अकोला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अकोला जिल्हा
अकोला जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
अकोला जिल्हा चे स्थान
अकोला जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव अमरावती
मुख्यालय अकोला
तालुके १.अकोट, २. अकोला,३. तेल्हारा,४.पातूर, ५.बार्शीटाकळी, ६.बाळापूर, ७.मूर्तिजापूर
क्षेत्रफळ
 - एकूण ५,४३१ चौरस किमी (२,०९७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १८,१८,१६७ (२०११)
-लोकसंख्या घनता ३२० प्रति चौरस किमी (८३० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या -
-साक्षरता दर ८८.५५
-लिंग गुणोत्तर ९४६ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी अजित कुंभार
-लोकसभा मतदारसंघ १.अकोला (लोकसभा मतदारसंघ)
-विधानसभा मतदारसंघ १.अकोला पूर्व,२.अकोला पश्चिम,३.अकोट, ४.बाळापूर, ५.मुर्तिजापूर
-खासदार संजय धोत्रे
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान रुपांतरण त्रूटी: मूल्य "-" अंकातच आवश्यक आहे
प्रमुख_शहरे अकोला
संकेतस्थळ


हा लेख अकोला जिल्ह्याविषयी आहे. अकोला शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अकोला हे आहे.अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो. जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशिम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.

विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

अकोला जिल्ह्यातील तालुके- अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, अकोटतेल्हारा. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१ चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९ इतकी आहे.

भूरूपे[संपादन]

अकोला जिल्ह्यात विविध भूरूपे आहेत. पूर्णा नदीच्या खोऱ्यायाचा बहुतेक भाग सपाट मैदानाचा आहे. जिल्ह्यात उत्तर भागात गाविलगडचे डोंगर, तर दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस नर्नाळा किल्ला आहे. भूरूपांच्या उंचसखलपणावरून प्राकृतिक रचना समजते.

जिल्ह्यातील तालुके[संपादन]

अकोला जिल्ह्यात खालील सात तालुक्यांचा समावेश होतो.

प्राकृतिक विभाग[संपादन]

अकोला किल्ला

प्राकृतिक रचनेनुसार जिल्ह्याचे पुढील विभाग पडतात.

गाविलगडचा डोंगराळ प्रदेश[संपादन]

या विभागात जिल्ह्यातील तेल्हाराअकोट तालुक्यांचा उत्तर भाग येतो.

अजिंठ्याचा डोंगराळ व पठारी प्रदेश[संपादन]

जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. हा भाग बराचसा पठारी आहे. यात पातूर व बार्शीटाकळी तालुक्यांचा भाग येतो.

पूर्णा नदीचा सखल प्रदेश[संपादन]

या प्रदेशात जिल्ह्याचा मध्यभाग येतो. यात मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यांचा दक्षिण भाग यांचा समावेश होतो. बार्शीटाकळी तालुक्याचा उत्तर भागही यात येतो.

नद्या[संपादन]

अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा आहे. ही नदी जिल्ह्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्णा नदीस शहानूर, पठार, विद्रूपा, आस, इत्यादी नद्या उत्तरेकडून येऊन मिळतात . उमा, काटेपूर्णा, मोर्णामन ह्या नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात. याशिवाय निर्गुणा ही मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते. वाशीम जिल्ह्यात काटेपूर्णा नदीचा उगम आहे. ही नदी बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व अकोला या तालुक्यांतून वाहते. ती लाईत गावाजवळ पूर्णा नदीस मिळते. मूर्तिजापूर तालुक्यात सांगवी या ठिकाणाजवळ पूर्णा व उमा नद्यांचा संगम झाला आहे. मन व म्हैस या नद्यांचा संगम बाळापूर जवळ झाला आहे.

हवामान[संपादन]

अकोला जिल्हा समुद्रापासून दूर आहे. जिल्ह्याचे हवामान साधारण्पणे उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा फार कडक असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, मूतिजापूर तालुक्यांत कमी पाऊस पडतो.

नैसर्गिक संपत्ती[संपादन]

अकोला जिल्ह्यात गाविलगड व अजिंठ्याच्या डोंगरराळ भागात जास्त वने आहेत. वनात साग , ऐन, खैर, अंजन, इत्यादी वृक्ष आढळतात. तसेच मोर, रानकोंबडा, इत्यादी पक्षीही वनांत आहेत. पातूर तालुक्यात साग, चंदन, आढळते तसेच चारोळीचे उत्पादनही होते. जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे.

पाणीपुरवठा[संपादन]

अकोला जिल्ह्यात विहिरी व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी तालुक्यांत विहिरी जास्त आहेत. तेल्हारा तालुक्यात वान धरण आहे. याशिवाय महान, मोर्णा ही धरणे जिल्ह्यात आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील धरण-प्रकल्प जिल्ह्यात मोठा आहे. पातूर तालुक्यात मोर्णा व निर्गुणा यांच्यावर धरणे आहेत.

पिके[संपादन]

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके होतात.

खरीप पिके[संपादन]

अकोला जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे खरीप पीक आहे. अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट या तालुक्यांत कापसाचे पीक जास्त होते. या शिवाय इतर तालुक्यांतही थोडाफार कापूस होतो. खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे . ज्वारीचे पीक अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांत सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते.

याशिवाय मूग, तूर, तांदूळ, भुईमूग, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिके जिल्ह्यात घेतली जातात.

रब्बी पिके[संपादन]

रब्बी हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, जवस, करडई, आदी पिके होतात. जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्याप्रमाणात होत असून त्यात मुख्यत: संत्री, मिरची, ऊस, केळी, पेरू, बोरे, पपई आणि टरबूज आदी पिके घेतली जातात. तेल्हारा व अकोट तालुक्यात विड्याच्या पानांचे उत्पादन होते.

वाहतूक व व्यापार[संपादन]

अकोला जिल्ह्यातील वाहतूक रस्ते व लोहमार्गाने चालते. शिवनी विमानतल् हा अकोला शहराचा विमानतल् आहे.

राष्ट्रीय महामार्ग[संपादन]

मुंबई - नागपूर - कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यातून जातो. या मार्गावर बाळापूर, अकोला, कुरणखेड, मूर्तिजापूर, इत्यादी ठिकाणे आहेत. शिवाय अकोला-हैदराबाद हा नांदेड मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. इंदूर-अकोला-नांदेड-हैदराबाद हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे.

प्रमुख रस्ते[संपादन]

तेल्हारा ते मंगरूळपीर मार्ग : तेल्हाऱ्याहून शेजारच्या वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीरकडे हा मार्ग जातो. या मार्गावर अंदुरा, अकोला, बार्शीटाकळी, महान आदी ठिकाणे आहेत. अकोट- वाशीम मार्ग : या मार्गावर पाटसूळ, चोहट्टा, अकोला, पातूर इत्यादी ठिकाणे आहेत. मूर्तिजापूरहून अमरावती जिल्ह्यातील अचलपूरकडेकारंजामार्गे यवतमाळकडे मार्ग जातात.

लोहमार्ग[संपादन]

जिल्ह्यात अकोलामूर्तिजापूर ही दोन महत्त्वाची रेल्वे जंक्शने आहेत. जिल्ह्यातील लोहमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडतात.

  1. मुंबई - नागपूर - कोलकाता लोहमार्ग: हा लोहमार्ग जिल्ह्यातून पश्चिमेकडून पूर्वेस जातो. या मार्गावर पारस, अकोला, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, मूर्तिजापूर आदी स्थानके आहेत.
  2. खांडवा- पूर्णा लोहमार्ग : हा लोहमार्ग जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण गेला आहे. या मार्गावर अकोट, पाटसूळ, अकोला, बार्शीटाकळी इत्यादी स्थानके असून हा मार्ग पुढे वाशीमहून हिंगोलीमार्गे पूर्णाकडे जातो.

सध्या पुर्णा ते अकोला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला आहे. यामार्गे अकोला- काचिकुडा (हैद्राबाद ) आणि नागपूर-कोल्हापूर रेल्वे सुरू आहेत. अकोला-खांडवा मार्ग अजुनही नॅरोगेज असून तो ब्रॉडगेज झाल्यास वऱ्हाड परीसराच्या विकासाला चालना मिळेल.

हे सुद्धा पहा[संपादन]

अकोला‌ करार