"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎जीवन: {{संदर्भ हवा}}
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८: ओळ ३८:


== शिक्षण व विद्यार्थी जीवन ==
== शिक्षण व विद्यार्थी जीवन ==
लहानपणी, सुभाष [[कटक]] मध्ये ''रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल'' नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.
लहानपणी, सुभाष [[कटक]] मध्ये ''रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल'' नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते.{{संदर्भ हवा}} वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.{{संदर्भ हवा}} वयाच्या १५व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते.{{संदर्भ हवा}} गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर [[स्वामी विवेकानंद|स्वामी विवेकानंदांचे]] साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.{{संदर्भ हवा}} महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.{{संदर्भ हवा}} [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] [[प्रेसिडेंसी महाविद्यालय|प्रेसिडेंसी महाविद्यालयात]] इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत.{{संदर्भ हवा}} म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.{{संदर्भ हवा}}
असे


[[इ.स. १९२१|१९२१]] साली [[इंग्लंड|इंग्लंडला]] जाऊन, सुभाष [[भारतीय नागरी सेवा|भारतीय नागरी सेवेच्या]] परीक्षेत उत्तीर्ण झाले.{{संदर्भ हवा}} परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.{{संदर्भ हवा}}
वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर [[स्वामी विवेकानंद|स्वामी विवेकानंदांचे]] साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.

महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] [[प्रेसिडेंसी महाविद्यालय|प्रेसिडेंसी महाविद्यालयात]] इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.

[[इ.स. १९२१|१९२१]] साली [[इंग्लंड|इंग्लंडला]] जाऊन, सुभाष [[भारतीय नागरी सेवा|भारतीय नागरी सेवेच्या]] परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.


== स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य ==
== स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य ==

१७:४०, ११ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती


सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस
टोपणनाव: नेताजी
जन्म: २३ जानेवारी १८९७ (1897-01-23)
कटक, ओडिशा, भारत
मृत्यू: १८ ऑगस्ट, १९४५ (वय ४८)
तैहोको, तैवान
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
फॉरवर्ड ब्लॉक
आझाद हिंद फौज
प्रमुख स्मारके: पोर्ट ब्लेर येथील स्मारक
धर्म: हिंदू
पत्नी: एमिली शेंकल
अपत्ये: अनिता बोस फफ

सुभाषचंद्र बोस (बंगाली: সুভাষ চন্দ্র বসু सुभाष चॉन्द्रो बॉसु) (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती.[ संदर्भ हवा ] त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. त्यांनी "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" असे भारताला आवाहन दिले.[ संदर्भ हवा ]

१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.[ संदर्भ हवा ]

जीवन

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.[ संदर्भ हवा ] जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते.[ संदर्भ हवा ] आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते.[ संदर्भ हवा ] इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.[ संदर्भ हवा ] प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.[ संदर्भ हवा ] प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते.[ संदर्भ हवा ] सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.[ संदर्भ हवा ] आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.[ संदर्भ हवा ]

शिक्षण व विद्यार्थी जीवन

लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते.[ संदर्भ हवा ] वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.[ संदर्भ हवा ] वयाच्या १५व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते.[ संदर्भ हवा ] गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.[ संदर्भ हवा ] महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.[ संदर्भ हवा ] कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत.[ संदर्भ हवा ] म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.[ संदर्भ हवा ]

१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.[ संदर्भ हवा ] परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.[ संदर्भ हवा ]

स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य

१९३९च्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनासाठी उपस्थित बोस.छायाचित्र:टोनी मित्रा

कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.

गांधींजीनी देखिल कोलकत्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.

१९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.

१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.

जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.

२२ जुलै १९४० रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली.[१]

कारावास

आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

१९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.

नोव्हेंबर ५, १९२५ च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.

मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.

१९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.

१९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.

युरोपातील वास्तव्य

१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाषबाबूंचे युरोप मध्ये वास्तव्य होते.

युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. त्यांनी इटली चे नेते मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. आयर्लंड चे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले.

सुभाषबाबू युरोप मध्ये असताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्‍नी कमला नेहरू ह्यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले. सुभाषबाबूंनी तिथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सांत्वन केले.

पुढे सुभाषबाबू युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले.

विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली.

१९३४ साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले. कराचीला पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा युरोपला धाडले.

हरीपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद

१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.

ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.

आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.

१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न जपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.

सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.

पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.

१९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.

अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना

मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.

नजरकैदेतून पलायन

नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मनइटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मनइटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओरलँडो मझयुटा नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.

नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट

बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटनाआझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.

अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.

काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारतभारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.

शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलरजर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली.

पूर्व आशियातील वास्तव्य

पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.

नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.

ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले.

आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.

पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला.

द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवरकोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.

आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी

दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.

ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या. २०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत.

भारतरत्‍न पुरस्कार

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे.

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचे मुद्धे

  1. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला.
  2. सुभाषबाबू १९२० मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.
  3. सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  4. नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
  5. डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.
  6. जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.
  7. नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.
  8. नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.
  9. सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.
  10. आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.
  11. सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
  12. आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.
  13. आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.
  14. १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.

चरित्रे

अनेक लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही चरित्रे ही :-

नेताजींवरील अन्य पुस्तके

  • नेताजींची सुवचने आणि संदेश (य.ना. वालावलकर)
  • नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवाद - अवधूत डोंगरे)

हे सुद्धा पहा

संदर्भ