विंचू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विंचू (इंग्रजी: scorpion) हा एक विषारी प्राणी आहे. याने मनुष्यास दंश केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८ ते २० सेंटिमीटर लांबीचा असतो. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत. महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. लाल विंचू मुख्यत:कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून ह्याने नांगी मारल्यास माणूस दगावू शकतो.

आशिया खंडात आढळणारा विंचू

विंचवांच्या दंशाने बहुधा मरण येत नाही. लाल विंचवाचे लॅटिन नाव Mesobuthus tamulus असे आहे.

या विंचवाच्या विषावरचा उतारा (अँटी-सिरम) मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध आहे. हे औषध उपलब्ध नसले तरी योग्य उपचाराने उपाय होऊ शकतो.

आढळ[संपादन]

विंचवांचा आढळ कौले, घराची छते, जुने कपडे, काढून ठेवलेल्या चपला, बूट, अडगळ अशा ठिकाणी असतो. छतातून रात्री विंचू खाली पडतात. अंधारात स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात दंश करतात. यासाठी कौलारू छत असेल तर त्याखाली लाकडाचे अजून एक स्तराचे छत असणे महत्त्वाचे असते. शेतीमध्ये काम करताना हातात जाड हात मोजे वापरणे योग्य असते. गुंडाळून ठेवलेली अंथरुणे पांघरूण झटकून मगच झोपणे श्रेयस्कर असते.

विषबाधेचे स्वरूप[संपादन]

विंचवाच्या विषातील रासायनिक तत्त्वाने एका विशिष्ट प्रकारचे मज्जातंतू उद्दीपित होतात व होतच जातात. त्या उद्दीपनाच्या अतिरेकाचा दुष्परिणाम होतो. या प्रकारच्या "ऑटोनोमिक" मज्जातंतूंच्या अतिरेकामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते दंशातून शरीरात किती विष गेले आहे त्यावर अवलंबून आहे. कमी प्रमाणात गेले असले, तर दंशाच्या ठिकाणी दुखते, वाढत्या प्रमाणात दंशापासून दूर दूर परिणाम होतो. अर्थात विषाचा प्रभाव आपोआप उतरताना दुरून जवळपर्यंत दुखणे नाहीसे होते. त्याहून जास्त प्रमाणात विष शरीरात जाता शरीरभर "ऑटोनोमिक" मज्जातंतूंचे अतिरेकी उद्दीपन होते. याला "ऑटोनोमिक वादळ" म्हणतात.

"ऑटोनोमिक" मज्जातंतूंचे दोन प्रकार असतात - सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक. दोन्ही प्रकारच्या तंतूचे उद्दीपन होत असले तरी सिंपथेटिक अतिरेकाचा प्रभाव (या ठिकाणी) जास्त घातक असतो. सिंपथेटिक प्रणालीचे योग्य उद्दीपन "लढा किंवा पळा" परिस्थितीत होते. हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढते. त्यामुळे विंचू चढणे हे त्वेष चढणे किंवा भयभीत होण्याची लक्षणे दाखवते. याचा अतिरेक झाला की हृदय/रक्तपुरवठा हवे तसे काम देत नाही. शिवाय फुफ्फुसात लस (रक्तातला पाण्याचा अंश) स्रवून फुप्फुसे आपल्या नियत कार्यासाठी फुगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मृत्यू येऊ शकतो ("वादळ" उठलेल्यांपैकी, उपचार केला नसल्यास २५-३०%). मृत्यू न आल्यास विष हळूहळू आपोआप नष्ट होते आणि शरीर पूर्ववत होते ("वादळ" उठलेल्यांपैकी, ७०-७५%). "वादळ" उठण्याइतपत विषाची मात्रा शरीरात गेली नसल्यास, विष आपोआप १००% उतरते.

विंचवाची नांगी

उपचार[संपादन]

कोकणातील विंचू उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक विषारी असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. ‘हाफकिन’ या संस्थेने यावर उपाय ठरणारी बनवलेली विंचू प्रति विषजल लस निश्चित उपयुक्त असल्याने, शासनाने कोकणात असंख्य आरोग्य केंद्रात उपलब्ध केली आहे.

बावसकरांच्या उपचार-प्रणाली (ॲल्गोरिदम)ने २५-३०% ऐवजी २-३% "वादळी" रुग्ण दगावतात, आणि तेही इस्पितळात येण्यास उशीर झाला म्हणून. ज्या रुग्णास "वादळ" उठले नाही, त्याला वेदनाशामक आणि काळजीशामक औषधी देतात. विष आपोआप उतरते.

ज्यास "वादळ" उठले आहे, त्यास सिंपथेटिक मज्जातंतूंचे एका विशिष्ट प्रकारे दमन करणारे औषध देतात व पाणी प्यावयास देतात. शिवाय फुफ्फुसांचा निचरा करण्यास मदत करणारे औषध देतात. सुरू झालेले वादळ शमवण्यास अँटी-सिरम उपयोगी पडत नाही.

म्हणून सर्व जातीच्या विंचवांचा दंश घातक नसतो, आणि लाल विंचवाचा दंश शरीरात गेेलेल्या विषाच्या मात्रेवर अवलंबून घात करतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.

अधिक वाचन/संदर्भ[संपादन]

  • बॅरिस्टरचं कार्टं (पुस्तक, लेखक - हिंमतराव स. बावस्कर)
  • अनिल अवचट यांच्या 'कार्यरत' पुस्तकातील हिंमतराव बावसकरांवरचे 'हा विंचवाला उतारा' हे प्रकरण)