आयुर्वेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयुर्वेदिक या पानावरून पुनर्निर्देशित)
आद्य वैद्य श्री धन्वंतरी

आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेदाची सुरुवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार, आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.

कर्नाटकातील सोमनाथपुर येथील धन्वंतरीची प्रतिमा

आयुर्वेदातील सिद्धान्त आणि औषधे आधुनिक विज्ञानाच्या clinical trials या पद्धतीनुसार तपासलेली नसतात. त्यामुळे आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी या प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे असे काही लोकांचे मत आहे.[१] आयुर्वेदिक औषधांचा विशेषतः मुलांना उपयोग होतो. आर्युवेदानुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतुंमध्य विभागणी केलेली आहे. त्या त्या ऋतुंमधील होणाऱ्या वातावरणातील बदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात.[२]

इतिहास[संपादन]

आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे. म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्धाच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक मोलाच्या गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते.

परंपरा आणि ग्रंथसंपदा[संपादन]

आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन तत्त्वपरंपरा[श १] आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ याच परंपरांचा सारांश आहे आणि म्हणून हे ग्रंथ कोणी एका लेखकाने लिहिलेले नाहीत. तिसरी परंपरा कश्यपांची आहे.

आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून (सुमारे इसवी सनपूर्व ५५६) ते सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत (सुमारे इ.स. ६००) या परंपरांचे कार्य चालत होते. पण तीन शाखांचे औपचारिक सिद्धान्त आणि युक्त्या मूळ बौद्ध साहित्यात दिसून येतात. चरक आणि सुश्रुत संहितांचे बऱ्याच लोकांनी संपादन केले आहे. अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही जी परंपरा आहे तिची सुरुवात सुश्रुताने केली असे मानतात.

इसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणाऱ्या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदिक साहित्यांचे एकत्रीकरण केले. त्याला अष्टांग हृदय असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळ आधार समजले जाते म्हणून या तिघांना आदराने बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला. यातील ७९ प्रकरणांमध्ये विविध विकार, त्यांची लक्षणे, कारणे आणि क्लिष्टता याबद्दल चर्चा केली आहे. यानंतर भावप्रकाश व योगरत्नाकर हेही ग्रंथ निर्माण झाले. नवीन भर पडल्याने हे तीन ग्रंथ आजही प्रमाण मानले जातात. यांना लघु त्रयी म्हणून ओळखले जाते. विविध औषध निर्मितीच्या प्रक्रिया विषद करणारा शारंगधर हाही एक प्रमुख वैद्य. बृहद् त्रयी, लघु त्रयी व शारंगधर या तिन्हीत आयुर्वेद सामावला आहे.[३]

आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. इ.स.च्या आठव्या शतकात उग्रादित्य आणि इ.स.च्या चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बऱ्याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला. विंचू, साप, कोळी इ. प्राण्यांच्या विषांचाही प्राणिज औषध म्हणून वापर केला जातो. विषौषधाचा अभ्यास करणारी अगदतंत्र ही आयुर्वेदाची एक शाखा आहे.

आयुर्वेदांच्या प्राचीन ग्रंथांत केवळ आहाराचाच विचार केला नाही तर विविध ऋतूंमध्ये, कालानुरूप, हवापाण्यात बदल होत असताना आपण कसे राहावे, कसे राहू नये, याचा साधकबाधक विचार केलेला आहे. तर या ग्रंथ आणि पोथ्यांमध्ये अगदी सर्वसामान्य विकारांपासून दुर्मीळ विकारांवर मात्रा आहेत. आयुर्वेदाच्या दुर्मीळ पोथ्यांचे संग्रहण अनेकांनी केले आहे, नाशिकचे दिनेश वैद्य हे त्यांपैकी एक आहेत.

मार्गदर्शक आणि मूळ तत्त्वे[संपादन]

पंचमहाभूते[संपादन]

प्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेला आहे. त्यात सर्व भौतिक जग हे पाच मूळ तत्त्वांपासून तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळ तत्त्वाचे स्वतःचे काही गुण आहेत. ही मूळ तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत -

गुण[संपादन]

गुण विरुद्ध गुण
गुरू (जड) लघु (हलका)
मंद (हळूहळू) तीक्ष्ण (तीव्र)
हिम, शीत (थंड) उष्ण (गरम)
स्निग्ध (तेलकट, ओशट) रूक्ष (कोरडा)
श्लक्ष्ण (गुळगुळीत) खर (खरखरीत)
सांद्र (घन, दाट) द्रव (पातळ)
मृदू (मऊ, कोमल) कठीण (बळकट, दृढ)
स्थिर (टिकाऊ) चल, सर (गतिमान)
सूक्ष्म (अतिशय बारीक) स्थूल (मोठा)
विशद (स्वच्छ) पिच्छील (बुळबुळीत)

आयुर्वेदाचा लेखक सुश्रुत ह्याने अन्नाचे सहा प्रकार सांगितले आहेत:

भक्ष्यं भोज्यंच पेयंच लेह्मं चोष्यंच पिच्छिलम्।
इति भेदाः षडन्नस्य मधुराद्याश्च षड्रसाः॥

दोष[संपादन]

सर्व शारीरिक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात, असे आयुर्वेद मानते.

वात दोष[संपादन]

वात हा शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्‌वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.

कफ दोष[संपादन]

कफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक(lubricant), जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदयफुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि प्रत्यूर्जता ((ॲलर्जी) allergy) इत्यादी त्रास होतात.

पित्त दोष[संपादन]

पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अति पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.

निदानपद्धती[संपादन]

अष्टविध निदान पद्धती[संपादन]

  1. नाडी
  2. मूत्र
  3. मल
  4. जिंव्हा
  5. शब्द
  6. स्पर्श
  7. दृक्
  8. आकृती

या आठ गोष्टी बघून आयुर्वेदात निदान केले जाते. त्यास अष्टविध निदान पद्धती असे म्हणतात.

उपचारपद्धती[संपादन]

आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रामुख्याने शमन आणि शोधन अशी वर्गीकृत केली जाते. वाढलेले दोष स्वस्थानी नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेस शमन असे म्हणतात. तर वाढलेले दोष स्वस्थानातून खेचून बाहेर काढून शरीराबाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस शोधन असे म्हणतात. पंचकर्मे ही शोधन प्रक्रियेचा भाग मानली जातात. म्हणूनच पंचाकर्मांना 'शोधन कर्मे' असेदेखील म्हटले जाते.

पंचकर्मे[संपादन]

पंचकर्मे ही शोधन कर्मे आहेत. ती संख्येने पाच आहेत म्हणून त्यास पंचकर्मे असे म्हटले जाते.

  1. वमन
  2. विरेचन
  3. बस्ती
  4. नस्य
  5. रक्तमोक्षण

ही पाच कर्मे पंचकर्मे म्हणून ओळखली जातात.

ही एक आयुर्वेद उपचार पद्धती आहे.
याचे विश्लेxण पुढील प्रमाणे :-

१ - वमन[संपादन]

शरीरातील वाढलेले दोष मुखावाटे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस वमन असे म्हणतात. वमन ही कफ दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.

२ - विरेचन[संपादन]

शरीरातील वाढलेले दोष अधोमार्गाने बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस विरेचन असे म्हणतात. विरेचन ही पित्त दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.

३ - बस्ती[संपादन]

शरीरातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी गुदद्वारामार्गे औषधी देण्याच्या प्रक्रियेस बस्ती असे म्हटले जाते. बस्ती ही वात दोषाची प्रमुख चिकित्सा मानले जाते.

४ - नस्य[संपादन]

मानेच्या वरील प्रदेशातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी नाकाद्वारे औषध देण्याच्या प्रक्रियेस नस्य असे म्हणतात.

५ - रक्तमोक्षण[संपादन]

अशुद्ध रक्त शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस रक्तमोक्षण

औषधपद्धती[संपादन]

आसव[संपादन]

औषधे दीर्घकाळपर्यंत टिकून राहावीत यासाठी आसव-अरिष्टे तयार केली जातात. ही रोगांनुसार विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवितात. आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व इतर सहाय्यक वनस्पतींचा रस या गोष्टी भरल्या जातात. त्यामध्ये आवश्यक प्रमाणात गूळ, साखर, मध व अन्य सुगंधी पदार्थ टाकतात. त्यानंतर त्यात धायटीची फुले किंवा यीस्ट मिसळून झाकण लावून त्याला पंधरा ते पंचवीस दिवस समशीतोष्ण (साधारण तापमानाला) खोलीमध्ये स्थिर ठेवतात. यानंतर त्यामध्ये संधान (मद्यनिर्मितीची) प्रक्रिया सुरू होते. संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला गाळून जो द्रवपदार्थ प्राप्त होतो त्याला ‘आसव’ असे म्हणतात.

आसव हे शरीर व भूक वाढविणारे, निद्रानाश, वेदना व तोंडाचा बेचवपणा दूर करणारे व मनाला प्रसन्न करणारे असे असते; तर अरिष्ट हे शरीर कृश किंवा रोड होणे, मूळव्याध, पचनाचे जुने विकार इत्यादी प्रकारच्या रोगांमध्ये लाभदायक असून अन्नाची चव वाढविणारे, कफापासून उत्पन्न होणारे रोग कमी करणारे असते. वाळा, अफू, कोरफड, चंदन इत्यादी औषधांपासून आसव; तर अशोक, गुळवेल, अश्वगंधा, द्राक्ष इत्यादींपासून अरिष्ट बनविले जाते. आसव-अरिष्टे जितकी जुनी तितकी अधिक गुणकारी असतात.

अरिष्ट[संपादन]

आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व इतर सहाय्यक वनस्पतींचा रस या गोष्टी भरल्या जातात. त्यामध्ये आवश्यक प्रमाणात गूळ, साखर, मध व अन्य सुगंधी पदार्थ टाकतात. त्यानंतर त्यात धायटीची फुले किंवा यीस्ट मिसळून झाकण लावून त्याला पंधरा ते पंचवीस दिवस समशीतोष्ण (साधारण तापमानाला) खोलीमध्ये स्थिर ठेवतात. यानंतर त्यामध्ये संधान (मद्यनिर्मितीची) प्रक्रिया सुरू होते. संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला गाळून जो द्रवपदार्थ प्राप्त होतो त्याला ‘आसव’ असे म्हणतात. औषधी वनस्पतींचे भरड चूर्ण करून त्यापासून काढा बनवून त्यानंतर वरीलप्रमाणे संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला गाळून जो मद्ययुक्त द्रव पदार्थ तयार होतो, त्यास अरिष्ट असे म्हणतात. आसव बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जात नाही, तर अरिष्ट बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जाते.

आसव हे शरीर व भूक वाढविणारे, निद्रानाश, वेदना व तोंडाचा बेचवपणा दूर करणारे व मनाला प्रसन्न करणारे असे असते; तर अरिष्ट हे शरीर कृश किंवा रोड होणे, मूळव्याध, पचनाचे जुने विकार इत्यादी प्रकारच्या रोगांमध्ये लाभदायक असून अन्नाची चव वाढविणारे, कफापासून उत्पन्न होणारे रोग कमी करणारे असते. वाळा, अफू, कोरफड, चंदन इत्यादी औषधांपासून आसव; तर अशोक, गुळवेल, अश्वगंधा, द्राक्ष इत्यादींपासून अरिष्ट बनविले जाते. आसव-अरिष्टे जितकी जुनी तितकी अधिक गुणकारी असतात.

काढा[संपादन]

ज्या पदार्थांचा काढा करावयाचा असेल ते घटकपदार्थ घेतात व त्यावर पदार्थांच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी एक अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळवताtत, हे पाणी गाळून घेतल्यावर बनलेल्या द्रवपदार्थाला त्या घटकपदार्थातील मुख्य घटकाचा काढा म्हणतात..

घन[संपादन]

यात औषधाची पूड करून मग त्यात पातळ पदार्थ जसे पाणी, तूप इत्यादी मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यालाच घनवटी/वटी (गोळ्या ) असे म्हणतात.

चूर्ण[संपादन]

चूर्ण :- म्हणजे त्या वनस्पतीला / तिच्या सालीला/फळाला वाळवून नंतर त्याला कुटून बारीक करणे. (चूर्ण करणे)
हे चूर्ण पाणी, तूप, मध किंवा गुळासोबत औषध म्हणून घेतात.

चाटण/लेह[संपादन]

पुष्कळ औषधी उगाळून किंवा कुटून चाटण्यासाठी जे गोड रसायन बनवितात ते; लेह; चाटण्याचे औषध

प्राश[संपादन]

प्राशन करण्यासाठी बनविलेले गोड व घन आयुर्वेदिक रसायन. च्यवनऋषींने बनवले ते च्यवनप्राश. असेच कवचप्राश, कफप्राश, केशरी बदाम प्राश, त्रिफळाप्राश, त्रिफला पंचकोल प्राश, बदामप्राश, शिलाजितप्राश, सुवर्णप्राश, वगैरे

तैल[संपादन]

अमृत[संपादन]

मुलांची सर्वांगीण वाढ व्हावी, यासाथीचे गोड सरबत. उदा० बालामृत : यात मुलेठी, अतीस, काकडाश्रृंगी, नागर मोथा, अनंतमूल ,विडंग, हरड़ ,ओवा, चूर्णोदक, साखर, गंधक, सल्फर, तुवरक तेल, कापूृर इत्यादी घटक द्रव्ये असतात. असेच अमृत तुलसी, अमृतारिष्ट, वगैरे.

तैल[संपादन]

तैल :- यात काही वनस्पती मोहरी, एरंड, तीळ आदि तेलात मिसळून त्याला उकळून मग त्याचा वापर मालिश करणे, हळुवार चोळणे याकरिता करतात.

आयुर्वेदातील काही प्रसिद्ध तेले[संपादन]

  • महाभृंगराज तेल
  • नारायण तेल
  • चंदनबला लाशादि तेल
  • हरमेदादि तेल
  • काशीसादि तेल
  • जात्यादि तेल
  • गुडुच्यादि तेल
  • महालाक्षादि तेल
  • पंचगुण तेल
  • षडबिंदु तेल
  • महाविषगर्भ तेल
  • महामरीचादि तेल
  • तुवरक (चालमोगरा/तुबरक) तेल

घृत[संपादन]

घृत :- म्हणजे तूप होय.
यात गाईच्या तुपात अथवा अन्य तुपात इतर औषधी मिसळतात. हे मिश्रण उकळून एकजीव केल्यावर त्याचा वापर करतात.

शिवाय[संपादन]

१. भोज्य – डाळ भात इत्यादी २. भक्ष्य – पोळी भाजी, भाकरी इत्यादी ३. चर्व्य – चिवडा, फुटाणे इत्यादी (चावणे ही क्रिया अधिक) ४. लेह्य – चटणी, छुंदा (उन्हात वाळवलेला मोरंबा) इत्यादी चाटायचे पदार्थ ५. चोष्य – आंबा, ऊस यासारखे चोखून खायचे पदार्थ ६. पेय -सरबत, चहा-काॅफी-कोको, पन्हे, ताक यासारखे प्यायचे पदार्थ

संशोधन[संपादन]

आयुर्वेदामध्ये संशोधनाची गरज असून जगात अनेक ठिकाणी यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.[४] आयुर्वेदात संशोधन करण्याचे अनेक मार्ग आहेत. क्लिनिकल ट्रायल हा त्यापैकी एक महत्त्वाचा मार्ग आहे.आयुर्वेदिक सिद्धान्त तपासून पहाणे हेही एक प्रकारचे संशोधनच आहे.

पारिभाषिक शब्द[संपादन]

  1. ^ तत्त्वपरंपरा (इंग्लिश: Schools of Thought)

ग्रंथादी संदर्भ[संपादन]

  • Ayurveda Encyclopedia, Swami Sadashiva Tirtha, D.Sc., Ayurveda Holistic Center Press, Bayville, New York'
  • Ayurveda: Nature's Medicine, Dr. David Frawley and Dr. Subhash Ranade, Lotus Press, Twin Lakes, Wisconsin
  1. ^ Peethaambaran Kunnathoor, Pharmabiz.com, Wednesday, January 25, 2012 Create solid clinical trial data to convince international community about efficacy of Ayurveda: Sam Pitroda Archived 2016-03-07 at the Wayback Machine.
  2. ^ कुलकर्णी, वैद्य माधवी (२०१७). "आयुर्वेद, ऋतू आणि आहार". साहित्य स्वानंद. : ४७.
  3. ^ http://www.theproficient.com/BookPage.aspx?BookIds=1590 | सार्थ वाग्भट - गणेश कृष्ण गर्दे कृत मराठी भाषांतर
  4. ^ en:Clinical trials on Ayurvedic drugs

बाह्य दुवे[संपादन]