट्याही ते उत्तम बनवीत. म्हैसूरच्या महाराजानी त्यांचा या कार्याबद्दल गौरवही केला होता. हरिभाऊ गोरे यांनी चार स्वर असणाऱ्या वाद्यांना षड्ज-पंचम- मध्यमाचा स्वरपुरवठा करणाऱ्या छोट्या तंबोरापेट्याही निर्माण केल्या. पंडित पन्नालाल घोष, पंडित व्ही जी. जोग या महान वादक कलाकारांनी या सुलभ तंबोरा पेट्यांचा वापर सुरू केला आणि वजनाने हलक्या व प्रवासात सहज नेऊ शकणाऱ्या या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.

सुप्रसिद्ध पेटीवादक[संपादन]

पं.विश्वनाथ कान्हेरे ,अजय जोगळेकर, अप्पा जळगावकर (पुणे), अरविंद थत्ते, आदित्य ओक, एकनाथ ठाकुरदास, केदार नाफडे, गणपतराव पुरोहित, गुलाम रसुल बशीरखाँ (बडोदा), गोविंदराव टेंबे (कोल्हापूर-१८८१-१९५७), गुंडोपंत वालावलकर गोविंदराव पटवर्धन, चिन्मय कोल्हटकर, चैतन्य कुंटे, जयंत बोस, तन्मय देवचक्के,मिलिंद कुलकर्णी,वरद सोहनी तुळशीदास बोरकर, श्रीराम हसबनीस, दिनकर शर्मा, दीपक मराठे, नन्हेबाबू कुंवर (बिदर), निर्मला काकोडे, ङाॅ. पाबळकर, पी. मधुकर (मुंबई-१९१६-१९६७), पुट्टराज गवई, पुरुषोत्तम वालावलकर (मुंबई), पु. ल. देशपांडे, प्रमोद मराठे, बच्चुभाई भंडारे (मुंबई-१८७८-१९०९), बंडूभैय्या चाैघुले (इंदूर), बबन मांजरेकर, बलदेव मिश्र (वाराणसी), बाबुराव बोरकर (बेळगाव), बाबुसिंह (हैद्राबाद), बाळ माटे, भीष्मदेव चॅटर्जी, मनोहर चिमोटे (मुंबई), मुनेश्वर दयाल, मोहनलाल, रवींद्र काटोटी, रवींद्र माने, राजाभाऊ कोसके, राजेंद्र वेैशंपायन, रामभाऊ विजापुरे (बेळगाव- १९१७-२०१०), लक्ष्मणसिंंह, वसंत कनकापूर (धारवाड), वासंती म्हापसेकर, विजय घासकडवी, विठ्ठलराव कोरगावकर (बेळगाव-१८८४- १९७४), विनय मिश्र, शेषाद्री गवई, सारंग कुलकर्णी, सीमा शिरोडकर, सुधांशु कुलकर्णी, सुधीर नायक, अश्विन वालावलकर, सुयोग कुंडलकर, सुवेंदु बॅनर्जी, सोहनलाल, हणमंतराव वाळवेकर (धारवाड), ज्ञानप्रकाश घोष, पुंडलिक कोल्हटकर डोंबिवली

आाकाशवाणीवर हार्मोनियम[संपादन]

संवादिनी हे साथीचे वाद्य म्हणून एकोणीसाव्या शतकाच्या आरंभापासून सर्वमान्य झालेले वाद्य आहे. सर्व ख्यालगायकानी या वाद्याला अगदी खुशीने अंगीकारिले. ज्यांचे गायन श्रुतियुक्त असे त्यानीही हार्मोनियम साथीला घेतले आणि गायकांचे कणसुर सहजपणे सामावून घेऊन त्याना जोरकसपणा देण्याचे कामही हार्मोनियमने केले. परंतु मींडकाम करता न येणे, गमक न निघणे अशा काही कारणांमुळे स्वतंत्र वाद्य म्हणून त्याची मान्यता आकाशवाणीने बाळकृष्ण केसकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या कारकिर्दीत रद्द केली. (केसकरांनी चित्रपट संगीत, क्रिकेट समालोचन यांनाही अकाशवाणीवरून बंद केले!) बेळगावचे हार्मोनियमवादक रामभाऊ विजापुरे यानी १९४५ साली हैदराबाद आकाशवाणीवर स्वतंत्र वादनाचा सर्वात पहिला कार्यक्रम केला. निजाम सरकारचे कायदे कानून इतर परगण्यांपेक्षा वेगळे असल्याने हे शक्य झाले. पण इतरत्र कुठेही आकाशवाणीवर हार्मोनियमला मान्यता नव्हतीच. पुण्याचे हार्मोनियमवादक डाँ. पाबळकर, बेळगावचे विठ्ठलराव कोरगावकर यांच्यासारख्यानी स्वतंत्र वादनाच्या मागणीसाठी केंद्रसरकारकडे जोर लावला होता. अनेक वर्षांनंतर (सुमारे २० वर्षांनंतर) त्या प्रयत्नांना यश मिळाले व १९७२मध्ये हार्मोनियमला आकाशवाणीची मान्यता मिळाली. त्यानंतर बऱ्याच वादकांचे स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून प्रसारित झाले. १९७२ आणि ७३ मध्ये रामभाऊ विजापुरे आणि वसंत कनकापूर यांचे धारवाड केंद्रावर अनेकवेळा वादन झाले. त्यानंतर एका वादकाच्या बेसुर वादनामुळे हार्मोनियमवर पुन्हा बंदी आली. त्यानंतर कित्येक वर्षांनी १ एप्रिल २०१८ रोजी बेळगावचे रविंद्र काटोटी यांचा रविवारच्या राष्ट्रीय संगीत प्रसारणात स्वतंत्र संवादिनीवादनाचा कार्यक्रम झाला.

कर्नाटक संगीतामध्ये संवादिनी[संपादन]

विद्वान बी. अरुणाचलप्पा, विद्वान टी. चौडय्या, विद्वान नरसिंहय्या, विद्वान पल्लदम वेंकटरमण राव, विद्वान आर. परमशिवन, एस. श्रीनिवास, सी. रामदास अशा अनेकांनी कर्नाटक संगीतासाठी संवादिनीचा प्रभावी उपयोग केला. कर्नाटक संगीत संवादिनीवर सादर करणारे कलाकार आकाशवाणीच्या ग्रेडेशन पासूनही वंचित नव्हते.

संदर्भ[संपादन]

१. भारतीय संगीत व संगीतशास्त्र-बा. गं. आचरेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंङळ

२. विश्व संवादिनी शृंग स्मरणिका ५,६,७ जाने. २०१८

३. स्वरऋणी - लेखिका स्मिता सुनील नाईक

चित्रदालन[संपादन]