वैश्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैश्य समाज हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती शेती, पशुपालन, व्यापार व इतर अर्थव्यवस्थेशी संबंधित कामे करायची. आधुनिक काळात या वर्णातील लोक अनेक प्रकारची कामे करताना दिसून येतात.

जातीव्यवस्था ही पेशवे काळात जास्त प्रमाणात रूढ झाली. ह्या काळात जातीव्यवस्थेचे नाव वर्गीकरण १८ अलुतेदार, १२ बलुतेदार आणि वतनदार असे होते. बलुतेदार हे सुतार, लोहार, चांभार, महार, मांग, कुंभार, न्हावी, धोबी, गुरव, जोशी, भाट. अलुतेदार हे सोनार, जंगम, शिंपी, कोळी, माळी, डवरी, गोसावी, रामोशी, तेली, तांबोळी व गोंधळी इत्यादी.ह्या लोकांकडून सामानाची देवाणघेवाण करणारा एक व्यापारी वर्ग होता. त्या वर्गातील लोकांना वैश्यवाणी म्हणत असे. हा वैश्यवाणी समुदाय व्यापार आणि व्यवसायासाठी वेगवेगळ्या भागात गेला. कालांतराने त्याच ठिकाणी त्यांनी आपला समुदाय निर्माण केला. त्यावरून वैश्यवाणी समाजात वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या.

ठाणे, रायगड जिल्ह्यातील लोकांना ठाणेकर वैश्य म्हणतात. रत्‍नागिरी जिल्ह्यातील लोकांना संगमेश्वरी वैश्य म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना कुडाळेश्वर वैश्य म्हणतात. उत्तर कन्नड जिल्ह्यातील लोकांना कारवारी वैश्य म्हणतात. कोल्हापूरातील व पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना देशस्थ वैश्य म्हणतात. बेळगावातील लोकांना बेळगावी वैश्य म्हणतात.

शास्त्रीय वर्ण प्रणालीतील तिसरा उच्चतम वैश्य समुदाय हा गोव्यातील कुडाली व नीसचा एकल गट आहे जो नंतर व्यापार आणि व्यवसायासाठी इतर शहरी भागात स्थायिक झाला. विशेषतः कुडाळ, म्हापसा, फोंडा, मडगाव इथे राहणारे वैश्य पोर्तुगीज सत्ता असताना व्यापार आणि पोर्तुगिजांनी चालवलेले धर्मपरिवर्तन व अत्याचार यामुळे वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरित झाले.

प्रकार[संपादन]

कोकणस्थ वैश्य[संपादन]

या समाजाची मूळ वस्ती गोदावरी तीरी मुंगीपैठण येथे होती. दुर्गा देवीच्या दुष्काळामध्ये या समाजाची पांगापांग होऊन निरनिराळ्या घाटांनी हे लोक कोकणात उतरले आणि तिथे स्थायिक झाले म्हणून त्यांना "कोकणस्थ वैश्य" म्हणतात.

कोकणात जे प्रमुख दोन व्यापारी वर्ग आहेत. त्यापैकी प्रस्तुत समाज हा रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली व संगमेश्वर ह्या दोन ठिकाणी उतरला नंतर इतर जिल्ह्यांत म्हणजे करवीर (कोल्हापूर) आणि कुलाबा (रायगड) येथे गेला. अशी माहिती वैश्य संदर्भ ग्रंथात आहे.

विजापूरच्या दरबारातून मुसलमानी अमदानीत मिळालेल्या सनदा निरनिराळ्या घराण्यांना मिळाल्या त्यांना नंतर शेट्ये हे आडनाव प्राप्त झाले. ह्या नावाने आज ही ओळखले जातात. विशालगड संस्थानापैकी वायकूळ घराण्याच्या जुन्या दप्तरात अजूनही पुष्कळ सनदांची नोंद आहे.

रायगड जिल्ह्यातील वैश्य[संपादन]

मराठी सत्तेच्या उदयापूर्वी अदिलशहा, निजामशहा, मोगल, नवाब सिद्दी ह्यांची सत्ता होती. महाड माणगाव, पोलादपूर हा परीसर अदिलशहाच्या ताब्यात होता तर पश्चिम किनारपट्टी वरील मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा ह्या भागात सिद्दीचे वर्चस्व होते जिल्हाच्या उत्तरेकडील किनारपट्टी पनवेल, उरण या भागावर इंग्रजांनी बस्तान बसविले होते.

ह्या भागातील सुपारी, नारळ, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंचा व्यापार करण्यासाठी वैश्य आले त्यांना रायगडी वैश्य असे म्हंटले जाते. प्रामुख्याने अलिबाग, श्रीवर्धन, आदगाव, बोर्ली पंचायतन इथे वैश्यवाणी समाज जास्त आढळून येतो. ह्या भागात मापुस्कर, कोकाटे, खातू, गांधी, देवळेकर ही आडनावे आहेत.

कालांतराने रेल्वे सुरू झाल्यावर काही व्यापारी मुंबईच्या दिशेने वाटचाल करू लागले मुंबईत आल्यावर काही लोकांनी छापखाना व पानाच्या वखारी सुरू केल्या ह्या व्यापारात ते नावारूपाला आले. देवळेकर, हेगीष्टे ह्यांनी छापखाने काढले तर मापुस्कर, खातू ह्यांनी पान व तंबाखूच्या वखारी उत्तम प्रकारे चालविल्या. इतर लोक किराणा माल व कापड व्यवसाय करत आहेत.

कुडाळेश्वर वैश्य[संपादन]

घाटावरून कोकणात जेव्हा व्यापारी व सावकार मंडळी उतरल्या त्यातील काही कुडाळ प्रांतात गेले. त्याकाळी कुडाळ प्रांत हा रत्‍नागिरी जिल्ह्यात होता. सावंतवाडी संस्थान होण्यापूर्वी पासून ह्या प्रांताला कुडाळ हेच नाव होते. या भागात रहाणारे म्हणून कुडाळेश्वर वैश्यवाणी असे म्हणतात. यामध्ये म्हाडेश्वर, बिले, काणेकर, नलावडे, मोर्ये, भोग्टे, बिल्ले, कुडतरकर, कोरगावकर, पारकर, नानचे अश्या आडनावाचे लोक यात मोडतात.

यांची मुख्य वस्ती सावंतवाडी शहर, कुडाळ, बांदे, आरवंदे, माणगाव, नारूर, आकेरी, दापोली, दाणोली, आंबोली, आंब्रड, कसाल, कुंभवडे, आंबवडे, घोडगे, कणकवली व इतर लहान खेडी, तसेच गोव्यामध्ये पणजी, म्हापसे, डीचोली, साकळी, फोंडे, पेडणे, मडगाव इत्यादी व बेळगाव, कोल्हापूर जिल्हात आहे. याशिवाय नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई-पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आहेत.

पाटणस्थ वैश्य[संपादन]

पाटणस्थ वैश्य समाज हा प्रथम रायपाटण व खारेपाटण येथे वस्ती करून राहीला असावा. खारेपाटण ही पेठ प्राचीन काळापासून भरभराटीस आलेली होती. हे एक व्यापारी केंद्र आणि खाडीचे बंदर म्हणून प्रसिद्ध होते. म्हणून इथल्या वैश्य समाजाला पाटणस्थ वैश्य नाव पडले असावे.

ह्यांची लोकवस्ती गगनबावडा, भुईबावडा, पन्हाळा, भूदरगड तालुका आणि राधानगरी-चांदे या मार्गावरून थेट कोल्हापूर पर्यत आढळते. घाटमाथ्यावर ह्यांची वस्ती जास्त आहे. तसेच रत्‍नागिरीच्या मध्य विभागात म्हणजे राजापूर व देवगड या तालुक्यात ही हा समाज आहे. याशिवाय पुणे मुबई शहरात ही वास्तव्य आढळते.

पूर्वी हे लोक खायची पाने, केळी, हळद, व तागाचे व्यापार मोठ्या प्रमाणात करत असे. बामणे या गावात लाडवाडी, कोकाटेवाडी, जैतापकरवाडी मध्ये पाटणस्थ वैश्यांची घरे आहेत. ह्यांची ग्रामदेवता चाफाबाईचें देऊळ गावाच्या मध्यवर्ती असे आहे. मालक व पुजारी पाटणस्थ वैश्य आहेत.

ह्यांची आडनावे - कानडे, कुडतरकर, कोरगांवकर, ढवण, तानवडे, नारकर, महाजन, लाड, कोदे, खाड्ये, फोंडगे, बिड्ये, शिरसाट, शिरोडकर, सापळे, कामेरकर, जठार, कुडाळकर, कोकाटे, खवळे, खेतल, जैतापकर, नर, हळदे इत्यादी आहेत.

 ठाणेकर वैश्य[संपादन]

ठाणेकर वैश्य समाज हा अंबरनाथ, शहापूर, आटगाव, खर्डी, अंबाडी, बेलापूर, भिवंडी, बदलापूर, चिंचघर, डोंबिवली, दुर्गाडी, वसई, कुळगाव, कल्याण, खातिवली, मुरबाड, पडघा, टिटवाळा, ठाणे, वाशिंद, विक्रमगड, वाडा, वज्रेश्वरी, जव्हार, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण येथे खेड्या पाड्यात पसरलेला आहे. हा समाज येथे केव्हा आला याचा काही पुरावा मिळू शकला नाही. साधारण दिडशेवर्षा पूर्वी व्यापारासाठी नाशिक, नगर व बोरघाटातून येथे आला असावा.

काही पुरावे असे मिळतात की ४५० वर्षापूर्वी पोर्तुगीज काळात त्यांनी धर्मपरिवर्तन सुरू केल्यामुळे आणि अत्याचार सुरू केल्यामुळे मोठ्या संख्येने तेथील वैश्य बांधव कुडाळ, मापसा, बांदा, गोवा, परिसरातून कल्याण बंदराजवळ वास्तव्यास आले. कल्याण बंदर हे अति प्राचीन काळापासून फार मोठी बाजारपेठ होती, तसा उल्लेख प्राचीन इतिहासातही आढळतो. प्राचीन काळात हा परिसर कोळवण प्रांत नावाने परिचित होता. त्यामुळे कुडाळ परिसरातून निघून अनेक वैश्य वाणी बांधव कल्याण जवळील शहापूर, मुरबाड, वाडा, भिवंडी, अंबरनाथ, ठाणे, पनवेल, वसई येथे स्थायिक झाले. ठाणे जिल्ह्यात पातकर आडनावाची कुटुंबे मोठ्या संख्येनं पार खेड्यापाड्यात शेती आणि वास्तव्य करताना पूर्वापार आढळतील.

कुडाळ जवळील पाट या गावात जाऊन चौकशी केली असता असे समजले की पूर्वी मोठ्या संख्येने वैश्य वाणी त्या ठिकाणी वास्तव्यास होते. हे सर्व पाट चे पाटकर हे आडनाव लावत असत. पोर्तुगीजांच्या काळात हे लोक तिकडून निघाले आणि कल्याण बंदर परिसरात येऊन वास्तव्य, आणि शेती, व्यापार करू लागले. कल्याणच्या आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच शहापूर, वाडा, भिवंडी येथे आदिवासी मोठ्या संख्येने राहत असल्याकारणाने बोलीभाषा आदिवासी सारखी असल्यामुळे पाटकर या शब्दाचा अपभ्रंश पातकर झाला असावा. पाट पंचक्रोशीचे ग्रामदेवता माऊली देवी आहे. तेथून हे पाटकर शहापूर जवळ परिसरात वास्तव्य करू लागल्यामुळे शहापूर येथील डोंगराला माऊलीचा डोंगर म्हणून संबोधले जाऊ लागले असावे, कारण वस्तुस्थिती पाहता माऊली किल्ला असा कोणताही किल्ला अस्तित्वात नाही, तर इतर नाव असलेले दोन गडांची नावे या डोंगराला आहेत, त्यामुळे असा तर्क लावला जाऊ शकतो. आजही कुडाळ,मापसा, गोवा, बांदा, वर कोल्हापूर, सातारा या परिसरामध्ये पाटकर या आडनावाचे वैश्य वाणी मोठ्या संख्येने आढळतात. या ठिकाणी हे पूर्वपार सुपारी, पान, धान्य व्यापारी, सावकार, जमीनदार होते, आजही काही गर्भ श्रीमंत आहेत, मोठे व्यापारी आहेत. देशात इतरही ठिकाणी पाटकर आडनाव असलेले वैश्य वाणी (बनिया) मोठ्या संख्येने आहेत. गुजरात मध्ये बडोदा येथे आहेत, इंदोर,भोपाळ, बिहारमध्ये पाटणा, कर्नाटकात आहेत. सतना शहरात मोठा पाटकर बाजार आहे, तेथें सर्व व्यापारी हे पाटकर आडनावाचे वैश्य वाणी आहेत. कर्नाटकात पत्तुकेरू, पट्टुकर आहेत. पट म्हणजे रेशीम म्हणजेच सिल्क. रेशीम चे व्यापार करणारे ते पत्तुकेरू, हेच दक्षिण भारतात पटतूकर आडनांव लावतात. पट, पट्टूचे कारिगर ते पत्तुगेरू. हे समाज बांधव दक्षिणेकडून गोवा मालवण प्रांतात आले आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यात आले. नगरपट्ट्यामध्ये गुजरे, मुंडे आडनावाचे समाज बांधव मोठ्या संख्येने सापडतील.

शेटे, शेट्टी, शेट्ये, शेठे, सेठ, महाजन, चौधरी, या आडनावाचे वैश्य वाणी समाज बांधव संपूर्ण देशात आपल्याला पाहायला मिळतील, महराष्ट्रात नाशिक, पुणे, रत्‍नागिरी, कोल्हापूर, ठाणे, रायगड, नांदेड, परभणी, बीड, अकोला, धुळे, जळगाव या जिल्ह्यात शेठ, शेटे, सेठ, शेठे महाजन तसेच कर्नाटकात शेट्टी आडनावे असलेले वैश्य वाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. शेठ म्हणजे यांना पुर्वी साव म्हणायचे. साव या शब्दाचा अपभ्रंश सावठं, साठ, सेठ, शेट असा झाला. सावजींचा व्यवसाय हा शेती, हॉटेल, मिठाई, धान्य व्यापार, घाऊक बाजार शेतमाल खरेदी, सावकारी हा होता. नाशिक, धुळे, जळगाव या ठिकाणी बडे चौधरी, वाणी, महाजन, सिंगासने, अस्वले, पोटे या आडनावाचे समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेले आढळतील.

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधव त्या त्या गावाची आडनावे लावतात, जेथे त्यांचे पूर्वापार वास्तव्य आहे. जसे पाटकर, वेंगुर्लेकर, वालावलकर, कुडाळकर, मालवणकर, देवळेकर, मुणगेकर, वेलणकर, तेंडुलकर, जूकर अशी अनेक आडनावे आहेत. वैश्य वाणी बांधव. घाऊक किराणा माल, घाऊक धान्य व्यापार, भुसारी माल, कापड व्यापार, घाऊक फळ व्यापार भाजीपाला व्यापार मिठाई व्यापार, लाकूड व्यापार, मसाल्याचा व्यापार सुक्या मेव्याचा व्यापार करत असत. आजही करत आहेत.

मुंबई सारख्या औद्योगिक शहरात मोठ्या संख्येने गिरण कामगार म्हणून वैश्य वाणी कोकणातून मालवण, कुडाळ, बांदा म्हापसा, बेळगाव, गोवा येथून मुंबईस आलेले आढळून येतात.

ठाणेकर वैश्यांची आडनावे: तेलवणे, दलाल, पातकर, गुजरे, महाजन, सोनटक्के, मलबारी, कोथिंबरे, शेठे, पांडव, म्हात्रे, खडकबाण, पनवेलकर, खिसतमराव, शेटे, शेट्ये, गंधे, पाठारी, बिडवी, मुरबाडकर, तांबोळी, कोंडलेकर, आंबवणे, रोडगे, उबळे, जगे, आळशी, हरदास, काबाडी, भरणुके, बडे, चौधरी, मनोरे, पुण्यार्थी, मुंडे, सिगासणे, आंग्रे, जुकर, शहाणे, शेरेकर, राखाडे, भोपतराव, गोरी, वाणी, झिंजे, निकते, रोठे, पेणकर, पुणेकर, आनंंदे, दुगाडे, फक्के, दामोदरे, ठकेकर, लोखंडे, झुगरे, ठाकरे, पोटे, दुगाडे, गोरे, भुसारी, लाड, तांबडे, तोडलीकर, अस्वले, गिरी, शेरेकर, दामोदर.

कुलधर्म, कुलाचार: बहुतांश ठाणेकर वैश्यांचे गोत्र काश्यप आहे. कुलदेवता तुळजाभवानी व जेजुरीचा खंडोबा आहे.  इतर ही असू शकतात आणि आहेत. रेणुका माता ही अनेक गावात ग्रामदेवता आहे. काहींची कुलदेवता जीवदानी, एकवीरा आहे, या दोन्ही माता रेणूका देवीची नावे आहेत. जीवदानी माता ही पांडवांनी ठेवलेलं रेणुका मातेचे नाव आहे. पांडवांनी रेणुका मातेकडे जीवनाचे दान मागितलं आणि मातेने त्यांना जीवनदान दिले, म्हणून पांडवांनी रेणुका मातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिला जीवनदायिनी माता असे संबोधले. तेव्हापासून रेणुका मातेचे विरार, वसई येथील स्थान जीवनदायिनी माता या नावाने प्रचलित झाले. कुडाळ, बांदा परिसरातून असलेल्यांच ग्रामदैवत, गावदेव काळभैरव, रवळनाथ आहे. ग्रामदेवता माऊली, सातेरी आहे. यांचे गुरू गुरुदेव दत्त आहेत.

काही आडनावे ही सर्व वैश्य समाजात सारखी आहेत पण राहाण्याचे स्थान जसे बदलले गेले तसे कुळ व गोत्र ही वेगळे असलेले पाहाण्यात आले आहे. व्यापारानिमित्त मूळ गावे बदलल्याने अनेकांना कुलदेवी, गावदेवी, गावदेव यांचा विसर पडला आहे. प्रथा, परंपरा, राखण देणे या पद्धतींचा काळानुरूप विसर पडलेला आहे. परंतु या प्रथा, परंपरा, राखण देण्याच्या पद्धती पुन्हा सुरू ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतात. राखण ही देव देवतांना सोवळे तर पितरांना ओवळे स्वरूपात दिली जाते. राखण देऊन पीतरांना तृप्त केले जाते. आपले पितर तृप्त झाले तर ते सुद्धा आपल्यावर चांगली कृपादृष्टी ठेवतात. म्हणून पितरांच्या तृप्तीसाठी वर्षातून एकदा राखण देण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. ही राखण दरवर्षी बलिप्रतिप्रदे नंतरच्या कोणत्याही रविवारी दिली जाते. राखण म्हणजे पितरांच्या आवडीचे भोजन त्यांचा नैवेद्य असतो. त्यांच्या आवडीचे भोजन देऊन त्यांना तृप्त करावे लागते. आजही कोकण, मालवण, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, सातारा परिसर आणि इतर ही सर्वत्र ही परंपरा आवर्जून पाळली जाते.

गावदेवी, ग्रामदेवता: प्रत्येक गावची चतुःसीमा असते व त्या चतुःसीमेची रक्षण करणारी देवता तिला ग्रामदेवता म्हणजेच गावदेवी असे म्हणतात. प्रत्येक कुटुंबाचे मूळ घराणे ज्या गावात राहते तिला आपण मूळ एक पांढरी गावदेवी असे म्हणतो. एक पांढरी म्हणजे जिच्यावर मनुष्य घरदार करून राहतात ती जमीन, पांढर म्हणजेच ग्रामदेवता. मूळ कुटुंबात विभक्त होऊन दुसऱ्या गावी किंवा शहरी स्थायिक झाल्यावर त्या गावची अथवा शहराची गावदेवी ही तुमची गावदेवी असली तरी शुभ कार्याचे वेळी मूळ पांढरी गावदेवीचा ही मान द्यावा लागतो. शुभ कार्याचे वेळी देव देवतांचे मान उलप्यांच्या रूपाने काढून ते त्यांना मानवायचे असतात. म्हणजेच देव देवतांचा मानपान करायचा असतो.

उलपा काढणे, मान देणे: म्हणजे पत्रावळीवर एक नारळ, मूठभर तांदूळ, पानाचा विडा आणि दक्षिणा ठेवणे व नारळावर व विड्यावर हळद, कुंकू अक्षता व फुले वाहून प्रत्येक उलप्याला त्या त्या देवतेच्या नावाने गाऱ्हाणे घालतात. शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कृपा आशीर्वाद मागतात. घरात मौजी बंधन विवाह यासारखे शुभ कार्य असल्यावर घरात देवासमोर उलपे काढावे लागतात. त्या उलप्यांची संख्या कमी अधिक असू शकते.

  1. घराण्याची कुलदेवता म्हणजेच कुलदेवी. आणि कुळदेव खंडोबा.
  2. जागेचा रखवालदार, रवळनाथ, काळभैरव
  3. सध्या वास्तव्य असलेलं गावातील ग्रामदेवतांचे म्हणजे गावदेवी आणि मूळ पांढरी गाव देवतेचे असे दोन उलपे काढावे लागतात.
  4. मुंबईत कार्य असल्यास मुंबादेवी, महालक्ष्मी या देवीचे उलपे काढावे लागतात
  5. मूळ खांब, मूळ पुरुषाचा उलपा
  6. अनुग्रह घेतला असल्यास गुरूच्या नावाने एक उलपा
  7. घरात सात आसरा वगैरे देवतेचे स्थान असेल तर त्यांचा एक उलपा.

दर वर्षाची राखण: व्यक्तिशः किंवा सर्व भाऊ की एकत्र येऊन मृग नक्षत्र असताना राखण देण्याची परंपरा प्रत्येक घराण्यात आहे व कुटुंबात सदैव सुख शांती नांदावी यासाठी राखण देण्याची परंपरा चालू ठेवावी लागते. देवतांबरोबर त्यांचे गण असतात पित्रगण असतात. त्यातील दुष्ट शक्तींना आणि पितरांना नैवेद्याच्या स्वरूपात कोंबडा बकरा देण्याची परंपरा प्रथा आहे. त्यांचाही आशीर्वाद कुटुंबाच्या पाठीशी राहण्यासाठी त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी ही पूर्वपार प्रथा चालत आलेली आहे. ही परंपरा खंडित झाल्याने कुटुंबाला अनिष्ट परिणीमांना, दुःखांना सामोरे जावे लागले आहे. अशा रीतीने त्या त्या देवतेच्या नावाने पाच ते सहा राखण्या द्याव्या लागतात. त्यात देवतांना केवळ नारळ आणि पानाचा विडा म्हणजेच सोवळे ध्व्यावे तर गणांना, पितरांना - २ नारळ, २ लिंबू व कोंबडा अथवा बकरा, ५ प्रकारची मासे, मदिरा, काळीज, ५ प्रकारची मिठाई, ५ प्रकारची गाठी, २ अंडी अश्या स्वरुपत ओवळा द्यावा लागतो अशी प्रथा आहे. त्याला ओवळे असे म्हणतात. ही राखण पित्रगणाना घराबाहेर दक्षिण दिशेला द्यायची असते. त्यानंतर घरातील सर्व कुटुंबीयांनी सदर भोग ग्रहण करावा.

सोवळे: विडा आणि नारळ या देवांना ठेवावा.

उदा.

  1. कुलदेवता म्हणजेच कुलदेवी,
  2. कुलदेव खंडोबा
  3. जागेचा मालक रखवालदार, काळभैरव, रवळनाथ, गावदेव मूळ
  4. जलासरा (विहिरीजवळ)
  5. मूळ गावदेवी - एक पांढरी,
  6. सध्या वास्तव्यास असलेल्या गावची गावदेवी
  7. गावचा खऱ्या
  8. मूळ पुरुष, उभादेव, जो आपल्या देव्हाऱ्यात असतो तो. तुमच्या वंशाचा मूळ पुरुष, चंद्रवंशी स म्रा ट राजा कोटिविर्यार्जून. माहिष्माती सम्राट हैहैंय वंशी राजा सहस्त्रबाहू अर्जुन, म्हणजेच कोटिविर्यार्जून.
  9. गुरूंचा विडा, अनुग्रह घेतला असल्यास त्या गुरूंच्या नावाने अथवा, म्हणजे गुरुदेव दत्त यांचा.

उद्देश - कुटुंबाचे कुल आचार, कुलधर्म, संस्कृती पूजन रीतिरिवाज अनुसार सर्वसमाज बांधवांनी करावे. काळानुसार विसर पडलेले संस्कार, कुलाचार पूनरप्रारंभ करून पुढील पिढ्यांना मार्गदर्शक व्हावेत,व ठरावेत.

बेळगावी वैश्य / कारवारी वैश्य[संपादन]

सोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या धर्मछळामुळे अनेक वैश्य गोवा सोडून स्थलांतरीत झाले. त्यापैकी काही कुटुंबे रामदुर्ग आंबोली (रामघाट) चोर्ले घाटामार्गे बेळगावात स्थलांतरीत झाली. ह्या समाजात प्रामुख्याने तीन प्रकारचे वैश्य आढळतात. नार्वेकर वैश्य, बांदेकर वैश्य, पेडणेकर वैश्य.

नार्वेकर वैश्य[संपादन]

सध्या बेळगाव, खानापूर, नंदगड, लोंढा, अळणावर, बीडी, कलघटगी, दांडेली, यल्लापूर, अनगोळ, तुड्ये, मुरूकुंबी, कडोली इत्यादी ठिकाणी ह्यांची वस्ती आहे. ह्यांची गावावरून आडनावे आहेत. या समाजाची कुलदैवत गोवा प्रातांत मंगेशी, म्हाडदोबा, श्री कणकेश्वरी, नागेशी, शांतादुर्गा, सप्तकोटेश्वर, काळभैरव ही आहेत.

बांदेकर वैश्य[संपादन]

मूळ बांद्याहून निघून कारवार, अकोला, हल्याळ, कुमठा, व होनावर येथे स्थायिक झाले. बांद्याहून आले म्हणून बांदेकर नाव पडले. बेळगाव शहर, पारसगड, अथणी, गोकाक येथे जास्त वस्ती ह्यांची आहे. ह्यांची आडनावे पोकळे, तायशेटे, शिरसाट, मुंगे, वेंगुर्लेकर, नेवगी, तेली, कुशे इत्यादी आहेत.

पेडणेकर वैश्य—पेडणे येथून स्थलांतरीत झाले म्हणून पेंडणेकर म्हणतात. हे लोक नावा पुढे शेट लावतात. हे लोक किराणा दुकान, मिठाई ,नारळ, केळी, सुपारी, चणे, कुरूमुरे इत्यादींचा व्यापार करत असत.

इतर वैश्य समाजातील पोटजाती विषयी थोडक्यात माहिती -

लाड वाणी - यांची वस्ती बेलापूर, हल्याळ, शिरसी या भागात आहे. पूर्वी हे लोक घोड्यांचा व्यापार करत होते. आता कापड, किराणा विक्री व्यवसायात आहेत. कुलदैवत भवानी आहे.  

नगर जिल्ह्यात नगर व शेवगाव ह्या तालुक्यातील लाड वाणी हे गुजरातच्या लाट प्रदेशातून या भागात आले ह्यांची आडनावे चवाण, चिखले, चौधरी, गोसावी, जोशी, झारे, कराडे, खेळे, मोदी, पैठणकर, शेटे, अशी आहेत. यांची कुलदेवता अशनई येथील आशापुरी, तुळजाभवानी, शिंगणापूरचा महादेव, व पंढरपूरचा विठोबा आहे. हे शाकाहारी असतात. पिढीजात धंदा दुकानदारीचा आहे.

वैश्य समाजातील प्रकार:

  •   कोमटी वैश्य
  •   कासार वैश्य
  •   लिंगायत वाणी
  •   चितोडे वाणी
  •   हंबद वाणी
  •   कुणकरी वाणी
  •   कठर वाणी
  •   नेवे वाणी
  •   कुलवंत वाणी
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र