प्रल्हाद केशव अत्रे
| प्रल्हाद केशव अत्रे | |
| पूर्ण नाव | प्रल्हाद केशव अत्रे |
| टोपणनाव | केशवकुमार |
| जन्म | ऑगस्ट १३, इ.स. १८९८ सासवड, महाराष्ट्र, भारत |
| मृत्यू | जून १३, इ.स. १९६९ परळ (मुंबई),महाराष्ट्र, भारत |
| कार्यक्षेत्र | साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण |
| राष्ट्रीयत्व | |
| भाषा | मराठी |
| साहित्यप्रकार | कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र |
| प्रसिद्ध साहित्यकृती | डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्हेचे पाणी (आत्मचरित्र) |
| अपत्ये | शिरीष पै, मीना देशपांडे |
प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ.स. १८९८ - जून १३, इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
अनुक्रमणिका |
कारकीर्द [संपादन]
पत्रकारिता [संपादन]
इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.
संस्था [संपादन]
आचार्य अत्रे यांच्यास्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-
- आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
- आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ ,ठाणे
- आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
- आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
- आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
- आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई) (पुतळ्याची उंची ३४ फूट)
- आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा). हाच चार फूट उंचीचा पुतळा पूर्वी मुंबईत वरळी येथे होता.
- आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
- आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
- आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
- आचार्य अत्रे सभागृह, पुणे (उद्घाटन २९ मार्च १९८१)
- आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
- सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
- आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. (स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.)
- आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६
पहा : प्रतिष्ठाने
चित्रपट [संपादन]
इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
अध्यापन [संपादन]
मुंबईत पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.
उणिवा आणि निष्ठा [संपादन]
आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून ने घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. (संदर्भ:http://www.lokprabha.com/20111111/vyktimatva.htm आणि http://shreerangngaikwad.blogspot.in/2011/11/blog-post.html)
पुस्तके [संपादन]
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
नाटके [संपादन]
- अशी बायको हवी
- उद्याचा संसार
- एकच प्याला-विडंबन
- कवडीचुंबक
- गुरुदक्षिणा
- घराबाहेर
- जग काय म्हणेल?
- डॉक्टर लागू
- तो मी नव्हेच
- पराचा कावळा
- पाणिग्रहण
- प्रल्हाद(नाटक)
- प्रीतिसंगम(नाटक)
- बुवा तेथे बाया
- ब्रम्हचारी
- भ्रमाचा भोपळा
- मी उभा आहे
- मी मंत्री झालो
- मोरूची मावशी
- लग्नाची बेडी
- वंदे भारतम
- वीरवचन
- शिवसमर्थ
- सम्राट सिंह
- साष्टांग नमस्कार
काव्य [संपादन]
कथासंग्रह [संपादन]
आत्मचरित्र [संपादन]
- कर्हेचे पाणी - खंड एक ते पाच
कादंबरी [संपादन]
इतर [संपादन]
- अध्यापक अत्रे
- आषाढस्य प्रथम दिवसे
- इतका लहान एवढा महान
- केल्याने देशाटन
- क्रांतिकारकांचे कुलपुरुष
- चित्रकथा भाग-१
- चित्रकथा भाग-२
- दलितांचे बाबा
- दूर्वा आणि फुले
- मराठी माणसे, मराठी मने
- महापूर
- महाराष्ट्र कालचा आणि आजचा
- मी कसा झालो?
- मुद्दे आणि गुद्दे
- वस्त्रहरण
- विनोद गाथा
- विनोबा
- संत आणि साहित्य
- समाधीवरील अश्रू
- सिंहगर्जना
- सुभाष कथा
- सूर्यास्त
- हंशा आणि टाळ्या
- हुंदके
पुरस्कार [संपादन]
- विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
- आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान(पुणे) यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.
पहा : आचार्य अत्रे पुरस्कार
बाह्य दुवे [संपादन]
- मराठीवर्ल्ड.कॉम - आचार्य अत्र्यांचा अल्पपरिचय
- Prahlad Keshav Atre
- Some real life jokes of Atre
- Prahlad Keshav Atre
- Some real life jokes of Atre
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||