विदर्भ
| ?विदर्भ महाराष्ट्र • भारत |
|
| — प्रांत — | |
|
|
|
| गुणक: (शोधा गुणक) | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ | ९७,३२१ km² (३७,५७६ sq mi)[१] |
| मोठे शहर | नागपूर |
| लोकसंख्या • घनता |
२,०६,३०,९८७ (2001) • २१२/km² (५४९/sq mi)[१] |
| भाषा | Marathi मराठी |
| संकेतस्थळ: no | |
विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा नैऋत्येकडे असणारा विभाग आहे. विदर्भाचे दोन उपविभाग आहेत - (नागपूर आणि अमरावती). विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के. [१]. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची आर्थिक उन्नती कमी आहे..[२]
विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. ह्या प्रदेशात कापूस, संत्रे आणि सोयाबीन ही उत्पन्न देणारी मुख्य पिके आहेत. तसेच ह्या प्रदेशात ज्वारी, बाजरी आणि तांदुळाची लागवड होते.
अनुक्रमणिका |
नैसर्गिक साधने [संपादन]
विदर्भ प्रदेश वनसंपत्तीने आणि खनिजसंपत्तेने संपन्न आहे. येथील गर्द हिरव्या वनराईमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत व तेथे अनेक वन्य पशू-पक्षी नैसर्गिकपणे आढळतात. पर्यटक दरवर्षी यांना पाहण्यासाठी गर्दी करतात.
महाराष्ट्रातील सर्व व्याघ्रप्रकल्प विदर्भातच आहेत. अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि नागपूर जिल्ह्यात पेंच व्याघ्रप्रकल्प हे विदर्भातले व्याघ्रप्रकल्प आहेत. विदर्भाच्या पूर्व भागात दाट जंगले तसेच कोळसा आणि मॅंगनीजच्या खाणी आहेत.
महाराष्ट्रातील सर्वांत जुने राष्ट्रीय अभयारण्य हे १९५५ मध्ये घोषित झालेले ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प[३] विदर्भाच्या पूर्व भागात आहे. हा प्रकल्प भारतातल्या २५ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.[४] हा प्रकल्प ६२३ चौ.किमी. येवढा असून ह्यात ताडोबा आणि अंधारी हे दोन चौकोनी प्रदेश आहेत. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात ५० वाघांशिवाय लांडगे, अस्वल, रानगवा, रान कुत्रे, तरस, उदमांजर, रानमांजर तसेच सांबर, चितळ, नीलगाय आणि भेकर, सारख्या भारतीय हरिणांचे प्रकार आहेत. येथील ताडोबा तलावात महाराष्ट्रात एकेकाळी सामान्यपणे आढळणाऱ्या मगरींचे प्रजनन केंद्र होते. निरनिराळ्या प्रकारच्या जलचर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे ताडोबा हे पक्षीतज्ज्ञांचे नंदनवन आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या उत्तर आणि पश्चिमेला दाट माळराने आणि वनराईंनी आच्छादित टेकड्या आहेत. नैऋत्य दिशेला एक प्रचंड तलाव आहे. तो पलीकडच्या इरई तलावापर्यंतच्या शेतांपासून प्रकल्पाच्या वनराईंचे रक्षण करतो. दाट माळरानांना लागूनच चिचघाट खोऱ्यात फ़ॉरेस्ट लॉज (www.tigertrails.in) आहे. ताडोबा टायगर रिझर्व एक अबाधित अरण्य असून येथे फारसे पर्यटक येत नाहीत. ताडोबा टायगर रिझर्व तसेच फ़ॉरेस्ट लॉज वर्षभरासाठी खुले असतात. ताडोबा कॅंप नागपूरपासून, अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे. मात्र दर मंगळवारी पार्क पर्यटकांसाठी बंद असतो.
इतिहास [संपादन]
विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश तो विदर्भ अशी याच्या नावाची व्युत्पत्ती आहे. नागपूर ही मराठा राज्यसंघातील भोसले घराण्याची राजधानी होती. भोसल्यांचे राज्य जवळजवळ पूर्ण मध्य-पूर्व भारतात पसरलेले होतं. १८१८ च्या तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धातील पराभवानंतर भोसल्यांचा प्रभाव फक्त नागपूर विभागातच मर्यादित झाला. १८५३ मध्ये नागपूरच्या राजाचा म्रुत्यू झाला. त्यांच्यामागे कोणी वारस नसल्याने भोसल्यांचे राज्य इंग्रज साम्राज्यात विलीन करण्यात आले. (१८६१).
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर आहे.
सन १८५३पर्यंत अमरावती -ज्याला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जायचे- हे हैदराबाद येथील निझामाच्या अंमलाखाली होते. त्या वर्षी, निझामाचे अराजक बघून ब्रिटिश वसाहत अधिकरणाने या प्रदेशाचा प्रत्यक्ष ताबा घेतला. सन १९०३ मध्ये बेरार हे मध्य प्रांताला (सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस) ला जोडले गेले.
सन १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार हे मध्य प्रदेश म्हणून भारतातील एक राज्य झाले. सन १९५६ मध्ये, मराठी बोलल्या जाणाऱ्या क्षेत्रांच्या एकीकरणासाठी विदर्भ क्षेत्राची अंतर्भ्व बदली मुंबई राज्यात करण्यात आला. मुंबई राज्य सन १९६० मध्ये, भाषेच्या आधारावर महाराष्ट्र व गुजरात यामध्ये विभागण्यात आले, आणि मराठी बोलणारा विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
स्वतंत्र विदर्भराज्य चळवळ [संपादन]
गेल्या काही वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला आहे. विदर्भ प्रांत हा पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या मानाने कितीतरी पटीने आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, तसेच काही प्रमाणातील स्वतंत्र सांस्कृतिक बैठक हे मुद्दे धरुन स्वतंत्र विदर्भाची मागणी गेली कित्येक वर्षे स्वतंत्र राज्याचे पुरस्कर्ते करत आले आहेत. परंतु महाराष्ट्राच्या इतर प्रांतातून होणारा विरोधही पुष्कळ आहे. स्वतंत्र विदर्भात आर्थिक व सामाजिक प्रगती झपाट्याने होइल असा त्यांचा अंदाज आहे तर विरोधक असे मानतात की विदर्भ जर वेगळा झाला तर महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या अनेक आर्थिक सोई सुविधांना विदर्भातील जनता मुकेल व विदर्भाची प्रगती अजून खुंटेल.
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, ते यासाठी घेत असलेल्या तसदीचा भाग म्हणून, ग्रामीण पुननिर्माण योजनेच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी विदर्भाचा दौरा केला व या क्षेत्रासाठी पुनर्वसन मदतीची घोषणा केली..[५]
पौराणिक कथांमध्ये [संपादन]
महाराष्ट्रापासून काही बाबतीत सांस्कृतिक वेगळेपणा विदर्भात आहे. विदर्भाचे संदर्भ महाभारतात आढळतात. महाभारतातील कथेप्रमाणे विदर्भ हा आर्यावर्तातला[६] देश होता. ज्याची राजधानी अमरावतीजवळील कुंडिनपूर - सध्याचे कौंडिण्यपुर- येथे होती. वैदिक काळानंतरच्या महा-जनपदात विदर्भाचा समावेश होता. पुराणातील अनेक कथा विदर्भाशी निगडित आहेत त्या खालीलप्रमाणे -
- अगस्त्य व लोपामुद्राचा विवाह
- महाभारतातील रुक्मिणीहरण - विदर्भाची राजकन्या रुक्मिणी हिने, मनाविरुद्ध होत असलेल्या तिच्या लग्नाची बातमी कृष्णापर्यंत पोहोचवली व तिने कृष्णाला आपला पती मानले आहे असेपण सांगितले व म्हणून तिने कृष्णाला तिला पळवून नेण्याची विनंती केली होती. कृष्णाने रुक्मिणीची विनंती मान्य केली व तिचे हरण केले व विदर्भ राजकुमार रुक्मी याचा पराभव केला.
- प्रसिद्ध नल दमयंतीची कथाही विदर्भ राज्याशी निगडित आहे.
- कालिदासाच्या मेघदूतात विदर्भाचा, यक्ष-गंधर्वाची वनवासाची जागा म्हणून नोंद आहे.
- महाभारतातील पांडवांचा अज्ञातवास विदर्भात व्यतीत झाला. कीचकवध अमरावती जवळील किचकदरा येथे झाला असा उल्लेख आढळतो.
- महर्षी गृत्समद यांना विदर्भातच कापसाचा शोध लागला आणि त्यांनीच कापसाच्या धाग्यापासून कापड तयार करण्याची पद्धत विकसित केली.
सद्यस्थिती [संपादन]
विदर्भ गेल्या काही वर्षात येथे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी राष्ट्रीयस्तरावर झोतात आलेला आहे. मुख्य कारण म्हणजे येथील प्रमुख पीक कापसाला मिळणार कमी बाजारभाव. अनेक गुंतागुंतीचे हे प्रकरण असून या आत्महत्यांना अनेक कारणे आहेत. सावकारांकडून घेतल्या गेलेल्या कर्जाची परतफेड न करता येणे हे एक प्रमुख कारण आहे.
भारत सरकारने कापसाचा किमान आधारभाव अंदाजे १०० रुपयांनी($2) वाढवून देण्याबद्द्ल हमी दिलेली आहे. परंतु, पुढे आपल्या हमीपासून माघार घेत किमान आधारभाव उलट कमी केला. याचा परिणाम म्हणून आत्महत्या आणखी वाढल्या. कारण शेतकऱ्यांना सावकारांकडून घेतल्या गेलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे लाज वाटत होती. सन २००६ मध्ये फक्त विदर्भात १,०४४ आत्महत्यांची नोंद केली गेली आहे. म्हणजे दर ८ तासाला एक आत्महत्या.."[७]
१ जुलै २००६ ला भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भासाठी ३,७५० करोड रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली. या निधीद्वारे, या क्षेत्रातील ६ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. परंतु, जेथे हवी तेथे मदत पोचेलच की नाही याबद्दल सर्व आश्वस्त नाहीत. या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना वाटते की अजून पुष्कळ काम करणे बाकी आहे.
हेही पाहा [संपादन]
- निजाम कालीन बेरार संदर्भात, ऐतिहासिक हैदराबाद मुक्तिसंग्रामचा आढावा.
संदर्भ [संपादन]
- ↑ १.० १.१ १.२ "Ref for both population and area"
- ↑ "अंडरस्टॅंडिंग अंडरडेव्हलपमेंट इन विदर्भ." संजीव फणसाळकर लिखित. IWMI-Tata Water Policy Program. लेख येथे वाचा [१].
- ↑ http://projecttiger.nic.in/tadoba.htm
- ↑ http://projecttiger.nic.in/map.htm
- ↑ "Package for farmers in 31 districts proposed". By Gargi Parsai. The Hindu. June 27, 2006.
- ↑ म्रुत्युंजय-ले. शिवाजी सावंत
- ↑ "The Dying Fields". Wide Angle (TV series). PBS. 2007.
बाह्य दुवे [संपादन]
| महाराष्ट्र |
|---|
| कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ |