लीळाचरित्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंडित म्हाइंभट सराळेकर हे लीळाचरित्राचे कर्ते आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे. रचना इ. स. १२००.हा काळ लीळाचरित्र रचनेचा आहे याचा संदर्भ कोलते लीळाचरित्र वरून

परिचय[संपादन]

एकांक-पूर्वार्ध-उत्तरार्ध असे या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. एकांकात ७४, पूर्वार्धात ३५८, उत्तरार्धात ४८८ अशा साधारणपणेअ ९५० लीळांचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ चरित्रात्मक असून, श्रीचक्रधरांच्या जीवनाचा सर्वांगी रेखाटलेला आलेखच होय. त्यांचे उद्गार, वचने ही सांप्रदायिक सूत्रेच होय. 'लीळाचरित्र' म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे सामजिक, सांस्कृतिक, धार्मिक, तात्त्विक, वाङ्मयीन चित्ररूप दर्शन होय. [१] श्रीचक्रधरांचे चरित्र हा या ग्रंथाचा विषय आहे. लीळाचरित्राच्या यशाचे निम्मेअधिक श्रेय श्रीचक्रधरांच्या व्यक्तिमत्त्वाला जाते. तत्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र लीळाचरित्रात उमटलेले आहे. त्यावेळचा समाज, चालीरीती, व्रतवैकल्ये, सणवार, वस्त्रेप्रावरणे, खाणीपिणी, नाणीगाणी, व्यापारटापार इत्यादी विविध अंगांचे दर्शन व स्थितिगती याची चांगली कल्पना लीळाचरित्रातून येते. नागदेव, बाइसे, आउसे, सारंगपंडित, जानोपाध्ये इ. अनेक व्यक्तींची स्वभावचित्रे या ग्रंथात आहेत. चरित्रकार म्हाइंभट चतुरस्र, साक्षेपी, कष्टाळू, प्रामाणिक, भावनिष्ठ शैलीकार आहे. लीळाचरित्राची प्रेरणा नागदेवाचार्य - म्हाइंभट संवादात आहे. भाषा, इतिहास, साहित्य, समाजदर्शन, तत्त्वज्ञान या सर्वच दृष्टींनी या ग्रंथाचे महत्त्व जाणवते.


लीळाचरित्र एक दृष्टिक्षेप[संपादन]

लीळाचरित्र महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल ११७८ च्या आसपास. लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे. ९०० पासून 1837 पर्यंत ही संख्या आढळते. एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध असे लीळाचरित्राचे तीन विभाग करण्यात आले. लीळाचरित्राच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील लीळा अनेक शिष्यांकडून मिळाल्या पण त्यांच्या एकाकी अवस्थेतील लीळा कोणालाच ज्ञात नव्हत्या. महदाईसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्वायुष्यातील लीळा मग म्हाईंभटाने मिळवल्या. चक्रधरस्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांची वैविध्यपूर्ण माहिती या चरित्रग्रंथातून व्यक्त झाली आहे. चक्रधरस्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्त्व यातून साकार झाले आहे. चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे कसे आले याची माहिती म्हणजे लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान, चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी लीळाचरित्रातून साकार झाल्या आहेत. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत. लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमघून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळचे भोजनपदार्थ, वस्त्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार,कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. लीळाचरित्रात चक्रधरांचे व्यक्तिचित्र व त्या अनुषंगाने गोंविदप्रभू, महदंबा, नागदेव इत्यादींची रेखाटलेली स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटाने केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात.

वि.भि कोलते संपादित लीळाचरित्रावर न्यायालयाची बंदी[संपादन]

डॉ. वि.भि. कोलते यांनी संपादित केलेले लीळाचरित्र महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने इ.स. १९७८मध्ये प्रकाशित केले. या लीळाचरित्रात हिंदू देवी-देवतांची विटंबना करण्यात आली असून स्त्रियांची बदनामी करण्यात आल्याचे कोलते विरोधकांचे म्हणणे होते. वारकरी संप्रदायाचा विठ्ठल हा देव चोर, दरोडेखोर असून स्त्रियांचा भोग घेणारा होता, किंवा संत ज्ञानेश्वर यांना झोटिंग म्हणजे भूत प्रसन्न होते म्हणून ते चमत्कार दाखवायचे, अशा लिखाणाबरोबरच महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींची विकृत प्रतिमा ग्रंथात रचली होती. अशा आक्षेपार्ह लिखाणामुळे वारकरी, महानुभाव पंथीयांच्या भावना दुखावल्या गेल्या. हे सर्व सवंग लिखाण डॉ. कोलते यांनी स्वतःच्या मताने काही प्रक्षिप्‍त पोथ्यांच्या आधारे केले होते.

त्या लिखाणाचा संदर्भ देऊन १९८०मध्ये दर्यापूरकरबाबा आणि इतर चार जणांनी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि डॉ. वि.भि. कोलते यांच्या विरोधात अमरावतीच्या सत्र न्यायालयात दावा दाखल केला. दाव्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्र सरकारने ग्रंथाच्या मुद्रण-प्रकाशनावर बंदी घातली. दाव्याच्या तब्बल १७ वर्षांनी १९९७ला सत्र न्यायालयाचे न्या. कुळकर्णी यांनी निकाल घोषित करून कोलते यांना २५ हजार रुपये व त्यावर १२ टक्के व्याज असा दंड करण्यात आला होता. तसेच कोलते संपादित लीळाचरित्राच्या सर्वच्या सर्व प्रती जप्‍त करण्यात याव्यात आणि वादींचा व शासनाचा सर्व खर्च कोलते यांनी द्यावा, असा निकाल न्या. कुळकर्णी त्यांनी दिला होता. शासनाने उपरोक्त निर्णय मान्य करून निर्णयाविरुद्ध अपिलात जाणार नाही, असा निर्णय विधानसभेत जाहीर करून ग्रंथाच्या सर्व प्रती जप्‍त करण्यात याव्यात, असे आदेश सर्व महाविद्यालये, विद्यापीठे आणि ग्रंथालयांना दिले होते.

पुन्हा १९९८ला अमरावती सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात डॉ. कोलतेंनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले व त्यावेळेस त्यांना समर्थन म्हणून काही महंतांनी त्यांच्या बाजूने रदबदली केली. त्यानंतर १९९९ला पुन्हा अमरावती सत्र न्यायालयाचा निकाल कोलतेंच्या विरुद्ध गेला. कोलते मरण पावल्यामुळे त्यांच्या मुलांनी व समर्थक महंतांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. या मंडळींनी हा खटला पुनर्विचारार्थ अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात पाठवण्याची विनंती केली. यावर न्या. श्रीमती अंजू शेंडे यांनी दिलेल्या निकालात कोलते व कोलतेसमर्थक महंताचे अपील फेटाळून अमरावतीच्या सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यात २५ हजार रुपये दंड आणि १९८०पासूनचे त्यावरील १२ टक्क्याने व्याजाचा दंड शासनाकडे जमा करून त्याचा उपयोग महानुभाव पंथाच्या संशोधन व अभ्यासासाठी खर्च करण्यात यावा, अशी सुधारणा न्यायाधीश शेंडे यांनी केली आहे.

भाष्य[संपादन]

Mahanubhvache yogdhan : Dr. Shridhar Akashkar, Shehvardhan publishing house, pune

हे सुद्धा पहा[संपादन]


  1. ^ पाटील, डॉ. बी. एन्. (२००९). प्राचीन महाराष्ट्र वाङ्मय वैभव. जळगाव: प्रशांत पब्लिकेशन्स्. pp. १९२-१९३.