आंबेडकरी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विदर्भात जवळजवळ दरवर्षी, आंबेडकरी साहित्य संमेलन भरते. पहिले अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन वर्धा शहरात १९९३ साली भरले होते. कवी वामनराव कर्डक त्याचे संमेलनाध्यक्ष होते.

दुसरे संमेलन त्याच शहरात १९९६मध्ये झाले.

त्यानंतर आणखी एक अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन, बल्लारपूरला १३-१४ जानेवारी १९९६ या तारखांना डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

२००८ चे संमेलन ज्या संस्थांनी आयोजित केले होते त्या सगळ्या संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव अशा प्रत्येकी दोन प्रतिनिधींची बैठक २१ सप्टेंबर २००८ रोजी अमरावतीला झाली होती. त्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये, ही संमेलने सुसंगत आणि नियमित व्हावी यासाठी सांस्कृतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्था एकसंघ असणे गरजेचे आहे हे लक्षात आले. म्हणून त्याच वेळी, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ नामक संस्थेची स्थापना करण्यात आली. हे महामंडळ संस्थांचा संघ म्हणून काम करेल आणि ज्या संस्था त्याच्या सभासद असतील, त्यांचे दोन प्रतिनिधी या महामंडळाच्या आमसभेला निमंत्रित केले जातील, अशी योजना ठरवली गेली. मात्र त्यापूर्वीचे २००८ चे अमरावतीचे संमेलन हे "आशय" नावाच्या स्थानिक संस्थेने आयोजित केले होते.

१९९३नंतरच्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष, उत्तम कांबळे, गंगाधर पानतावणे, बाबुराव बागुल, यशवंत मनोहर, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, अरुण कांबळे(९वे संमेलन; वणी-यवतमाळ, १३ जानेवारी २००६), रावसाहेब कसबे (१०वे संमेलन; अमरावती, २१-२२ फ़ेब्रुवारी २००९) हे होते. ११ वे साहित्य संमेलन१२ व १३ जानेवारी २०१३ रोजी विदर्भातील भंडारा येथे झाले. आंबेडकरी साहित्य चळवळीचे ज्येष्ठ भाष्यकार राजा ढाले संमेलनाच्या अध्यक्षपदी होते.

१२वे अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, प्रा.डॉ. शरणकुमार लिंबाळे होते. ते १२-३-२०११ला नांदेड येथे झाले होते.

आणखी एक १२वे आंबेडकरी साहित्य संमेलन चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे २०११ सालच्या जानेवारीत भरले होते, संमेलनाध्यक्ष अविनाश डोळस होते.

पुढे या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने दोन आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलने आणि चार आंबेडकरी युवा साहित्य संमेलने आयोजित केली गेली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते.

मार्च २०१२पर्यंत अकरा अखिल भारतीय दलित साहित्य संमेलने (११वे नागपूरला, २१-२३ जाने २०११, अध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे. १२ वे भोपाळला, मार्च २०१२, अध्यक्ष शरदकुमार लिंबाळे) आणि पंधरा आंबेडकरी साहित्य संमेलने झाली होती. याशिवाय तीन अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलने नोव्हेंबर २०१२पर्यंत झाली आहेत.

अश्‍वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले २रे अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन १४-१५ जानेवारी २०११ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे प्रा. डॉ. कृष्णा किरवले हे होते.

अश्‍वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले ३रे अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन २१-२२ जुलै २०१२ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे होते.

फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या सोलापूर नगरीत १४ व १५ फेब्रुवारी २०१५ रोजी १३ व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज.वि. पवार हे संमेलनाध्यक्ष होते.

महात्मा फुले, आंबेडकर विचारमंच गडचिरोलीच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी शुकवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. भाऊ लोखंडे होते. विशेष अतिथी म्हणून आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संमेलनाला हजेरी लावली होती.

१८ मार्च २०१७ : नागपूर येथे (आणखी एक) १३ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. दत्ता भगत होते.

१७ डिसेंबर २०१७ : नांदेड शहरात अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे पहिले आंबेडकरी विचारवेध संमेलन संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटक सुप्रसिद्ध लेखक तथा पत्रकार संजय आवटे हे होते तर बीजभाषक म्हणून प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर हे होते. दुसरे २० मे २०१८ रोजी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे संपन्न झाले. अध्यक्षस्थानी होते. पद्मश्री लक्ष्मण माने. तिसरे संमेलन २८ व २९ आॅक्टोबर २०१८ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक पळवेकर होते.

फेब्रुवारी २०१८ : आनंद गायकवाड हे फेब्रुवारी २०१८ मध्ये उमरखेड (जि.यवतमाळ)येथे झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

याशिवाय खालील नावाची साहित्य संमेलनेही आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]