मोरया गोसावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज हे १४व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव होते. त्या गावी श्रीवामनभट्ट शाळिग्राम आणि त्यांची पत्‍नी पार्वतीबाई नांदत होते. देशस्थ ऋग्वेदी, हरितस गोत्राचे वैदिक असलेले, श्रीवामनभट्ट व त्यांच्या पत्नी सौ.पार्वतीबाई ह्या पतिव्रता व ईश्वरनिष्ठ होत्या. परंतु एक दुःख त्यांच्या मनाला जाळत होते, त्यांना पुत्र संतान नव्हते. पुत्रप्राप्तीच्या मार्गात काही अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. पत्‍नी बरोबर तीर्थयात्रा करत ते इ.स.१३२४ मध्ये मोरगावला आले. मोरगावला ‘भूस्वानंद’ म्हणतात. श्री वामनभट्ट यांनी ठरवले की पुत्र प्राप्ती साठी संकल्प करून अनुष्ठान करायचे, व तपश्चर्या करून श्रीमयूरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. असा  संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला. अश्याप्रकारे त्यांनी ४ तप {४८ वर्ष} अनुष्ठान केले. एकेदिवशी पहाटे साक्षात तेजोनिधी मयूरेश्वर त्यांच्या समोर प्रकट झाले व म्हणाले “वामना तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला, तरी मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन”. वामनभटांची तपश्चर्या फळाला आली. भक्तीच्या वेलीला साक्षात्कारचे फूल उमलले. प्रत्यक्ष मयूरेश्वर पुत्र रूपाने आपल्या घरात नांदणार या परते भाग्य कुठले?

मोरया गोसावी यांचे कल्पनाचित्

थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती झाल्या व नवमासपूर्ण होताच श्री शालिवाहन शके १२९७ सन.१३७५, विधातरू नाम संवत्सर, माघ शुद्ध चतुर्थी, शुक्रवारी रेवती नक्षत्र, द्वितीय चरण माध्यान काळी पार्वतीबाई प्रसूत झाल्या. मयूरेश्वर रूपाने मुलाची प्राप्ती झाली, मुलाचे नाव ‘मोरेश्वर’ असे ठेवले सर्वजण प्रेमाने त्याला ‘मोरया’ म्हणत. वयाच्या ८ व्या वर्षी मोरयांची मुंज झाली. मोरया रोज त्रिकाल संध्या, गायत्री जप, सूर्योपासना, अग्निउपासना आणि अनुष्ठान करण्यात मग्न होऊ लागले. त्यांनी अष्टविनायक यात्रा करण्याचे ठरविले. अष्टविनायकातील प्रत्येक क्षेत्री ते अनुष्ठान करीत व त्या गणपतीचे तेज आपल्या हृदयात साठवून ठेवत व पुढे जात. या मागे भविष्यातील एक संकेत होता. गणेशभक्तांना अष्टविनायकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे हा हेतु होता. स्वतः मोरया गोसावी गणपतीचे अवतार होते व पुढील सात पिढ्यांमध्ये गणेशाचे अंशरूपाने अस्तित्व होते. अष्टविनायक यात्रा पूर्ण होताच श्री मोरयाना श्री सदगुरू नयन भारती गोसावी यांचे रूपाने सद्गुरू प्राप्ती झाली. व त्यांना श्री नयन भारती गोसावी यांनी कफनी, रुद्राक्षाची माळ, कमंडलू दिले व मंत्रउपदेश देत श्री मोरयांना नाथपंथ संप्रदायाची दीक्षा दिली. मोरया गोसावी बनले. ’गो’ म्हणजे इंद्रिये, त्यांच्या स्वाधीन झाली. शमदम संपन्न गोसावी अष्टमहासिद्धी प्राप्त करून मोरगावला आले. त्यांच्या सिद्धी गोरगरिबांच्या, दीन दुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागल्या. ’बहुत जनासि आधारू’ झालेल्या त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य हो‍ऊ लागले. त्यामुळे लोक त्यांना ‘गोसावी’ संबोधू लागले.

मोरया गोसावींचा सगळीकडे मोठा बोलबाला झाला. पण यात जनाची उपाधि वाढली. ध्यानधारणेला वेळ मिळेना. एक दिवस अचानक मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलात आले. त्याचवेळी श्री मयूरेश्वराने दृष्टांत दिला की, “तू आता पवना नदीच्या तिरावर असलेल्या चिंचवड गावी जाऊन रहा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीस मोरगाव वारीस येत जा”. नंतर त्यांनी ताथवडे येथील केजूबाई मंदिर येते वास्तव्य केले. एकांतात ध्यानधारणा करू लागले. पण नियती काही वेगळीच होती. चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले. आजचा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली. त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले.प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत व मजल दर मजल करत मोरगावला जात. चतुर्थीला मोरयाची पूजा करत. पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत. मयूरेश्वराच्या आज्ञे प्रमाणे श्री मोरया गोसावी महाराज चिंचवड ते मोरगाव वारी करू लागले. श्री मयूरेश्वराच्या आज्ञे प्रमाणे श्री मोरयांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला व वयाच्या ९६ व्या वर्षी विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे नाव उमा असे ठेवण्यात आले. पुढे श्री थेउरच्या चिंतामणीने आशीर्वाद दिल्या प्रमाणे श्री मोरयांच्या १०४ व्या वर्षी श्री.मोरया व उमा मातांच्या पोटी श्री चिंतीमणीने जन्म घेतला. श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज वयाच्या ११७ व्या वर्षा पर्यंत मयूरेश्वराची आराधना करत न चुकता मोरगावची वारी करत होते.

पण वयोवृद्ध झाले कारणाने एकदा त्यांना वारीला जाताना मोरगावास पोहोचायला उशीर झाला. मंदिराचे दार पूजाऱ्यांनी बंद केले होते. श्री मोरया तिथेच आसलेल्याला तरटीच्या झाडा खाली बसून व्याकूळ होऊन मयूरेश्वरचा धावा करू लागले, त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. “तुझीये भेटीची बहू आस रे मोरया, देखीता बहुत झाले दिवस रे मोरया” हा धावा मयूरेश्वरानी ऐकला व पालनहार श्री मयूरेश्वर मोरयांच्या समोर प्रकट झाले व मोरयांना म्हणाले, “अरे मोरया कशासाठी एवढा अट्टहास करतोस, आपल्यातले द्वैतअद्वैत संपले आहे. आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरला नाही. तू आणि मी एकच आहोत”, असे म्हणून श्री मयूरेश्वराने त्यांना सांगितले, “तू आता वृद्ध झालास, तुला आता मोरगावास येण्याची गरज नाही, मीच तुझ्या बरोबर चिंचवडला येतो”. दुसऱ्या दिवशी कऱ्हा नदीत सूर्याला दुसरे अर्घ्य देत आसताना तांदळा रूपी श्री मंगलमूर्ती हातात प्रकट झाले, आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली, “हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील”  आणि तेव्हा पासून, “मंगलमूर्ती मोरया” हा जयघोष प्रचलित झाला.

हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला. अन्नदानाला मोरया महाराज फार महत्व देत. अन्नसत्र, यात्रा-उत्सव, पूजा-अर्चा यामुळे चिंचवड सदाच गजबजू लागले. श्री मोरया गोसावी महाराज यांना जनसंपर्कामुळे साधनेत व्यत्यय येत होता. त्यांनी मयूरेश्वरा कडे संजीवन समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री मयूरेश्वराने त्यांना परवानगी दिली. त्यांच्या आज्ञेनुसार  सन १५६१ मार्गशीर्ष वद्य षष्ठी रोजी चिंचवडला पवनेच्या काठी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यावेळी श्री महाराजांचे वय १८६ वर्ष इतके होते. पवनेचा काठ पवित्र झाला. दर्शनासाठी भक्‍तांची पावले चिंचवड कडे वळू लागली.

श्री मोरयाना चिंतामणी नावाचा मुलगा होता,तो गणेशावतार होता. संपूर्ण महाराष्ट्रात श्री मोरया गोसावी महाराज व श्री महाराज ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवन समाधी दक्षिणवाहिनी नदीपाशी आहे.श्री मोरयांनी संजीवन समाधी घेतल्या नंतर त्यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव यांनी समाधीवर श्रीगणेशाची स्थापना करून मंदिराची उभारणी केली. प्रमाणे संजीवन समाधी आणि हे मंदिर गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण आहे.