गिरगाव

गिरगाव दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. पश्चिम रेल्वे वरील चर्नी रोड हे रेल्वे स्थानक गिरगावाचा भाग आहे. येथील चाळसंस्कृती किंवा चाळीतील जीवनावर बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिले आहे. येथील गिरगाव चौपाटी प्रसिद्ध आहे. गिरगावात खाडिलकर मार्ग आहे. पत्रकार, नाटककार आणि सुधारणावादी असलेले आणि प्रसिद्ध कवी प्रभाकर खाडिलकर ह्यांचे सुपुत्र असलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ह्यांचे नाव ह्या रस्त्याला देण्यात आले आहे.[१] गिरगावात अवंतिकाबाई गोखले मार्ग,जगन्नाथ शंकरशेट मार्ग, विठ्ठलभाई पटेल मार्ग आहेत.अवंतिकाबाई गोखले ह्यांचे घर अवंतिकाबाई गोखले मार्गावर होते.[२] चर्नी रोड रेल्वे स्थानक ते कुपरेज फुटबॉल मैदान हा रस्ता सन १८५० मध्ये झाला तेव्हा त्याचे नाव क्वीन्स रोड असे ठेवले होते.भारतरत्न महर्षी धोंडो कर्वे ह्यांनी स्थापन केलेले नाथीबाई दामोदर ठाकरसी हे पहिले महिला विद्यापीठ (स्थापना १९१६) क्वीन्स रोडवर असल्याने महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृती निमित्ताने सन १९५८ मध्ये क्वीन्स रोडचे नाव महर्षी कर्वे मार्ग असे केले.[३]
गिरगावातल्या वाड्या
[संपादन]गिरगावात अनेक वाड्या होत्या. त्यापैकी काही वाड्या खालीलप्रमाणे:-
- मुगभाट मुगा कोळी
- मांगल वाडी मांगेला कोळी
- कोळभाट
- बोरभाट
- फणसवाडी
- ठाकूरद्वार
गिरगावात कोळी लोकांची वस्ती होती आणि मुंबई आणि रायगड येथील राजाराम राऊत ऊर्फ भाऊसाहेब राऊत हे कोळी समाजाचे प्रमुख नेते होते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
[संपादन]दोनशे वर्षापूर्वी गिरगाव चौपाटी लकडी बंदर म्हणून ओळखले जात होते. तिथे बोटीसाठी धक्का बांधलेला होता. चुना, सरपण, कौले, ताजे मासे, चिऱ्याचे दगड वगैरे मालाची देवाणघेवाण व्हायची.कालांतराने कोळी बांधव साष्टी आणि ठाणे येथे स्थलांतरित झाले.१८६० च्या काळात कोळ्यांची होळी पेटल्याशिवाय कुणाचीही होळी पेटायची नाही असा दंडक होता.१९व्या शतकात राजाराम राऊत यांनी आपल्या कोळीवाड्यात तेरा कौलारू चाळी बांधल्या.मोठी विहीर बांधून पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.चाळीसमोर पाण्याची कारंजी बांधली होती. तेथील मोठ्या मैदानात हुतूतूचे सामने भरवले जात असत. कोळीवाड्यात सरहद्द गांधी,सुभाषचंद्र बोस असे राष्ट्रीय नेते येत असत. तिथे ऐतिहासिक बाबदेव दिर आहे. त्याची गेली दोनशे वर्षे पालखी निघते. ऑपेरा हाऊस पासून मरीन लाईन्स पर्यंत समुद्र किनाऱ्याला लागून असलेली जमीन शंकरशेट यांच्या मालकीची होती. शंकरशेठ यांनी स्वतःची जमीन मुस्लिम कब्रस्तानासाठी दिली.चिराबाजार येथे राहणाऱ्या कथालिक व पारसी समाजाने हिंदू स्मशानभूमीवर आक्षेप घेतला होता. त्यांनी थेट इंग्लंडच्या राणीला हिंदू स्मशानभूमी बंद करण्यासाठी पत्र लिहिले होते. वाईसरॉय सोबत स्वतः राणी भारतात तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आली होती. तेव्हा मुस्लिम समाजातील लोकांनी नाना शंकरसेट ह्यांच्या उपकारांची जाणीव ठेवली आणि रोग्ये ह्यांच्या नेतृत्वाखाली स्मशानभूमी परिसरात दुर्गंधी कमी होण्यासाठी विदेशी अत्तराचा फवारा केला होता.भाऊसाहेब राऊत यांच्या शब्दाखातर नाना शंकरशेठ यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई आणि रायगड येथील तमाम कोळी बांधव आपल्या होड्या, पडाव घेऊन गिरगाव चौपाटीवर आले होते. ही एकजूट पाहिली आणि राणी कोणतीही कार्यवाही न करता परत गेली होती.स्वातंत्र्य लढ्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची जेवणाखाण्याची सोय भाऊसाहेब राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माधवबाग,महाजनवाडी,कोळीवाडी करीत.गोदीत १९४४ मध्ये महाभयंकर स्फोट झाला तेव्हा विस्थापित मांडवी कोळीवाड्यातील बांधवांची सोय गिरगावात कोळीवाड्यात केली होती. महिनाभर कोळीवाड्यातील स्त्रियांनी त्यांच्या जेवणखाण्याची सोय केली होती. सन १९५६-५७ मध्ये मुंबई येथे सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिला हुतात्मा कोळीवाड्यातील तरुण होता.कोळीवाड्यातील गौर आणि दहीकाला उत्सवाला शतक पुरे झाले आहे तरीही आजही तो भव्य प्रमाणात साजरा केला जातो.महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण येथे ८५ वर्षे राहत होत्या. [४]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |