समर्थ रामदास स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी - चित्रकार :श्री मेरु स्वामी
मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर
जन्म चैत्र शु. ९, शके १५३० (२४ मार्च १६०८)
जांब, जालना जिल्हा, महाराष्ट्र
निर्वाण माघ कृ. ९, शके १६०३ (१३ जानेवारी १६८१)
सज्जनगड, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
संप्रदाय समर्थ संप्रदाय
गुरू प्रभू श्रीरामचंद्र
भाषा मराठी
साहित्यरचना दासबोध, मनाचे श्लोक
कार्य भक्ति-शक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना
प्रसिद्ध वचन जय जय रघुवीर समर्थ
संबंधित तीर्थक्षेत्रे सज्जनगड, शिवथर घळ, चाफळ
वडील सूर्याजीपंत ठोसर
आई राणूबाई सूर्याजीपंत ठोसर

समर्थ रामदास, जन्म नाव - नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च १६०८, जांब - १३ जानेवारी, १६८१, सज्जनगड) हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते.[१] रामालाहनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले.[२] ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.[३] पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.

पूर्वाश्रमीचा परिवार[संपादन]

समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते सूर्योपासक होते. त्यांच्या पत्‍नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव 'राणूबाई' होते.[४]

सूर्याजीपंत आणि सरकारी अधिकारी

बालपण[संपादन]

समर्थ रामदासस्वामी (नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्यान्ही झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर त्याने दिले होते. या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.[४]

तपश्चर्या आणि साधना[संपादन]

पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.

नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले असे मानले जाते. समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात.[४] त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.

तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण[संपादन]

तुम्हास जगोद्धार करणे आहे /तुमची तनु ते आमुची तनु पाहे /दोनी तपे तुमची रक्षिली काय हे /धर्मस्थापनेकारणे //

समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला.

शिखांचे सहावे धर्मगुरू हरगोविंद आणि समर्थ रामदास

भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता?" तेव्हा गुरू हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी". समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?" त्यावर हरगोविंद म्हणाले - " धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे. 'समान-शीले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरू हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले. त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत. "समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरू हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुती[संपादन]

समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे:
(१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर)
(२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे)
(३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर)
(४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ
(५) उंब्रज मारुती (ता. कराड)
(६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ)
(७) मसूर मारुती (ता. कराड)
(८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली)
(९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली)
(१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर)
(११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर).[४] ही ती गावे होत.

समर्थ स्थापित मठ[संपादन]

१. जांब
२. चाफळ
३. सज्जनगड
४. डोमगाव
५. शिरगाव
६. कन्हेरी

समर्थ सांप्रदायांमधील प्रमूख शिष्यांपैकी वासुदेवशास्त्री हे एक होत. यांचा मठ कण्हेरी येथे आहे. कण्हेरी हे गांव मांढरदेवी डोंगराच्या (म्हणजे काळुबाई देवस्थान ज्यावर आहे) तिथे पायथ्याशी आहे. पुणे सातारा रस्त्यावर खंडाळा पारगांव वरून पश्चिमेस ११ किमी अंतरावर हे गांव आहे. शिरवळ वरूनही इथे बसने जाता येते. पुणे येथून ६९ किमी वर हा मठ येतो. अत्यंत रमणीय स्थानी सुंदर असा हा मठ आहे. इथे वासुदेवशास्त्री व भीमस्वामी यांच्या समाधी आहेत. या मठाची समर्थ रामदास - वासुदेव - माधव(महादेव)- पुरुषोत्तम-भीमस्वामी - जयराम व नारायण - गंगाधर अशी गुरुपरंपरा आहे.

- समर्थ रामदास स्वामींना ज्यांनी प्रत्यक्ष पाहीले ते गिरिधरस्वामी. त्यांना समर्थांनी वेणीस्वामी शिष्या बाईयाबाई यांच्याकरवी अनुग्रहीत करून बीड (पुर्वीचे चंपावती) या क्षेत्रात कार्यस्थान करा सांगितले. बिंदुसरा नदीतीरावर रामतिर्थ या स्थानी गिरिधर यांची समाधी आहे. या गिरिधरकृत "समर्थप्रताप" या ग्रंथात समास १०, ११ व १२ मध्ये समर्थां रामदासांच्या भारतवर्षा मधील शिष्यसंप्रदाय व स्थाने याचा तपशील आढळतो. दहाव्या समासामध्ये श्लोक १४ वासुदेवस्वामींचा उल्लेख आहे.

"वासुदेव नामा अनुष्ठानी। समर्थप्रतिमा म्हणती जनीं। उत्कट परमार्थ विस्तारुनी। समर्थ चरणी लीन राहे।।१४।।" तसेच

"वासुदेव असा पंडीत निष्पृह। तेणे शिष्यगण बहु केले। हजारोंहजार शिष्य केलें। मंत्रा पालटले बुद्धीबळें।।"

याशिवाय राजारामप्रसादी कृत ग्रंथात, "भक्तमंजिरीमाला" यामध्ये, "राजश्री हातें हा मठ करविला। कण्हेरीचा मठ प्रतापेची केला" असा उल्लेख आढळतो.

श्रीहनुमंतस्वामींची बखर पान क्रमांक १६७ ते १७६ प्रकरण ९ मध्ये तसेच धाराशिव मठाचे श्री अनंतदास रामदासी यांच्या सप्तकांडात्मक "दासायण" यामधील लोकोद्धारकांड पान ३२१ ते ३३३ या ग्रंथांमध्ये वासुदेवशास्त्रींबाबत अधिक माहीती मिळते.

याच परंपरेमधील हनुमंतअवतार समजले जाणारे भीमस्वामी यांनी रघुनाथस्वामी यांना अनुग्रहीत केले. हे पसरणी मठाचे रघुनाथस्वामी यांच्या १६ अध्यायी चरित्रातील द्वितीय अध्यायी वासुदेवशास्त्रींची माहीती मिळते.

हया चरित्राअंती "इति श्रीमत् सद्गुरू रघुनाथ कथामृत ग्रंथे तत् पूत्र पौत्रेण रंगनाथेन कृते परिपुर्ण षोडशअध्यायः- संपुर्ण।।" तसेच ग्रंथाच्या शेवटी गुरुपरंपरा विशद केली आहे : "श्रीरामदास वासुदेव माधवासी ध्यायिजे। पुरूषोत्तम भिमस्वामी पंचायतन पूजिजे।। नित्यनेम सर्वकाळ दृढ पाय वंदिजे। राघवासी हाचि छंद रामराम बोलिजे।।"

अशाप्रकारे विविध संदर्भ ग्रंथांमधील माहीती अनुसार श्री वासुदेव यांचे मुळ नांव सदाशिवशास्त्री देव येवलेकर असे होते. नाशिक जवळील येवले येथे यजुर्वेदी ब्राह्मण कुटूंबात यांचा जन्म झाला. काशीक्षेत्री राहून त्यांनी सहा शास्त्रांचे अध्ययन केले. पुढे गुरूआज्ञेने शास्त्रार्थ करण्यास सांगितलेवरून जानव्यास एक सुरी व दिवसा मशाल पेटवूून हे शास्त्री गावोगांव शास्त्रार्थ करीत विविध विद्वानांकडून जयपत्र लिहून घेत. सुरी यासाठी बाळगली कि शास्त्रार्थ वादात हरले तर तात्काल जीभ छाटून प्राणत्याग करायचा हा प्रण. ते राजगड परिसरात आले असतां श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनास गेले. त्यावेळी तिथे गागाभट्टही हजर होते. शालिवाहन शके १५८० मधील ही घटना आहे. म्हणजे इस. १६५८ हे वर्ष. गुरू समर्थ रामदास यांचेबरोबर शास्त्रार्थ करायचा यासाठी ते पुढे चाफळ परिसरातील बहीरोबा वाडी जवळील रामघळीजवळ समर्थ एका कातळावर बसले होते तिथे गेले. शास्त्रार्थाची वादभिक्षा मागितली. समर्थ नम्रपणे म्हणाले, आम्ही रामाचे दास ना पंडीत ना विद्वान ना वेदशास्त्र जाणतो. तरी ही अहंकारी सदाशिवशास्त्री ऐकत नाहीत म्हहटल्यावर शिष्य कल्याणाकडे पाहीले. योगीराज कल्याण म्हणाले पात्र बहु शुद्ध आहे कृपा व्हावी. समर्थांनी तेथून एक अंत्यज मोळीविक्या चालला होता त्याला कल्याणाकरवी बोलावून घेतले. आम्ही पात्र नाहीत पण या मोळीविक्या भैरूसोबत आपण शास्त्रार्थ करावा असे ते शास्त्रींना म्हणाले. गुरूचरित्णातील लिलेप्ररमाणे या भैरुने सदाशिवशास्त्रींना हरविले. ही लिला पाहता सदाशिवशास्र्त्री समर्थांना शरण आले व क्षमा मागितली. या सदाशिव शास्त्रींना उपदेश करून वासुदेव गोसावी हे नामाभिधान दिले. कण्हेरी हे कृष्णेच्या उत्तरेस पंचक्रोशीतील ग्राम ़आहे व तिथे आपण समाजोद्धाराचे काम करावे असी आज्ञा केली. या वासुदेव शास्त्रींनी पुढे माधव, पुरुषोत्तम, भीमराज, असा बहु रामदासी शिष्यगण तयार केला. परिसरामध्ये शिरवळ, येथे २ भुइंज, मर्ढे, पसरणी, बार्शीजवळ महीषगांव येथे उपमठ तयार झाले.

७. दादेगाव [४]
8 मादळमोही

जीवन[संपादन]

भारत प्रवास करतांना शेवटी वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी पैठणला परत आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्‍नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्‍नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले.

मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्याया गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे मानले जाते.

जीवनकार्य[संपादन]

समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत.समर्थांचे एक वैशिष्ट्य होते - समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती.

आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदासस्वामींना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले.

सर्वस्वी निःसत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुनः जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.

केल्याने होत आहे रे ।
आज आपल्या जीवनात अपयश आणि दुःख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खऱ्या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले. अंतःकरणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंतःकरणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले -

धिर्धरा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका ।
केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥

मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गांवी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण अकराशे मठ आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला.
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातून, डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगायमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, निःस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभु श्रीरामचंद्र, आदिशक्ति तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरशः शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यांत, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. समर्थावर संत एकनाथाच्या वाङ्‌मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले.

शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली सनद[संपादन]

शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीचे एम.व्ही. धुरंधर यांनी काढलेले चित्र

छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींच्या विच्याराचे होते. स्वराज्य रक्षणासाठी समर्थ शिवाजी महाराजांन सोबत होते.[४] छत्रपती शिवाजी महाराजांनी ३१ नोव्हेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती.

यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडतात; पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’त या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे आहेत. पत्राच्या मुख्य बाजूवरचे अक्षर आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे.

‘श्रीसद्‌गुरुवर्य, श्रीसकळतीर्थरूप, श्रीकैवल्यधाम, श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापनाजे’’, अशा मायन्याने हे पत्र सुरू होते. त्यापुढे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या शब्दात पूर्वी समर्थांनी त्यांना काय उपदेश केला, त्याबद्दल थोडक्‍यात लिहिले आहे.[५]

तत्त्वज्ञान[संपादन]

रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्‌मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म%, माया, जीव, जगत्‌, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले.

त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच 'भिकारी' आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असे त्यांनी सांगितले आहे.

परमात्मा हा चराचरांत भरलेला असून, त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले आहे. अनेक उपनिषदांचा संदर्भ देऊन समर्थांनी या जगाचे अनित्यत्व, मिथ्यत्व प्रतिपादन केले आहे. कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गांचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी त्यांच्या शिष्यांपुढे ठेवले. सतत ईश्वरचिंतन करावे, सद्गुरूंची सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावे, सतत परमार्थ ग्रंथांचे परिशीलन करावे असे अनेक दंडक समर्थांनी घालून दिले आहेत.

पहा : चौदा ब्रह्म

व्यक्तिमत्त्व[संपादन]

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. “शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे.

साहित्य व काव्यनिर्मिती[संपादन]

समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या.[४] आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या; एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे. यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.

समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध,[६] मनाचे श्लोक,[७] करुणाष्टके,[८] भीमरूपी स्तोत्र,[९] अनेक आरत्या उदाहरणार्थ 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादी त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी घरांघरांत स्थान मिळवले आहे 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्‌मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले. समर्थांनी या वाङ्‌मयाचे पुनरुज्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत.

आपल्या अखंड प्रवासाच्या दरम्यान श्री समर्थ रामदास स्वामी श्रीक्षेत्र मोरगावला येऊन पोहोचले. येथे श्री मयूरेश्वराच्यासमोर उभे राहिल्यानंतर त्यांनी जोरात 'जय जय रघुवीर समर्थ' अशी आरोळी दिली. त्यावेळी महासाधू मोरया गोसावी महाराज यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव (थोरले) तेथे होते. श्री चिंतामणी महाराजांनी श्री समर्थांना विनंती केली की मोरया च्या समोर मोरया ची आरोळी असावी. ज्या कोणत्या देवतेच्या मंदिरात आपण असू त्या देवतेचाच जयघोष करायला हवा. मात्र श्रीसमर्थांनी ते न ऐकता वारंवार 'जय जय रघुवीर समर्थ" चाच नारा दिला, आणि एक चमत्कार घडला. अचानक श्रीसमर्थांचे डोळ्यास अंधारी आली. हे अजबच संकट आलेले पाहून श्री समर्थ श्रीगणेशांना शरण गेले. या संकटातून वाचविण्यासाठी त्यांनी मयुरेश्वराची करुणा भाकली. आर्तपणे त्यांनी जी साद घातली तीच आपण नेहमी "सुखकर्ता दुखहर्ता..." ह्या आरती रूपात म्हणत असतो. "सुखकर्ता दुखहर्ता..." ही श्री समर्थ रामदास स्वामी निर्मित आरती याच स्थानी, यानिमित्ताने निर्माण झाली. श्री समर्थांच्या आगमनाचा साक्षीदार म्हणून जसा हनुमंत राया मोरगाव येथे स्थापित आहे.

तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेतांना समर्थांना 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' ही आरती स्फुरली. 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो.

समर्थांनी शंकराची आरती लिहिली, त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले. जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती. हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे हट्टी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय! समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते. त्याच वेळी 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत.

रामदासस्वामींनी श्रीमत्‌ ग्रंथराज 'दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना (महाडजवळील) शिवथरघळ येथे केली.[१०]

दासबोधाशिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्‌रिपु-विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.

समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती.

एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शव्दांत सांगता येते - कर्म ,उपासना, ज्ञान, विवेक. भक्ती, प्रयत्‍न व सावधानता.

समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।

प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -
प्रपंची जे सावधान। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।

याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,
बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।
मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,

‘येक म्हणजी मऱ्हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।
लोहाची मांदूस केली। नाना रत्‍ने साठविली।
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।
तैसी भाषा प्राकृत।।’

लेखन[संपादन]

रामदासस्वामींची वाङ्‌मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङमयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्‌मय प्रकाराचा ऊहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्‌मयातून समर्थ काय सांगतात, हे पहातानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.

समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.

परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहिले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी, किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

रामदासांच्या काही साहित्यरचना :-

समर्थांचा अंतिम प्रवास : साहित्यातील वर्णन[संपादन]

संवत्सरी दुर्मती । सज्जनगडी हो इमारती । दोन सहस्र निष्क प्रीती ।वेचिली राये ।।
घर बांधिले विशाले । गृह प्रवेश करतीये वेले । वैशाख मासी भक्तपाले । प्रवेशले ।।
तेव्हा बोलिले वचन । आम्हास राहाणे स्वल्प जाण ।।
सांप्रत ज्यास मठ म्हणतात ती इमारत जीर्ण झालेली असल्याने अंगलाई देवालय व शेजारच्या तटातील ओवऱ्यांत समर्थांच्या राहण्याची व्यवस्था केली .१६०३ च्या रामनवमीनंतर चाफळहून समर्थ परत येईपर्यंत इमारत तयार झाली आणि समर्थ आल्यावर वैशाखापासून तेथेच राहू लागले. गृहप्रवेश करतेवेळेसच समर्थ उद्गारले 'येथे आता स्वल्प काळ राहणे आहे; खोलीचे बाहेर येणे किंवा कोणाशी बोलणे बहुतेक कमीच केले. उद्धवस्वामी व आक्काबाई यांशिवाय खोलीत कोणास येऊ देत नसत. कोणी काही कार्यभाग विचारले तर 'राम बुद्धी देईल तसे करा' म्हणून उत्तर देत.
'कोण्ही विचार पुसले काही । पूर्वीच सांगितले पाही । सांगावया आता काही । उरेचिना ।।'
पितळेच्या खुराचा पलंग होता, त्यावर नित्य बसून असत. अन्नाचा आहार अगदी टाकला होता. पाच चार महिने तर केवळ दुधावरच होते. जवळ कोणास येऊ देत नसत. एखाद्यास प्रसंगोपात बोलाविले तर त्याने तेवढे येऊन काय आज्ञा आहे ते विचारून जावे. उद्धव अथवा आक्का हे मात्र न विचारता खोलीत ये-जा करत व काय हवे नको ते पाहत. निजले असले तर उठवून दूध देत. पण ते दूधही स्वामींनी मर्जी असली तर घ्यावे नाही तर अपेक्षा नाही म्हणून सांगावे. उद्धव एके दिवशी म्हणाले की व्याधिनिरसनार्थ अनुष्ठान बसवितो व उत्तम वैद्य आणवितो; त्यावर हसून समर्थ म्हणाले आतापर्यंत देहाची ममता टाकण्याचा उपदेश दुसऱ्यास केला त्याचे हे सार्थक की काय? प्रारब्धाने देहाचे जे व्हायचे जेथे व्हायचे ते होत राहील. तेव्हा आक्का म्हणाल्या 'आपली इच्छा नसेल तर राहिला औषधोपचार; पण आता थंडीचे दिवस आले येथे डोंगरावर तर फार थंडी असते. तेव्हा चार दिवस खाली चाफळला किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी चलावे. 'समर्थांनी उत्तर दिले -
जेथे होईल हे प्रांत (शेवट) । तेथे भजतील हो भक्त । उत्साह चाफळी अद्भुत । राहील तेव्हा ।।
'आम्ही चाफळास जाण्याने श्री रघुवीराच्या उपासनेकडे लोकांचे दुर्लक्ष होऊ लागेल यासाठी कोठेही आता जाणे नको;
'म्हणौनी सज्जनगडी वास । आम्हास करणे सावकास । जे होईल देहास । ते येथे घडे ।।'
अशाही स्थितीत पौषमासी ( मार्गशीर्षाचा क्षयमास होता ) डोमगावहून कल्याण स्वामी आले. त्यांनी लिहिलेली दासबोधाची प्रत तपासून दिली.
आमची प्रतिज्ञा ऐसी । काही न मागावे शिष्यासी । आपणामागे जगदीशासी । भजत जावे ।।'
ही शेवटची ओवी करून ती १२-१० मध्ये घातली.
'मध्यरात्री साहावे तासी । समर्थ पाहती त्या मूर्तीसी । मेण होते जे नयनासी । ते काढविले ।।
श्रीचे मुखावलोकन केले । परम समाधान झाले । याउपरी आले । राहणे न घडे ।।
अवकाश पांच दिवस । उरला आहे आम्हास । कोण पुजील त्यास । यश घडो ।।
करणाऱ्याच्या करविल्या । आणि त्याच्या श्रमाचा । प्रसाद झाला सर्वांचा । मनोरथ ।। अर्थात हे बोलणे बहुतेक स्वगतच झाले. दुसरे दिवशी सकाळी मूर्ती पाहण्यासाठी खोलीत मंडळी आली असता समर्थांच्या मुखातून एक श्लोकार्ध निघाला -
रविकुळटिळकाचा वेळ संनिध आला । तदुपरी भजनाशी पाहिजे संग केला ।।समर्थांचे मनोगत जाणून -
अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी । बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी ।।
हे दोन चरण उद्धवांनी म्हणून समर्थांचा श्लोक पूर्ण केला. ते पाहून समर्थ फार संतुष्ट होऊन म्हणाले 'उद्धवा शाबास भले शाबास!' आणि नंतर श्रीरामापुढे अखंड नामघोष सुरू केला.
माघ कृ.८ रोजी दोन प्रहरी निद्रा करून उठले, ते समयी वचने दोनी प्रत्येकी येकादशाक्षरे--
देवद्रोहीयांचा नाशची आहे ।। समुद्रातीरस्थांचा नाश आहे ।। बोलिले, असे लेखांक ४३ मध्ये म्हटले आहे. त्यातच शेवटी लिहिले आहे की,
नवमी दो प्रहरा दर्शनासी बहुत लोक आले । त्यांस स्वमुखे आज्ञा दिली । ते लोक द्वारापासी उभेच आहेत । संनिध कोन्हासही येऊ दिल्हे नाही । तेच समयी पलंगावरून उतरून पादुकावरी उत्तराभिमुखी बैसले । श्रींचे स्मरण केले ।।
"पलंगाखाली उतरले । पादुका पायी लेइले । उत्तर दिशेकडे केले । मुख बरवे ।।
भक्तजन विनविती । पलंगावरी बैसावे म्हणती । तेव्हा बोलिले हो प्रीती । बैसाणे नाही ।।
तुम्ही बैसवाल तरी पहा । म्हणोन उचलती जन दहा । शक्तिवंत करिती अहा । नुचलती आमुते ।।
करिता बहुतची यत्न । नुचले अनुमात्र आसन । तेव्हा आज्ञापिले वचन । बाहेर बैसां ।।
आक्का व उद्धव यांखेरीज बाकीचे सगळे बाहेर दाराशीच बसले, आणि समर्थांनी रघुपतीकडे दृष्टी लावून ध्यान धरले; त्याबरोबर आक्का व शिष्य मंडळी घाबरी होऊ लागली. ते पाहून समर्थ म्हणाले ,'इतके दिवस सेवेत राहून वेदान्त श्रवण केल्याचे व अध्यात्माच्या अभ्यासाचे फळ हेच काय? त्यावर आक्कांनी हात जोडून विनंती केली, घाबरे होणे किंवा ममतेत गुंतणे हे काहीच समर्थांनी ठेवले नाही, पण प्रत्यक्ष सेवा व सगुणदर्शन अंतरेल याचे वाईट वाटते'; त्या वेळी त्यांच्या (व आज आपल्याही) समाधानासाठी समर्थांच्या मुखातून पुढील अभंग प्रकटला -
माझी काया गेली खरे । परी मी आहे जगदाकारे । ऐका स्वहित उत्तरे । सांगेन ती ।।
नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट । तेणे सायुज्याची वाट । ठाई पडे ।।
राहा देहाच्या विसरे । वर्तो नका वाईट बरे । तेणे मुक्तीची द्वारे । चोजविती ।।
रामीरामदास म्हणे । सदा स्वरूपी अनुसंधान । करा श्री रामाचे ध्यान । निरंतर ।।

या अभंगाचा आशय भीमस्वामींनी दोन ओव्यांत सांगितला तो असा -
माझी काया आणि वाणी ।गेली म्हणाल अंतःकरणी । परी मी आहे जग्जीवनी । निरंतर ।।
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध । असता न करावा खेद । भक्त जनी ।।

नंतर श्रीसमर्थांनी रामनामाचा गजर तीन वेळा एवढ्या मोठ्याने केला कI त्या घोषाने मुहूर्तभरपर्यंत गडावरील सर्व आकाश दुमदुमून गेले.
तीन वेळा स्मरण केले । अंबर अवघे गर्जिनले । रामनामे कोंदाटले । जिकडे तिकडे ।।
मुहूर्त एक हो गर्जना । गगनी कोंदाटली जाणा । विस्मय पावलो निजजना । प्रेम आले ।।
ध्वनी जाली संपूर्ण । जाहला अवतार हो पूर्ण । देशोदेशी भक्तजन । जाते जाले ।।
या प्रकारे श्रीसमर्थांनी 'माघ वद्य नवमी । दिवसा दोन प्रहर नेमी । शनिवारी परंधामी । योग केला ।।[ संदर्भ हवा ]

अंतिम पाच दिवसांमध्ये समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केले. त्याच काळात सज्जनगडावर तंजावर येथून श्रीराम पंचायतनाच्या मूर्ती आल्या. समर्थांनी स्वहस्ते त्यांचे पूजन केले. पूर्णपणे एकांतवास स्वीकारला. त्यावेळी त्यांच्याजवळ फक्त उद्धव स्वामीआक्का बाई होते. कल्याण स्वामी डोमगाव येथे होते. अंतिम दिनी समर्थ पद्मासन घालून उत्तराभिमुख बसले. तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून आत्मा पंचत्वात विलीन केला. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार उद्धव स्वामी यांनी केले. समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य नवमी शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय.

समर्थसंप्रदाय[संपादन]

समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा संप्रदाय आहे.[११] समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवाजी महाराजांच्या काळात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी व कवयित्रींनी विपुल लेखन केले आहे. या संप्रदायाची बहुतेक हस्तलिखिते धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात ठेवली आहेत. त्यांचा शोध घेऊन संग्रह करण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.

शिष्यमंडळ[संपादन]

समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा होती.

समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते. कल्याणस्वामी रामदासांचे पट्टशिष्य होते. ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे. दासबोधाचे नुसते पारायण करून भागत नव्हते, दासबोध समजावून घेण्यावर समर्थांचा भर होता. अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता. शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती. त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत. हाताने लिहून ग्रंथांचा नकला केल्या जात. छापील नसल्यामुळे ग्रंथ बांधलेले (बाइंडिंग केलेले) नसत. पानांवर पृष्ठांक देखील नसायचे. अशा वेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत. पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत. ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे. अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपती पदी नियुक्त केले जात नसे. ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत," याने दासबोध वाचला नाही केवळ गंधफुले वाहून पूजला."त्या वेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की, जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल. त्यासाठी वेगळा गुरू करण्याची गरज नाही. ग्रंथ हेच गुरू होत.

रामदासस्वामींची मराठीतील चरित्रे आणि त्यांच्यासंबंधी इतर ग्रंथ[संपादन]

  • आनंदवनभुवनी (कादंबरी, लेखिका : शुभांगी भडभडे)
  • ऐसी हे समर्थ पदवी (अशोक प्रभाकर कामत)
  • संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक ११-६-२०१७)
  • कल्याणा, छाटी उडाली (सुनील चिंचोलकर)
  • ग्रंथराज दासबोध खंड १ (सुनील चिंचोलकर)
  • तुका राम दास (तुलसी आंबिले, लोकसत्ता दैनिकात २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या दोन सदरांतील मजकुराचे संकलन)
  • तोचि येक रामदास (जनार्दन ओक)
  • पत्र समर्थांची (सुनील चिंचोलकर)
  • प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास : तुकाराम-रामदास (अच्युत नारायण देशपांडे, १९६६)
  • मनाच्या श्‍लोकातून मनःशांती (सुनील चिंचोलकर)
  • मला दासबोधीच लाभेल बोध (सुनील चिंचोलकर)
  • राजगुरू समर्थ रामदास (शं.दा. पेंडसे)
  • राजवाड्यांचा रामदास : (राजवाडे लेखसंग्रहाअंतर्गत, संपादन द.वा. पोतदार)
  • रामदास (श.श्री. पुराणिक)
  • रामदास : वाङ्मय आणि कार्य (न.र. फाटक) (१९५३)
  • श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान (श्री.म. माटे)
  • विद्यार्थ्यांचे श्रीरामदास (पुस्तक आणि ऑडिओ बुक) (सुनील चिंचोलकर)
  • शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोलकर)
  • शिष्य समर्थांचे (सुनील चिंचोलकर)
  • श्रीसमर्थ चरित्र (ज.स. करंदीकर, १९५३)
  • श्रीसमर्थ चरित्र (न.र. फाटक) (१९५१)
  • श्रीसमर्थ चरित्र (सदाशिव खंडो आळतेकर) (दुसरी आवृत्ती, सन १९७४)
  • श्रीसमर्थचरित्र (सदाशिव खंडो आळतेकर) (शके १८५५)
  • श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन (सुनील चिंचोलकर)
  • श्रीसमर्थ चरित्र (अनेक खंड) : खंड १. -श्रीसमर्थावतार (बा.सी. बेंद्रे)
  • श्री समर्थ चरित्र (अनेक खंड) : तृतीय खंड -श्री समर्थ संप्रदाय (शंकरराव देव)
  • समर्थदर्शन (संपादित लेख संग्रह; लेखक - श्री.र. कावळे, अनिरुद्ध कुलकर्णी, श्या.गो. मुद्गल. प्रस्तावना - के.वि. बेलसरे, नवीन आवृत्ती - १९८२
  • श्रीसमर्थप्रताप (समर्थांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले गिरिधरस्वामी)
  • समर्थविचार (कॅप्टन आनंद जयराम बोडस)
  • समर्थ व्यवस्थापन (दासबोध) लेखक - रमेश कुलकर्णी)
  • श्रीसमर्थ रामदास वाङ्मय शब्दार्थ संदर्भकोश (दासबोध वगळून) (संपादक : रा.शं. नगरकर आणि डॉ. मु.श्री. कानडे)
  • सद्‌गुरू समर्थ रामदास और छत्रपति शिवाजी महाराज (हिंदी, लेखक सुरेश तोफखानेवाले)
  • समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद (सुनील चिंचोलकर)
  • समर्थ रामदास विवेक दर्शन (संत रामदास, साहित्य अकादमी प्रकाशन)
  • समर्थ रामदासांचा भक्तियोग (डाॅ. शंकर अभ्यंकर)
  • श्रीरामदासस्वामि-चरितम् (संस्कृत, श्रीपादशास्त्री हसुरकर, शके १८४४)
  • समर्थ शिकवण (आनंद जयराम बोडस)
  • श्रीसमर्थ रामदास : जीवन व तत्त्वज्ञान (?)
  • समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज (कौस्तुभ सतीश कस्तुरे)
  • श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान (श्री.म. माटे)
  • समर्थ रामदासांचे व्यवस्थापन (सुनील चिंचोलकर)
  • समर्थ संदेश (कॅप्टन आनंद जयराम बोडस)
  • समर्थ साहित्य (उषा जोशी)
  • श्रीसमर्थांचा गाथा (संपादक अनंतदास रामदासी, १९२८)
  • समर्थ रामदासांची साहित्‍य सृष्‍टी (लेखक : सुनील चिंचोलकर; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
  • श्रीसमर्थांची लघुकाव्ये (संपादक - डॉ. सुनीती सहस्रबुद्धे)
  • श्री समर्थाचें पुण्य स्मरण (शंकर धोंडो क्षीरसागर)
  • साक्षेप समर्थांचा (डॉ. वि. रा करंदीकर)

समर्थ रामदासांच्या जीवनावरील नाटके/चित्रपट[संपादन]

  • संत रामदास (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजा नेने)
  • जय जय रघुवीर समर्थ (मराठी लघुपट, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर)
  • समर्थ रामदास स्वामी (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजू सावंत)
  • श्रीशिवसमर्थ (नाटक, लेखक : जयवंत पंदिरकर)
  • श्री राम समर्थ (चित्रपट, दिग्दर्शक संतोष तोडणकर)
  • रघुवीर

विसाव्या शतकातील श्रेष्ठ रामदासी[संपादन]

संस्था[संपादन]

स्वामी समर्थ रामदास यांचे नाव दिलेल्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही या :-

  • स्वामी समर्थ रामदास महापालिका मंडई, वांद्रे (मुंबई)

रामदास स्वामींनी वास्तव्य केलेल्या ‘घळी’[संपादन]

तारळेघळ, मोरघळ, रामघळ, शिवथरघळ, हेळवाक घळ, वगैरे

हे सुद्धा पहा[संपादन]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Sankalit. Samarth Guru Ramdas (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 978-93-86199-33-1.
  2. ^ Tiwari, Vijay Shankar (2015-10-01). Prernaprad Jeewan Charitra: For Students (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 978-93-84414-48-1.
  3. ^ जोशी, लक्ष्मणशास्त्री मराठी विश्वकोश खंड १४, पृष्ठ ७९४
  4. ^ a b c d e f g जोशी , होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००० (पुनर्मुद्रण)). भारतीय संस्कृती कोश खंड आठवा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन. pp. ११४-१२३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "येथे". Archived from the original on 2018-03-08. 2019-05-19 रोजी पाहिले.
  6. ^ "दासबोध".
  7. ^ "मनाचे श्लोक".
  8. ^ "करुणाष्टके".
  9. ^ "भीमरूपी स्तोत्रे".
  10. ^ Dasbodh prakrut-marathi. Mrs Manasi s. vaidya.
  11. ^ Jogalekar, N. C. (1968). Hindī evaṃ Marāṭhī ke Vaishṇava sāhitya kā tulanātmaka adhyayana (हिंदी भाषेत). Javāhara Pustakālaya.

बाह्य दुवे[संपादन]

विकिक्वोट
विकिक्वोट
समर्थ रामदास स्वामी हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.
यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.: