स्वामी समर्थ
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)२२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
जीवन
[संपादन]स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले.[१] त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले.
स्वामी समर्थ प्रकट दिन
[संपादन]इ.स. १८५६च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.
वासुदेव बळवंत फडके
[संपादन]इ.स. १८७५ सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ]
महती
[संपादन]सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास... और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज... तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते.
प्रकटनाची पूर्वपीठिका
[संपादन]इ.स. १४५९ मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी[२] श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापूरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत.
आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.
दीक्षा
[संपादन]श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना स्वामींची दीक्षा मिळाली आहे. ते फार मोठे शिष्य होऊन गेले आहे.
अक्कलकोट प्रवेश
[संपादन]इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.
अवतार कार्य समाप्ती
[संपादन]स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८ मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे नाटक केले आहे. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो-जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातून करत आहेत.
पुण्यतिथी
[संपादन]श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केल्याचे नाटक केले व नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. त्यानंतर स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर
[संपादन]सोलापूरपासून ४० कि. मी. अंतरावर, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे परमपवित्र तिर्थक्षेत्र आहे.अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. २२ वर्ष स्वामींचे वास्तव्य वटवृक्षाच्या छायेत होते. आज त्या पुण्यस्थळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर उभे आहे. पवित्र वटवृक्षाखाली श्रीच्या निगुण पादुका, शिवलिंग, श्री स्वामीची संगमवरी मंगलमूर्ती व स्वामींच्या स्मृती वस्तुने हा मंदिर परिसर स्वामीमय झाला आहे.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पहाटे पाच वाजता काकडआरती होते. काकडआरतीपासून वस्त्रालंकार पूजा होईपर्यंत गाभाऱ्यातील पादुकांचे व शिवलिंगाचे दर्शन घडते. त्यानंतर मात्र त्यावर मुखवटा चढवला जातो. श्री स्वामीची संगमवरी मंगलमूर्तीसह श्री गुरुदेव दत्तात्रय, श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ, श्री गुरुदेव नरसिं. सरस्वती व शिवलिंगावरील . श्री स्वामीच्या प्रसन्न मुखावटाचे विलोभनीय दृश्य डोळाचे पारणे फेडणारे असते. भक्तांना सकाळी ७:३० ते ९:३० वेळेत पूजा, अभिषेक, लघुरुद्र करता येते. सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती होते. सायंकाळी ७:४५ वाजता आरती, धुपारती व शेजारती होते. रात्री १०:०० भाविकांसाठी दर्शन मंदिर बंद केले जाते. [३] मंदिर गाभारा चांदीच्या नक्षीदार वखराने सजविण्यात आला असून गाभाऱ्यांच्या मागे स्वामींची छोटी सोनेरी मूर्ती आहे.
दर गुरुवारी पालखी निघते. स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव चैत्र वद्य षष्ठीपासून चैत्र वद्य चतुर्दशीपर्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दत्तजयंती, गुरुद्वादशी असे अन्य उत्सवही इथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरे होतात.[४]
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर परिसरात गणेश व मारूंती व नागदेवतेच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंदिरातील शेजघर समोरील परिसरात ४०,००० पंचमुखी रुद्राक्षांपासून साकारलेली स्वामींची १२ फूट लांब आणि १० फूट रुंदीची शांतीदायक प्रतिमा आहे. मंदिराच्या पूर्वला स्वामीभक्त ज्योतिबा मंडप आहे. वटवृक्षाखालील ज्योतीबा मंडपात दिवसभर नित्यनाम जप, भजन, पूजन, ग्रंथ पारायण सुरू असते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र
[संपादन]अक्कलकोटचे ऐतिहासिक महत्व असून हे पूर्वी संस्थान होते. येथे राजघराण्याची गादी असुन भोसले हे संस्थानिक आहेत. श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले, पहिले शहाजीराजे, मालोजीराजे, फत्तेसिंहराजे तिसरे व श्रीमंत विजयसिंहराजे भोसले असे पराक्रमी व कर्तबगार राजे होऊन गेले. अक्कलकोट शहराची ख्याती सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली ती म्हणजे दत्तावतारी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे. श्री स्वामी समर्थाचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे कारकीर्दीत झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी उचलुन धरली व २९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरू झाले.[५]
अन्नछत्राचे “श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट” असे नामकरण करण्यात आले. अन्नछत्राचा विस्तार व्हायला लागला. अन्नदानासाठी परगांवच्या भक्तांच्या देणग्या यायला लागल्याने ट्रस्ट स्थापनाची आवश्यकता भासु लागली. त्यामुळे सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी आपले निकटवर्तीयसंबधीत व सहकारी असलेल्या स्वामीभक्तांना सभासद करून घेऊन पब्लिक ट्रस्ट (सार्वजनिकन्यास) ची नोंदणी केली. अन्नछत्र हे दुपारी 12 ते 3 व रात्री 9 ते 11 या वेळेत सुरू असते. गर्दीच्या वेळेस किवां उत्सवाच्या दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते. येथे आलेला भक्त विन्मुख होऊन जात नाही. हे या अन्नछत्राचे विशेष आहे. अन्नछत्रात रोज अंदाजे १० हजार तर गर्दीच्या विशेष दिवशी सुमारे १ लाख स्वामीभक्त महाप्रसाद घेतात. महाप्रसादाचा दररोजचा खर्च सरासरी २ लाख ते ३ लाख रूपये इतका आहे. सदरचा महाप्रसाद (मोफत पुर्ण भोजन) मोफत असल्याने येथे कसल्याच प्रकारचे मुल्य त्यासाठी आकरले जात नाही. नियोजित महाप्रसादगृहाच्या बांधकाम सुरू झाले आहे. महाप्रसादगृह एकावेळेस २००० भाविक महाप्रसाद घेतील इतक्या क्षमतेचे असणार आहे. भव्य देखणी इमारत ४ माजली असणार आहे. तळ मजला हा प्रतीक्षा गृह असून वरील ३ मजले हे महाप्रसादगृहासाठी असणार आहे. ह्या इमारतीत देणगी काउंटर्स, कार्यालय, धान्य गोदाम, स्वयंपाकगृह, भांडी धुवण्यासाठी ची जागा, भाजी निवडण्यासाठी जागा तसेच पीठ गिरणी, कांडप मशीन, स्वच्छता गृह व लिफ्ट ची सोय इत्यादी असणार आहे. नवी ईमारत ही संपूर्णतः वातानुकुलीत असणार आहे. या साठी रु.५००००/- ते रु.१०००००/- पर्यंत देणगी देणाऱ्या देणगीदाराचे नाव ग्रेनाईटच्या बोर्डावर कोरण्यात येईल आणि सदर ग्रेनाईट बोर्ड बांधकाम झाल्यावर महाप्रसादगृहात लावण्यात येईल आणि रु. १००००१ किंवा त्यापेक्षा जास्त देणगी देणारया देणगीदाराचे नाव मार्बल संगमरवर प्लेटवर कोरण्यात येईल आणि सदर मार्बल बोर्ड बांधकाम झाल्यावर महाप्रसादगृहात लावण्यात येईल.
चित्रपट
[संपादन]- स्वामी समर्थ यांच्या भक्तीवर देऊळ बंद’ हा चित्रपट २०१५ साली निघाला. त्यात स्वामींची भूमिका मोहन जोशी यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे व प्रणीत कुलकर्णी यांनी केले आहे.
- तत्पूर्वी २०१२ साली ’कृपासिंधू श्री स्वामी समर्थ’ ही दूरचित्रवांणी मालिका ’मी मराठी’ या वाहिनीवर आली होती. हिचे प्रसारण शंभराहून अधिक भागांत झाले होते.
या दोन्हींच्या आधी २००४ साली जेष्ठ अभिनेते श्री राहुल सोलापुरकर यांचा "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हा चित्रपट आला होता. २०२० मध्ये कलर्स मराठी वाहिनीवर "जय जय स्वामी समर्थ" ही मालिका सुरू आहे. स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मालिका आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ Hanumante, Mukund M. (1999). A Glimpse of Divinity: Shri Swami Samarth Maharaj of Akkalkot. Kenner, USA: Akkalkot Swami Samarth Foundation ISBN 978-0-9669943-0-8
- ^ "संग्रहित प्रत". 2012-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-04 रोजी पाहिले.
- ^ https://vatvrukshaswami.org/temple-schedule}}
- ^ साचा:Https://royalfamilyakkalkot.com/places-mar/banyan-tree-temple-the-eternal-abode-of-swami-mar/
- ^ [https:// https://swamiannacchatra.org/ "श्री स्वामी समर्थ अन्नछत्र"] Check
|url=value (सहाय्य).
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |