वामन कर्डक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वामन तबाजी कर्डक या पानावरून पुनर्निर्देशित)
वामन कर्डक
जन्म १५ ऑगस्ट १९२२ (1922-08-15)
देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
मृत्यू १५ मे, २००४ (वय ८१)
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे वामनदादा
नागरिकत्व भारतीय
पेशा कवी (शाहीर) आणि (साहित्यिक)
ख्याती कवी, शाहिर
धर्म बौद्ध धर्म
जोडीदार अनुसया
शांताबाई
अपत्ये मीरा (जगू शकली नाही), दत्तक पुत्र -रवींद्र कर्डक
वडील तबाजी कर्डक
आई सईबाई तबाजी कर्डक
नातेवाईक सदाशिव (थोरला भाऊ), सावित्राबाई (धाकटी बहीण)

वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.[१] कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,०००हून अधिक गीते रचली आहेत.

लोकशाहीर वामन कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या शेवटापर्यंत फिरत राहिले. त्यामुळे समाज जागृत होत राहिला.[२] परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाच्या शेत शिवारात राणीसावरगाव-गंगाखेड रस्त्यावर रोड लगत समाधी आहे.[ संदर्भ हवा ]

प्रारंभिक जीवन[संपादन]

वामन कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ साली नाशिक जिल्ह्यातील ता. सिन्नर मधील देशवंडी या छोट्याशा खेड्यात झाला. वडील तबाजी कर्डक, आई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा वामनदादांचा परिवार होता. त्यांच्या घरी १८ एकर शेती होती. धान्य घरात यायचे तरीही हंगाम संपला की आईने डोंगरात जाऊन लाकडे गोळा करून मोळी बांधून ते जळतण सिन्नर बाजारात विकायचे. वडील टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकायचे व हेडीचा धंदा करायचे. सर्वांनी कष्ट केल्यावरही आषाढ श्रावणात आबाळ व्हायची. कधी तरवट्याची भाजी, माठाची भाजी, कधी भाकरीच खावी लागायची.[२]

कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिलमध्ये नोकरी, इत्यादी कामे केली. त्यांना वाचनाचा छंद होता तसेच त्यांनी लल्लाट लेख या नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती.[२]

वयाच्या १९-२०व्या वर्षी वामनचे लग्न अनुसया नावाच्या मुलीशी झाले. पुढे त्यांच्या कुटुंबात मीरा नावाच्या मुलीने जन्म घेतला. वामनदादांचे जीवन सुखात गेले नाही. बायको त्यांना सोडून गेली आणी पुढे आजारपणात मीराचेही निधन झाले. हा त्यांचा जीवनाला फार मोठा धक्का होता, ते मीराचे दुःख कधीही विसरू शकले नाहीत.[२]

मुंबईला प्रयाण[संपादन]

मुलगी मीराच्या निधनानंतर पुढे आईसोबत पोटाची खळजी भरण्याकरिता वामनदादा मुंबईत आले. त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला. चिक्की विक्रीचा, आईस फ्रूट विक्रीचा धंदा केला. मिळेत ते काम केले. नंतर त्यांना टाटा कंपनीत नोकरी मिळाली. शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत असतांना ते समता सैनिक दलात सामील झाले. इथपर्यंत वामनदादांना अक्षरांचा परिचय नव्हता.[२]

एकदा त्यांच्या चाळीमधीस एका मनासाने वामनदादांना पत्र वाचायला सांगितले. दादांना पत्र वाचता लिहिता येत नव्हते. याचे त्यांना खूप वाईट वाटले. शिक्षण नसल्यामुळे आपण लिहू-वाचू शकत नाही हे त्यांना अवघड वाटू लागले व ते रडू लागले. आणि ते देहलवी नावाच्या मास्तरांकडून बाराखडी, मुळाक्षरे शिकली. जोडाक्षरे ते दुकानाच्या पाट्या, बोर्ड वाचून शिकले. हळू-हळू त्यांचे लेखन वाचन वाढू लागले. सोबतच ते विविध खेळही खेळायचे व व्यायामही करायचे.[२]

आंबेडकरी चळवळीत सहभागी[संपादन]

त्यावेळी आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगाने जोर धरू लागली. आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते. वामनदादाही बाबासाहेबांच्या सभेला जात. समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. नायगाव येथे १९४३ साली वामन कर्डक यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिले होते.[२]

कवी[संपादन]

वामन कर्डक यांचे मराठी व हिंदी वाचन बरेच पुढे गेले होते. त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. ते अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले. पण त्यांना मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. ते कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओ यांमध्येही कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासनतास बसायचे.[२]

असेच १९४३ मध्ये राणी बागेत बसले असता वामनदादा कर्डक यांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत करायचे सुचले व ते त्यांनी ३ मे १९४३ रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांना प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामन कर्डक कवी झाले.[२]

त्यानंतर २००४ पर्यंत कर्डकांनी गीतलेखनाचा व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांची प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचे गायन केले.[२]

काव्यसंग्रह[ संदर्भ हवा ][संपादन]

  1. ‘वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३
  2. ‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६
  3. ‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७

गद्य[ संदर्भ हवा ][संपादन]

  1. ‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६

ध्वनिफिती व चित्रपट गीते[ संदर्भ हवा ][संपादन]

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
  2. भीमज्योत
  3. जय भीम गीते
  4. सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (चित्रपट - सांगत्ये ऐका)
  5. चल गं हरणे तुरू तुरू (चित्रपट - पंचारती)

अन्य गीतरचना[ संदर्भ हवा ][संपादन]

  1. ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा, तुझ्याकडे बघून हसतोय गं, काही तरी घोटाळा दिसतोय गं (संगीत- मधुकर पाठक; स्वर- श्रावण यशवंते)

पुरस्कार व सन्मान[संपादन]

वामन कर्डकांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत.

  1. दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.[ संदर्भ हवा ]
  2. महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  3. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.[ संदर्भ हवा ]
  4. महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.[ संदर्भ हवा ]
  5. औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).[ संदर्भ हवा ]
  6. प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७).[ संदर्भ हवा ]
  7. मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१)[ संदर्भ हवा ]
  8. प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन.[ संदर्भ हवा ]
  9. नाशिक, बुलढाणा येथे नाणेतुला[ संदर्भ हवा ]
  10. साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्‍न’ ही गौरववृत्ती.
  11. ’युगांतर प्रतिष्ठान’तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (१९९७).[ संदर्भ हवा ]
  12. जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार’[ संदर्भ हवा ]
  13. मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा ‘भीमस्मृती पुरस्कार’[ संदर्भ हवा ]
  14. भोपाळ येथे ताम्रपट मिळाला.[ संदर्भ हवा ]
  15. भुसावळ येथे चांदीचे मानपत्र मिळाले.[ संदर्भ हवा ]
  16. मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’[ संदर्भ हवा ]
  17. इ.स. १९९३ मध्ये, वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.[ संदर्भ हवा ]

कर्डकांवर लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • ‘एका कवीचे जीवनगाणे’ (लेखक: बबन लोंढे)[ संदर्भ हवा ]
  • आंबेडकरी प्रतिभेचा महाकवी : वामनदादा कर्डक - (लेखक: डॉ. अशोक जोंधळे व डॉ. शत्रुघ्न जाधव,)[२]
  • आंबेडकरी लोकशाहीर वामनदादा कर्डक- (लेखक:प्रा. बाबा बोराडे, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर.)[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ संजय वझरेकर. "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: १५ ऑगस्ट". ३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d e f g h i j k "आंबेडकरी प्रतिभेचा महाकवी : वामनदादा कर्डक-Ambedkari Pratibhecha Mahakavi Vamandada Kardak by Dr. Ashok Jondhale, Dr. Shatrughna Jadhav - Pratibhas Prakashan - Parbhani - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-05-15 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

  1. वामन कर्डकांवरील लघुपट (हिंदी)
  2. [१]
  3. आंबेडकरवादी महागीतकार: वामनदादा कर्डक – Dr. Yashwant Manohar