नवबौद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतामधील इ.स. १९५६ च्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना हे संबोधन लागू होते.

अनुक्रमणिका

[संपादन] बौद्ध धर्म

मुख्य लेख: बौद्ध धर्म

बौद्ध धर्म (पाली: बौद्धधम्म) भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि दर्शन आहे. ह्याचे प्रस्थापक महात्मा बुद्ध शाक्यमुनि (गौतम बुद्ध) होते. इ.स.पू. सहावे ते पाचवे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या मृत्युनंतर पुढील पाच शतकांत बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. बौद्ध धर्माचे ३५ कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे.

[संपादन] उगम

भारतामधे बौद्ध धर्माचे साधारणपणे इ.स. ५०० पर्यंत समूळ उच्चाटन झाले.[१] भारतातील बौद्धधर्मीय काही कालांतराने इतर धर्म, पंथांमधे सामावले गेले. उर्वरीत बौद्धांना भारतीय समाजात अस्पृश्य म्हणून वागवले गेले[ संदर्भ हवा ]. हिंदू धर्माने अस्पृश्यांवरील लादलेल्या शिक्षणावरील बंदी आणि असमानतेची वागणुक मुळे कालांतराने त्यांचा इतिहास पुसला गेला.पण बोधिसत्व प.पु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शुद्र पुवीं क्षत्रिय होते हे उत्तर दिले नंतर क्षत्रिय हे बौध्द झाले. बौद्ध धर्म केवळ त्यांच्या संस्कृती, रुढी, परंपरा आणि प्रथांमधे शिल्लक राहिला.

[संपादन] धम्मचक्रप्रवर्तन दिन

इ.स. १९५६ मधे १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी नागपूर येथे ५ लाख उपासकांसमवेत बौद्धधम्माची दिक्षा घेऊन या धर्माची भारतात पुनर्स्थापना केली. हा धर्म अंगिकारून तथाकथित अस्पृश्य हे बौद्धधम्मात आले. भारतातील करोडो अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याला "धम्मचक्रप्रवर्तन दिन" म्हणून संबोधले जाते. या घटनेनंतर बौद्धधम्म पुनःस्वीकारलेल्या समाजाला नवबौद्ध असे संबोधले जाते.

[संपादन] बावीस प्रतिज्ञा

धम्मदिक्षेबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर अनुयायांसमवेत बौद्धधम्माच्या बावीस प्रतिज्ञांचा स्वीकार केला. त्या बावीस प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत:

  1. मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  2. रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  3. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  4. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
  5. गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
  6. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
  7. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
  8. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
  9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
  10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
  11. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  12. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
  13. मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
  14. मी चोरी करणार नाही.
  15. मी व्याभिचार करणार नाही.
  16. मी खोटे बोलणार नाही.
  17. मी दारू पिणार नाही.
  18. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
  19. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्‍या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्‍या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
  20. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
  21. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
  22. इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

www.buddha22pledges.org

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये